पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

लखनौ येथे उत्तर प्रदेशमधल्या गुंतवणूकदार शिखरपरिषदेच्या भूमिपूजन समारंभाला पंतप्रधान उपस्थित


80,000 कोटींहून अधिक किमतीच्या 1406 प्रकल्पांची पायाभरणी

"आज जग शोधत असलेल्या विश्वासार्ह भागीदाराच्या मापदंडांची पूर्तता करण्याची ताकद फक्त आपल्या लोकशाहीवादी भारताकडे आहे"

“आज जग भारताच्या क्षमतेकडे पाहत आहे तसेच त्याच्या कामगिरीचे कौतुक करत आहे”

“आम्ही गेल्या 8 वर्षांत धोरणात्मक स्थिरता, समन्वय आणि व्यवसाय सुलभ करण्यावर भर दिला आहे”

"उत्तर प्रदेशच्या जलद वाढीसाठी, आमचे दुहेरी इंजिन सरकार पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि उत्पादनावर एकत्रितपणे काम करत आहे"

" देशाला उत्तर प्रदेशकडून ज्या क्षमतेची अपेक्षा आहे ती क्षमता उत्तर प्रदेश प्रशासन आणि सरकारकडे असल्याचे मला जाणवले आहे "

"आम्ही धोरण, निर्णय आणि हेतू यासह विकासासोबत आहोत"

Posted On: 03 JUN 2022 3:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लखनौ येथे उत्तर प्रदेशमधल्या गुंतवणूकदारांच्या शिखरपरिषदेच्या भूमिपूजन समारंभाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी 80,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 1406 प्रकल्पांची पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये कृषी आणि संबंधित, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग, उत्पादन, अक्षय ऊर्जा, औषध, पर्यटन, संरक्षण आणि एरोस्पेस, हातमाग आणि वस्त्रोद्योग इत्यादी विविध क्षेत्रांचा समावेश आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह देशातील प्रमुख उद्योगपती उपस्थित होते.

उत्तर प्रदेशातील तरुणांची क्षमता, समर्पण, कठोर परिश्रम आणि समज यावर विश्वास दाखवल्याबद्दल पंतप्रधानांनी गुंतवणूकदारांचे आभार मानले. तसेच पंतप्रधानांनी उद्योगपतींना काशीला जाण्यास सांगितले. काशीचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला काशीला भेट देण्याची विनंती करतो, प्राचीन वैभवासह काशीचा नवीन आवृत्तीत कायापालट होऊ शकतो. उत्तर प्रदेशच्या क्षमतेचे हे जिवंत उदाहरण आहे, असे ते पुढे म्हणाले.

आज दाखल करण्यात आलेले प्रस्ताव उत्तर प्रदेशमध्ये नवीन संधी निर्माण करतील आणि हे तिथल्या विकासगाथेवरच्या आत्मविश्वासवाढीचे द्योतक आहे, असेही  पंतप्रधान म्हणाले. जगाला हव्या असलेलल्या विश्वासार्ह भागीदाराच्या मापदंडांची पूर्तता करण्याची ताकद फक्त आपल्या लोकशाहीवादी भारताकडे आहे. आज जग भारताच्या क्षमतेकडे पाहून भारताच्या कामगिरीचे कौतुक करत आहे, असं ते म्हणाले. G20 अर्थव्यवस्थांमध्ये भारत सर्वात वेगाने प्रगती करणारा देश आहे आणि जागतिक रिटेल इंडेक्समध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक देश आहे. गेल्या वर्षी जगातील १०० हून अधिक देशांमधून 84 अब्ज डॉलरची विक्रमी एफडीआय अर्थात परदेशी थेट गुंतवणक आली. भारताने गेल्या आर्थिक वर्षात 417 अब्ज डॉलर म्हणजेच 30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालाची निर्यात करून नवा विक्रम निर्माण केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

गेल्या काही वर्षांत आम्ही सुधारणा-कामगिरी-परिवर्तन या मंत्राने पुढे गेलो आहोत असं त्यांनी  केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख करत  सांगितलं. धोरण स्थिरता, समन्वय तसंच व्यवसाय करणे सुलभ करण्यावर भर दिला आहे, हे त्यांनी निदर्शनास आणलं. संपूर्ण देशाला एक राष्ट्र म्हणून एकत्रित करणाऱ्या सुधारणांबद्दल बोलून त्यांनी हा मुद्दा पुढे स्पष्ट केला. आम्ही आमच्या सुधारणांद्वारे भारताला एक राष्ट्र म्हणून मजबूत करण्याचे काम केले आहे. एक देश-एक कर जीएसटी, वन नेशन-वन ग्रिड, वन नेशन-वन मोबिलिटी कार्ड, वन नेशन-वन रेशन कार्ड, हे प्रयत्न आमच्या ठोस आणि स्पष्ट धोरणांचे प्रतिबिंब आहेत, असं मत त्यांनी पुढे व्यक्त केले.

2017 नंतर उत्तरप्रदेशात झालेल्या प्रगतीबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, जलद प्रगतीसाठी आमचे दुहेरी इंजिन सरकार पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि उत्पादन क्षेत्रासाठी एकत्रतिपणे काम करत आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चासाठी केलेले 7.50 लाख कोटी रूपयांचे अभूतपूर्व वाटप हे या दिशेने एक पाऊल आहे.

ते म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीतील सुधारणेमुळे व्यावसायिकांच्या मनात पुन्हा विश्वास स्थापित झाला आहे, उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे आणि राज्यातील प्रशासकीय व्यवस्थांमध्येही सुधारणा झाली आहे.  राज्याचा खासदार म्हणून देशाला उत्तरप्रदेशकडून अपेक्षित असलेली राज्याच्या प्रशासनाची तसेच सरकारची क्षमता आणि संभाव्यता मला जाणवली आहे. राज्याच्या सरकारी यंत्रणेचा बदललेला कल आणि कार्यसंस्कृती याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. उत्तरप्रदेशात देशाच्या एक पंचमांश किंवा एक षष्ठमांश लोकसंख्या रहाते. त्यामुळे विकासावर त्याचा प्रचंड परिणाम घडून येतो. उत्तरप्रदेशच्या  बलस्थानांचे वर्णन करून पंतप्रधान म्हणाले की विकासाच्या मार्गावर राज्याला काहीही थांबवू शकत नाही. ताज्या अर्थसंकल्पात, गंगा नदीच्या दोन्ही तीरांवर 5 किलोमीटर रसायन विरहित नैसर्गिक शेतीचे क्षेत्राची घोषणा करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. उत्तरप्रदेशात गंगा नदीचे 1100 किलोमीटर लांबीचे क्षेत्र  असून त्यात 25-30 जिल्ह्यांचा समावेश होतो. नैसर्गिक शेतीसाठी यामुळे मोठ्या प्रमाणावर संधी तयार होतील. ते म्हणाले की, कृषी क्षेत्रात कॉर्पोरेट क्षेत्राला गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी आहे. ते म्हणाले की पीएलआय योजना आणि 7.5 लाख कोटी रूपयांचे वाटप याचा लाभ राज्याला होणार आहे. त्यांनी असेही नमूद केले की, राज्यातील संरक्षण मार्गिका ही नव्या संधींसाठी अग्रदूत ठरेल. आधुनिक पॉवरग्रीड, गॅस पाईपलाईन, मल्टी मोडल कनेक्टिव्हिटी, विक्रमी संख्येने असलेले द्रुतगती मार्ग, आर्थिक विभागांमधील संपर्क मजबूत करणे, आधुनिक रेल्वेच्या पायाभूत सुविधा, पूर्व आणि पश्चिम भागातील समर्पित मालवाहतूक मार्गिका(कॉरिडॉर) हे सर्व एकत्र येऊन उत्तरप्रदेशला राज्याच्या विकासाला नवीन चालना देणार्या आश्वासनाकडे घेऊन जात आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, अलिकडच्या काही वर्षात देशात प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्याची नवीन संस्कृती विकसित झाली आहे. डिजिटल क्रांतीचा दाखला या प्रवृत्तीसाठी देत पंतप्रधानांनी देशाच्या गेल्या काही वर्षातील वाढीच्या यशोगाथेचा पुनरूच्चार केला. 2014 मध्ये, आमच्या देशात केवळ 65 दशलक्ष ब्रॉडबँड ग्राहक होते. आज त्यांची संख्या 78 कोटीवर गेली असल्याची माहिती त्यांनी दिली. 2014 मध्ये, 1 जीबी विदेचा(डेटा) वापर करण्यासाठी 200 रूपये खर्च येत असे. आज त्याची किमत 11 ते 12 रूपयांपर्यंत खाली आली आहे. भारत त्या देशांपैकी एक आहे जेथे विदा वापरणे इतके स्वस्त आहे. 2014 मध्ये, देशात 100 हून अधिक ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडल्या गेल्या होत्या. आज ऑप्टिकल फायबरने जोडल्या गेलेल्या ग्रामपंचायतींच्या संख्येने अडीच लाखांचा आकडा ओलांडला आहे. 2014 पूर्वी, आमच्याकडे केवळ काहीशे स्टार्ट अप्स होते. पण आज देशात नोंदणीकृत स्टार्टअप्सची संख्या 70 हजारांपर्यंत जात आहे. नुकतीच, भारताने एक अब्ज डॉलरची गुंतवणूक असलेल्या स्टार्टअप्सचे म्हणजे युनिकॉर्नच्या 100 संख्येचा विक्रम केला आहे. धोरण, निर्णय आणि इरादे यांच्या संदर्भात आम्ही विकासाबरोबर आहोत. तुमच्या सर्व प्रयत्नांत आम्ही सारे तुमच्याबरोबर आहोत आणि तुमच्य मार्गावरील प्रत्येक पावलागणिक आम्ही तुम्हाला मदत करू, असे पंतप्रधानांनी गुंतवणूकदार आणि उद्योजकांना आश्वस्त केले.

उत्तरप्रदेशातील गुंतवणूकदारांची परिषद 2018, 21 आणि 22 फेब्रुवारी 2018 रोजी झाली होती. तर पहिला भूमिपूजन समारंभ 29 जुलै 2018 रोजी तर दुसरा भूमीपूजन समारंभ 28 जुलै 2019 रोजी पार पडला होता. पहिल्या भूमीपूजन समारंभाच्या दरम्यान, 61,500 कोटी रूपये किमतीहून अधिक मूल्यांच्या 81 प्रकल्पांचे भूमीपूजन झाले होते. तर दुसऱ्या भूमीपूजन समारंभात 67,000 कोटी रूपये गुंतवणूक असलेल्या 290 प्रकल्पांची पायाभरणी झाली होती.

GC/PJ/UK/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1830812)