पंतप्रधान कार्यालय

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांना पंतप्रधानांनी निरोप दिला


आपल्या देशाच्या लोकशाहीबद्दलच्या प्रत्येक चर्चेत डॉ.मनमोहन सिंग यांचा नामोल्लेख होणे अनिवार्य असेल

हे सभागृह म्हणजे सहा वर्षांच्या अनुभवांनी घडवलेले वैविध्यपूर्ण विद्यापीठ आहे

Posted On: 08 FEB 2024 2:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 8 फेब्रुवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप दिला.

याप्रसंगी राज्यसभेत उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की दर पाच वर्षांनी लोकसभेतील सदस्य बदलतात तर राज्यसभेत दर दोन वर्षांनी नवे सदस्य नवी उर्जा घेऊन येतात. त्याच प्रकारे, द्विवार्षिक निरोपसमारंभ देखील नव्या सदस्यांसाठी अविस्मरणीय आठवणी आणि अमूल्य वारसा ठेवून जातो असे पंतप्रधानांनी सांगितले.

डॉ.मनमोहन सिंग यांच्या योगदानाचे स्मरण करत पंतप्रधान मोदी म्हणाले, या सभागृहाला तसेच देशाला मार्गदर्शनपर ठरलेल्या त्यांच्या दीर्घकालीन कार्यकाळामुळे आपल्या देशाच्या लोकशाहीबद्दलच्या प्रत्येक चर्चेत डॉ.मनमोहन सिंग यांचा नामोल्लेख होणे अनिवार्य असेल. असे प्रतिष्ठित सदस्य आपल्यासाठी दिशादर्शक प्रकाश असतात म्हणून त्यांच्या वागणुकीतून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी सूचना त्यांनी सर्व सदस्यांना केली. सभागृहातील सदस्याचे कर्तव्याप्रती समर्पण कसे असावे याचे प्रेरणादायी उदाहरण देत पंतप्रधान मोदी यांनी सभागृहातील मतदानासाठी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग  व्हीलचेयरवर बसून सभागृहात उपस्थित राहिले होते याचे स्मरण केले. लोकशाहीला सामर्थ्य देण्यासाठी ते आले होते असा मला विश्वास आहे, पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी डॉ.मनमोहन सिंग यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी याप्रसंगी सांगितले की अधिक व्यापक सामाजिक मंचासाठी राज्यसभेतून निवृत्त होत असलेल्या सदस्यांना या सभागृहातील अनुभवाचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल. हे सभागृह म्हणजे सहा वर्षांच्या अनुभवांनी घडवलेले वैविध्यपूर्ण विद्यापीठ आहे. येथून जाणारा प्रत्येकजण समृद्ध होऊन जातो आणि जाताना देश उभारणीच्या कार्याला बळकटी देऊन जातो. ते म्हणाले.

आज निरोप देत असलेल्या  सदस्यांना संसदेच्या जुन्या आणि नवीन इमारतीत काम करण्याची  संधी मिळाली आणि ते अमृत काळ  आणि संविधानाच्या 75 वर्षांचे साक्षीदार म्हणून या सदनाचा निरोप घेत  आहेत, असे पंतप्रधानांनी या  क्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले. 

जेव्हा अनिश्चितता मोठ्या प्रमाणात दिसत होती त्या  कोविड महामारीची आठवण करून देताना पंतप्रधानांनी, सभागृहाच्या कामकाजात कोणताही अडथळा येऊ न देणाऱ्या सदस्यांच्या वचनबद्धतेचे कौतुक केले. यावेळी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी संसद सदस्यांनी घेतलेली मोठी जोखीम पंतप्रधानांनी नमूद केली. कोरोना विषाणूमुळे  ज्या सदस्यांना आपला जीव गमवावा लागला त्यांच्याबद्दल  पंतप्रधान मोदी यांनी  तीव्र दुःख व्यक्त केले आणि सभागृहाने ते   स्वीकारत  पुढे वाटचाल सुरु ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधकांनी काळे कपडे परिधान केल्याच्या घटनेची आठवण करून देत पंतप्रधानांनी ते नमूद केले कीदेश समृद्धीचे नवे उच्चांक गाठत आहे आणि  देशाच्या प्रगतीच्या प्रवासाकडे  वाकडी नजर रोखण्यासाठीचा प्रयत्न म्हणून या घटनेकडे  ‘काळा  टिका’ म्हणून पाहिले जाऊ शकते.

जे चांगली  संगत ठेवतात त्यांच्यात त्याचप्रकारे चांगले  गुण  वाढीस लागतात आणि जे वाईट संगतीने वेढलेले असतात ते दोषयुक्त  बनतात, असे पंतप्रधानांनी  प्राचीन शास्त्रांचा संदर्भ देत स्पष्ट केले. नदीचे पाणी जेव्हा नदी प्रवाही असते तेव्हाच पिण्यायोग्य असते आणि समुद्राला मिळताच ते पाणी खारट होते, असेही त्यांनी   सांगितले. या विश्वासाने पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप करताना निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा अनुभव सर्वांना प्रेरणा देत राहील, असे सांगितले.आणि  त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.  

 

 

 

S.Tupe/N.Meshram/Sanjana/Sonal C/PM

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2003932) Visitor Counter : 90