• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
आदिवासी विकास मंत्रालय

आदिवासी तरुणांच्या डिजिटल कौशल्यासाठी अर्जुन मुंडा यांनी फेसबुकसह भागीदारीत आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा ‘गोल’ कार्यक्रम भारतभर सुरू केला


‘गोल’ कार्यक्रम आदिवासींमध्ये उद्योजकता विकसित करून डिजिटल व्यासपीठाद्वारे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडेल

Posted On: 15 MAY 2020 4:25PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली, 15  मे 2020

केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी आज नवी दिल्लीत वेबिनारच्या माध्यमातून फेसबुकसोबत भागीदारीत तयार केलेल्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या गोल (गोइंग ऑनलाईन ऍज लीडर्स) कार्यक्रमाचे उद्‌घाटन केले. आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या राज्यमंत्री रेणुकासिंग सरुता; आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर व आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच फेसबुकचे प्रतिनिधी वेबिनारद्वारे या उदघाटन कार्यक्रमात उपस्थित होते. गोल कार्यक्रम आदिवासी तरुणांना डिजिटल मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. आदिवासी तरुणांमधील छुपी प्रतिभा शोधण्यासाठी उत्प्रेरक म्हणून हा डिजिटल सक्षम कार्यक्रम बनविलेला आहे, जो त्यांच्या वैयक्तिक विकासात व त्यांच्या समाजाच्या सर्वांगीण प्रगतीत मदत करेल.

 

वेबिनारलिंक:

https://www.facebook.com/arjunmunda/videos/172233970820550/UzpfSTY1Nzg2NDIxNzU5NjMzNDoyODg4MDg1MTAxMjQwODkw/

 

कोविड महामारीमुळे उद्‌भवणाऱ्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर डिजिटल साक्षरतेला महत्त्व प्राप्त झाले आहे, असे मुंडा यांनी सांगितले. ते म्हणाले की, फेसबुकसह भागीदारीत आदिवासी व्यवहार मंत्रालयाने तयार केलेला ‘गोल’ कार्यक्रम आदिवासी तरुण व महिलांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने अतिशय योग्य वेळी सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 5 हजार आदिवासी तरुणांचे कौशल्य विकसित करून त्यांना व्यवसाय करण्याचे नवीन मार्ग शिकविण्यासाठी, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारांशी जोडण्यासाठी डिजिटल मंचाचा व साधनांच्या पूर्ण संभाव्यतेचा उपयोग करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन आहे. डिजिटल कौशल्य व तंत्रज्ञान त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री म्हणाले की फलोत्पादन, खाद्य प्रक्रिया, मधमाशी पालन, आदिवासी कला व संस्कृती, औषधी वनस्पती, उद्योजकता यासारख्या विविध क्षेत्रात आदिवासी तरुण व महिलांना मार्गदर्शनाद्वारे कौशल्य आणि ज्ञान प्राप्त करण्यास मदत करण्यासाठी तसेच त्यांची क्षमता विकसित करण्यासाठी हा कार्यक्रम दीर्घकालीन दृष्टीने बनविला गेला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 5 हजाराने सुरु झालेल्या या उपक्रमात यानंतर असे अनेक आदिवासी जोडले जातील; ज्यांना डिजिटल तंत्रज्ञान शिकण्यात रुची आहे, असेही मंत्र्यांनी सांगितले.

गोल कार्यक्रमाचा हेतू व आशय अद्वितीय आणि प्रभावी आहेत. आदिवासी महिलांना डिजिटल जगाशी जोडून त्यांच्या सक्षमीकरणासाठी वातावरण तयार करण्यात आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी डिजिटल मंचाचा उपयोग करण्यामध्ये या कार्यक्रमाचा खूप उपयोग होईल. राज्यातील आदिवासी तरुणांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने परिणामकारक ठरण्यात गोल कार्यक्रम यशस्वी होईल, असा विश्वास रेणुकासिंग सरुता यांनी व्यक्त केला.

दीपक खांडेकर म्हणाले की, गोल कार्यक्रम सकारात्मक कृती दर्शवितो जो, आदिवासी व बिगर आदिवासी तरुणांमधील दरी कमी करण्यात पुष्कळ उपयोगी ठरेल आणि देश उभारणीत आदिवासी तरुणांचा सहभाग नोंदवेल.

फेसबुकच्या सार्वजनिक धोरणाच्या संचालक अंखी दास (भारत, दक्षिण व मध्य आशिया) यांनी सांगितले की, सध्याची जागतिक महामारी ही आपण पाहिलेले सर्वात गंभीर आरोग्यविषयक व मानवतावादी संकट आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालय हे भारताची आदिवासी संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि आदिवासी समाजातील स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी समर्पित आहे. या टप्प्यावर, आम्ही आमच्या आदिवासी तरुणांची अधिक उद्योजकीय क्षमता वाढविण्यासाठी मंत्रालयाबरोबर सहकार्याचा विस्तार करीत आहोत आमच्या गोल कार्यक्रमाच्या दुसर्‍या टप्प्यात, असे शिक्षण आणि प्रशिक्षण व्यासपीठ तयार केले जाईल, जे 5 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना अनुभवी शिक्षकांशी जोडेल. आम्हाला आशा आहे की हा माजी विद्यार्थ्यांनी बनविलेला कार्यक्रम अनेक आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देईल.

या कार्यक्रमात, 5000 अनुसूचित जमातीच्या तरुणांना (‘मेंटी’ म्हणून संबोधले जाणारे) विविध विभाग आणि क्षेत्रातील तज्ञांकडून (‘मार्गदर्शक’ म्हणून ओळखले जाणारे) प्रशिक्षण घेण्याची उत्कृष्ट संधी मिळेल. 2 पुरुषांसाठी 1 सल्लागार असेल. या कार्यक्रमाचे उद्दीष्ट दुर्गम भागातील अनुसूचित जमातीच्या (एसटी) तरूणांना त्यांच्या मार्गदर्शकासह त्यांच्या आकांक्षा, स्वप्ने आणि प्रतिभा सामायिक करण्यासाठी डिजिटल मंचाचा वापर करण्यास सक्षम करणे हे आहे.

गोल (गोइंग ऑनलाईन ऍज लीडर्स), आदिवासी व्यवहार मंत्रालयासह फेसबुक इंडियाचा संयुक्त उपक्रम

5,000 युवा आदिवासी उद्योजक, व्यावसायिक, कारागीर व कलाकार यांना डिजिटल उद्योजकता कार्यक्रमाअंतर्गत डिजिटल कौशल्याबाबत प्रशिक्षण दिले जाईल.

इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पोर्टल goal.tribal.gov.inवर अर्ज करावा.

अर्ज 4 मे 2020 पासून 3 जुलै 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारले जातील.

उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील अग्रणींनी प्रशिक्षक म्हणून goal.tribal.gov.inयावर नोंदणी करावी.

फेसबुकने स्वत:हून हा प्रकल्प 5 फेब्रुवारी 2019 ते ऑक्टोबर 2019 या काळात 5 राज्यांमध्ये 100 प्रशिक्षणार्थी आणि 25 मार्गदर्शकांसह प्रायोगिक तत्त्वावर चालविला होता, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्या प्रयत्नातील यशाच्या आधारे फेसबुकने सकारात्मक कृती अंतर्गत संयुक्त पुढाकार घेण्यासाठी आणि कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रशिक्षणार्थी, डिझाइन अभ्यासक्रम आणि विविध उपक्रमांची निवड करण्यात फेसबुकला मदत करण्यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयाकडे संपर्क साधला.

प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षकांनी पोर्टलवर (goal.tribal.gov.in) नोंदणी करावी लागेल, जी 4 मे, 2020 ते 3 जुलै 2020 या दोन महिन्याच्या कालावधीत करता येईल. पोर्टलमध्ये नोंदणीसाठी स्मार्टफोन नसलेल्या राज्यातील आदिवासी तरुणांना सुविधा देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून मदत करण्याची विनंती केली आहे.

आदिवासी तरुणांना विविध व्यवसायातून प्रतिनिधित्व करणारे आणि संपूर्ण शहरी व ग्रामीण भागातील प्रतिनिधीत्व अशा प्रकारच्या आधारावर प्रशिक्षणार्थी आणि मार्गदर्शकांची निवड केली जाईल. माहिती-तंत्रज्ञान आधारित प्रणाली प्रशिक्षणार्थी आणि मार्गदर्शकांशी जुळण्यासाठी तयार केली गेली आहे जेणेकरून ते समान व्यवसायातील असतील आणि शक्यतो समान भाषा बोलू शकतील. निवडक प्रशिक्षणार्थी नऊ महिने किंवा 36 आठवड्यांसाठी या कार्यक्रमात व्यस्त असतील ज्यात 28 आठवड्यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आणि त्यानंतर आठ आठवड्यांचा इंटर्नशिप कार्यक्रम असेल.हा कार्यक्रम डिजिटल साक्षरता, जीवन कौशल्य आणि नेतृत्व या तीन मुख्य बाबींवर आणि उद्योजकता आणि कृषी, कला व संस्कृती, हस्तकला व वस्त्र, आरोग्य, पोषण यासारख्या गोष्टींवर केंद्रित असेल. राष्ट्रीय शिष्यवृत्ती आणि फेलोशिप योजनेंतर्गत आदिवासी व्यवहार मंत्रालयाकडून शिष्यवृत्ती मिळविणारे आणि आदिवासी प्रतिभा कार्यक्रमाचे भाग असलेले किमान 250 प्रशिक्षणार्थीना या कार्यक्रमाद्वारे मार्गदर्शन केले जाईल.

निवडलेल्या सर्व सभासदांना स्मार्टफोन व इंटरनेट प्रवेश (एक वर्षासाठी) तसेच फेसबुकद्वारे विविध बाह्य मंचाच्या प्रदर्शनासह प्रदान केले जातील; ज्यामुळे सहभागींना त्यांची व्यावसायिक कौशल्य आणि नेतृत्व क्षमता दर्शविण्याची संधी मिळेल. अनुसूचित जमातीच्या कल्याण आणि त्यांची मूलभूत कर्तव्ये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी सुरू केलेल्या विविध योजनांविषयी हा कार्यक्रम आदिवासींमध्ये जागरूकता निर्माण करेल. मुद्रा योजना, कौशलय विकास योजना, जन धन योजना, कौशल भारत, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया अशा इतर सरकारी योजनांसह या कार्यक्रमाला जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. यामुळे सहभागींना या सरकारी योजनांतर्गत प्रदान केलेल्या संधींचा फायदा घेता येईल.

 

S.Pophale/V.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1624081) Visitor Counter : 333


Link mygov.in