शिक्षण मंत्रालय
“आत्मनिर्भर मध्यप्रदेश- आरोग्य आणि शिक्षण” या वेबिनारमध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री सहभागी
Posted On:
10 AUG 2020 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2020
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’ आज नवी दिल्लीतून, “आत्मनिर्भर मध्यप्रदेश- आरोग्य आणि शिक्षण’ या वेबिनार मध्ये सहभागी झाले होते. 12 मे 2020 रोजी पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली. सध्या जगाची जी स्थिती आहे, त्यातून आपल्याला स्वयंपूर्ण व्हा, असाच धडा मिळतो आहे, असे शिक्षणमंत्री यावेळी बोलतांना म्हणाले. ‘एषःपन्थाः’ म्हणजे आत्मनिर्भर भारत असे आपल्या प्राचीन वाङ्मयात लिहिले आहे. सध्याच्या संकटकाळात, शिक्षणक्षेत्रानेही अनेक उपक्रम राबवण्याची संधी घेतली आहे, असे पोखरियाल यांनी सांगितले.
कोविडच्या काळात शिक्षण मंत्रालयाने राबवलेल्या खालील उपक्रमांची त्यांनी माहिती दिली:
- मध्यान्ह भोजन : कोविडमुळे शाळा बंद असतांना मुलांना पुरेसा पोषक आहार मिळावा आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहावी यादृष्टीने, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लाभार्थी विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन अथवा त्याच्याशी समान इतका अन्नसुरक्षा भत्ता दिला जावा अशा सूचना देण्यात आल्या होत्या.
- व्हेंटीलेटर्स, चाचण्यांची कीट, मास्क, सैनीटायझर, मोबाईल आधारित संपर्क शोध ऐप, विविध वेब पोर्टल्स अशी साधने आणि सुविधा विकसित करण्यात उच्चशिक्षण संस्थांनी अजोड काम केले. आयआयटी च्या पूर्व विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या कोविड चाचणी कीटचे , महाराष्ट्रात उद्घाटन करण्यात आले.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मुळे देशाच्या शैक्षणिक व्यवस्थेतील सर्व पैलूंमध्ये मोठ्या सुधारणा होणार आहेत, असे त्यांनी सांगितले. गेल्या तीन दशकांपासून चालत आलेल्या शिक्षणव्यवस्थेत बदल करुन जागतिक शिक्षण व्यवस्थेच्या दर्जानुसार ही शिक्षणव्यवस्था केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. नव्या शिक्षण धोरणात, पारंपारिक आणि आंतरशाखीय शिक्षणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जागतिक शिक्षणजगताशी स्पर्धा करण्यास भारतीय मुलांना सक्षम करणे त्याशिवाय त्यांना देशातील मूल्ये, संकृती आणि भाषांची शिकवण देणे असे दुहेरी हेतू या धोरणातून साध्य होणार आहेत. या शिक्षण धोरणात स्पष्ट दृष्टीकोन आणि निश्चित उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत, असे पोखरीयाल यांनी सांगितले.
राष्ट्रीय शिक्षण धोरण हा सर्वसमावेशक आणि व्यापक मसुदा असून विद्यार्थ्याची सर्वांगीण प्रगती करत त्यांना जागतिक स्पर्धेसाठी सक्षम करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. शिक्षण हे समवर्ती स्वरूपाचे असते, हे लक्षात घेऊन, या शिक्षण धोरणात व्यापक दिशा दाखवण्यात आली आहे. यात प्रस्तावित सुधारणांची अंमलबजावणी केंद्र आणि राज्यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच होऊ शकेल, असेही पोखरीयाल यांनी सांगितले.
M.Chopade/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1644867)
Visitor Counter : 255