पंतप्रधान कार्यालय

गुजरातमध्ये विविध प्रकल्पांच्या उद्‌घाटन आणि लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 16 JUL 2021 7:39PM by PIB Mumbai

नमस्‍कार,

मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि गांधीनगरचे खासदार अमित शाह , रेल्वे मंत्री अश्विनी वैष्‍णव , गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी , उपमुख्यमंत्री नितिन भाई, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश , गुजरात सरकारचे अन्य मंत्रिगण, संसदेतले माझे सहकारी आणि गुजरात प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्‍यक्ष सीआर पाटील, अन्‍य खासदार, आमदार आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना नमस्‍कार.

आजचा दिवस 21 व्या शतकातील भारताच्या आकांक्षांचे, युवा भारताच्या भावना आणि संधींचे खूप मोठे प्रतीक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान असेल, उत्तम शहरी आखणी असेल, किंवा मग संपर्क व्यवस्थेच्या आधुनिक पायाभूत सुविधा, नव्या भारताच्या नव्या परिचयात आज आणखी एक भर पडत आहे. मी इथून दिल्लीतून विविध प्रकल्पांचे लोकार्पण तर केले आहे , मात्र ते प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता किती आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही. मी संधी मिळेल तेव्हा स्वतः ते पहायला येईन.

 

बंधू आणि भगिनींनो ,

आज केवळ कॉन्क्रीटच्या इमारती उभारणे इतकेच देशाचे उद्दिष्ट नाही तर स्वतःचे वैशिष्ट्य असणाऱ्या पायाभूत संरचना आज निर्माण होत आहेत. उत्तम सार्वजनिक ठिकाणे आपली गरज आहे , अशा प्रकारे यापूर्वी कधी विचारच केला गेला नाही. आपल्या भूतकाळातील शहरी नियोजनात देखील त्याला आलिशान गोष्टींशी जोडण्यात आले होते. तुम्ही देखील पाहिले असेल, की गृहनिर्माण आणि हाउसिंग कंपन्यांच्या प्रचाराचा भर कशावर असतो, -पार्क फेसिंग घर किंवा मग सोसायटीच्या खास सार्वजनिक जागेच्या आसपास असतो. हे यासाठी असते कारण आपल्या शहरांची एक मोठी लोकसंख्या दर्जेदार सार्वजनिक जागा आणि दर्जेदार सार्वजनिक जीवनापासून वंचित राहिली आहे. आता नगर विकासाचा जुना विचार मागे सोडून देश आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे .

 

मित्रानो,

अहमदाबाद मध्ये साबरमतीची काय स्थिती होती, हे कुणी विसरू शकते का ? आज तिथे पाण्याच्या प्रवाहाबरोबरच रिवरफ्रंट, पार्क, ओपन जिम, सी प्लेन या सर्व सुविधा आपल्या सेवेत उपलब्‍ध आहेत. म्हणजेच एक प्रकारे संपूर्ण परिसंस्था बदलली आहे. हाच बदल कांकरिया मध्येही करण्यात आला आहे. जुन्या अहमदाबाद मधील एक तलाव एवढे गजबजाटाचे केंद्र बनेल, असा विचार यापूर्वी कधी केला गेला नाही.

 

मित्रानो,

मुलांच्या नैसर्गिक विकासासाठी त्यांच्या मनोरंजनाबरोबरच त्यांचे शिक्षण आणि त्यांच्या सर्जनशीलतेलाही वाव मिळायला हवा. सायन्स सिटी हा असा प्रकल्प आहे जिथे मनोरंजनाच्या गोष्टींमधून मुलांमधल्या कल्पकतेलाही प्रोत्साहन मिळते.यामध्ये विविध खेळ आहेत, मौज मस्ती आहे, आणि त्याचबरोबर मुलांना काहीतरी नवे शिकवण्याचा मंच देखील आहे. आपण पाहिले आहे, मुले बरेचदा आईवडिलांकडे रोबोट्स आणि प्राण्यांच्या मोठ्या खेळण्यांची मागणी करत असतात. काही मुले म्हणतात, घरात डायनासोर घेऊन या, कुणी सिंह पाळण्याचा हट्ट करतात. आता आईवडील हे सगळे कुठून आणणार? मुलांना सायन्स सिटीमध्ये याचा पर्याय मिळतो. हे जे नवीन नेचर पार्क बनले आहे ना , हे विशेषतः माझ्या छोट्या मित्रांना खूप आवडणार आहे. एवढेच नाही, सायन्स सिटीमध्ये उभारलेली ॲक्वेटिक्स गॅलरी तर आणखी आनंददायी ठरणार आहे. केवळ देशातलेच नाही तर आशियामध्ये देखील अव्वल मत्स्यालयांपैकी हे एक आहे. जगभरातील सागरी जैवविविधता एकाच ठिकाणी पाहायला मिळणे हा एक अद्भुत अनुभव आहे.

