PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 28 JUN 2020 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली-मुंबई, 28 जून 2020

 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

संपूर्ण देशभर कोविड-19 महामारीचा उद्रेक लक्षात घेवून उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांनी सर्व जनतेला आवाहन केले आहे. या महामारीच्या विरोधात सर्वजण संघटित होवून स्वतः जगताना इतरांच्या रक्षणासाठीही लढा देवू या, असे नायडू यांनी म्हटले आहे.आता जवळपास संपूर्ण देशभरातून टाळेबंदी मागे घेण्यात आली आहे. अर्थव्यवस्था आता कशी वेगाने सुधारू शकेल, यासाठी सरकार सातत्याने उपाय योजना करीत आहे तसेच प्रत्येकाने यासाठी सरकारला कशी मदत होवू शकेल, याकडे लक्ष दिले पाहिजे. अशा साथीच्या काळात सर्वांनी आवश्यक ती काळजी घेवून सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी प्रत्येकाने केली पाहिजे. असे मत उपराष्ट्रपतींनी आज फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. देशापुढे सध्या निर्माण झालेल्या आरोग्य समस्येतून बाहेर पडण्यासाठी आणि या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे नायडू यांनी म्हटले आहे. लोकांनी अशा काळात मन अस्वस्थ करणारे ‘पॅनिकचे बटण दाबू नये. मात्र ‘प्रतिबंधात्मक उपाय योजनेचे आणि ‘संरक्षणात्मक काम करण्याचे बटण जरूर दाबावे, असे आवाहन नायडू यांनी जनतेला केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' द्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, “भारतावर असे कित्येक संकटे आली आणि गेलीत परंतु भारताने न डगमगता यशस्वीपणे त्या संकटाचा सामना करत यशाचा मार्ग खेचून आणला आहे. हा भारताचा इतिहास आहे त्यामुळे वर्तमान करोना संकटाला न भीता तसेच सध्याची जी संकटांची मालिका चालू आहे त्या लक्षात घेऊन या अनलॉकडाऊन च्या काळात ‘दो गज कि दुरी’ म्हणजेच सुरक्षित अंतर राखणे, मास्क वापरणे आणि शक्यतो घराबाहेर न पडणे, हे नियम पळून सामूहिकरीत्या या साथीचा मुकाबला करू या. पंतप्रधान पुढे म्हणाले की, या संकटांमधूनही भारत अधिकच भव्य आणि सक्षम होत बाहेर पडेल.”

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

कोविड-19 चे व्यवस्थापन, प्रतिबंध आणि नियंत्रण यासाठी केंद्र सरकार सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने करत असलेल्या, सुनियोजित, पूर्वदक्षता घेऊन कालबद्ध, आणि सक्रीय प्रयत्नांचे उत्साहवर्धक परिणाम दिसत आहेत. 

बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्णांच्या संख्येतील तफावत आता  एक लाखांपेक्षा जास्त झाली आहे. आजपर्यंतच्या आकडेवारीनुसार,  सक्रीय रूग्णांपेक्षा  बरे झालेल्या रुग्णांची संख्या, 106,661  इतकी  जास्त झाली आहे. म्हणजेच,  आतापर्यंत, एकूण 3,09,712 रुग्ण कोविड-19 मधून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर, 58.56 टक्के इतका झाला आहे. गेल्या 24 तासांत, कोविडचे एकूण 13,832 रुग्ण बरे झाले आहेत.

सध्या देशात, 2,03,051 सक्रीय रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. भारतात आता कोविडच्या निदानासाठी 1036 प्रयोगशाळा आहेत. यापैकी, 749 प्रयोगशाळा सरकारी, तर 287 खाजगी क्षेत्रात आहेत.

या प्रयोगशाळांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :--

• रियल टाईम –RT पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 567 (सरकारी: 362 + खाजगी: 205)

• TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: 382 (सरकारी :355 + खाजगी: 27)

• CBNAAT आधारित चाचणी प्रयोगशाळा: 87 (सरकारी: 32 + खाजगी: 55)

सध्या दररोज 2,00,000 नमुन्यांची चाचणी केली जात आहे. गेल्या 24 तासांत चाचण्यांची संख्या 2,31,095 पर्यंत वाढली आहे. आतापर्यंत एकूण 82,27,802 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

28 जून 2020 पर्यंत,कोविड संबधित पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात आली असून, सध्या देशात  1055 समर्पित कोविड रुग्णालये आहेत. यात, 1,77,529 अलगीकरण खाटा, 23,168 आयसीयु खाटा आणि 78,060 ऑक्सिजन आधारित खाटा आहेत. त्याशिवाय, 2,400 समर्पित  कोविड हेल्थ सेन्टर्स असून त्यात  1,40,099 अलगीकरण खाटा, 11,508 आयसीयु खाटा आणि 51,371 ऑक्सिजन आधारित खाटा कार्यरत आहेत.

त्याशिवाय, देशात 9,519 कोविड केअर सेन्टर्स आहेत, जिथे 8,34,128 खाटा उपलब्ध आहेत. केंद्र सरकारने विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच केंद्रीय संस्थांना 187.43 लाख  N95 मास्क आणि 116.99 लाख पीपीई किट्स दिल्या आहेत. 

 इतर

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल दिल्लीतील राधास्वामी सत्संग ब्यास येथील 10,000 खाटांच्या ‘सरदार पटेल कोविड केअर सेंटर’ च्या सज्जतेचा आढावा घेतला. “10,000 खाटांचे हे केंद्र दिल्लीकरांना मोठा दिलासा देईल” असे अमित शाह म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री पुढे म्हणाले, “मी आपल्या शूर इंडो-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) कर्मचाऱ्यांचे कौतुक करतो, त्यांनी या कठीण काळात या कोविड केअर सुविधा चालू ठेवल्या. देश आणि दिल्लीच्या जनतेची सेवा करण्याची त्यांची कटीबद्धता अद्वितीय आहे. ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार देशातील नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे, यावर अमित शाह यांनी भर दिला.
  • केंद्र सरकारच्या कृषी विभाग, सहकार आणि शेतकरी कल्‍याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अमरावती रोड स्थित सेंद्रिय शेती प्रादेशिक केंद्र, गोंडखैरी, नागपूर तर्फे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सेंद्रिय शेती विषयावर ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण अवधी सात दिवस असून देशभरातील प्रशिक्षणार्थींची संख्या 100 इतकी असणार आहे. बारावी उत्तीर्ण आणि यापेक्षा अधिक शैक्षणिक असलेल्या ग्रामीण भागातील युवकांना हे प्रशिक्षण मिळणार आहे. यासाठी ग्रामीण भागातील युवकांना प्राधान्य देण्यात येणार असून कुठल्याही वयोमर्यादेची अट राहणार नाही.

महाराष्ट्र अपडेट्स

नवीन नोंद झालेल्या केसची संख्या 5,318 आहे. राज्यातील एकूण रुग्ण संख्या 1,59,133 आहे. सक्रिय केसेसची संख्या 67,600 आहे. तर 7,273 एकूण मृत्यू नोंद झाले आहेत. आजपर्यंत 8.97 लाख चाचण्या करण्यात आल्या. महाराष्ट्रामध्ये तीन महिन्यांच्या कालावधीनंतर व्यायाम शाळा, केशकर्तनालय, सलून आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यात आली आहेत.

***

RT/MC/SP/PK



(Release ID: 1635039) Visitor Counter : 273