गृह मंत्रालय

परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी तसेच भारतात अडकलेल्या व्यक्ती ज्यांना तातडीच्या कारणास्तव परदेशात जायचे आहे, अशा व्यक्तींसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाची मानक परिचालन सूचना (SOP)

Posted On: 24 MAY 2020 10:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 मे 2020

 

केंद्रीय गृह मंत्रालयाने देशाबाहेर अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी तसेच भारतात अडकलेल्या व्यक्ती ज्यांना तातडीच्या कारणास्तव परदेशात जायचे आहे अशा व्यक्तींसाठीही मानक परिचालन सूचना (SOP) प्रसिद्ध केल्या आहेत. हा आदेश याचसंबंधी दिनांक 05.05.2020 रोजी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशाची जागा घेईल. सीमेपलीकडून रस्त्याने येणाऱ्या प्रवाशांनाही या सूचना लागू असतील.

कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन उपायांतर्गत प्रवाशांना आंतरराष्ट्रीय प्रवास करायला मनाई आहे. उपलब्ध माहितीनुसार नोकरी, अभ्यास / इंटर्नशिप, पर्यटन, व्यवसाय इत्यादी विविध कारणांसाठी लॉकडाउनपूर्वी विविध देशांमध्ये गेलेले अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत. दीर्घकाळ परदेशात राहिल्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून तातडीने भारतात परत यायची इच्छा आहे. उपरोक्त प्रकरणांव्यतिरिक्त, असे काही भारतीय नागरिक आहेत ज्यांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत किंवा कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूमुळे भारतात येण्याची आवश्यकता आहे. भारतातही अनेक लोक अडकले आहेत, ज्यांना विविध कारणांसाठी तातडीने परदेशात जाण्याची इच्छा आहे. परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या प्रवासासाठी, स्थलांतरित कामगार / मजूर, व्हिसाची मुदत संपलेल्या अल्प मुदतीचे व्हिसा धारक, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतील व्यक्ती / गर्भवती महिला / वृद्ध आणि विद्यार्थी तसेच  कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूमुळे भारतात परत जाणे आवश्यक आहे अशांना प्राधान्य देण्यात येईल.

अशा व्यक्तींना परराष्ट्र मंत्रालयाच्या निर्देशानुसार आवश्यक तपशिलांसह ते ज्या देशात अडकले आहेत त्या ठिकाणी भारतीय दूतावासाकडे नोंदणी करावी लागेल. अशा व्यक्तींना नागरी उड्डाण मंत्रालयाने परवानगी दिलेल्या अनियमित वाणिज्यिक उड्डाणांद्वारे आणि सैन्य कार्य  विभाग (डीएमए) / नौवहन मंत्रालयाच्या परवानगीनुसार जहाजांमधून भारतात प्रवास करता येईल. प्रवासाचा खर्च प्रवाशांना करावा लागेल. तसेच ज्यांच्यात कोविडची लक्षणे नाहीत त्यांनाच भारतात प्रवास करण्याची अनुमती दिली जाईल.

परराष्ट्र मंत्रालय अशा सर्व प्रवाशांचा संबंधित तपशिलासह विमान / जहाज यानुसार डेटाबेस तयार करेल आणि संबंधित राज्य / केंद्रशासित प्रदेशांना पाठवेल. त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालय त्यांचे राज्य / केंद्रशासित प्रदेशनिहाय नोडल अधिकारी नियुक्त करतील, जे संबंधित राज्ये / केंद्रशासित प्रदेशांद्वारे यासाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधतील. येणारी विमाने / जहाजाचे वेळापत्रक (दिवस, ठिकाण आणि आगमनाची वेळ) परराष्ट्र मंत्रालय त्यांच्या ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्मवर किमान दोन दिवस अगोदर सूचित करेल.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय आगमनांसाठी आणि विलगीकरण व्यवस्थेसाठी जारी केलेल्या  मार्गदर्शक सूचना गृह मंत्रालयाच्या मानक परिचालन सूचनांसह  खालील लिंकवर जोडल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व प्रवाशांना प्रवास सुरु करण्यापूर्वी  14 दिवसांसाठी अनिवार्य विलगीकरणाचे यामध्ये 7 दिवस स्वखर्चाने संस्थागत विलगीकरण आणि त्यानंतर घरी 7-दिवस अलगीकरणात राहण्याचे पालन करू, असे लेखी आश्वासन द्यावे लागेल.

परदेशात जाण्यासाठी इच्छुक भारतात अडकलेल्या नागरिकांना नागरी उड्डाण  मंत्रालयाकडे (एमओसीए) किंवा या उद्देशासाठी मंत्रालयाने नियुक्त केलेल्या कोणत्याही एजन्सीकडे प्रस्थान आणि आगमनस्थानासह आवश्यक तपशीलांसह नागरी उड्डाण मंत्रालयाच्या विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल. भारतातून त्यांचा प्रवास बिगर अनुसूचित व्यावसायिक विमानातून होईल ज्यांना नागरी उड्डाण मंत्रालयाने  परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी परवानगी दिली आहे. प्रवासाचा खर्च प्रवाशांना करावा लागेल.

संबंधित गंतव्य देशाचे नागरिक असलेल्यांनाच ज्यांच्याकडे त्या देशाचा किमान एक वर्षाच्या कालावधीचा व्हिसा आहे; आणि ग्रीन कार्ड किंवा ओसीआय कार्ड धारक आहेत अशांनाच त्या देशात प्रवासाची परवानगी असेल. कुटुंबात वैद्यकीय आपत्कालीन स्थिती किंवा मृत्यू झाला असेल तर अशा घटनांमध्ये सहा महिन्यांचा व्हिसा असणार्‍या भारतीय नागरिकांनादेखील परवानगी दिली जाऊ शकते. अशा व्यक्तींच्या तिकिटांची पुष्टी होण्यापूर्वी, नागरी उड्डाण मंत्रालयाने  हे सुनिश्चित करावे  की गंतव्य देश त्या देशात अशा व्यक्तींच्या प्रवेशाला परवानगी देत आहे.

परदेशी जहाजांवर सेवा देण्याचे कंत्राट स्वीकारण्यास इच्छुक भारतीय खलाशी / चालक दल, वंदे भारत मिशन अंतर्गत भारतातून जाणाऱ्या बिगर अनुसूचित व्यावसायिक विमानांतून किंवा त्यांच्या नियोक्त्याद्वारे व्यवस्था केलेल्या इतर विमानातून प्रवास करू शकतात. मात्र यासाठी नौवहन मंत्रालयाची मंजुरी आवश्यक आहे.

विमानात चढण्यापूर्वी आरोग्य प्रोटोकॉलनुसार सर्व प्रवाशांनी थर्मल स्क्रीनिंग केले आहे हे नागरी उड्डाण मंत्रालय सुनिश्चित करेल. कोविडची लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच विमानात चढण्याची परवानगी दिली जाईल. विमानात मास्कचा वापर, पर्यावरणीय स्वच्छता, श्वसन स्वच्छता, हाताची स्वच्छता इत्यादी आवश्यक दक्षता पाळावी लागेल.

एसओपी दस्तावेज आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा


* * *

S.Thakur/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1626713) Visitor Counter : 306