PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
22 JUL 2020 7:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली-मुंबई, 22 जुलै 2020
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मणिपूर पाणीपुरवठा प्रकल्पाची पायाभरणी करतील. मणिपूरचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, तसेच काही खासदार आणि आमदार इम्फाळ येथून या कार्यक्रमात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे."हर घर जल" या बोधवाक्याला अनुसरून 2024 सालापर्यंत देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येक घरात सुरक्षित आणि पुरेसे पेयजल पोहोचविण्यासाठी भारत सरकारने जल जीवन अभियान सुरू केले आहे. या कार्यक्रमांतर्गत पाण्याचे पुनर्भरण आणि पुनर्वापर करण्यासाठी दूषित जलव्यवस्थापन, जलसंधारण, पावसाच्या पाण्याची साठवण अशा उपाययोजनाही राबविल्या जात आहेत.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
एकाच दिवसात सर्वाधिक म्हणजे 28,472 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे. शिवाय गेल्या 24 तासात बरे झालेल्या/ घरी सोडण्यात आलेल्या कोविड-19 रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. यासह, बरे झालेल्या रूग्णांची संख्या आता 7,53,049 इतकी आहे. यामुळे कोविड-19 रूग्णांमधील बरे होण्याचा दर 63.13 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
रुग्ण बरे होण्याच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे सक्रिय रुग्ण संख्येत (4,11,133 आजची संख्या) 3,41,916 पर्यंत फरक पडला आहे. हा फरक उतरोत्तर वाढत जाणाऱ्या प्रगतीचे निदर्शक आहे.
राष्ट्रीय पातळीवर रुग्ण बरे होण्याचा दर सुधारला असताना 19 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशामधील हाच दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.
बरे झालेल्या रुग्णांची सातत्याने वाढती संख्या, तसेच सक्रिय व बरे झालेल्या रूग्णांमधील वाढता फरक, या गोष्टीची साक्ष देतात, की केंद्राने अवलंबलेली व राज्य/ केंद्र शासित प्रदेश सरकारांनी राबवलेली धोरणे इच्छित परिणाम साधत आहेत. घरोघरी केलेले सर्वेक्षण, देखरेख ठेवणे, प्रभावी नियंत्रण योजना, असुरक्षित लोकांची तपासणी व विस्तारीत प्रसार-चाचणी यांच्या माध्यमातून बाधित रुग्ण लवकरात लवकर शोधण्यावर प्राथमिक लक्ष केंद्रित केले गेले आहे. तीन-स्तरीय आरोग्य पायाभूत सुविधा व उत्तम प्रकारे अंमलात आणलेल्या काळजी घेण्याच्या नियमावलीने रुग्णालय तसेच गृह-विलगीकरण यांच्याद्वारे प्रभावी उपचारांना मदत झाली आहे.
एम्स, नवी दिल्लीने, राज्ये/ केंद्र शासित प्रदेशांमधील उत्कृष्ट केंद्रांच्या सहाय्याने अति दक्षता विभागामधील रूग्णांचे उपचार करण्यास व काळजी घेण्यास मदत केली आहे; ज्यायोगे भारतात कोविड रुग्णांचे प्रमाण कमी राखणे शक्य झाले आहे. एम्स, नवी दिल्लीचा ‘ई-आयसीयू’ कार्यक्रम केंद्र-राज्य सहकार्याचा आणखी एक मार्ग आहे, ज्याचा उद्देश मृत्युदर कमी करण्याचा आहे. आठवड्यातून दोनदा आयोजित या ‘टेलि-कन्सल्टेशन’ सत्रांमुळे अति दक्षता विभागातील रूग्णांच्या व्यवस्थापनातील तज्ज्ञांच्यासमान अनुभव व तांत्रिक सल्ल्याद्वारे राज्यातील मोठ्या कोविड-19रुग्णालयांना मार्गदर्शन व आधार मिळत आहे. आरोग्य सेवा कर्मचार्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे रुग्ण बरे होण्याचा दर सुधारत आहे व मृत्यू प्रकरणांची संख्या सतत कमी होत आहे, जी सध्या 2.41% आहे.
इतर
- काकरापार अणु ऊर्जा प्रकल्प-3 चा निर्णायक टप्पा ( सामान्य परिचालन स्थिती) साध्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय परमाणु शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ होणार आहे. केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यावेळी उपस्थित राहतील. या कार्यक्रमात, गृहमंत्र्यांच्या हस्ते सहा निसर्ग उद्याने /पर्यटन स्थळांचा कोनशिला समारंभ होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एकाच वेळी 38 जिल्ह्यातील 10 कोळसा/दगडी कोळसा खाणी परिसरातील 130 स्थळी हे वृक्षारोपण होणार आहे.
- कोविड-19 या साथीच्या आजारामुळे चेहऱ्यावरच्या मास्कचा वापर सर्वांसाठी अनिवार्य ठरला आहे. मात्र, देशातील लोक जसजसे या सुरक्षा कवचाची सवय करुन घेत आहेत, त्यासोबत, त्याचे काही त्रासही जाणवू लागले आहेत. मात्र, उच्छवासासाठी हवा बाहेर जाण्याची वाट (व्हॉल्व्ह) दिलेल्या ॲक्टिव्ह रेस्पिरेटर मास्कमुळे श्वासोच्छवास घेणे आरामदायी आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील सुरक्षित झाले आहे. कोलकात्याच्या एस एन बोस राष्ट्रीय मूलभूत विज्ञान केंद्रातील प्राध्यापक समीर के पाल यांनी आपल्या चमूसह, संस्थेचे संचालक समीत कुमार रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मास्क तयार केला आहे. त्याशिवाय, या संस्थेतील विद्यार्थ्यानी एक नॅनो सॅनिटायझर देखील विकसित केले आहे.
- भारतीय हवाई दलाच्या कमांडर परिषद (एएफसीसी)चे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज करण्यात आले. हवाई दलाच्या मुख्यालयात (वायू भवन) येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले. हवाई दलाचे प्रमुख, एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी संरक्षण मंत्री व संरक्षण मंत्रालयाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याप्रसंगी स्वागत केले.
- ऑगस्ट 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या जल जीवन अभियानाच्या 2019-20 मधील 7 महिन्यांत, सुमारे 85 लाख ग्रामीण कुटुंबांना नळ जोडण्या देण्यात आल्या. तसेच कोविड-19 महामारी दरम्यान, अनलॉक-1 पासून आतापर्यंत 2020-21 मध्ये सुमारे 55 लाख नळ जोडणी देण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे दररोज सुमारे 1 लाख घरांना नळ जोडण्या दिल्या जात आहेत.आज पर्यंत 7 राज्ये - बिहार, तेलंगणा, महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि मिझोरम यांनी त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या घरगुती नळ जोडण्यांपैकी 10% पेक्षा जास्त उद्दिष्ट गाठले आहे.
महाराष्ट्र अपडेट्स
उद्धव ठाकरे सरकार मधील पाचवे मंत्री श्री अब्दुस सत्तार जे पशुधन विकासाचे राज्यमंत्री आहेत ते कोविड-19 पॉझिटिव आढळले आहेत. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस च्या राज्यसभेतील खासदार फौजिया खान या सुद्धा पॉझिटिव्ह आढळल्या आहेत आणि राज्यातील एकूण रुग्ण संख्या 3,27,031 वर पोचली आहे. परंतु राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या मंगळवारी 1,32,236 होती. मुंबईने 995 केसेस नोंद केल्या. चाचण्यांची संख्या सहा ते सात हजार चाचण्या प्रति दिन झाली आहे.
***
MC/SP/PM
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1640480)
Visitor Counter : 234