पंतप्रधान कार्यालय

विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद


या कार्यक्रमात देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी झाले सहभागी

"विकसित भारत संकल्प यात्रा'चा सरकारी योजना प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचवण्यावर भर"

"योजनांच्या लाभांपासून वंचित लोकांचा मी सतत शोध घेत आहे"

"मोदी की गॅरंटी की गाडी’ जिकडे जाते तिथे ती लोकांचा आत्मविश्वास वाढवत आहे आणि लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करत आहे"

"मी 2 कोटी लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे"

"'एक जिल्हा, एक उत्पादन' हा उपक्रम अनेकांच्या जीवनात समृद्धी आणण्यात महत्वपूर्ण ठरेल "

"भारतातील ग्रामीण जीवनाचा एक भक्कम पैलू म्हणून सहकारी संस्था उदयास याव्यात हा आमचा प्रयत्न आहे"

Posted On: 27 DEC 2023 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे  विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित देखील केले.

या कार्यक्रमात देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सहभागी झाले होते . कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, विकसित भारताच्या संकल्पाशी जोडली जाण्याची ही मोहीम सातत्याने विस्तारत आहे. विकसित भारत संकल्प यात्रा सुरू होऊन 50 दिवसही झाले नाहीत, परंतु आतापर्यंत ही यात्रा 2.25 लाख गावांमध्ये पोहोचली आहे. हाच एक विक्रम आहे. हा उपक्रम  यशस्वी केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे, विशेषतः महिला आणि युवकांचे  आभार मानले. ते म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट अशा व्यक्तीपर्यंत पोहोचणे आहे, जी काही कारणास्तव भारत सरकारच्या योजनांपासून वंचित राहिली आहेत . लोकांपर्यंत सक्रियपणे पोहचण्याचा उद्देश  म्हणजे त्यांना याची  खात्री पटवून देणे की सरकारी योजना सर्वांसाठी उपलब्ध आहेत आणि कोणत्याही प्राधान्य किंवा भेदभावाशिवाय उपलब्ध आहेत.  "मी अशा लोकांचा शोध घेत आहे जे योजनांच्या लाभापासून वंचित  राहिले आहेत ", असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी लाभार्थ्यांमधील अभूतपूर्व आत्मविश्वासाची दखल घेतली . ते म्हणाले, देशभरातील प्रत्येक लाभार्थीकडे गेल्या 10 वर्षांत त्यांच्या जीवनात झालेल्या बदलांबद्दल सांगण्यासारखे खूप काही आहे. ही एक धैर्य आणि धाडसाने भरलेली कथा आहे.

पंतप्रधान म्हणाले की, हे लाभ लाभार्थ्यांना त्यांचे जीवन अधिक चांगले बनवण्यास मदत करत आहेत. "आज देशातील लाखो लाभार्थी पुढे जाण्यासाठी सरकारी योजनांचा वापर करत आहेत." असे ते म्हणाले,

ते म्हणाले की, ‘मोदी की गॅरंटी’   गाडी  ज्या, ज्या भागात  जात आहे, तिथल्या   लोकांचा विश्वास वाढत आहे आणि लोकांच्या आशा पूर्ण होत आहेत. त्यांनी माहिती दिली कीव्‍हीबीएसवाय म्हणजेच विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान उज्ज्वला गॅस कनेक्शनसाठी 4.5 लाख नवीन अर्ज दाखल करण्यात आले आहेत, तर  1 कोटी आयुष्मान कार्ड जारी करण्यात आले आहेत, 1.25 कोटी जणांची  आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.  70 लाख लोकांची क्षयरोग तपासणी करण्यात आली आहे आणि 15 लाख सिकलसेल अॅनिमिया म्हणजे रक्ताल्पता आजाराविषयीच्या   चाचण्या करण्यात आल्या आहेत.  एबीएचए- आभा कार्ड एकाचवेळी दिल्यामुळे  लाभार्थ्यांच्या वैद्यकीय नोंदी तयार होणार आहेतअशी माहितीही त्यांनी दिली. "यामुळे संपूर्ण देशात आरोग्याबाबत नवीन जागरूकता निर्माण होणार आहे", असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

