पंतप्रधान कार्यालय

लेहमध्ये भारतीय सशस्त्र दलांना पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 03 JUL 2020 8:50PM by PIB Mumbai

 

भारत माता की- जय

भारत माता की –जय

मित्रहो, आपले साहस,आपले शौर्य आणि भारत मातेच्या मान-सन्मानाच्या रक्षणासाठी आपले समर्पण अतुलनीय आहे. आपले चैतन्य जगातल्या कोणाहीपेक्षा कमी नाही.ज्या खडतर परिस्थितीत, इतक्या उंच ठिकाणी आपण भारत मातेची ढाल होऊन तिचे रक्षण करता, सेवा करता, त्याला जगात तोड नाही.

आपण ज्या जागी तैनात आहात त्या जागेच्या उंची पेक्षाही आपले साहस उत्तुंग आहे. ज्या खोऱ्यात आपण रोज वावरता त्या खोऱ्यापेक्षाही आपला निश्चय बुलंद आहे.आपले बाहु, आपल्या भोवतालच्या डोंगरापेक्षाही मजबूत आहेत. आपली इच्छाशक्ती,आपल्या भोवतालच्या पर्वताप्रमाणे खंबीर आहे. आपल्यासमवेत आज येऊन मी हे अनुभवतो आहे. माझ्या डोळ्यांनी हे पाहत आहे.

मित्रहो, देशाचे रक्षण आपल्या हाती आहे, आपल्या मजबूत निश्चयात आहे. तिथे एक अतूट विश्वास आहे. केवळ मला नव्हे तर संपूर्ण देशाला एक अतूट विश्वास आहे आणि देश निश्चिंतही आहे. आपण सीमेवर ठाम उभे आहात हा विश्वासच प्रत्येक देशवासियाला अहोरात्र काम करण्यासाठी प्रेरित करतो. आत्मनिर्भर भारताचा संकल्प आपणामुळे, आपला त्याग, बलिदान आणि पुरुषार्थ यामुळे अधिक दृढ होतो. आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी नुकतेच जे शौर्य दाखवले, त्यातून संपूर्ण जगाला भारताचे सामर्थ्य काय आहे याचा संदेश गेला आहे.

माझ्यासमोर महिला सैनिकही आहेत. युद्धाच्या मैदानात, सीमेवर हे दृश्य आपल्याला प्रेरणा देते.

मित्रहो, राष्ट्र कवी रामधारी सिंह दिनकर यांनी लिहिले होते-

जिनके सिंहनाद से सहमी। धरती रही अभी तक डोल।।

कलम, आज उनकी जय बोल। कलम आज उनकी जय बोल।।

आज वाणीने मी तुमचा जयजयकार  करतो, अभिनंदन करतो. गलवान खोऱ्यात  शहीद झालेल्या आपल्या वीर जवानांना मी पुन्हा श्रद्धांजली अर्पण करतो. यात पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तर, दक्षिणेकडून, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून  शूरवीर आपल्या  शौर्याचे दर्शन घडवत होते. त्यांचा पराक्रम, सिंहनाद यांनी भूमी आताही त्यांचा जयजयकार करत आहे. आज प्रत्येक देशवासियाचे मस्तक आपल्या समोर, आपल्या देशाच्या वीर सैनिकांसमोर आदराने नतमस्तक होऊन नमन करत आहे. प्रत्येक भारतीयाची मान तुमची वीरता आणि पराक्रमाने अभिमानाने उंचावली आहे.

मित्रहो, सिंधू आशीर्वादाने ही धरती पावन झाली आहे. वीरपुत्रांचे   शौर्य आणि पराक्रम या धरतीमधे सामावला आहे. लेह-लडाख पासून कारगिल आणि सियाचीनपर्यंत,रीजांगलाचे  बर्फाचे पर्वत ते गलवान खोऱ्यातल्या थंडगार पाण्याच्या धारे पर्यंत प्रत्येक डोंगर प्रत्येक शिखर, प्रत्येक खडकही भारतीय सैनिकांच्या पराक्रमाची साक्ष  देतात. 14 कॉर्प्सच्या पराक्रमाच्या कथा तर चहूकडे आहेत.  जगाने आपले साहस पाहिले आहे, जाणले आहे. आपल्या शौर्याच्या कथा घराघरात सांगितल्या जात आहेत आणि भारत मातेच्या शत्रूने आपली फायर आणि फ्युरी, आपला त्वेषही पाहिला आहे.