तर रोबोटिक्स गॅलरीत रोबोटशी संवाद हे आकर्षणाचे केंद्र तर आहेच , मात्र त्याचबरोबर आपल्या तरुणांना रोबोटिक्सच्या क्षेत्रात काम करण्यास ते प्रेरितही करेल आणि बालमनात कुतूहल निर्माण करेल.औषधे, शेती, अंतराळ, संरक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये रोबोट्स कसे उपयोगी ठरू शकतात याच अनुभव इथे आपले युवा मित्र घेऊ शकतील. आणि हो, रोबो कैफेमध्ये रोबोटिक शेफने बनवलेले आणि रोबोट वेटर्सनी वाढलेले विविध पदार्थ खाण्याचा आनंद औरच आहे. तिथे गेलेली कुणीही व्यक्ती तिथे गेल्यावाचून राहणार नाही. काल जेव्हा सोशल मीडियावर मी त्यांचे फोटो पोस्ट केले, तेव्हा अशा प्रतिक्रिया देखील वाचायला मिळाल्या की - असे फोटो तर आपण परदेशातच पाहतो. लोकांचा विश्वासच बसत नव्हता की हे फोटो भारतातले आहेत, गुजरातचे आहेत. आज या कार्यक्रमात मी विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने मुले सायन्स सिटीमध्ये यावीत, विद्यार्थी यावेत, शाळांच्या नियमित सहली इथे व्हाव्यात , सायन्स सिटी मुलांनी गजबजून जाईल तेव्हाच त्याची सार्थकता आणि भव्यता आणखी वाढेल.

 

मित्रानो,

माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की गुजरात आणि गुजरातच्या जनतेचा गौरव आणखी वाढवणाऱ्या अशा अनेक कामांचा आज शुभारंभ झाला आहे. आज अहमदाबाद शहराबरोबरच गुजरातची रेल्वे कनेक्टिविटी देखील अधिक आधुनिक आणि अधिक मजबूत झाली आहे. गांधीनगर आणि वडनगर स्थानकाचे नूतनीकरण असेल, मेहसाणा-वरेठा मार्गाचे रुंदीकरण आणि विद्युतीकरण असेल, सुरेंद्रनगर-पीपावाव दरम्यान विद्युतीकरण असेल, गांधीनगर कॅपिटल-वरेठा मेमू सेवेची सुरुवात असेल, किंवा मग गांधीनगर कॅपिटल-वाराणसी सुपरफास्ट एक्सप्रेसचा शुभारंभ असेल, या सर्व सुविधांसाठी गुजरातच्या जनतेचे खूप-खूप अभिनंदन. गांधीनगर ते बनारस दरम्यान रेल्वेगाडी , एक प्रकारे सोमनाथच्या धरतीला विश्वनाथच्या धरतीशी जोडण्याचे महान कार्य आहे. 

 

बंधू आणि भगिनींनो,

20 व्या शतकाच्या पद्धती वापरून 21 व्या शतकातील भारताच्या गरजा भागवल्या जाऊ शकत नाहीत, म्हणूनच रेल्वेमध्ये नव्याने सुधारणा करण्याची गरज होती. आम्ही रेल्वेचा केवळ सेवा म्हणून नाही तर एक मालमत्ता स्वरूपातही विकास करण्यासाठी काम सुरु केले. आज याचे परिणाम दिसून येत आहेत. आज भारतीय रेलवेची ओळख, तिचे रूप पालटत आहे. आज भारतीय रेल्वेत सुविधा देखील वाढल्या आहेत, स्वच्छता देखील वाढली आहे. सुरक्षा देखील वाढली आहे आणि वेगही वाढला आहे. मग ते पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण असेल किंवा नवीन आधुनिक रेल्वेगाड्या असतील, अशा प्रकारचे कितीतरी प्रयत्न गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी केले जात आहेत. आगामी काळात जेव्हा समर्पित मालवाहतूक मार्गिका सुरु होईल, तेव्हा गाड्यांचा वेग आणखी वाढेल. तेजस आणि वंदेभारत सारख्या आधुनिक गाड्या तर आपल्या रेल्वेमार्गावर धावायला सुरुवातही झाली आहे. आज या गाड्या प्रवाशांना एक नवीन आणि अद्भुत अनुभव देत आहेत. विस्टाडोम कोचेसचा व्हिडिओ देखील तुम्ही सोशल मीडियावर नक्कीच पाहिला असेल.

जे लोक स्टॅच्यू ऑफ युनिटी पहायला गेले असतील त्यांनी याचा लाभ घेतलाही असेल. हे कोचेस आरामदायी प्रवासाला एका वेगळ्याच उंचीवर नेतात. रेल्वेगाडीतून प्रवास करणाऱ्या सर्व लोकांना आता असाही अनुभव येत आहे की आपल्या गाड्या, आपले प्लॅटफॉर्म्स आणि आपले रेल्वेरूळ पूर्वीपेक्षा किती स्वच्छ दिसू लागले आहेत. यात सर्वात जास्त योगदान त्या 2 लाखांहून अधिक बायो-टॉयलेट्सचे देखील हे, जी या डब्यांमध्ये बसवण्यात आली आहेत..

अशाच प्रकारे आज देशभरात प्रमुख रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे. द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमधील रेल्वे स्थानके देखील आता वाय-फाय सुविधांनी सुसज्ज होत आहेत. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाहिले तर ब्रॉडगेजवरील मानव रहित रेल्वे क्रॉसिंग्स पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहेत. कधी काळी भीषण अपघात आणि गैर व्यवस्थापनच्या तक्रारींसाठी माध्यमात प्रसिद्ध असणारी भारतीय रेल्वे आज सकारात्मकता घेऊन येत आहे. आज भारतीय रेल्वे जगातील आधुनिक नेटवर्क आणि भव्य प्रकल्पांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. आज भारतीय रेल्वेकडे पाहण्याचा अनुभव आणि दृष्टिकोन दोन्ही बदलत आहे. आणि मी अभिमानाने सांगेन की आजचे हे प्रकल्प भारतीय रेल्वेच्या याच नव्या अवताराची झलक आहे.

 

मित्रानो,

रेल्वे देशातल्या काना-कोपऱ्यापर्यंत पोहोचावी यासाठी रेल्वेचा समतल विस्तार आवश्यक आहे असे माझे स्पष्ट मत आहे. याबरोबरच रेल्वेमध्ये क्षमता वृद्धी, संसाधन उभारणी, नवे तंत्रज्ञान आणि उत्तम सेवा यासाठी लंब विस्तारही तितकाच आवश्यक आहे. उत्तम मार्ग, आधुनिक रेल्वे स्थानक आणि रेल्वे मार्गांजवळ आलिशान हॉटेल, गांधीनगर रेल्वेचा हा प्रयोग, भारतीय रेल्वेमधल्या परिवर्तनाची सुरवात आहे.रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांनाही विमान तळाप्रमाणे सुविधा मिळाव्यात, महिला आणि बालकांना त्यांच्या विशेष आवश्यकता लक्षात घेऊन त्यानुसार उत्तम व्यवस्था असावी असे आधुनिक आणि सुविधांनी युक्त असे स्थानक आज देशाला, गांधीनगरला प्राप्त होत आहे.

 

मित्रहो,

गांधीनगरचे नवे रेल्वे स्थानक देशात पायाभूत सुविधांच्या संदर्भातल्या मानसिकतेत होत असलेला बदलही दर्शवत आहे. दीर्घकाळापासून भारतात पायाभूत सुविधांच्या बाबतीतही वर्गभेदाला खतपाणी दिले गेले होते. मी आपल्याला सांगू इच्छितो, गुजरातमधले लोक तर जाणतातच, मला जेव्हा गुजरातची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली होती तेव्हा एक प्रयोग केला होता. आपली जी बस स्थानके असतात ती आधुनिक करण्याच्या दिशेने काम करण्यात आले. सार्वजनिक-खाजगी मॉडेल बाबत काम करण्यात आले.बस स्थानकांची परिस्थिती आधी कशी होती, आज गुजरातमध्ये अनेक बस स्थानके आधुनिक झाली आहेत. बस स्थानकावर विमानतळाप्रमाणे सुविधा दिसत आहेत.

मी दिल्लीत आलो तेव्हा रेल्वे अधिकाऱ्यांना, गुजरातमधली बस स्थानके पाहण्यासाठी पाठवले आणि त्यांना सांगितले की आपली रेल्वे स्थानके अशी का नसावीत. जमिनीचा पुरेपूर वापर असावा, रेल्वे स्थानकावर मोठ्या आर्थिक घडामोडी असाव्यात आणि रेल्वे केवळ रेल्वे गाड्यांची ये-जा करण्यासाठीचे नव्हे तर अर्थव्यवस्थेचे उर्जा केंद्र ठरू शकते. जसा विमानतळाचा विकास होतो त्याप्रमाणे गुजरातमध्ये बस स्थानकांचा विकास करण्याचे काम झाले आहे त्याप्रमाणेच रेल्वे स्थानकांचाही सार्वजनिक –खाजगी भागीदारी मॉडेलप्रमाणे विकास करण्याच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. गांधीनगर ही त्याची आज सुरवात आहे. जन सुविधांमध्ये वर्गीकरण, हे याच्यासाठी, हे त्याच्यासाठी, श्रीमंतांसाठी होत आहे अशी जी समजूत केली जात आहे त्याला काहीच अर्थ नाही. समाजातल्या प्रत्येक वर्गाला व्यवस्था मिळायला हव्यात.

 

मित्रहो,

रेल्वेच्या संसाधनांचा सदुपयोग करत रेल्वे स्थानकाला आर्थिक घडामोडीचे केंद्र करता येते याचे गांधीनगरचे आधुनिक रेल्वे स्थानक हे प्रमाण आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत ट्रॅकवर असे हॉटेल उभारण्यात आले आहे जिथून रेल्वे धावताना तर दिसते पण जाणवत नाही. जमीन तितकीच आहे पण जमिनीचा वापर दुप्पट झाला आहे. सुविधाही उत्तम आणि पर्यटन आणि व्यापारही उत्तम. जिथून रेल्वे जाते त्यापेक्षा जास्त मोक्याचे ठिकाण असू शकते का? 

या रेल्वे स्थानकावरून दांडी कुटीर, महात्मा मंदिरचे दिसणारे भव्य दृश्य, अद्भुत आहे. दांडी कुटीर संग्रहालय पाहण्यासाठी येणारे लोक किंवा व्हायब्रंट गुजरात परिषदेसाठी येणारे लोक जेव्हा याचा आनंद घेतील तेव्हा त्यांच्यासाठीही हे पर्यटन आकर्षण ठरेल. 

आज रेल्वेचा जो कायापालट झाला आहे तो महात्मा मंदिराला लागुनच झाला आहे, यामुळे महात्मा मंदिराचे महत्व कित्येक पटींनी वाढले आहे. लोक आता लहान-मोठ्या परिषदांसाठीही या हॉटेलचा उपयोग करतील, महात्मा मंदिरचाही उपयोग करतील. म्हणजेच एक प्रकारे वर्षभर अनेक कार्यक्रमांसाठी इथे एक सार्वजनिक व्यवस्था प्राप्त झाली आहे. विमानतळ इथून 20 मिनिटांच्या अंतरावर, आपण कल्पना करू शकता की देश-परदेशातले लोक याचा किती उपयोग करू शकतात.

 

बंधू- भगिनीनो,

रेल्वेचे संपूर्ण देशात एवढे विशाल जाळे आहे, इतकी संसाधने आहेत, यामध्ये किती शक्यता सामावल्या आहेत याची कल्पना करा. मित्रहो, भारतासारख्या विशाल देशात रेल्वेची भूमिका नेहमीच मोठी राहिली आहे. रेल्वे आपल्याबरोबरच नवे आयाम, सुविधांचे नवे आयामही घेऊन येते. गेल्या काही वर्षाच्या प्रयत्नांचे हे फलित आहे की आज ईशान्येकडच्या राजधान्यापर्यंत रेल्वे प्रथमच पोहोचली आहे तर लवकरच श्रीनगरही रेल्वेच्या द्वारे कन्याकुमारीशी जोडले जाणार आहे. आज वडनगरही या विस्ताराचा एक भाग बनले आहे. वडनगर स्थानकाशी माझ्या कितीतरी आठवणी जोडलेल्या आहेत. नवे स्थानक खूपच आकर्षक दिसत आहे. नवी ब्रॉड गेज लाईन झाल्याने वडनगर- मोढेरा- पाटण सांस्कृतिक मंडल आता उत्तम रेल्वे सेवेशी जोडले गेले आहे. यामुळे अहमदाबाद-जयपुर-दिल्ली मुख्य मार्गाशी थेट कनेक्टिव्हीटी झाली आहे. हा मार्ग सुरु झाल्याने या संपूर्ण भागात सुविधा बरोबरच रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी नव्या संधीचे दालनही खुले झाले आहे. 

