नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दहशतवादी हल्ल्यामुळे प्रभावित पहलगामच्या पर्यटक आणि पीडितांच्या मदतीसाठी नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्याकडून वेगवान कार्यवाही


श्रीनगरहून चार तर दिल्ली आणि मुंबई येथून प्रत्येकी दोन विशेष विमानांची व्यवस्‍था

भाडे आकारणी नियमित स्तरानुसार करण्याचे विमान कंपन्यांना निर्देश

Posted On: 23 APR 2025 11:23AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 एप्रिल 2025

 

काश्मीरमधील भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी प्रभावित पर्यटक आणि पीडितांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी त्वरेने कार्यवाही सुरू केली आहे.

नायडू यांनी वैयक्तिकरित्या गृहमंत्र्यांशी  संवाद साधला. ते चोवीस तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी सतत समन्वय साधत आहेत. तात्काळ मदतीच्या उपायांचा एक भाग म्हणून, श्रीनगरहून चार विशेष विमानांच्या उड्डाणांची  त्याचबरोबर दिल्ली आणि  मुंबई येथून प्र‍त्येकी दोन  विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.  यानंतरही जर  गरज पडली तर, अतिरिक्त उड्डाणांची तयारी  ठेवण्यात आली आहे.

मंत्री  राम मोहन नायडू यांनी सर्व एअरलाइन ऑपरेटर्सची तातडीची बैठक घेतली आहे. या संवेदनशील काळात कोणत्याही प्रवाशावर भार पडणार नाही याची खात्री करून नियमित भाडे पातळी राखण्याचे निर्देश विमान सेवा देणा-या कंपन्यांना  देण्यात आले आहेत.

या व्यतिरिक्त, राम मोहन नायडू यांनी सर्व विमान कंपन्यांना तेथील हल्‍ल्‍यामध्‍ये मृत्युमुखी पडलेल्यांचे पार्थिव आणण्‍यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्राधिकरणांशी समन्वय साधून पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

नागरी उड्डाण मंत्रालय अत्यंत सतर्क आहे आणि हल्ल्यातील पीडितांना  शक्य ती सर्व मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे.

 

* * *

S.Bedekar/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2123692)