मित्रहो, लडाखचा हा संपूर्ण भाग, भारताचा हा मुकुट,  130 कोटी भारतीयांच्या मान-सन्मानाचे प्रतिक आहे. भारतासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी सदैव सज्ज असणाऱ्या राष्ट्र भक्तांची ही धरती आहे. या धरतीने  कुशॉक बकुला रिनपोंछे सारखे महान राष्ट्र भक्त देशाला दिले आहेत. इथे फुटीरता निर्माण करण्याचे कारस्थान, लडाखच्या राष्ट्रभक्त जनतेने  रिनपोंछे यांच्या नेतृत्वाखाली निष्फळ ठरवले. त्यांच्याच प्रेरक प्रयत्नामुळे देशाला, भारतीय सैन्याला लडाख स्काऊट या नावाने इन्फंट्री रेजिमेंट तयार करण्याची प्रेरणा मिळाली. आज लडाखचे लोक प्रत्येक स्तरावर मग ते सैन्य असो किंवा सर्वसामान्य नागरिकाचे कर्तव्य असो,राष्ट्र बलवान करण्यासाठी मोठे योगदान देत आहेत.

मित्रहो, आपल्याकडे म्हटले जाते-

 खड्गेन आक्रम्य वंदिता आक्रमण: पुणिया, वीर भोग्य वसुंधरा

म्हणजे, वीर आपल्या शस्त्राच्या सामर्थ्यावर धरतीचे, मातृभूमीचे रक्षण करतात. ही धरती वीरांसाठी आहे. या मातृभूमीचे रक्षण आणि सामर्थ्य, आपला संकल्प हिमालयाइतका उत्तुंग आहे. हे सामर्थ्य आणि संकल्प याची प्रचीती मला आपल्या डोळ्यातून मिळते. आपल्या चेहेऱ्यावर मला हे स्पष्ट दिसत आहे. आपण या धरतीचे वीर आहात, ज्या धरतीने हजारो वर्षापासून अनेक हल्ल्यांना, अत्याचारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आपली ही ओळख आहे, आपण असे लोक आहोत जे बासरीधारी कृष्णाची पूजा करतात. आपण असे लोक आहोत जे सुदर्शन चक्रधारी कृष्णाला आदर्श मानतात. याच प्रेरणेने प्रत्येक आक्रमणानंतर भारत अधिक मजबूत होऊन उभा राहिला आहे.

मित्रहो, राष्ट्र, जग आणि मानवतेच्या प्रगतीसाठी शांतता आणि मित्रता यांचा स्वीकार  प्रत्येक जण  करतो, हे आवश्यक आहे असे प्रत्येक जण मानतो. मात्र आपण हेही जाणतो की निर्बल शांतता आणू शकत नाहीत. वीरता ही शांततेची पूर्व अट आहे. भारत आज पाणी,जमीन, आकाश आणि अंतराळापर्यंत आपले सामर्थ्य वाढवत आहे, त्यामागे त्याचे लक्ष्य  मानव कल्याणाचेच आहे. भारत आज आधुनिक शस्त्र-अस्त्र निर्मिती करत आहे. जगातले अत्याधुनिक तंत्रज्ञान भारताच्या सैन्यासाठी आणत आहे त्यामागेही हीच भावना आहे. भारत आधुनिक पायाभूत निर्मिती वेगाने करत आहे त्यामागेही त्याचा  हाच संदेश आहे.

जागतिक महायुध्द असो किंवा शांततेची बाब असो जेव्हा आवश्यकता भासली तेव्हा जगाने आपल्या वीरांचा पराक्रम पाहिला आहे, जागतिक शांततेसाठीचा त्यांचा प्रयत्न अनुभवला आहे. आपण नेहमीच मानवतेचे रक्षण आणि सुरक्षितता यासाठी काम केले आहेजीवन अर्पण केले आहे. आपण सर्वजण भारताचे हे लक्ष्य, भारताची ही परंपरा, भारताची ही महान संस्कृती  स्थापित करणारे आघाडीवरचे नेतृत्व आहात.

मित्रहो, महान संत तिरुवल्लुवर यांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितले आहे-

मरमानम मांड वडिच्चेलव्  तेट्रम 

येना नान्गे येमम  पडईक्कु

 

म्हणजे, शौर्य, सन्मान,मर्यादापूर्ण व्यवहाराची परंपरा आणि विश्वसनीयता हे चार गुण कोणत्याही देशाच्या सैन्याचे प्रतिबिंब असतात. भारताचे सैन्य नेहमीच या मार्गावर वाटचाल करत आले आहे.

****

B.Gokhale/ N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1636394) Visitor Counter : 347