पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी पंजाबमधील पूरग्रस्त भागांची केली हवाई पाहणी


गुरदासपूर येथे झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी आढावा घेतला आणि नुकसानाचे मूल्यांकन केले

पंतप्रधानांनी पंजाबसाठी यापूर्वी देण्यात आलेल्या 12,000 कोटी रुपयांव्यतिरिक्त 1600 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली

पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली

पंतप्रधानांनी अलिकडच्या पूर आणि भूस्खलनामुळे अनाथ झालेल्या मुलांना पीएम केअर्स योजनेअंतर्गत सर्वसमावेशक मदतीची केली घोषणा

पंतप्रधानांनी बाधित कुटुंबांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले

पंतप्रधानांनी एनडीआरएफ, एसडीआरएफचे कर्मचारी आणि आपदा मित्र स्वयंसेवकांचीही भेट घेतली आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले

केंद्र सरकारने बाधित भागातील पायाभूत सुविधा पूर्ववत करण्यासाठी आणि पुनर्बांधणीसाठी सर्वतोपरी मदतीचे दिले आश्वासन

Posted On: 09 SEP 2025 9:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2025

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी 9 सप्टेंबर 2025 रोजी पंजाबला भेट दिली आणि पंजाबमधील बाधित भागात  ढगफुटी, पाऊस आणि भूस्खलनामुळे उद्भवलेली पूर परिस्थिती आणि त्यामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला.

पंतप्रधानांनी पंजाबमधील पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. त्यानंतर, त्यांनी गुरदासपूर येथे अधिकारी आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींसोबत अधिकृत आढावा बैठक घेतली. पंतप्रधान मोदी यांनी  करण्यात आलेल्या  मदत आणि पुनर्वसन उपाययोजनांचा आढावा घेतला तसेच पंजाबमध्ये झालेल्या नुकसानाचे मूल्यांकन केले.

पंतप्रधानांनी पंजाबसाठी यापूर्वी देण्यात आलेल्या  12,000  कोटी रुपयांव्यतिरिक्त 1600  कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. एसडीआरएफ आणि पंतप्रधान किसान सन्मान निधीचा दुसरा हप्ता आगाऊ जारी केला जाईल.

पंतप्रधानांनी संपूर्ण प्रदेश आणि लोकांना पुन्हा  उभे करण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोनाच्या गरजेवर भर दिला. यामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरांची पुनर्बांधणी, राष्ट्रीय महामार्ग पूर्ववत करणे, शाळांची पुनर्बांधणी, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून  मदत पुरवणे आणि पशुधनासाठी मिनी किट वाटप  यासारख्या उपाययोजनांचा समावेश असेल.

कृषी समुदायाला आधार देण्याची महत्त्वाची गरज ओळखून, सध्या वीज जोडणी नसलेल्या शेतकऱ्यांना  अतिरिक्त मदत पुरवली  जाईल. राज्य सरकारच्या विशिष्ट प्रस्तावानुसार, ज्या बोअर्समध्ये गाळ साचला आहे किंवा ते वाहून गेले आहेत, त्यांच्या नूतनीकरणासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मिशन मोडवर  मदत दिली जाईल.

डिझेलवर चालणाऱ्या बोअर पंपांसाठी, सौर पॅनेलसाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाबरोबर मेळ साधणे आणि प्रति थेंब अधिक पीक मार्गदर्शक तत्त्वांनुसार सूक्ष्म सिंचनासाठी मदत केली जाईल. 

प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण अंतर्गत, ग्रामीण भागातील घरांच्या पुनर्बांधणीसाठी पंजाब सरकारने सादर केलेल्या "विशेष प्रकल्प" अंतर्गत, ज्यांच्या घरांचे पुरामुळे नुकसान झाले आहे अशा पात्र कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाईल.

नुकत्याच आलेल्या पुरामध्ये पंजाबमधील ज्या सरकारी शाळांचे नुकसान झाले आहे त्यांना समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत आर्थिक मदत देण्यात येणार आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक असलेली सर्व माहिती पुरवण्याच्या सूचना राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत.

पंजाबमध्ये जल संचय जन भागीदारी कार्यक्रमाअंतर्गत जल संधारणासाठी पुनर्भरण संरचनांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येईल. क्षतिग्रस्त पुनर्भरण संरचनांची दुरुस्ती तसेच अतिरिक्त पुनर्भरण संरचनांची उभारणी या उद्देशाने हे काम करण्यात येईल. या प्रयत्नांमुळे तेथील पर्जन्य जल संधारणात सुधारणा होईल आणि दीर्घकाळासाठी पाण्याची शाश्वतता सुनिश्चित होईल.

पंजाबमध्ये झालेल्या नुकसानाचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारने तेथे आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथके देखील पाठवली आहेत आणि या पथकांनी दिलेल्या अहवालांच्या आधारावर पुढील मदतीचा विचार केला जाईल.
या नैसर्गिक आपत्तीमध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांप्रती शोक संवेदना व्यक्त करत पंतप्रधान मोदी म्हणाले की या संकटाच्या काळात केंद्र सरकार राज्य सरकारच्या खांद्याला खांदा भिडवून काम करेल आणि सर्वतोपरी मदत करेल.

पंतप्रधानांनी पंजाबमध्ये नैसर्गिक आपत्ती आणि पुरामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांची देखील भेट घेतली. आपण या संकटात सापडलेल्या सर्वांच्या सतत सोबत आहोत अशी ग्वाही देत पंतप्रधानांनी या आपत्तीमध्ये ज्यांनी जवळच्या व्यक्तींना गमावले आहे त्यांच्याप्रती तीव्र दुःख व्यक्त केले.

या पुरात तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये बळी गेलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची सानुग्रह मदत देण्याची घोषणा देखील पंतप्रधानांनी केली. 

नुकत्याच झालेल्या पूर आणि भूस्खलनानंतर जी मुले अनाथ झाली आहेत त्यांना बालकांसाठीच्या पंतप्रधान केयर योजनेतून व्यापक पाठबळ पुरवण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. यातून त्या मुलांचे दीर्घकालीन कल्याण सुनिश्चित होईल.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, राज्यांना आगाऊ रक्कम वितरणासह आपत्ती व्यवस्थापन नियमांच्या अंतर्गत सर्व प्रकारची मदत दिली जाईल. क्षतिग्रस्त भागात तातडीने मदत पोहोचवण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, राज्य सरकारी प्रशासन आणि इतर सर्व सेवाभावी संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. राज्य सरकारकडून दिले जाणारे निवेदन आणि केंद्रीय पथकांचे अहवाल यांच्या आधारे केंद्र सरकार मदत विषयक मूल्यांकनाचा आढावा घेईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेतले आणि या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली.

शैलेश पाटील/सुषमा काणे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2165108) Visitor Counter : 2