पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे ईशा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘माती वाचवा’ कार्यक्रमामध्ये केलेले भाषण

Posted On: 05 JUN 2022 2:14PM by PIB Mumbai

नमस्कार!

आपल्या सर्वांना, संपूर्ण विश्वाला विश्व पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! सद्गुरू आणि ईशा प्रतिष्ठान आज अभिनंदनास पात्र आहे. मार्चमध्ये त्यांच्या संस्थेने ‘माती वाचवा’ मोहीम सुरू केली होती. 27 देशांचा प्रवास करून त्यांची ही यात्रा आज 75 व्या दिवशी इथे पोहोचली आहे. आज ज्यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे, या अमृतकाळामध्ये नवीन संकल्प घेत आहे, त्यावेळी अशा प्रकारे लोकांनी सुरू केलेल्या मोहिमेला खूप महत्व आहे.

मित्रांनो,

मला आनंद आहे की, देशामध्ये गेल्या आठ वर्षांपासून ज्या योजना सुरू आहेत, जे कोणते प्रकल्प सुरू आहेत, त्या सर्वांमध्ये कोणत्या ना कोणत्या रूपाने पर्यावरण संरक्षणाचा आग्रह धरला जातो. स्वच्छ भारत मिशन असो अथवा कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याचा कार्यक्रम असो, अमृत मिशन अंतर्गत शहरांमध्ये आधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची निर्मिती असो अथवा एकल वापराच्या प्लास्टिकपासून मुक्ती मोहीम, किंवा नमामी गंगे अंतर्गंत गंगा स्वच्छतेचे अभियान, ‘वन सन-वन ग्रिड’ , सौर ऊर्जा निर्मितीवर लक्ष्य केंद्रीत  असो, अथवा इथेनॉलचे उत्पादन आणि ब्लेंडिंगमध्ये वृद्धी करण्याचे काम असो, पर्यावरण रक्षणासाठी भारताने सुरू केलेले प्रयत्न अनेक स्तरीय, अनेकमितीय आहेत. ज्यावेळी संपूर्ण जग हवामान बदलामुळे चिंतीत होते, त्रासले होते, त्यावेळेपासूनच भारताने हे सर्व प्रयत्न सुरू केले आहेत. हवामान बदलामुळे झालेल्या नुकसानीमध्ये आपल्या लोकांची भूमिका नव्हती, भारताची भूमिका नव्हती.

विश्वातले मोठे आणि आधुनिक देश काही केवळ पृथ्वीवरील जास्तीत जास्त स्त्रोतांचा विनाश करीत आहेत असे नाही तर सर्वात जास्त कार्बन उत्सर्जनही हेच मोठे देश करीत आहेत. कार्बन उत्सर्जनाचे वैश्विक सरासरी प्रमाण प्रतिव्यक्ती 4 टन आहे. तर भारतामध्ये प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जन प्रतिवर्षाला अर्ध्या टनाच्या जवळपास आहे. कुठे चार टन आणि कुठे अर्धा टन. असे असले तरीही, भारत पर्यावरणाच्या दिशने एक सर्वंकष दृष्टीकोन समोर ठेवून केवळ देशांतर्गतच नाही तर वैश्विक समुदायांबरोबरही काम करीत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने ‘आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी युती (सीडीआरआय) आणि आताच सद्गुरूजींनी सांगितल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (आयएसए) यांच्या निर्माणासाठी नेतृत्व केले आहे. गेल्या वर्षी भारताने असाही संकल्प केला आहे की, भारत वर्ष 2070 पर्यंत ‘नेट झीरो’चे लक्ष्य गाठणार आहे.

मित्रांनो,

माती असो अथवा ही भूमी, आमच्यासाठी पंचतत्वांपैकी एक आहे. आपण मातीला अभिमानाने आपल्या कपाळाला लावतो. या मातीतच पडत-धडपडत आपण लहानाचे मोठे होत असतो. मातीचा आदर करण्यात कसलाही अभाव नाही. मातीचे महत्व समजण्यातही कमी नाही. कमतरता तर या गोष्टीची आहे की, मातीचे महत्व समजण्यासाठी मानव जे काही करीत आहे, त्यानेच तर या मातीचे कितीतरी नुकसान होत आहे. यामध्ये माणसाला मातीचे महत्व समजण्यामध्ये आणि तो जी काही कृती करतो त्यामध्ये थोडे अंतर निर्माण होत आहे. आणि आताच सद्गुरू सांगत होते की, सर्वांना नेमकी समस्या काय आहे, हे माहिती आहे.

आम्ही ज्यावेळी लहान होतो, त्यावेळी अभ्यासामधून, पाठ्यपुस्तकामधून आम्हाला शिकवले जात होते, मी गुजराती शिकलो आहे, आता इतर लोकांनी आपल्या भाषेतही हेच कदाचित शिकले असेल... एकेठिकाणी रस्त्यामध्ये एक दगड पडला होता. लोक जात- येत होते. कोणी चिडत होते, संताप व्यक्त करीत होते, कोणी त्या दगडाला लाथाडून पुढे जात होते. सगळेजण म्हणायचे की, हा दगड असा रस्त्यामध्ये कोणी ठेवला. हा दगड इथे कसा काय आला, हे काही समजत नाही... इत्यादी इत्यादी लोक बोलत होते. मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांपैकी कोणीही तो दगड वाटेतून उचलून बाजूला ठेवत नव्हते. एक सद्गृहस्थ रस्त्यावरून जात होते, त्यांना वाटले की, चला आपण हे काम करूया.  सद्गुरूंसारखा कोणी तरी आला असणार!

आपल्याकडे युधिष्ठिर आणि दुर्योधन यांच्या भेटींविषयी ज्यावेळी चर्चा होते, त्यावेळी दुर्योधनाविषयी जे सांगितले जाते ते असे की, - ‘‘जानाम धर्मं न च में प्रवृत्ति।’’

मी धर्म जाणतो, मात्र माझी प्रवृत्ती तशी नाही. मी ते करू शकत नाही. हे जे सत्य आहे, ते काय आहे, हे मला माहिती आहे. मात्र मी त्या मार्गावरून जावू शकत नाही.  ज्यावेळी  समाजामध्ये अशी प्रवृत्ती  वाढते, त्यावेळी असे संकट येत असते. मग अशावेळी सामूहिक चळवळीतूनच समस्यांना उत्तर शोधण्यासाठी मार्ग निवडावे लागतात.

मला आनंद आहे की, गेल्या आठ वर्षांमध्ये देशाने माती जिवंत राहावी यासाठी सातत्याने काम केले आहे. माती वाचविण्यासाठी आम्ही पाच प्रमुख गोष्टींवर लक्ष्य केंद्रीत केले आहे -

पहिले म्हणजे मातीला रसायनमुक्त कशी बनवता येईल हे पाहिले. दुसरे - मातीमध्ये असलेल्या जीवजंतूंना, ज्यांना तांत्रिक भाषेमध्ये तुम्ही मंडळी ‘सॉइल ऑगॅनिक मॅटर’ असे म्हणता, त्यांना कसे वाचवता येईल. आणि तिसरे म्हणजे मातीमध्ये ओलावा कायम टिकून राहावा, यासाठी तितक्या खोलीपर्यंत पाण्याची उपलब्धता कशी वाढवता येईल, याचा विचार केला. चौथे काम म्हणजे भूजल स्तर कमी होत असल्यामुळे  मातीचे जे नुकसान होत आहे, ते दूर कसे करता येईल हे आम्ही पहात आहोत. आणि पाचवी गोष्ट म्हणजे वनांचे क्षेत्र कमी होत असल्यामुळे मातीचे जे सातत्याने क्षरण होत आहे, ते रोखण्यासाठी काम करण्यात येत आहे.

मित्रांनो,

या सर्व गोष्टी लक्षात घेवूनच देशामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये होत असलेल्या कामांमुळे मोठे परिवर्तन घडून येत आहे, याला आणखी एक कारण आहे ते म्हणजे देशाचे कृषी धोरण. आधी आपल्या देशातल्या शेतकरी बांधवांकडे माहितीचा अभाव असायचा. त्याच्या शेतातली माती नेमकी कशा प्रकारची आहे, त्याच्या मातीमध्ये कोणत्या नैसर्गिक घटकांचा नेमका किती अभाव आहे; हे माहिती नसायचे. ही समस्या दूर करण्यासाठी देशामध्ये शेतकऱ्यांना ‘मृदा आरोग्य पुस्तिका’ देण्याची खूप मोठी मोहीम चालविण्यात आली. जर आपण कोणा व्यक्तीला त्याचे आरोग्य पुस्तिका देणार असू तर त्याचीही वर्तमानपत्रांमध्ये मोठी बातमी बनेल. मात्र मोदी सरकारने काही चांगले काम केले आहे. या देशामध्ये पहिल्यांदाच ‘मृदा आरोग्य पुस्तिका’ शेतकरी बांधवांना दिल्या आहेत, परंतु प्रसार माध्यमांची दृष्टी अजून कमी आहे.

संपूर्ण देशात 22 कोटींहून अधिक मृदा आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना देण्यात आल्या आणि हा उपक्रम केवळ कार्ड वाटपापुरताच मर्यादित नव्हता. यातून माती परीक्षणाशी संबंधित एक मोठे जाळेही देशभर तयार झाले आहे. देशातील कोट्यवधी शेतकरी मृदा आरोग्य पत्रिकेवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे आज खते आणि सूक्ष्म पोषक तत्वांचा वापर करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात 8 ते 10 टक्के बचत झाली असून उत्पादनातही 5 ते 6 टक्के वाढ झाली आहे. म्हणजेच माती निरोगी होत असताना उत्पादनातही वाढ होत आहे.

युरियाच्या 100% नीम कोटिंगमुळे मातीला फायदा होण्यास खूप मदत झाली आहे. अटल भू योजनेमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये सूक्ष्म सिंचनाला चालना मिळून मातीचे आरोग्यही राखले जात आहे. काही गोष्टी समजून उमजून करण्याच्या असतात. समजा दीड वर्षाचे मूल आजारी असेल, तब्येत बरी होत नसेल, वजन वाढत नसेल, उंची वाढत नसेल आणि कोणीतरी आईला सांगितले की जरा काळजी घे,  कोणी तिला सल्ला दिला,  दूध इत्यादी गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या असतात आणि समजा तिने त्याला रोज 10-10 लिटर दुधाने आंघोळ घातली तर त्याची तब्येत ठीक होईल का? पण एखाद्या समजूतदार आईने त्याला सुरुवातीला एक चमचा, मग थोडेथोडे वाढवून,  दिवसातून दोनदा, पाच वेळा, सात वेळा, एकेक चमचा दूध  दिले तर हळूहळू फरक दिसून येईल.

पिकांचेसुद्धा तसेच आहे. शेतात पाणी भरून पीक बुडवून ठेवले म्हणजे पीक चांगले येते असे नाही. थेंब थेंब पाणी दिल्यास पीक चांगले येते, प्रति थेंब अधिक पीक. अशिक्षित आईही आपल्या मुलाला दहा लिटर दुधाने आंघोळ घालत नाही, पण आपण शिकलेसवरलेले लोक संपूर्ण शेत पाण्याने भरतो. या सर्व गोष्टींमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करायचा आहे.

कॅच द रेन सारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही देशातील जनतेला जलसंवर्धनात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या वर्षी मार्चमध्ये देशात 13 मोठ्या नद्यांच्या संवर्धनाची मोहीम सुरू झाली आहे. यामध्ये जलप्रदूषण कमी करण्यासोबतच नद्यांच्या काठावर वनलागवड केली जात आहे आणि असा अंदाज आहे की यामुळे भारताच्या वनक्षेत्रात 7400 चौरस किलोमीटरपेक्षा अधिक वाढ होईल. गेल्या आठ वर्षांत भारताने आपले वनक्षेत्र 20 हजार चौरस किलोमीटरहून अधिक विस्तारले असून त्यात हे आणखी सहाय्यभूत ठरेल.

मित्रांनो,

जैवविविधता आणि वन्यजीवाशी संबंधित ज्या धोरणांवर आज भारताचे मार्गक्रमण सुरू आहे त्यामुळे वन्यजीवांच्या संख्येतही विक्रमी वाढ झाली आहे. आज वाघ असो, सिंह असो, बिबट्या असो की हत्ती, सर्वांची संख्या वाढत आहे.

 

मित्रांनो,

देशात हे प्रथमच घडले आहे. आपण आपली गावे आणि शहरे स्वच्छ करणे, इंधनातील आत्मनिर्भरता, शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न आणि मातीचे आरोग्य या मोहिमांना एकत्र जोडले आहे. गोबरधन  योजना हा असाच एक प्रयत्न आहे आणि जेव्हा मी गोबरधनाबद्दल बोलतो तेव्हा काही सेक्युलर लोक प्रश्न उपस्थित करतील की हे काय  आहे. ते अस्वस्थ होतील.

