PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
09 JUL 2020 7:49PM by PIB Mumbai

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)



दिल्ली-मुंबई, 9 जुलै 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 'इंडिया ग्लोबल विक'च्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. सध्याच्या संकटाच्या काळाचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की, जागतिक पुनरुत्थानात भारत अग्रगण्य भूमिका बजावेल. ते म्हणाले की, दोन घटकांशी याचा निकटचा संबंध आहे. पहिले म्हणजे - भारतीय प्रतिभा आणि दुसरी म्हणजे सुधारणा तसेच पुनरुज्जीवन करण्याची भारताची क्षमता. त्यांनी हे स्पष्ट केले की, जगभरात भारताच्या कौशल्य-शक्तीचे विशेषतः भारतीय तंत्रज्ञान उद्योग आणि तंत्रज्ञान व्यावसायिकांच्या योगदानाला मान्यता प्राप्त झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या कोविड-19 च्या काळात मदतकार्य करणाऱ्या वाराणसीतील विविध स्वयंसेवी संस्थांशी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. वाराणसीसारख्या पवित्र आणि वरदायिनी नगरीत आशा आणि उत्साहाला बळ देत कोरोना महामारीशी दोन हात करत असल्याबद्दल पंतप्रधानांनी वाराणसी वासियांची प्रशंसा केली. सेवाभाव आणि धैर्य जागवत गरजूंना सतत मदत आणि सहकार्य कशा तऱ्हेने केले जात होते याबद्दल आपल्याला माहिती असल्याचे मोदी यांनी सांगितले. लागण होउ नये म्हणून करण्यात येणारे प्रयत्न, रुग्णालयातील परिस्थिती, अलगीकरणाची व्यवस्था, आणि स्थलांतरीत मजूरांना केलेली मदत याबद्दलही आपल्याला वेळोवेळी माहिती मिळत असल्याचे ते म्हणाले.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
कोविड-19 च्या प्रतिबंधनात्मक उपायांची लक्षणीय उपलब्धी म्हणजे, देशात कोविडच्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता सक्रीय रूग्णांपेक्षा 2,06,588 ने अधिक झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रीय रुग्णांच्या तुलनेत 1.75 म्हणजेच पावणेदोन पट (सुमारे दुप्पट) अधिक आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे एकूण 19,547 रुग्ण बरे झाले असून यामुळे आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 4,76,377 इतकी झाली आहे. रुग्णांशी संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यासाठीघरोघरी जाऊन केलेलं सर्वेक्षण, लवकर आजाराचे निदान आणि वेळेत अलगीकरण तसेच कोविड रुग्णांवर प्रभावी वैद्यकीय उपचार या सर्व उपाययोजनांना हा परिणाम आहे.

