शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा 2025 या कार्यक्रमाला एका महिन्यातील सर्वाधिक नोंदणीसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने केले सन्मानित

Posted On: 04 AUG 2025 9:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2025

केंद्रीय शिक्षण मंत्रालय मायगोव्हच्या सहकार्याने 2018 पासून यशस्वीरित्या आयोजित करीत असलेल्या ‘परीक्षा पे चर्चा ‘ (पीपीसी) या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला "एका महिन्यात नागरिक सहभाग मंचावरील सर्वाधिक जन नोंदणी" यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित केले आहे. मायगोव्ह मंचावर आयोजित कार्यक्रमाच्या 8 व्या आवृत्तीत 3.53 कोटी वैध नोंदणी झाल्याच्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल हा गौरव प्राप्त झाला आहे.

परीक्षा पे चर्चा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आणि नेतृत्वाखालील एक अद्वितीय जागतिक व्यासपीठ आहे जिथे ते स्वतः विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी थेट संवाद साधतात. हा उपक्रम परीक्षेच्या हंगामाला सकारात्मकता, तयारी आणि उद्देशपूर्ण शिक्षणाच्या उत्सवात रूपांतरित करतो, ज्यामुळे परीक्षा हा ताणतणावाऐवजी प्रोत्साहनाचा काळ बनतो.

नवी दिल्ली येथे झालेल्या एका समारंभात अधिकृत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र औपचारिकरित्या प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान; केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, रेल्वे व माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव; केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद आणि इतर प्रमुख भागधारक उपस्थित होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकृत निर्णय अधिकारी ऋषी नाथ यांनी हा  विक्रम प्रमाणित करून याबाबत घोषणा केली.

या प्रसंगी बोलताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली परीक्षा पे चर्चा हा उपक्रम परीक्षांकडे पाहण्याचा राष्ट्रीय दृष्टिकोन म्हणून पुन्हा परिभाषित करण्यात आला आहे, तसेच ताणतणावाला शिक्षणाच्या उत्सवात रूपांतरित करण्यात आले आहे. प्रधान यांनी माहिती दिली की पीपीसीच्या 8 व्या आवृत्तीला 2025 मध्ये सर्व माध्यम मंचावर एकूण 21 कोटींहून अधिक प्रेक्षक लाभले. पीपीसी 2025 मधील प्रचंड सहभाग हा समग्र आणि समावेशक शिक्षणासाठी देशाच्या सामूहिक वचनबद्धतेचे आणि विकसित भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगततेचे प्रतिबिंब म्हणून पाहिले जाते, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाला संबोधित करताना अश्विनी वैष्णव यांनी "परीक्षा पे चर्चा" हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक अनोखा उपक्रम असल्याचे म्हटले, जो विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना एकत्र आणून कल्याण आणि तणावमुक्त शिक्षणाला प्रोत्साहन देतो. त्यांनी या अमृत कालमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या करिअरच्या विस्तृत संधींवर प्रकाश टाकला आणि सांगितले की सर्वाधिक नोंदणीसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार मिळाल्याने या उपक्रमावरील जनतेचा दृढ विश्वास दिसून येतो.

प्रशासनाला अधिकाधिक सहभागी करण्याच्या मायगोव्हच्या प्रयत्नांचे जितिन प्रसाद यांनी कौतुक केले.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये तणावमुक्त आणि आनंददायी शिक्षणावर भर देण्यात आला आहे. वैयक्तिक संवादांद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळ व्यवस्थापन, डिजिटल उपकरणांमुळे लक्ष विचलित होणे , जागरूकता आणि भावनिक लवचिकता यासारख्या प्रमुख आव्हानांची उकल करतात, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना व्यावहारिक मार्गदर्शन आणि प्रेरणा देतात.

पीपीसी 2025 चे यश म्हणजे सामूहिक यशस्वी कामगिरी असून या टप्प्यात योगदान देणाऱ्या सर्व भागधारकांचे, शैक्षणिक संस्थांचे आणि नागरिकांचे मंत्र्यांनी कौतुक केले आहे. सहभागी प्रशासन आणि समग्र शिक्षण अधिक मजबूत करण्याची वचनबद्धता कायम असल्याचे त्यांनी सांगितले. 

निलीमा चितळे/नंदिनी मथुरे /प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2152352)