| 
                        PIB Headquarters
                         
                         
                        
                            पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
                         
                        
                         
                        
                            
                         
                        
                         
                        
                            Posted On:
                        14 JUL 2020 8:10PM by PIB Mumbai
                         
                        
                         
                        
                            Delhi-Mumbai, July 14, 2020 
   
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट) 
  
  
  
 
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती   
	- भारतात कोविड-19 च्या रुग्णांचे प्रति दशलक्ष प्रमाण हे जगातल्या सर्वात कमी प्रमाण असलेल्या देशापैकी एक आहे. काही देशातील हे आकडे भारतातील आकड्यांपेक्षा 7 - 14 पट अधिक आहेत
 
	- दर दशलक्ष लोकसंख्येमागे कोविड-19  मुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही सर्वात कमी असणाऱ्या देशांमध्ये भारताची गणना होते. काही देशांत हे प्रमाण भारताच्या 35 पट आहे.
 
	- जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असूनही, कोविड-19 च्या रुग्णांच्या वाढीचा दर सातत्याने कमी होतो आहे. आपण जर निव्वळ संख्येकडे लक्ष दिलं, तर आपल्या धोरणावरचे लक्ष्य झाकोळले जाऊ शकते.भारतात पूर्णपणे कोविड-19 मुक्त झालेल्यांची संख्या, उपचार घेत असलेल्यांच्या संख्येच्या अंदाजे 1.8 पट आहे अनेक राज्यांमध्ये रुग्णालयातून घरी पाठवल्या जाणाऱ्यांची रोजची संख्या रुग्णालयात दाखल केल्या जाणाऱ्यांच्या रोजच्या संख्येपेक्षा अधिक असते
 
	- कोविड-19 च्या एकूण सक्रिय रुग्णांपैकी 86% रुग्ण केवळ दहा राज्यांत आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी 50% रुग्ण केवळ दोन राज्यांत आहेत. कोविड-19 चे संक्रमण देशभर एकसमानतेने सुरु नाही, याचेच हे निदर्शक आहे.
 
	- मे-2020 अखेरपर्यंत, कोविड-19 वर उपचार घेत असलेल्यांची संख्या कोरोनामुक्त व्यक्तींच्या संख्येपेक्षा अधिक असे. त्यानंतर मात्र, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या, उपचार घेत असलेल्यांपेक्षा जास्त झाली आहे. आणि या दोन्हीतील फरक आता वाढत चालला आहे
 
	- कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर सातत्याने वाढतो आहे. –आरोग्य मंत्रालयाची माहिती
 
	- 20 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनामुक्तीचा म्हणजे, कोविड-19 मधून रोगमुक्त होण्याचा दर, राष्ट्रीय स्तरावरील दरापेक्षा अधिक आहे.
 
	- कोविड-19 च्या RT-PCR चाचण्यांसाठी मार्चच्या मध्यापर्यंत आपल्याकडे 101 प्रयोगशाळा होत्या, आज आपल्याकडे 1,206 प्रयोगशाळा आहेत. आणि 280 रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर्स आहेत.यामुळे आपल्या चाचणी क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे.
 
	- जागतिक आरोग्य संस्थेने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, (https://apps.who.int/iris/handle/10665/332073…) कोविड-19 च्या संशयित रुग्णांचे सर्वसमावेशक सर्वेक्षण आणि चाचण्या करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली आहे.  दररोज प्रति दहा लाख लोकसंख्येपैकी 140 जणांची चाचणी म्हणजे 'सर्वसमावेशक’ असे जागतिक आरोग्य संस्था म्हणते 
 
	- जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार, 22 राज्ये दररोज दर दशलक्ष लोकसंख्येमागे 140 पेक्षा अधिक कोविड-19 तपासण्या करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तपासण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकार राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना देत आहे.
 
	- प्रतिबंधक उपाय, चाचण्या आणि वैद्यकीय व्यवस्थापन यावर भर देणे पुढेही सुरु असले पाहिजे. कोविड-19 विरुध्दच्या लढ्यात समुदायांनी जबाबदारी घेणे गरजेचे आहे.
 
	- जगभर पुरवल्या जाणाऱ्या लसींपैकी 60% लसी भारतात तयार होतात. भारत याबाबतीत नेतृत्व करत असून, जगभरात लसींच्या दृष्टीने भारत एक अतिशय महत्त्वाचा पुरवठादार आहे. - महासंचालक, ICMR
 
	- कोविड-19 साठी प्रतिबंधात्मक लस कोणत्याही देशात विकसित अथवा निर्मित झाली, तरीही त्या लसींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन भारत किंवा चीन मध्येच होऊ शकेल. प्रत्येक देश, जो लसीवर संशोधन करतो आहे, तो भारताच्या संपर्कात आहे. कारण भारत लसींचा मोठा उत्पादक देश आहे.- DG,ICMR
 
	- देशी बनावटीच्या दोन भारतीय संभाव्य लसींचे, उंदीर आणि सशांवर केलेले विषारीपणाच्या अभ्यासासाठीचे प्रयोग यशस्वी झाले असून, त्याबद्दलची माहिती DCGI ना देण्यात आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, त्यांच्या मानवी प्रयोगांसाठी परवानगी मिळाली आहे-ICMR
 
	- भारतीय बनावटीच्या दोन्ही लसींच्या मानवी चाचण्यांसाठी सुमारे 1,000 स्वयंसेवक पुढे आले आहेत. यासाठीचे चिकित्सापूर्व प्रयोग तसेच इतर लसींचे प्रयोग आता NIV,पुणे येथे होत आहेत.
 
	- कोविड-19 लसीचा जलद विकास करणे, ही नैतिक जबाबदारी आहे. रशिया आणि चीनने ही प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे, अमेरिका आणि इंग्लंडही लसविकास कार्यक्रमाला गती देण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतही देशी बनावटीच्या दोन संभाव्य लसींवर जलदगतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहे
 
	- कोविड-19 चा राष्ट्रीय सरासरी मृत्यूदर 2.6% आहे. हा दर सातत्याने कमी होत असून जागतिक मृत्यूदराच्या तुलनेत हा दर बराच कमी आहे. प्रत्येक आठवड्यात AIIMS चे डॉक्टर्स अतिदक्षता विभागातल्या डॉक्टरांना गंभीर स्वरूपाच्या कोविड रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत – आरोग्य मंत्रालय 
 
	- कोविड-19 मधून रोगमुक्त झालेल्या रुग्णांना होणाऱ्या त्रासाबद्दल, उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून माहिती गोळा करण्यासाठी, आरोग्य मंत्रालयाने  सल्लामसलतीचे काम सुरू केले आहे. याच्या आधारे आम्ही भविष्यात काही मार्गदर्शक सूचना देऊ शकतो. - आरोग्य मंत्रालय
 
	- कोविड-19 चा संसर्ग तुषारांद्वारे होतो, हे आता सिद्ध झाले आहे. मात्र,काही सूक्ष्म तुषारांद्वारे हवेतूनही या विषाणूचा प्रसार होऊ शकण्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.  यातून जे  स्पष्ट आहे ते असे की शारीरिक अंतर आणि मास्कचा वापर  सुरुच ठेवायचा असून हे अत्यंत महत्वाचे आहे. - DG, ICMR
 
	- दक्षता कमी झाल्याबरोबर कोरोनारुग्णांचे प्रमाण वाढल्याचे अनेक जिल्ह्यांत व अनेक भागांत आढळून आले आहे. म्हणूनच जेथे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्या भागात क्षेत्रबंदी आणि नियंत्रणाचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे.
 
 
इतर  
	- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज ऑस्ट्रेलियाचे आरोग्य मंत्री ग्रेगरी अँड्रयू हंट यांच्याबरोबर द्विपक्षीय आरोग्य सहकार्याबाबत चर्चा करण्यासाठी डिजिटल संवाद साधला.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी 10 एप्रिल 2017 रोजी आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारात मलेरिया आणि क्षयरोग सारख्या संसर्गजन्य रोगाचे व्यवस्थापन, मानसिक आरोग्य आणि असंसर्गजन्य रोग, प्रतिजैविक प्रतिकारशक्ती, औषधे, लस आणि वैद्यकीय उपकरणे यांचे नियमन, तसेच आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे डिजिटायझेशन या परस्पर हित क्षेत्रांचा समावेश आहे. या सामंजस्य करारात सध्याच्या कोविड महामारी सारख्या सार्वजनिक आरोग्य आणीबाणीला प्रतिसाद देखील समाविष्ट आहे.
 
	- कोविड-19 महामारीचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय रेल्वेच्या वतीने अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या कपूरथला येथे असलेल्या बोगी निर्माण फॅक्टरीमध्ये कोविड साथीशी लढा देण्यासाठी सक्षम बोगी तयार करण्यात येत आहेत. कोविडपश्चात वापरण्यास योग्य ठरतील असा बदल बोगींच्या रचनेमध्ये करण्यात आला आहे. या बोगींमध्ये असलेल्या सुविधा वापरण्यासाठी  त्या गोष्टींना प्रवाशाला हात लावावे लागणार नाही.
 
	- टोळधाड नियंत्रण मोहीम 11 एप्रिल 2020 ला सुरू झाली. 12 जुलै 2020 पर्यंत राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यांमध्ये 1,60,658  हेक्टर क्षेत्रफळावर टोळधाड नियंत्रण कक्षातर्फे तर राज्य सरकारांतर्फे राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब गुजरात उत्तर प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड हरियाणा आणि बिहार येथे 1,36,781 हेक्टर क्षेत्रावर ही मोहीम राबवली गेली.
 
	- 15 व्या वित्त आयोगाने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.हर्ष वर्धन आणि आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. बैठकीची सुरूवात करताना 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष  एन. के. सिंह यांनी जाहीर केले की महामारीची विशेष स्थिती पाहता आयोगाने सरकारला अंतिम अहवाल सादर करताना त्यात आरोग्याबाबत  स्वतंत्र प्रकरण समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
	- केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा म्हणाले की औषधनिर्माण विभाग मार्गदर्शक तत्वांना अंतिम रूप देत आहे जी  देशातील आगामी तीन बल्क औषध पार्क आणि चार वैद्यकीय उपकरणे पार्कसाठी ठिकाणे निवडण्याचा आधार तयार  करतील.
 
	- केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज (पीएमजीकेपी) अंतर्गत, कोविड 19 विरुद्धच्या लढ्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी घोषित विमा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी मर्यादितचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
 
महाराष्ट्र अपडेट्स 
गेल्या 24 तासात 6,497 नवीन रुग्ण आढळल्यानंतर राज्यातील रुग्ण संख्या 2,60,924 आहे. 193 जणांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला त्यामुळे मृत्यूसंख्या 10,482 झाली आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 1,05,637 आहे. कोविड-19 च्या वाढत्या केसेस मुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागांमध्ये काल मध्यरात्रीपासून पुन्हा लॉकडाऊन सुरू करण्यात आला. 
  
*** 
MC/SP/PM 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा @PIBMumbai     /PIBMumbai     /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com 
                         
                        
                         
                        
                         
                        
                            (Release ID: 1638598)
                         
                        
                         
                     |