सध्या, देशभरात कोविडच्या 2,69,789 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
भारतात कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दरही सातत्याने वाढतो आहे. कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आज सुधारुन 62.09 टक्के इतका झाला आहे.
केवळ कोरोनारुग्णांची संख्या लक्षात घेऊन त्याआधारे, भारताची इतर देशांशी तुलना करणे योग्य ठरणार नाही. भारतात सध्या प्रती दशलक्ष लोकसंख्येमध्ये 195.5 रुग्ण इतकी असून ही जगातल्या इतर देशांच्या तुलनेत सर्वात कमी संख्या आहे. प्रतिबंधित क्षेत्र आणि बफर झोन यांना त्वरित आणि कार्यक्षमपणे वेगळे ठेवणे,आक्रमक पद्धतीने केलेल्या चाचण्या आणि वेळेत निदान तसेच वैद्यकीय प्रोटोकॉल्सचे पालन आणि आयसीयू/ रूग्णालय व्यवस्थापन या सर्व उपाययोजनामुळेच भारतात कोविड संक्रमणाचा परिणाम कमी जाणवतो आहे. तसेच देशातला कोरोना रुग्ण मृत्यूदर देखील जगात सर्वात कमी आहे. प्रतीदशलक्ष लोकसंख्येमागे भारतात सध्या कोरोनाचे 15.31 रुग्ण दगावत आहेत, म्हणजेच कोविडचा सरासरी मृत्यूदर 2.75%. आहे. मात्र आज जगात हा सरासरी 68.7. टक्के इतका आहे.
देशात चाचण्यांची संख्या देखील सातत्याने वाढते आहे. गेल्या 24 तासांत 2,67,061 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत देशभरात कोविडच्या 1,07,40,832 चाचण्या करण्यात आल्या. लोकसंख्येच्या प्रमाणात कोविडचे प्रमाण जाणण्यासाठीही काही चाचण्या करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय तसेच ICMR च्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे देशात कोविडच्या चाचण्यांची क्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे. सध्या देशभरात 1132 प्रयोगशाळा आहेत, त्यापैकी, 805 सरकारी तर 327 खाजगी प्रयोगशाळा आहेत. त्यांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :
- रियल-टाईम RT PCR आधारित चाचणी प्रयोगशाळा: 603 (सरकारी: 373 + खाजगी: 230)
- TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: 435 (सरकारी: 400 + खाजगी: 35)
- CBNAAT आधारित चाचणी प्रयोगशाळा: 94 (सरकारी: 33 + खाजगी: 61)
इतर अपडेट्स:
- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज कोविड-19 साठी विशेष नियुक्त करण्यात आलेल्या मंत्री समुहाची 18वी बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली.
- यावेळी प्रारंभी देशातल्या कोविड-19 विषयीच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. जागतिक तुलनेमध्ये सर्वात जास्त कोविड रूग्ण असलेल्या पाच देशांमध्ये आता भारत आला आहे. मात्र प्रती दशलक्ष लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार केल्यास भारतामध्ये कोविडचे सर्वात कमी (538) रूग्ण आहेत. तसेच भारतामध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही सर्वात कमी (15) आहे. जागतिक सरासरी आकडेवारीनुसार हे प्रमाण अनुक्रमे 1453 आणि 68.7 आहे. कोविडच्या सक्रिय म्हणजेच कोरोनाबाधित रूग्ण देशातल्या महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या आठ राज्यांमध्ये जवळपास 90 टक्के आहेत. तर 49 जिल्ह्यांमध्ये एकूण रूग्णसंख्येपैकी 80टक्के कोविड रूग्ण आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या सहा राज्यांमध्ये एकूण मृत्यूंपैकी 86 टक्के रुग्ण मृत्यू पावले आहेत. तर 32 जिल्हयांमध्ये एकूण 80 टक्के मृत्यू झालेले आहेत. या विशिष्ट भागामध्ये मृत्यूदर का जास्त आहे, याची माहिती यावेळी देण्यात आली.
- भारतीय नौदलाकडून 'ऑपरेशन समुद्र सेतू' पूर्ण : देशभर असलेल्या कोविड - 19 साथीच्या काळात राष्ट्रीय पातळीवरील प्रयत्नातून परदेशातील भारतीय नागरिकांना समुद्रमार्गे स्वगृही परत आणण्याच्या मोहिमेने यशस्वीपणे 3,992 भारतीयांना देशात आणले आणि मोहीम समाप्त झाली. ही ऑपरेशन समुद्र सेतू मोहीम 5 मे 2020 रोजी सुरू करण्यात आली होती. सुमारे 55 दिवसांपेक्षा अधिक काळ चाललेल्या या मोहिमेत भारतीय नौदलाच्या जलाश्व (लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक) आणि ऐरावत, शार्दूल आणि मगर (लँडिंग शिप टँक्स) या जहाजांनी भाग घेतला; सागरीमार्गे 23,000 किलोमीटरपेक्षा अधिक पल्ल्याचा प्रवास केला.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, कोरोना आपत्तीच्या काळात कुणीही उपाशी राहू नये याची काळजी घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाची गौरवपूर्ण स्तुती केली आहे. ट्वीटमध्ये अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत कोट्यावधी गरिबांना शिधा पुरवणाऱ्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला (पीएमजीकेवाय) नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
- केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ(CBDT)आणि भारतीय प्रतिभूती नियामक मंडळ( SEBI) यांच्यादरम्यान माहितीच्या आदान प्रदानासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे झालेल्या या करारावर,आयकर खात्याच्या प्रमुख महासंचालिका श्रीमती अनु जे. सिंग आणि सेबीच्या पूर्णवेळ सदस्य असलेल्या श्रीमती माधबी पुरी बूच यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी दोन्ही मंडळातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
- जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा (IB) व नियंत्रण रेषे जवळच्या (LoC) संवेदनशील सीमाभागात चांगले रस्ते व यांच्याद्वारे संपर्काचा आरंभ करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज सहा मुख्य पूल देशाला अर्पण केले. धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे पूल सीमा रस्ते संघटनेने विक्रमी वेळेत पूर्ण केले आहेत.
- केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मणिपूर येथे जल जीवन अभियानाच्या अंमलबजावणीच्या विविध बाबींवर मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. याबाबत जलशक्ती मंत्रालयाचा पेयजल व स्वच्छता विभाग, गेल्या तीन महिन्यांपासून राज्य / केंद्रशासित प्रदेशांशी सल्लामसलत करून व्यापक प्रयत्न करीत आहे. सध्याच्या कोविड -19 परिस्थितीत ग्रामीण कुटुंबांमध्ये प्राधान्याने नळ जोडणी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जेणेकरून ग्रामीण लोकांना पाणी आणण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जावे लागणार नाही.
- रेल्वे मंत्रालयाने अलिकडेच खासगी भागीदारीतून प्रवासी गाड्या चालविण्यासाठी आरएफक्यू म्हणजेच ‘पात्रता विनंती प्रस्ताव’ आमंत्रित केले आहेत. यामध्ये 109 मूळ गंतव्य स्थानाच्या मार्गावर जोड्यांच्या 151 आधुनिक वेगवान गाड्यांची (रॅक्स) सुविधा खासगी भागीदारांमार्फत रेल्वे प्रवाशांना देण्याचा प्रस्ताव आहे.
महाराष्ट्र अपडेट्स :
महाराष्ट्रात कोविडचे 6,603 नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यात एकूण रुग्णसंख्या 2,23,724 इतकी झाली आहे. राज्यात 1,23,192 रुग्ण बरे झाले आहेत तर 91,065 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत मंगळवारी 1,381 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.



* * *
BG/ST/SP/DR
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1637604)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam