PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
05 AUG 2020 8:23PM by PIB Mumbai
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
दिल्ली-मुंबई, 5 ऑगस्ट 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येत 'श्री राम जन्मभूमी मंदिरा’चे भूमीपूजन केले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी या मंगलक्षणी देशातील नागरिकांचे आणि जगभरातील रामभक्तांचे अभिनंदन केले. आजच्या समारंभाला ऐतिहासिक असे संबोधत ते म्हणाले, भारतासाठी आज एका गौरवशाली अध्यायाची सुरुवात होत आहे, देशभरातील लोकांनी ज्याची शतकानुशतके प्रतीक्षा केली होती, त्या क्षणासाठी लोक उत्साही आणि भावनिक झाले आहेत, काहीजणांना तर हा क्षण आपल्या कारकिर्दीत पाहता आला, यावर क्षणभर विश्वास बसत नसेल. त्यांनी अधोरेखीत केले की, राम जन्मभूमी पुन्हा तुटण्याच्या आणि पुन्हा उभारण्याच्या चक्रातून मुक्त झाली आहे आणि आता मंडपाच्या जागी रामललाचे भव्य मंदिर उभारले जाईल.
पंतप्रधान म्हणाले, 15 ऑगस्ट हा दिवस ज्याप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यासाठी देशभरातील लोकांनी केलेल्या त्यागाचे प्रतिनिधीत्व आहे, त्याचप्रमाणे हा दिवस राम मंदिरासाठी पिढ्यानपिढ्यांच्या प्रचंड समर्पणाचे आणि अखंड संघर्षाचे प्रतीक आहे. राम मंदिराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी ज्यांनी संघर्ष केला त्या सर्वांचे पंतप्रधानांनी स्मरण केले आणि त्यांना अभिवादन केले.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
भारतात कोविड विरोधातील लढा अव्याहतपणे सुरु असून गेल्या 24 तासात, सलग दुसऱ्या दिवशी देशात कोविडच्या, 6 लाखांहून जास्त चाचण्या करण्यात आल्या. केंद्र, राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांनी आक्रमकतेने चाचण्या करणे हा लवकर निदान तसेच कोविड-19 रुग्णांचे उपचार/गृह अलगीकरण करण्यातील पहिला टप्पा मानल्याने चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
श्रेणीबद्ध प्रयत्नांमुळे चाचण्यांचे जाळे योजनाबद्ध रीतीने देशभर वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत 6,19,652 चाचण्या करण्यात आल्या. त्याबरोबरच आज रोजी चाचण्यांची एकत्रित संख्या 2,14,84,402 इतकी झाली आहे. प्रती लक्ष चाचण्यांच्या संख्येत 15,568 इतकी लक्षणीय वाढ झाली आहे.
‘टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’ या दृष्टीकोणावर आधारित धोरणाअंतर्गत कोविड-19 च्या चाचणी प्रयोगशाळांचे निरंतर सक्षमीकरण करण्यात येत आहे. आज रोजी देशात 1,366 प्रयोगशाळा आहेत, यापैकी 920 सरकारी तर 446 खाजगी प्रयोगशाळा आहेत. यात
• रियल टाईम RT PCR आधारित चाचण्यांच्या प्रयोगशाळा: 696 (सरकारी 421 + खाजगी 275)
• TrueNat आधारित चाचण्यांच्या प्रयोगशाळा: 561 (सरकारी 467 + खाजगी 94)
• CBNAAT आधारित चाचण्यांच्या प्रयोगशाळा : 109 (सरकारी 32 + खाजगी 77)
गेल्या 24 तासांत देशात एका दिवसात सर्वाधिक म्हणजे 51,706 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर विक्रमी 67.19 टक्क्यांवर पोहचला आहे. आतापर्यंत एकूण 12,82,215 रुग्ण बरे झाले असून ही संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा दुप्पट आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या सतत वाढत असल्यामुळे गेल्या 14 दिवसात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात 63.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्राच्या “टेस्ट, ट्रॅक, ट्रिट” नीतीद्वारे सुरू असलेले कोविड - 19 प्रतिसाद आणि व्यवस्थापन यामुळे ही अपेक्षित सुधारणा दिसून येत आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांच्या एकत्रित प्रयत्नांनी रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांसह नमुन्यांची वाढती चाचणी यामुळे गेल्या 14 दिवसात रुग्ण बरे होण्याचा दर 63 टक्क्यांवरून 67 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सतत वाढ होत असल्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत 7 लाख इतकी झाली आहे. दररोज जास्तीत जास्त रुग्ण बरे होत असल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 5,86,244 (काल ही संख्या 5,86,298 इतकी होती) इतकी झाली असून हे रुग्ण वैद्यकीय उपचार घेत आहेत. केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या "टेस्ट, ट्रॅक, ट्रिट” धोरणाची एकत्रित अंमलबजावणी केल्याने सीएफआर अर्थात कोविड मृत्यू दर जागतिक परिस्थितीच्या तुलनेत कमी असून त्यात सातत्याने घट होत आहे. कोविड मृत्यू दर आज 2.09 टक्के इतका आहे.
इतर अपडेट्स:
- उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या कुटुंबीयांनी आज कोविड-19 विरोधातील लढाई आणि अयोध्येतील राम मंदिरासाठी 10.00 लाख रुपयांची देणगी दिली. उपराष्ट्रपतींच्या पत्नी श्रीमती मुप्पावर्पू उषाम्मा नायडू यांनी पुढाकार घेऊन पुत्र हर्ष, स्नूषा श्रीमती राधा मुप्पावर्पू, कन्या दीपा व्यंकट, जावई व्यंकट इम्मानी आणि त्यांचे चार नातू यांच्याकडून वर्गणी जमा केली. श्रीमती नायडू यांनी 5.00 लाख रुपयांचा धनादेश पीएम केअर्स निधीकडे पाठवला आणि दुसरा 5.00 लाख रुपयांचा धनादेश श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे अयोध्येत आज झालेल्या भूमीपूजनानंतर राममंदिर उभारणीसाठी पाठवला. मार्च महिन्यात, उपराष्ट्रपती नायडू यांनी आपले महिन्याचे संपूर्ण वेतन पीएम केअर्स निधीसाठी दिले होते आणि कोविड संक्रमणाविरोधातील लढाईत दर महिन्याला 30 % वेतन देण्याचे जाहीर केले होते.
- भारतीय अन्नधान्य महामंडळाकडून प्राप्त अहवालानुसार, सुमारे 118 लाख मेट्रीक टन (99%) जे एप्रिल-जून 2020 साठी निर्धारीत होते, ते राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून उचलण्यात आले आहे आणि एनएफएसएच्या लाभार्थ्यांसाठी मोफत वितरीत करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, आणखी 111.52 लाख मेट्रीक टन (93.5%) राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून एप्रिल-जून 2020 साठी वितरीत करण्यात आले आहे. 37.5 लाख मेट्रीक टन (94%) अन्नधान्य एप्रिल आणि मे 2020 मध्ये सुमारे 75 कोटी लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहे आणि 36.54 लाख मेट्रीक टन (92%) अन्नधान्य जून महिन्यात 73 कोटी लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहे.
- केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते सहकार कॉपट्यूब एनसीडीसी चैनेलचे उद्घाटन झाले. NCDC म्हणजेच, राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचा हा उपक्रम आहे. आत्मनिर्भर भारताच्या विविध पैलूंची अंमलबजावणी करण्यात कृषी मंत्रालय आघाडीवर आहे, असे तोमर यावेळी म्हणाले. पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यात सहकार क्षेत्राची भूमिका महत्वाची आहे, असे त्यांनी सांगितले. तोमर यांच्या हस्ते यावेळी NCDC द्वारा निर्मित, “सहकाराची स्थापना आणि नोंदणी’ या विषयावरचा मार्गदर्शक व्हिडीओचेही प्रकाशन करण्यात आले. अठरा विविध राज्यांसाठी हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.
- एनआयडीएम आणि आयएमडी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘विजेसह वादळे आणि वीज कोसळणे ’ या विषयावरच्या वेबिनारचे केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था, एनआयडीएमने भारतीय हवामान विभागाच्या सहकार्याने हायड्रोमेट्रोलॉजीकल संकटांची जोखीम कमी करण्याबाबत वेबीनार शृंखला आयोजित केली आहे. विजेसह वादळे आणि वीज कोसळणे,ढगफुटी आणि पूर, चक्रीवादळ आणि हवामान बदल आणि तीव्र हवामान विषयक घटना अशी चार वेबिनार आयोजित करण्यात आली आहेत. हायड्रोमेट्रोलॉजीकल संकटांचा धोका अधिक उत्तम जाणण्यासाठी मानवी क्षमता वृद्धिंगत करण्यावर आणि धोका कमी करण्यासाठी आणि परिसर आणि संबंधितांची लवचिकता वाढवण्यासाठी,पंतप्रधानांच्या दहा कलमी कार्यक्रमाची आणि सेन्दाई चौकटीची अंमलबजावणी करत त्यावर प्रभावी समन्वयी कृती यावर यात भर देण्यात आला आहे.
- पेयजल आणि स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर यांनी संपादित केलेल्या “स्वच्छ भारत रेव्होल्यूशन ” या पुस्तकाचा हिंदीत अनुवाद करण्यात आला असून स्वच्छ भारत क्रांती म्हणून प्रकाशित केले आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत आणि केंद्रीय वस्त्रोद्योग व महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी नवी दिल्लीत या पुस्तकाचे अधिकृत प्रकाशन केले. त्यानंतर या दोन्ही मंत्र्यांनी आणि परमेश्वरन अय्यर यांनी पुस्तक आणि स्वच्छ भारत अभियानावर चर्चा केली. स्वच्छ भारत अभियानातील लाखो कार्यकर्त्यांनी वेबकास्टिंगच्या माध्यमातून ही चर्चा पाहिली.
महाराष्ट्र अपडेट्स :
महाराष्ट्र राज्यात सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने सुधारत असून आता तो 65 टक्के इतका झाला आहे. हा दर राष्ट्राची सरासरी दराच्या म्हणजेच 66 टक्क्यांच्या जवळ पोहचला आहे. राज्यात 4.57 लाख रुग्णांपैकी 2.99 लाख रुग्ण बरे झाले असून 1.42 लाख सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईला पूर्वपदावर आणण्यासाठी महापालिकेने महत्वपूर्ण निर्णय घेत लॉक डाऊनच्या नियमांना काही प्रमाणात शिथिल करत शहरातील व्यापार आजपासून काही प्रमाणात सुरू करण्याची परवानगी दिली आहे. शहरातील सम-विषम नियम रद्द करण्यात आला असून मॉल्स सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
* * *
G.Chippalkatti/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1643596)
Visitor Counter : 195