PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
11 JUN 2020 8:26PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 11 जून 2020
(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि महाराष्ट्रातल्या कोविड -19 बाधित जिल्ह्यांच्या दंडाधिकाऱ्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्च स्तरीय बैठक घेतली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव प्रीती सुदान,यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
महाराष्ट्रातल्या कोविड-19 बाबतच्या सध्याच्या स्थितीविषयी बोलताना डॉ हर्ष वर्धन यांनी, प्रतिबंधित क्षेत्रांच्या वाढत्या संख्येकडे तातडीने लक्ष पुरवण्याची आवश्यकता व्यक्त केली. प्रभावी प्रतिबंध धोरणासाठी दाट लोकवस्तीच्या भागात, प्रादुर्भाव लगेच होऊ शकण्यासंदर्भात मॅपिंग करण्यात यावे. मृत्यू दरात वाढ होत असल्याकडे लक्ष पुरवतानाच प्रती दशलक्ष लोकसंख्येत करण्यात येणाऱ्या चाचण्यांकडेही लक्ष द्यायला हवे असे हर्ष वर्धन म्हणाले.
राज्यातले सर्व 36 जिल्हे बाधित आहेत. डॉ हर्ष वर्धन यांनी वैयक्तिकरित्या संवाद साधत मुंबई, ठाणे, पुणे,नाशिक, पालघर, नागपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोविड-19 स्थितीचा आणि त्याबाबतच्या व्यवस्थापनाचा आढावा घेतला.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद-आयसीएमआर ने केलेल्या सीरो सर्वेक्षण म्हणजेच रक्तचाचणी अध्ययनात असे आढळले आहे की एकूण तपासलेल्या नमुन्यांमधील 0.73 टक्के लोकांना याआधी सार्स-कोविड-2 चा संसर्ग झाल्याचे पुरावे आढळले आहेत. आयसीएमआर चे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
आयसीएमआर ने मे 2020 मध्ये, राज्य आरोग्य विभाग, एनसीडीसी आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने, कोविड-19 साठीचे पहिले सेरो सर्वेक्षण घेतले होते. या अंतर्गत, 83 जिल्ह्यातील 28,595 कुटुंबे आणि 26,400 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले.
या अध्ययनात, लॉकडाऊनच्या काळात, केलेल्या उपाययोजनांमुळे संक्रमण कमी करण्यात आणि कोविड नियंत्रणात ठेवण्यात यश आल्याचेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. आयसीएमआरच्या निष्कर्षानुसार, ग्रामीण भागाच्या तुलनेत,शहरी भागात हे संक्रमण पसरण्याची शक्यता, 1.09 पट अधिक आहे, तर शहरी भागातील झोपडपट्यामध्ये हा धोका 1.89 पट अधिक आहे. संसर्गित रुग्णांचा मृत्यूदर 0.08% आहे. याचा एक अर्थ असाही आहे की लोकसंख्येच्या मोठ्या भागाने अद्याप कोविड बाबतीतली सर्व काळजी घेणे आणि नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
गेल्या 24 तासांत, देशभरात कोविडचे 5,823 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1,41,028 वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आता 49.21% इतका झाला आहे. सध्या देशात, 1,37,448 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या, सक्रीय रूग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्या अधिक आहे.
इतर अपडेट्स:
“कोविड-19 विरुध्दच्या लढ्याचा आपल्या भाषणात उल्लेख करतांना पंतप्रधान म्हणाले की,या संकटाशी सामना करतांना, संपूर्ण जगासोबत भारतही मोठ्या धैर्याने पावले उचलत आहे. या संकटासोबतच, टोळधाड, गारपीट, तेल-वायू विहिरीत आग, छोटे-मोठे भूकंप आणि दोन वादळे अशा इतर संकटांचाही सामना करावा लागतो आहे. मात्र आज देश संपूर्ण शक्तीनिशी एकत्र येऊन या संकटांचे आव्हान पेलतो आहे.
अशा कसोटीच्या काळांनीच भारताला अधिक दृढनिश्चयी बनवले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. दृढनिश्चय, इच्छाशक्ती आणि एकता हीच आपल्या देशाची ताकद आहे, ज्यामुळे आपला देश कोणत्याही संकटाचा सामना करु शकतो. कोणतेही संकट आपल्यासाठी एक संधी घेऊन येत असते, ह्या संधीचा वापर करुन घेत आपल्याला आत्मनिर्भर भारत घडवायचा आहे” असे पंतप्रधान म्हणाले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यनाहू यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर लस, उपचार आणि निदान क्षेत्रातल्या संशोधन आणि विकास यासह इतर कोणत्या क्षेत्रात भारत-इस्रायल यांच्यातले सहकार्य अधिक व्यापक करता येईल याबाबत या नेत्यांनी चर्चा केली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंबोडियाचे पंतप्रधान महामहीम समदेक अक्का मोहा सेना पदेई टेको हूण सेन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी कोविड-19 महामारीवर चर्चा केली. एकमेकांच्या देशात नोकरी करणाऱ्या नागरिकांना मदत करण्यासाठी आणि त्यांना मायदेशात परत यायला मदत करण्यासाठी यापुढेही सहकार्य सुरू ठेवायला त्यांनी सहमती दर्शविली.
- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काही राज्यांनी भारतीय रेल्वेकडे उपलब्ध कोविड दक्षता कोचची मागणी केली आहे. रेल्वेने राज्य/केंद्रशासित प्रदेशांना या कोचेसचे वाटप केले आहे. तेलंगणाने सिकंदराबाद, काचीगुडा आणि आदिलाबाद या तीन ठिकाणी 60 कोच तैनात करण्याची विनंती केली आहे. दिल्ली मध्ये 10 कोचेस तैनात करण्याची मागणी करण्यात आली आहे. कोविड-19 विरुद्धचा लढा कायम ठेवत, भारतीय रेल्वे भारत सरकारच्या आरोग्य सेवेच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. भारतीय रेल्वे त्याची 5231 कोविड दक्षता केंद्रे राज्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज झाली आहे. परिमंडळ (क्षेत्रीय) रेल्वेने विलगीकरण सुविधेसाठी हे कोच रुपांतरीत केले आहेत.
- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) नोवेल कोरोना विषाणू चाचणी केवळ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन - पॉलिमरेझ शृंखला प्रतिक्रिया (RT-qPCR) चाचणी करण्याची शिफारस केली आहे. कोशिकीय आणि आण्विक जीवशास्त्र (CCMB) केंद्राच्या संशोधकांनी सार्स-कोव्ह-2 चाचणीसाठी नवीन कमी खर्च येणारी आणि कमी तंत्रज्ञानाची आवश्यक चाचणी विकसित केली आहे. ही चाचणी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन नेस्टेड पीसीआर (आरटी-एनपीसीआर) चाचणी म्हणून ओळखली जाते.
- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज पाच मापदंडांच्या विस्तृत श्रेणीतील कामगिरीच्या आधारे विविध श्रेणीतील उच्च शिक्षण संस्थाच्या “इंडिया रँकिंग्स 2020” (भारत क्रमवारी 2020) चे प्रकाशन केले. मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थिती मध्ये मंत्र्यांनी आभासी पद्धतीने इंडिया रँकिंग 2020 चे प्रकाशन केले.
- मोहाली, रायबरेली, हाजीपूर आणि गुवाहाटी येथील NIPER म्हणजेच राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संस्थांच्या संचालकांबरोबर, रसायन आणि उर्वरक राज्यमंत्री श्री.मनसुख मांडवीय यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एक आढावा बैठक घेतली. कोविड-19 या साथरोगाचा सामना करण्यासाठी या संस्था संशोधन आणि अभिनव संकल्पनांद्वारे देत असलेल्या योगदानाचा आणि त्यांच्या कामगिरीचा यावेळी आढावा घेण्यात आला.
- केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ हा ठिबक आणि सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देणारा उपक्रम राबवला जातो. चालू वर्षात ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ या उपक्रमासाठी 4000 कोटी रुपयांची वार्षिक तरतूद करण्यात आली असून, तशी माहिती राज्य सरकारांना देण्यात आली आहे. या उपक्रमाच्या लाभार्थ्यांची यादी राज्य सरकारांनी तयार करायची आहे. वर्ष 2020-21 साठी काही राज्यांना निधी देण्याची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे.
- प्रसार भारतीच्या सहयोगातून आयुष मंत्रालय 11 जून 2020 पासून डीडी भारती वर सामान्य योग अभ्यासक्रमाचे दररोज प्रसारण आयोजित करीत आहे. सामान्य योग अभ्यासक्रम सत्रे दररोज सकाळी 08:00 ते 08:30 या वेळेत प्रसारित केली जातील. त्याच वेळी ही सत्रे मंत्रालयाच्या सोशल मीडिया हँडलवर उपलब्ध असतील. या अर्ध्या तासाच्या सत्रात सामान्य योग अभ्यासक्रमाच्या सर्व प्रमुख बाबींचा समावेश असेल.
- केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, मनुष्यबळ विकास व दळणवळण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या निर्देशानुसार भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची आरोग्य सेतू अॅप टीम आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि एनआयसीचे डीआयओ यांच्या दरम्यान चर्चा करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. आरोग्य सेतू अॅपच्या विविध बाबींबाबत राज्यातील क्षेत्रस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये जागरूकता वाढविणे आणि त्यांच्याकडून क्षेत्र-स्तरावरील माहिती प्राप्त करणे हे या चर्चेचे उद्दीष्ट्य होते. राज्यमंत्री धोत्रे यांच्यासह या परिषदेत महाराष्ट्र सरकारचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महराष्ट्र सरकारचे माहिती तंत्रज्ञान मंत्री सतेज पाटील देखील उपस्थित होते.
- केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी, डीएआरपीजीच्या सध्या सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला आणि विभागाने घरून काम करण्यासंदर्भातील धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काम त्वरित करावे असा सल्ला देखील दिला. या संदर्भात संबधित मंत्रालये/विभाग यांच्यासोबत प्राधान्याने आवश्यक सल्लामसलत पूर्ण करता येईल असा सल्ला दिला. डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, डब्ल्यूएफएच मार्गदर्शक तत्त्वांची वेळेवर अंमलबजावणी केली तर केंद्रीय सचिवालयातील कर्मचार्यांना पंतप्रधानांच्या “दो गज दुरी” (6 फुटाचे अंतर) आणि शारीरिक अंतर राखण्याच्या आवाहनाचे पालन करताना याचा फायदा होईल.
महाराष्ट्र अपडेट्स :
महाराष्ट्रात बुधवारी कोविडच्या 3254 नवीन रुग्णांची नोंद झाली, यामुळे राज्यात एकूण रुग्णसंख्या 94,041 इतकी झाली आहे. राज्यात 46,074 सक्रिय रुग्ण असून 44,517 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात बुधवारी या आजारामुळे 149 मृत्यू झाले असून आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. मुंबईतही बुधवारी कोविडचे 1567 नवीन रुग्ण आढळले असून 97 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोविड19 ची रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याच्या दरातही सुधारणा होत आहे तसेच मृत्यू दरही राष्ट्रीय सरासरी दराएवढाच झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आणि धारावी, माहीम आणि दादर या कोविडचे हॉटस्पॉट बनलेल्या ठिकाणी परिस्थितीत होत असलेली सुधारणा यामुळे राज्य सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे.
RT/ST/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1630961)
Visitor Counter : 274
Read this release in:
English
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam