• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
रेल्वे मंत्रालय

रेल्वे मंत्रालय करीत आहे दररोज देशभरातील विविध रेल्वेच्या स्वयंपाकघरांमधून राज्यांना 2.6 लाख जेवणाच्या पॅकेट्सचा पुरवठा

Posted On: 22 APR 2020 3:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 एप्रिल 2020

 

3 मे 2020 पर्यंत देशव्यापी लॉकडाऊन वाढविल्यामुळे, असुरक्षित घटकांची काळजी आणि भोजन सुनिश्चित करणे आवश्यक आहे. देशाच्या अगदी दुर्गम ठिकाणीही अन्न आणि औषध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी सुनिश्चित करण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून भारतीय रेल्वेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 

रेल्वेच्या स्वयंपाकघरातून शिजविलेले अन्न घेऊन ते गरजूंमध्ये वाटण्याची ज्या जिल्हा प्रशासनाची इच्छा असेल त्या जिल्हा प्रशासनांना विविध रेल्वे स्वयंपाकघरातून दररोज 2.6 लाख जेवण पुरवण्याची तयारी रेल्वेने दर्शविली आहे. याबाबत देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.

रेल्वे परिमंडळानुसार रेल्वेच्या स्वयंपाकगृह प्रमुखाचा तपशीलही राज्यांना कळविण्यात आला आहे. प्रतिदिन 2.6 लाख भोजन देण्याचे सुनिश्चित करुन ठरलेल्या आरंभिक ठिकाणांच्या स्वयंपाकघर क्षमतेवर आधारित आहे. गरजेनुसार पुरवठा करण्यासाठी अशा आणखी स्वयंपाकघराची उभारणी केली जाऊ शकते. हे जेवण नाममात्र 15 रुपये दरात उपलब्ध असेल. या देयकाची पूर्तता राज्यसरकारकडून पुढील टप्प्यात करण्यात येईल.

भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ आयआरसीटीसीने मागणीनुसार शिजवलेल्या जेवणाची संख्या वाढवण्याचे मान्य केले आहे. भारतीय रेल्वेमार्फत दररोज सुमारे एक लाख विनामूल्य गरम शिजवलेले जेवण वितरीत केले जात आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर गरजू लोकांना गरम शिजवलेले जेवण उपलब्ध करून देण्यासाठी 28 मार्च 2020 पासून अनेक रेल्वे संस्थांमधील भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांनी अविश्रांत मेहनत घेतली आहे. आयआरसीटीसीची स्थायी स्वयंपाकगृहे, रेल्वे पोलीस, वाणिज्यिक आणि इतर रेल्वे विभागांच्या माध्यमातून आणि स्वयंसेवी संस्थांच्या योगदानाद्वारे रेल्वे, दुपारच्या भोजनासाठी कागदाच्या प्लेट्मध्ये अन्न तर रात्रीच्या जेवणासाठी खाद्यपदार्थांची पाकिटे पुरवित आहे.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर केलेल्या टाळेबंदीच्या काळात भारतीय रेल्वेने मोफत शिजविलेले गरम अन्न पुरविण्याचा काल 2 दशलक्षचा टप्पा पार केला. या टाळेबंदीच्या काळात उपासमारीची वेळ आलेल्या  स्थलांतरित, रोजंदारीवरील मजूर, लहान मुले, हमाल, बेघर, गरीब आणि इतर गरजू लोकांना कालपर्यंत 20.5 लाख शिजविलेल्या भोजनाचे वितरण केले होते.

हे कार्य उत्तर, पश्चिम, पूर्व, दक्षिण आणि दक्षिण मध्य अशा विविध रेल्वे परिमंडळांमध्ये पसरलेल्या आयआरसीटीसीच्या स्थायी स्वयंपाकघरांच्या सक्रिय सहकार्याने केले जात आहे. रेल्वे स्थानकांच्या आसपासच्या भागातील गरजू लोकांच्या गरजा भागविण्यासाठी रेल्वे पोलीस दल, सरकारी रेल्वे पोलीस, रेल्वे परिमंडळांचे व्यावसायिक विभाग, राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने खाद्य वितरण केले जात आहे.

गया, दीनदयाल (मुगलसराय), राजिंदर नगर (पटना), समस्तीपूर, धनबाद, हाजीपूर, कटिहार, गुवाहाटी, 

रांची, बालासोर, टाटानगर आणि हावडा या पूर्व क्षेत्रामधील गरजू लोकांसाठी; उत्तर विभागातील नवी दिल्ली आणि प्रयागराज; दक्षिण मध्य विभागात विजयवाडा, खुर्दा रोड, विशाखापट्टणम आणि रायपूर; दक्षिण विभागातील बेंगळुरू, हुबळी, तिरुचिराप्पल्ली, काटपाडी, सी.ए.इंगेल्पा टीटीयू आणि मदुरै; आणि पश्चिम विभागातील मुंबई, अहमदाबाद, पुणे आणि भुसावळ येथील गरजूंना मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी आयआरसीटीसीच्या स्वयंपाकगृहांची संख्या वाढविण्याची रेल्वेची तयारी आहे.


***

B.Gokhale/ V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1617048) Visitor Counter : 202


Link mygov.in