PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 12 AUG 2020 7:48PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 12 ऑगस्ट 2020

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 13 ऑगस्ट 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे "पारदर्शक करपद्धती - प्रामाणिकाचा सन्मान" यासाठीच्यामंचाचे उद्घाटन करणार आहेत.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

गेल्या 24 तासांत 56,110 एवढी आतापर्यंतची एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली. प्रतिबंध धोरणांची यशस्वी अंमलबजावणी, आक्रमक पावलं उचलत केलेल्या व्यापक चाचण्या आणि कोविडच्या गंभीर रुग्णांचे प्रमाणित वैद्यकीय व्यवस्थापन, या सर्वांचा हा एकत्रित परिणाम आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांच्या योग्य समन्वयामुळे रुग्ण बरे होण्याचे दैनंदिन प्रमाण सातत्याने वाढत आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बरे होणाऱ्या रुग्णांची दररोजची संख्या 15,000 होती, ती ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 50,000 पेक्षा अधिकवर पोहचली.

जास्त रुग्ण बरे होत असल्यामुळे आणि रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्यामुळे आणि गृह अलगीकरण (सौम्य लक्षणे असलेले रुग्ण), यामुळे बरे झालेल्या रुग्णांच्या एकूण संख्येने 16 लाखांचा टप्पा ओलांडला आहे, त्यांची संख्या आता 16,39,599 एवढी आहे. रुग्ण बरे होण्याच्या दराने 70.38% हा नवा उच्चांक गाठला आहे.

एकूण रुग्णांपैकी सक्रीय रुग्णांची संख्या (6,43,948) म्हणजे केवळ 27.64% आहे. ते सध्या वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, त्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय कोविड-19 रुग्ण यांच्यातील अंतर वाढून, सुमारे 10 लाख एवढे झाले आहे.

रुग्णालयातील सुधारित आणि परिणामकारक वैद्यकीय उपचारपद्धती, रुग्णालयात रूग्णांना आणण्यासाठीची रुग्णवाहिका सेवा सुधारुन अधिक समन्वय आणणे आणि कोविडच्या रुग्णांना तात्काळ उपचार मिळतील, अशी व्यवस्था करणे, अशा उपाययोजना सातत्याने केल्या गेल्या. परिणामी, कोविडचा मृत्यूदर, जागतिक मृत्यूदराच्या तुलनेत सातत्याने कमी राहिला आहे. आज हा दर 1.98% एवढा आहे.

भारताच्या ‘टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’ पद्धतीमुळे चाचण्यांचा नवीन उच्चांक गाठला आहे, गेल्या 24 तासांत 7,33,449 चाचण्यात करण्यात आल्या आहेत. यामुळे आतापर्यंतच्या एकत्रित चाचण्यांची संख्या 2.6 कोटींपेक्षा अधिक झाली आहे. तर, प्रती दशलक्ष लोकांमागे चाचण्यांची संख्या 18,852 वर पोहचली आहे.

श्रेणीबद्ध आणि वाढत्या प्रतिसादामुळे देशभरात चाचण्यांचे जाळे विस्तारीत करण्यात आले. आज देशात एकूण 1421 प्रयोगशाळा आहेत, यापैकी 944 प्रयोगशाळा शासकीय तर 477 खासगी आहेत. यात:

• रिअल- टाईम आरटी पीसीआर चाचणी प्रयोगशाळा: 724 (शासकीय: 431 + खासगी: 293)

• ट्रूनॅट आधारीत प्रयोगशाळा: 584 (शासकीय: 481 + खासगी: 103)

• सीबीएनएएटी आधारीत प्रयोगशाळा: 113 (शासकीय: 32 + खासगी: 81)

 

इतर अपडेट्स:

कोविड-19 लस व्यवस्थापनासंबंधीच्या राष्ट्रीय तज्ज्ञ गटाची कोविड-19 लसीची उपलब्धता आणि वितरण यंत्रणा सुनिश्चित करण्यासंदर्भात आज बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव सह-अध्यक्ष होते.

तज्ज्ञ गटाने शेवटच्या घटकापर्यंत वितरणावर लक्ष केंद्रित करून लसीकरणाच्या प्रक्रियेचा मागोवा घेण्यासह लस व्यवस्थापन आणि वितरण यंत्रणेसाठी डिजिटल सुविधांच्या निर्मितीवर चर्चा केली. त्यांनी कोविड-19 रुग्णांची लसीकरणासाठी निवड यासंबंधीच्या व्यापक निकषांसंदर्भात चर्चा केली आणि लसीकरणासंबंधीच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या स्थायी तांत्रिक उपसमितीकडून (NTAGI) मते मागवली. या गटाने कोविड-19 लस खरेदी करण्याची पद्धती, यात स्वदेशी आणि आंतरराष्ट्रीय उत्पादन आणि लसीकरणासाठीचा प्राधान्य लोकसंख्या समूह याविषयीच्या मार्गदर्शक तत्वांवरही चर्चा केली.

तज्ज्ञ गटाने लस खरेदीसाठी लागणाऱ्या आर्थिक स्रोतांवर आणि अर्थपुरवठ्याच्या विविध पर्यायांवर चर्चा केली. तसेच कोविड-19 लस सुरु देण्यासंदर्भातील उपलब्ध पर्याय जसे डिलीव्हरी प्लॅटफॉर्मस, शीत साखळी आणि संबंधित पायाभूत सुविधांचा मुद्दाही चर्चेत आला. याव्यतिरिक्त, लसीचे समान आणि पारदर्शक पद्धतीने वितरण सुनिश्चित करण्यासाठी सर्व संभाव्य परिस्थितीवरील कार्यनीती आणि पाठपुरावा करण्याबाबत विचार करण्यात आला. लसीची सुरक्षा आणि निरीक्षण ठेवण्यासंदर्भातील मुद्दे आणि पारदर्शक माहिती आणि जागरूकता निर्माण करुन समुदाय सहभागावरही चर्चा करण्यात आली.

कोविड-19 लसीसंदर्भात भारताचा शेजारी राष्ट्रांना आणि विकासातील भागीदार देशांना पाठींबा यावरही चर्चा झाली. भारत देशांतर्गत लस उत्पादन क्षमता वाढवेल आणि इतर देशांना लसीचा लवकर पुरवठा सुनिश्चित व्हावा यासाठी प्रोत्साहीत करेल तसेच अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांनाही पुरवठा करेल, यासंदर्भातही तज्ज्ञ गटाची चर्चा झाली.

राज्यांनी खरेदीचे स्वतंत्र मार्ग आखू नयेत, असा सल्लाही समितीने दिला.


02 जुलै, 2020 रोजी कर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 41 दिवसांच्या आत पंतप्रधान फेरीवाले विक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेंतर्गत मंजूर कर्जाची संख्या आणि प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या अनुक्रमे 1 लाख आणि 5 लाखाच्या वर गेली आहे. कोविड - 19 लॉकडाउननंतर व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी किफायतशीर दरात खेळत्या भांडवलाच्या शोधात असलेल्या फेरीवाले विक्रेत्यांमध्ये पीएम स्वनिधी योजनेने उत्साह निर्माण केला आहे.

 

प्रथमदर्शनी नकारात्मकता आणि विरोध असूनही गेले चार महिने कोरोनामुळे लादली गेलेली स्थानबद्धता आपल्याला पूर्वीपेक्षा कार्यरत आणि कामात गुंतवणारी ठरली, असे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष वैंकय्या नायडू यांनी सांगितले. आपण आपल्या मनाला तात्काळ रिसेट करु शकलो आणि नव्या दैनंदिन परिस्थितीशी जुळवून घेउ शकलो म्हणूनच हे शक्य झाल्याचंही ते म्हणाले. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष म्हणून तीन वर्षांची कारकिर्द पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित समारंभात ते बोलत होते.

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संरक्षण-अधिग्रहण परिषदेने (डीएसी) स्वदेशी क्षमतेवर अवलंबून राहून दल बळकट करण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांना आवश्यक असलेल्या विविध प्लॅटफॉर्म्स आणि उपकरणाच्या भांडवल खरेदीसाठी मंजुरी दिली. सुमारे 8,722.38 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.

 

अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे सचिव तसेच ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव यांनी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत (टप्पा-II) अन्नधान्य (तांदूळ / गहू) आणि हरभरा यांची उचल आणि वितरणाच्या स्थिती व प्रगतीचा आढावा घेतला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न व नागरी पुरवठा प्रभारी सचिवांसह आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत अन्नधान्याच्या वितरणाची पाहणी केली.

 

महाराष्ट्र अपडेट्स :

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ देणार नाही यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी सर्व जिल्ह्यांत समर्पित रुग्णालय स्थापन करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचे ते म्हणाले. भारतात नोंदवलेल्या सर्व कोविड रुग्णसंख्येतील एक चतुर्थांश वाटा असलेल्या महाराष्ट्रात 1.48 लाख प्रकरणे आहेत. मात्र, राजधानी मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजारांच्या खाली गेली आहे.

FACT CHECK

***

B.Gokhale/S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1645396) Visitor Counter : 208