 

मित्रहो,

मेहसाणा-वरेठा मार्ग आपल्या वारसाशी आपल्याला जोडतो तर सुरेंद्रनगर-पीपावाव मार्गाचे विद्युतीकरण आपल्याला भारतीय रेल्वेच्या भविष्याशी जोडते. भारतीय रेल्वेच्या इतिहासातल्या अल्प काळात पूर्ण झालेल्या प्रकल्पांपैकी हा एक आहे. हा रेल्वे मार्ग एका महत्वाच्या बंदराला जोडणारा मार्ग आहे त्याबरोबरच पश्चिम समर्पित माल वाहतूकीसाठी मार्गीकेसाठी फीडर मार्गही आहे. हा रेल्वे मार्ग पीपावाव बंदराकडून देशाच्या उत्तर भागासाठी डबल स्टॅक कंटेनर मालगाडीची विना अडथळा ये-जा सुनिश्चित करणार आहे.

 

मित्रहो,

देशात प्रवास असो किंवा माल वाहतूक,कमी वेळ, कमी खर्च आणि उत्तम सुविधा याला आज 21 व्या शतकातल्या भारताचे प्राधान्य आहे. म्हणूनच आज देश बहुविध कनेक्टिव्हीटीच्या दिशेने वाटचाल करत आहे. यासाठी एका विस्तृत पथदर्शी आराखड्यावर काम सुरु आहे. वाहतुकीचे विविध मार्ग जोडून शेवटच्या टोकापर्यंतची कनेक्टिव्हीटी, आत्मनिर्भर भारत अभियानाला आणखी वेग देईल असा मला विश्वास आहे.

 

मित्रहो,

नव भारताची विकासाची गाडी दोन रुळावरून एकाचवेळी वाटचाल करत पुढे जाईल. एक रूळ आधुनिकतेचा तर दुसरा गरीब, शेतकरी आणि मध्यम वर्गाच्या कल्याणाचा. म्हणूनच आज आधुनिक पायाभूत सुविधा निर्मितीवर इतके काम होत आहे तर दुसरीकडे याचा लाभ गरीब, शेतकरी आणि मध्यम वर्गाला मिळेल हे सुनिश्चित करण्यात येत आहे.

 

बंधू-भगिनीनो,

गुजरात आणि देशाच्या विकासाच्या या कामात आपल्याला कोरोना सारख्या महामारीकडेही लक्ष ठेवायचे आहे. 100 वर्षातल्या सर्वात मोठ्या महामारीने, गेल्या दीड वर्षात आपल्या जीवनावर मोठा परिणाम केला आहे. कोरोना संक्रमणाने आपले अनेक आप्तस्वकीय अकालीच आपल्याला सोडून गेले आहेत. मात्र एक राष्ट्र म्हणून आपण संपूर्ण ताकदीने याचा मुकाबला करत आहोत. गुजरातनेही मोठ्या परिश्रमाने संक्रमणाचा वेग रोखला आहे.

आपल्याला आपल्या वर्तनातून आणि चाचण्या, रुग्णांच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, उपचार आणि लसीकरण हा मंत्र घेऊन कोरोना संक्रमणाचा दर मंदावायचा आहे. म्हणूनच आपल्याला सतर्क आणि सावधगिरी बाळगायला लागेल. याच्या बरोबरीने आपल्याला लसीकरण प्रक्रियाही सातत्याने वेगवान राखणे आवश्यक आहे. गुजरात लसीकरणाचा 3 कोटीचा टप्पा गाठणार आहे याचा मला आनंद आहे. लसींच्या उपलब्धतेबाबतची माहिती देण्याचे केंद्र सरकारने आधीपासूनच सुरु केले आहे यामुळे गुजरातला लसीकरण केंद्राच्या स्तरावर रणनीती आखण्यासाठी मदत होत आहे. सर्वांच्या प्रयत्नातून लसीकरणासंदर्भातले आपले लक्ष्य आपण लवकरच साध्य करू, या विश्वासासह नव्या योजनांसाठी आपणा सर्वाना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. 

धन्यवाद !

***

MC/SushmaK/NilimaC/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1736374) Visitor Counter : 252