PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 09 SEP 2020 7:51PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 9 सप्टेंबर  2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातल्या पथ विक्रेत्यांबरोबर ‘स्वनिधी संवाद’ साधला. कोविड-19 महामारीमुळे पथ विक्रेत्यांच्या व्यवसायावर खूप मोठा परिणाम झाला आहे, त्यांना आता पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत व्हावी, यासाठी सरकारने दि. 1 जून, 2020 रोजी ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना’ सुरू केली. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी मध्य प्रदेशातल्या 4.5 लाख पथ विक्रेत्यांनी आपली नावे नोंदविली होती. त्यापैकी 1.4 लाख पथ विक्रेत्यांना मंजुरी देण्यात आली असून त्यांना व्यवसायासाठी 140 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) डिजिटल पद्धतीने  सुरू करणार आहेत. पंतप्रधान ई-गोपाला अ‍ॅप देखील सुरू करणार आहेत, हे ऍप्प  शेतक ऱ्यांच्या  थेट वापरासाठी एक व्यापक प्रजनन  सुधारणा बाजारपेठ आणि माहिती पोर्टल आहे. तसेच  बिहारमध्ये मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रातील इतरही अनेक उपक्रम पंतप्रधानांच्या हस्ते सुरु केले जाणार  आहेत.

पायाभूत गुंतवणूक न्यासाच्या माध्यमातून पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहाय्यक कंपन्यांच्या मालमत्तेद्वारे उत्पन्नाला मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने या निर्णयाला मान्यता दिली.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :

एका दिवसात सर्वाधिक, जवळपास 75,000 कोविडचे रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली असतानाच, त्याच दिवशी दुसरीकडे सर्वाधिक कोविड-19 चाचण्या करण्याचा विक्रम देखील घडला आहे. गेल्या 24 तासांत 11.5 लाखाहून अधिक कोविड नमुन्यांची चाचणी घेण्यात आली.

भारत हा अशा काही देशांपैकी एक आहे जिथे दैनंदिन चाचणी संख्या सर्वाधिक आहे. दैनंदिन चाचणी क्षमता 11 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत 11,54,549 चाचण्या घेण्यात आल्या असून भारताने राष्ट्रीय निदान क्षमता आणखी बळकट केली आहे.

या कामगिरीमुळे एकत्रित चाचण्यांचा आकडा 5.18 कोटींच्या पुढे गेला आहे. (5,18,04,677)

मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या देशव्यापी चाचण्यांमुळे, वेळेवर निदान होत असल्याने रुग्णांना योग्य उपचारांसाठी अचूक वेळी अलगीकरण किंवा रुग्णालयात दाखल केले जात आहेत. यामुळे मृत्यू दर (आज 1.69%) कमी झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

विस्तारीत नैदानिक प्रयोगशाळांचे नेटवर्क आणि विविध उपायांद्वारे देशभरात सुलभ चाचणीच्या सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. या कामगिरीवर आधारित, प्रति दशलक्ष चाचण्यांमध्ये (टीपीएम) वाढ होऊन ती  37,539 झाली आहे.

जानेवारी 2020 मध्ये पुण्यात केवळ एक चाचणी प्रयोगशाळा होती;  देशातील चाचणी प्रयोगशाळांचे नेटवर्क निरंतर बळकट होत असून आज देशात 1678 प्रयोगशाळा आहेत, त्यात सरकारी क्षेत्रातील 1040 आणि  खाजगी क्षेत्रातील 638 प्रयोगशाळा आहेत. यामध्ये:

रिअल-टाइम आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा : 854 (सरकारी 469 + खासगी: 385)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 703 (सरकारी : 537 + खाजगी: 166)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा :121   (सरकारी: 34 + खासगी: 87)

गेल्या 24 तासांत कोरोना रूग्ण बरे होण्याचा भारतामध्ये नवा विक्रम झाला आहे. एका दिवसामध्ये 74,894 कोविड-19 रुग्ण बरे झाले आहेत.

याबरोबरच भारतामध्ये आता पूर्ण बरे झालेल्या एकूण रूग्णांचा आकडा 33,98,844 झाला आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.77 टक्के झाले आहे. तसेच दर आठवड्याला रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामध्ये जुलै,2020 मध्ये 1,53,118 रूग्ण बरे झाले होते. आता या प्रमाणात सुधारणा झाली आहे. सप्टेंबर 2020च्या पहिल्या आठवड्यामध्ये 4,84,068 रूग्ण बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे संक्रमित झालेली 89,706प्रकरणे आली आहेत. त्यामध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये 20,000 पेक्षा जास्त कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. तर आंध्र प्रदेशामध्ये 10,000 पेक्षा जास्त रूग्ण आढळले आहेत. नवीन कोरोना रूग्णांपैकी 60 टक्के रूग्ण पाच राज्यांमध्ये सापडले आहेत.

आजच्या तारखेला देशामध्ये 8,97,394 संक्रमित रूग्ण आहेत. यामध्ये सर्वात जास्त रूग्ण महाराष्ट्रात आहेत. 2,40,000 पेक्षा जास्त रूग्ण महाराष्ट्रात आहेत. त्याखालोखाल कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी 96,000 पेक्षा जास्त रूग्ण आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या पाच राज्यांमध्ये मिळून देशातल्या एकूण कोविड-19रूग्णांपैकी 61 टक्के संक्रमित रूग्ण आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये देशात या आजारामुळे 1,115 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. महाराष्ट्रात 380 जणांचे आणि त्याखालोखाल कर्नाटकमधल्या 146 जणांचे निधन झाले आहे. तर तामिळनाडूमध्ये 87 जणांचे निधन झाले आहे.

इतर अपडेट्स:

महाराष्ट्र अपडेट्स :

तीन महिन्यांहून अधिक काळात प्रथमच, महाराष्ट्रातील कोरोना विषाणूने संक्रमित रुग्णांची संख्या आता संपूर्ण देशापेक्षा वेगवान गतीने वाढू लागली आहे. महाराष्ट्रातील दैनंदिन वाढीचा दर 2.21 टक्क्यांवर गेला आहे, तर राष्ट्रीय पातळीवर हा दर 2.14 टक्के राहिला आहे. दररोज सुमारे 10000 ते 12000 रुग्णांची नोंद होणाऱ्या महाराष्ट्रात आता 20000 हून अधिक प्रकरणांची नोंद होऊ लागली आहे. पुण्यात दररोज 4 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे, जी देशात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या 2,43,809 इतकी आहे. पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, शहरात 7,099 इमारती सील करण्यात आल्या आहेत, तर प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 568 आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व ऑक्सिजन उत्पादकांना   80 टक्के उत्पादन वैद्यकीय उद्देशासाठी वापरण्याचे निर्देश दिले आहेत. ऑक्सिजन सिलेंडरचा काळा बाजाहोत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभाग, उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस अधिकाऱ्यांची तुकडी ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांवर देखरेख ठेवण्यासाठी तैनात करण्यात आली आहे.

RT/ST/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1652747) Visitor Counter : 202