PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
11 AUG 2020 7:53PM by PIB Mumbai
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
दिल्ली-मुंबई, 11 ऑगस्ट 2020
पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत सद्यस्थितीवर आणि साथीच्या आजारावर उपाययोजना आखण्यासाठी चर्चा केली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या दहा राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रतिनिधींशी सद्य परिस्थिती आणि कोविड-19 साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी उपाययोजना आखण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
पूर्वीप्रमाणेच ठरविल्या प्रमाणे आणि माहिती दिल्याप्रमाणे, नियमित प्रवासी आणि उपनगरी रेल्वे सेवा पुढील सूचना येईपर्यंत स्थगित राहतील ही बाब सर्व संबंधित लोकांच्या निदर्शनाला आणून द्यावयाचे आहे. सध्या सुरु असलेल्या 230 विशेष गाड्या सुरूच राहतील याची नोंद घेतली जावी. सध्या राज्य सरकारच्या मागणीनुसार मर्यादित संख्येने चालविल्या जाणार्या मुंबईतील लोकल गाड्याही सुरू ठेवण्यात येणार आहेत.विशेष गाड्यांच्या वापरावर नियमितपणे लक्ष ठेवले जात आहे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त विशेष गाड्या चालविल्या जाऊ शकतात. लॉकडाऊनपूर्वी सुरु असलेल्या सर्व नियमित आणि उपनगरीय गाड्या सध्या रद्द करण्यात आल्या आहेत.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
प्रतिबंधक धोरणांची यशस्वी अंमलबजावणी, आक्रमक पावलं उचलत केलेल्या व्यापक चाचण्या आणि कोविडच्या गंभीर रुग्णांवर उपचारांवेळी केलेले प्रमाणित वैद्यकीय व्यवस्थापन, या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्याने वाढ होऊन तो सुमारे 70 टक्क्यांवर पोहोचला आहे.
कोरोनाचे अधिकाधिक रुग्ण बरे होत असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडले जात आहे. तसेच लक्षणविरहीत किंवा कमी लक्षणे असलेले रुग्ण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. यामुळे आतापर्यंत देशात 15,83,489 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांत 47,746 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
सध्या देशभरात 6,39,929 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. हे प्रमाण एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत केवळ 28.21% एवढे आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढत असल्यामुळे, बरे होणारे रुग्ण आणि सक्रीय रुग्णांमधील तफावत आणखी वाढून सुमारे 9.5 लाख इतकी झाली आहे. भारताच्या टेस्ट, ट्रॅक, ट्रीट या धोरणाचे अपेक्षित सकारात्मक परिणाम दिसत असून त्यामुळेच ही तफावत वाढलेली दिसत आहे.
रुग्णालयातील सुधारित आणि परिणामकारक वैद्यकीय उपचारपद्धती, रुग्णालयात रूग्णांना आणण्यासाठीची रुग्णवाहिका सेवा सुधारुन अधिक समन्वय आणणे आणि कोविडच्या रुग्णांना तत्काळ उपचार मिळतील, अशी व्यवस्था करणे, अशा उपाययोजना सातत्याने केल्या गेल्या. परिणामी, कोविडचा मृत्यूदर, जागतिक मृत्यूदराच्या तुलनेत सातत्याने कमी राहिला आहे. आज हा दर 2 % पेक्षा खाली जात 1.99% पोहोचला आहे.
इतर अपडेट्स:
- भविष्य हे सर्वार्थाने डिजिटल तंत्रज्ञानाच्या परिवर्तनाचे असेल त्यामुळे कोविड-19 ने देशाला रोखण्याऐवजी त्या बदलाचा भाग होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे असे मत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव, प्राध्यापक आशुतोष शर्मा यांनी व्यक्त केले. कोविड-19 काळातील डिजिटल परिवर्तन या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते. “डिजिटल तंत्रज्ञान आणि यंत्रांचा वापर देशाला नवीन उंचीवर नेऊ शकेल आणि पंतप्रधानांचे ‘आत्मनिर्भर भारताचे’ स्वप्न साकार होईल,” असा विश्वास प्राध्यापक शर्मा यांनी व्यक्त केला. सार्वजनिक उपक्रमांच्या स्थायी परिषदेने (एससीओपीई) आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते म्हणाले कि डेटा हा नवीन मंत्र आहे आणि आपल्या प्रगतीसाठी डेटाचा वापर करणे आपल्याला आवश्यक आहे.
- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उपराष्ट्रपतींच्या तिसऱ्या वर्षाच्या कारकीर्दीचा आढावा घेणारे ‘कनेक्टिंग, कम्युनिकेटिंग, चेंजिंग’ या ईपुस्तकाचे आज प्रकाशन केले. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या पुस्तकाच्या कॉफी टेबल आवृत्तीचेही प्रकाशन करण्यात आले. नवी दिल्लीतील उप-राष्ट्रपती निवास स्थानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
- ‘उमंग’ म्हणजेच, नव्या युगातील प्रशासनासाठीचे एकीकृत मोबाईल ॲप्लिकेशन (UMANG) च्या माध्यमातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO)च्या ग्राहकांना कोविड आजाराच्या संकटकाळात त्यांच्या घरूनच विनासायास सेवा मिळाली आहे. सध्या प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांना उमंग ॲपच्या माध्यमातून इपीएफओ च्या 16 विविध सेवा मिळत आहेत. या ॲपवरुन आपल्या निधीसाठी दावा करु शकतात, दावा मंजूर होण्याच्या प्रक्रीयेचा पाठपुरावा करु शकतात. कोविड-19 च्या काळात म्हणजे एप्रिल ते जुलै 2020 मध्ये, उमंग ॲपवरुन 11.27 लाख दावे केले गेले. कोविडपूर्वीच्या काळाच्या तुलनेत यात 180% टक्के वाढ आहे. डिसेंबर 2019 ते मार्च 2020 या कालावधीत 3.97 लाख दावे करण्यात आले.
- केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहारमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन (एनआयपी)साठीच्या ऑनलाईन डॅशबोर्डचे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन केले. भारतीय पायाभूत प्रकल्पासंबंधीची माहिती सर्व भागधारकांना एकाच ठिकाणी मिळावी यादृष्टीने ऑनलाईन डॅशबोर्डची सुरुवात करण्यात आली आहे. इंडिया इन्वेस्टमेंट ग्रीडच्या (IIG) (www.indiainvestmentgrid.gov.in).संकेतस्थळावर डॅशबोर्ड उपलब्ध आहे. आयआयजी एक संवादात्मक आणि डायनॅमिक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे जो देशातील अद्ययावत आणि रिअल-टाइम गुंतवणूक संधींची माहिती पुरवतो.
- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आत्मनिर्भर भारत सप्ताहांतर्गत संरक्षण पीएसयू आणि ओएफबीचे(दारुगोळा फॅक्टरी) आधुनिकीकरण आणि नवीन पायाभूत सुविधांचा डिजीटल माध्यमातून शुभारंभ केला. संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून यात सहभागी झाले. याप्रसंगी संबोधित करताना राजनाथ सिंग म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाचे आवाहन केले आहे आणि त्यांचे 5-I चे सूत्र हेतू (Intent), समावेश (Inclusion), गुंतवणूक (Investment), पायाभूत सुविधा (Infrastructure) आणि नवोन्मेष (Innovation)’ अर्थव्यवस्थेला उच्च विकास मार्गावर आणतील. ते म्हणाले, सरकारने कोविड-19 काळात, आयातीसंबंधी नकारात्मक यादी, थेट परकीय गुंतवणूक मर्यादा वाढवणे, देशांतर्गत भांडवली खरेदीसाठी स्वतंत्र निधी आणि स्वदेशीकरणावर भर असे वेळीच आणि विचारपूर्वक निर्णय घेतले.
- केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री यांच्या हस्ते पाच दिवसीय आभासी जलद विक्री होणाऱ्या दैनंदिन वापरातील वस्तूंच्या (FMCG) पुरवठा साखळी एक्स्पो 2020 चे उद्घाटन झाले. यावेळी बोलतांना गोयल यांनी सांगितले की, कोविड-19 च्या नंतरच्या जगातली वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावी लागेल. जग आता बदलले आहे. या कोविडच्या अनुभवातून संपूर्ण जग आता काही नव्या गोष्टी शिकणार आहे आणि काही जुन्या गोष्टी विसरणारही आहे. “आपण आता स्वच्छता नियमांचे पालन करत जगायला शिकू, तंत्रज्ञानाचा वापर करु. आता आपण आपल्या व्यवसायातही अधिक अचूकता, दक्षता आणि सजगता वाढवायला शिकू,” असे गोयल यांनी सांगितले.
- केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’ नवी दिल्लीतून, “आत्मनिर्भर मध्यप्रदेश- आरोग्य आणि शिक्षण’ या वेबिनार मध्ये सहभागी झाले होते. 12 मे 2020 रोजी पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली. सध्या जगाची जी स्थिती आहे, त्यातून आपल्याला स्वयंपूर्ण व्हा, असाच धडा मिळतो आहे, असे शिक्षणमंत्री यावेळी बोलतांना म्हणाले. ‘एषःपन्थाः’ म्हणजे आत्मनिर्भर भारत असे आपल्या प्राचीन वाङ्मयात लिहिले आहे. सध्याच्या संकटकाळात, शिक्षणक्षेत्रानेही अनेक उपक्रम राबवण्याची संधी घेतली आहे, असे पोखरियाल यांनी सांगितले.
महाराष्ट्र अपडेट्स :
कोविड 19 च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सिरो- सर्वेक्षण अभ्यासाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात आरटी-पीसीआर चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईत गेट वे ऑफ इंडिया ते रायगड जिल्ह्यातील मांडवा ते सागरी रुग्णवाहिका सेवा राज्य सरकार वेगवान करणार आहे. या सेवेमुळे या दोन्ही जिल्ह्यादरम्यानचा साडे तीन तासांचा प्रवास अर्ध्या तासाने कमी होणार आहे. राज्यात 9,181 नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या 5,24,513 इतकी झाली आहे. राज्यात 1,47,735 सक्रिय रुग्ण असून एकूण 3,58,421 रुग्ण बरे झाले आहेत. कोविडमुळे राज्यात 18050 मृत्यू झाले आहेत.
FACT CHECK
* * *
B.Gokhale/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1645131)
Visitor Counter : 257
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam