गृह मंत्रालय

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात ऐतिहासिक आणि पवित्र "सेंगोल" ची स्थापना करतील


हे पवित्र"सेंगोल" ब्रिटिशांकडून भारताकडे सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक आहे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

या ऐतिहासिक "सेंगोल" साठी संसद भवन हे सर्वात योग्य आणि पवित्र ठिकाण आहे - अमित शाह

हे अमृत काळ चे प्रतीक असेल, जे नव भारत जगामध्ये आपले यथोचित स्थान ग्रहण करण्याच्या गौरवशाली घटनेचा साक्षीदार असेल

Posted On: 24 MAY 2023 5:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 मे 2023

 

रविवारी जेव्हा नवीन संसद भवन राष्ट्राला समर्पित केले जाईल  तेव्हा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे.  या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी न्याय्य आणि योग्य शासनाचे पवित्र प्रतीक असलेले सेंगोल (राजदंड) स्वीकारतील आणि ते नवीन संसद भवनात स्थापित करतील.  हे तेच सेंगोल आहे जे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 14 ऑगस्ट 1947च्या रात्री त्यांच्या निवासस्थानी अनेक नेत्यांच्या उपस्थितीत स्वीकारले होते.

भारताच्या स्वातंत्र्यदिनी घडलेल्या संपूर्ण घटनेची आठवण करून देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, “स्वातंत्र्य मिळून  75 वर्षे उलटूनही, भारतातील बहुतेक लोकांना या घटनेची माहिती नाही , त्या दिवशी  पंडित जवाहरलाल नेहरूंना सेंगोल सुपूर्द करून भारताकडे सत्तेचे हस्तांतरण झाले. 14 ऑगस्ट 1947 च्या रात्री भारताच्या स्वातंत्र्याचा क्षण  साजरा करणारा  हा एक विशेष प्रसंग होता.

या रात्री जवाहरलाल नेहरू यांनी खास या कार्यक्रमासाठी आलेले तामिळनाडूतील तिरुवदुथुराई आधिनम (मठ) च्या आधिनमो (पुजारी) यांच्याकडून 'सेंगोल' स्वीकारले. हा तोच क्षण होता जेव्हा ब्रिटिशांनी भारतीयांच्या हाती सत्ता हस्तांतरित केली होती. आपण स्वातंत्र्य म्हणून जे साजरे करत आहोत ते खरे तर 'सेंगोल' सुपूर्द  करण्याच्या क्षणाने चिन्हांकित झाले  आहे.

पंतप्रधानांनी  अमृत काळाचे राष्ट्रीय प्रतीक  म्हणून  सेंगोल स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे . संसदेची नवीन इमारत  त्याच घटनेची साक्षीदार असेल, ज्यात आधीनम (पुजारी) त्या समारंभाची पुनरावृत्ती करतील आणि  पंतप्रधानांना सेंगोल सुपूर्द करतील.

गृहमंत्र्यांनी सेंगोलबद्दल अधिक माहिती देताना सांगितले  “सेंगोलचा अर्थ गहन आहे,तमिळ शब्द “सेम्माई” वरून तो घेतला आहे, ज्याचा अर्थ “नीतिपरायणता” असा आहे. तामिळनाडूतील एका प्रमुख धार्मिक मठाच्या मुख्य पुजाऱ्यांचा त्याला आशीर्वाद लाभला आहे. “न्याया ” कडे अविचल नजरेने पाहणारा नंदी शीर्षस्थानी हाताने कोरलेला आहे.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सेंगोल प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला न्याय्य आणि निष्पक्षपणे राज्य करण्याचा “आदेश ” (तमिळमध्ये “आणई”) असतो , हे सर्वात महत्वाचे  आहे, लोकांच्या सेवेसाठी निवडून आलेल्यांनी हे कधीही विसरू नये."1947 पासूनचे  तेच सेंगोल पंतप्रधान लोकसभेत अध्यक्षांच्या आसनाजवळ  ठळकपणे स्थापित करतील. संपूर्ण राष्ट्राला ते पाहता यावे यासाठी ते प्रदर्शित केले जाईल आणि विशेष प्रसंगी बाहेर आणले जाईल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ऐतिहासिक "सेंगोल" स्थापित करण्यासाठी संसद भवन हे सर्वात योग्य आणि पवित्र ठिकाण आहे."सेंगोल" ची स्थापना, 15 ऑगस्ट 1947 ची भावना अविस्मरणीय बनवते. ते असीम आशा, अमर्याद संधी  आणि मजबूत तसेच समृद्ध राष्ट्र निर्मितीच्या  संकल्पाचे प्रतिक आहे. हे अमृत काळाचे  प्रतीक असेल, जे  जगामध्ये नवीन भारत आपले  यथोचित स्थान ग्रहण करण्याच्या गौरवशाली घटनेचा साक्षीदार असेल.

सेंगोलबद्दल अधिक माहिती आणि डाउनलोड करण्यायोग्य व्हिडिओ असलेल्या एका विशेष संकेतस्थळाचे (sengol1947.ignca.gov.in)  आज या कार्यक्रमात गृहमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. ते म्हणाले, “भारतातील लोकांनी हे पाहावे आणि या ऐतिहासिक घटनेबद्दल जाणून घ्यावे  अशी आमची इच्छा आहे. ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.”

पत्रकार परिषदेत केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन हे देखील उपस्थित होते.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची पत्रकार परिषद पाहण्यासाठी क्लिक करा:

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1926961) Visitor Counter : 262