सरकारच्या अनेक योजनांचा लाभ आता आणखी  नवीन लोकांना लाभ मिळत असल्याचे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आता  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींच्या जबाबदारीमध्‍ये वाढ झाली आहे. त्यांना गाव, प्रभाग, शहर आणि परिसरातील प्रत्येक पात्र व्यक्तीची ओळख पटवून, त्या व्‍यक्तींना सुविधांचे लाभ देण्‍यास  सांगण्यात आले आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, भारत सरकार खेड्यातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एक मोठी मोहीम राबवत आहे. गेल्या काही वर्षांत देशातील सुमारे 10 कोटी भगिनी, कन्या आणि दीदी आपल्या भागातील  स्वयं-सहायता गटांमध्ये सामील झाल्या आहेत. या भगिनी  आणि मुलींना बँकांकडून 7.5 लाख कोटी रुपयांहून जास्‍त मदत देण्यात आली आहे. या मोहिमेचा आणखी विस्तार करण्यासाठी आपण  पुढील तीन वर्षांत 2 कोटी लखपती दीदी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. ग्रामीण महिलांचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या ‘नमो ड्रोन दीदी योजने’ चाही त्यांनी उल्लेख केला.

लहान शेतकर्‍यांना संघटित करण्याच्या मोहिमेविषयी माहिती देताना पंतप्रधानांनी एफपीओ आणि  ‘पॅक्स’ सारख्या सहकारी उपक्रमांबद्दल सांगितले. ते म्हणाले, भारतातील ग्रामीण जीवनाचा एक मजबूत पैलू म्हणून सहकार्य क्षेत्राचा  उदय व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. आतापर्यंत आपण दूध आणि ऊस क्षेत्रात सहकार्याचे फायदे पाहिले आहेत. आता त्याचा विस्तार शेतीच्या इतर क्षेत्रांमध्ये आणि मत्स्य उत्पादनासारख्या क्षेत्रांमध्ये केला जात आहे. आगामी काळात दोन  लाख गावांमध्ये नवीन ‘पॅक्स’  तयार करण्याचे लक्ष्य समोर ठेवून  आम्ही पुढे जात आहोत. दुग्धव्यवसाय आणि साठवण क्षेत्रात सहकारी उपायांना चालना देण्याच्या प्रस्तावांचीही त्यांनी माहिती दिली. अन्न प्रक्रिया क्षेत्रातील 2 लाखांहून अधिक सूक्ष्म उद्योगांना बळकटी देण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत, असे  ते पुढे म्हणाले.

पंतप्रधान यावेळी  ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट- म्हणजेच एक जिल्हा- एक उत्पादन या  योजनेविषयीही  बोलले आणि ‘व्होकल फॉर लोकल ’ म्हणजेच स्थानिक उत्पादनांना आपणच प्रोत्साहन करण्याच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले की,  ‘मोदी की गॅरंटी की गाडी’  लोकांना स्थानिक उत्पादनांची माहिती देत आहे आणि या  उत्पादनांची  जीईएम- जेम पोर्टलवर देखील नोंदणी करता येते. ‘मोदी की गॅरंटी की गाडी’ या कार्यक्रमाला असेच सातत्याने  यश मिळावे,   अशी आशा  व्यक्त करून, त्यांनी भाषणाचा समारोप केला.

पार्श्वभूमी -

देशामध्‍ये दि. 15 नोव्हेंबर 2023 रोजी पासून वि‍कसित भारत संकल्प यात्रेला प्रारंभ झाला. ही यात्रा सुरू झाल्यापासून, पंतप्रधानांनी देशभरातील विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी नियमितपणे संवाद साधला आहे. यामध्‍ये दूरदृश्‍य प्रणालीच्या माध्‍यमातून  (दि. 30 नोव्हेंबर, 9 डिसेंबर आणि 16 डिसेंबर) संवाद साधला आहे. तसेच, पंतप्रधानांनी अलिकडेच  वाराणसीच्या भेटीमध्‍ये  सलग दोन दिवस (17-18 डिसेंबर) विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला आहे.

सरकारच्या सुविधांचा , योजनांचा लाभ सर्व लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचेल याची सुनिश्चिती करण्यासाठी  सरकारच्या  प्रमुख योजनांमध्‍ये  परिपूर्णता मिळवण्याच्या उद्देशाने देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा हाती घेण्यात आली  आहे.

 

N.Chitale/S.Kane/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1990995) Visitor Counter : 107