अर्थ मंत्रालय

उदयोन्मुख तंत्रज्ञानातील खासगी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी सादर केला दिला एक लाख कोटी रुपयांच्या नवीन निधीचा प्रस्ताव


“आमच्या तंत्रज्ञान जाणकार तरुणांसाठी हा सुवर्णकाळ असेल,” निर्मला सीतारामन

पन्नास वर्षांच्या व्याजमुक्त कर्जासह निधीची तरतूद करणार

संरक्षण क्षेत्रातील डीप-टेक तंत्रज्ञान मजबूत करण्यासाठी आणि 'आत्मनिर्भरते'ला चालना देण्यासाठी एक नवीन योजना प्रस्तावित

नवीन युगातील तंत्रज्ञान आणि डेटा लोकांचे राहणीमान आणि व्यवसायांचे स्वरूप बदलत आहे: केंद्रीय अर्थमंत्री

Posted On: 01 FEB 2024 3:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2024

 

उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये खासगी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी तयार करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.

आमच्या तंत्रज्ञान जाणकार तरुणांसाठी हा सुवर्णकाळ असेल असे प्रतिपादन आज संसदेत 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. 

पन्नास वर्षांच्या व्याजमुक्त कर्जासह निधीची तरतूद केली जाईल. ती दीर्घ मुदतीसाठी आणि कमी किंवा शून्य व्याजदरांसह दीर्घकालीन वित्तपुरवठा किंवा पुनर्वित्त प्रदान करेल.

“यामुळे खासगी क्षेत्राला उदयोन्मुख तंत्रज्ञानात संशोधन आणि नवोन्मेष वाढवण्यास प्रोत्साहन मिळेल. आपल्या तरुणाईच्या सामर्थ्य आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणारे कार्यक्रम आपल्याकडे असायला हवेत,” अशी अपेक्षा अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली. 

सीतारामन यांनी संरक्षण उद्देशांसाठी डीप-टेक तंत्रज्ञान बळकट करण्यासाठी आणि ‘आत्मनिर्भरतेला’ चालना देण्यासाठी एक नवीन योजना सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला.

तांत्रिक बदल

नवीन युगातील तंत्रज्ञान आणि डेटा लोकांचे राहणीमान आणि व्यवसायांचे स्वरूप बदलत आहेत याकडे लक्ष वेधून अर्थमंत्री म्हणाल्या की ते नवीन आर्थिक संधी देखील सक्षम करत आहेत आणि तळागाळातील लोकांसह सर्वांसाठी परवडणाऱ्या किमतीत उच्च-गुणवत्तेच्या सेवांची तरतूद सुलभ करत आहेत. 

जागतिक स्तरावर भारतासाठी संधी विस्तारत आहेत हे नमूद करताना सीतारामन यांनी सांगितले कि,"भारत आपल्या लोकांच्या नवकल्पना आणि उद्योजकतेद्वारे उपाय दाखवत आहे."

संशोधन आणि नवोन्मेष 

संशोधन आणि नवोन्मेष भारताच्या विकासाला चालना देईल, रोजगार निर्मिती करून विकासाकडे नेईल, यावर भर देत सीतारामन म्हणाल्या की, पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी “जय जवान जय किसान”चा नारा दिला होता आणि पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी “जय जवान जय किसान जय विज्ञान” हा नारा दिला होता.

नवोन्मेष हा विकासाचा पाया असल्याने “पंतप्रधान मोदींनी “जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय अनुसंधान” असा नारा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

 

* * *

M.Jaybhae/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2001388) Visitor Counter : 84