या गोबरधन  योजनेंतर्गत बायोगॅस प्रकल्पातून शेण व इतर कृषी कचऱ्याचे ऊर्जेत रूपांतर केले जात आहे. कधी काशी-विश्वनाथच्या दर्शनाला गेलात तर काही किलोमीटर अंतरावर गोबरधन प्रकल्प  आहे. त्याला नक्की भेट द्या. तिथे तयार  तयार होणारे सेंद्रिय खत शेतात वापरले जात आहे. मातीवर अतिरिक्त भार न येता पुरेसे उत्पादन घेता यावे यासाठी  गेल्या 7-8 वर्षात 1600 हून अधिक नवीन जातींचे बियाणेदेखील शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 

मित्रांनो,

आपल्या आजच्या आव्हानांवरही नैसर्गिक शेती हा एक उत्तम उपाय आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात आम्ही ठरवले आहे की आम्ही गंगेच्या काठावर वसलेल्या गावांमध्ये नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देऊ, नैसर्गिक शेतीचा एक मोठा कॉरिडॉर तयार करू. आपल्या देशात औद्योगिक कॉरिडॉर, संरक्षण कॉरिडॉर हे आपण ऐकले आहे. गंगेच्या तीरावर आपण नवीन कॉरिडॉर सुरू केला आहे, कृषी कॉरिडॉर,  नैसर्गिक शेतीचा कॉरिडॉर. यामुळे आपली शेते केवळ रसायनमुक्त होणार नाहीत, तर नमामी गंगे मोहिमेलाही नवे बळ मिळेल. भारत वर्ष 2030 पर्यंत 26 दशलक्ष हेक्टर नापीक जमीन पुनर्संचयित करण्याच्या लक्ष्यावर देखील काम करत आहे.

 

मित्रांनो,

पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी, आज भारत सतत नवनवीन शोधांवर, पर्यावरणपूरक  तंत्रज्ञानावर भर देत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी आपण बीएस-5 नॉर्मऐवजी बीएस-4 वरून थेट बीएस-6 वर आलो आहोत, हे आपणा सर्वांना माहीत आहे. देशभरात एलईडी दिवे उपलब्ध करण्यासाठी आम्ही सुरू केलेल्या उजाला योजनेमुळे दरवर्षी सुमारे 40 दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन कमी होत आहे. घरात फक्त दिवे बदलून..सगळे सहभागी झाले तर प्रत्येकाच्या प्रयत्नाचे  किती मोठे फळ मिळते.

भारत जीवाश्म इंधनावरील आपले अवलंबित्व कमी करण्याचाही प्रयत्न करत आहे.  आपली ऊर्जेची गरज नवीकरणीय स्त्रोतांकडून भागवण्यासाठी आम्ही वेगाने मोठ्या उद्दिष्टांवर काम करत आहोत. आम्ही आपल्या स्थापित ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या 40%  जीवाश्‍म-इंधनावर आधारित नसलेल्या स्रोतांमधून साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. भारताने हे लक्ष्य निर्धारित मुदतीच्या 9 वर्षे आधीच गाठले आहे. आज आपली सौरऊर्जा क्षमता 18 पटीने वाढली आहे. हायड्रोजन अभियान असो वा सर्कुलर पॉलिसीचा विषय असो, आमच्या पर्यावरणाच्या संरक्षणविषयक बांधिलकीचा तो पुरावा आहे. आम्ही जुन्या गाड्या भंगारात काढण्याचे (स्‍क्रॅप पॉलिसी)  धोरण आणले आहे. स्क्रॅप पॉलिसी हे एक मोठे पाऊल आहे.

 

मित्रांनो,

आपल्या या प्रयत्नांमध्येच, पर्यावरण दिनाच्या दिवशी भारताने आणखी एक यश प्राप्त केले आहे आणि हे आमचे भाग्य आहे की ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी आज मला अतिशय योग्य व्यासपीठ मिळाले आहे. तीर्थयात्रा करून आलेल्याला स्पर्श केला तर अर्धे पुण्य लाभते, अशी परंपरा भारतात आहे.  ही आनंदाची बातमी मी आज आवर्जून  सांगेन, देश आणि जगातील लोकांनादेखील आनंद मिळेल ... होय, काही लोक याचा आनंद घेऊ शकतात. आज भारताने पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठले आहे.

तुम्हाला हे कळल्यावरही अभिमान वाटेल की भारताने हे उद्दिष्ट नियोजित वेळेच्या 5 महिने आधीच  गाठले आहे.  वर्ष 2014 मध्ये भारतात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण होते केवळ 1.5 टक्के.  यावरून ही कामगिरी किती मोठी आहे याचा अंदाज तुम्ही बांधू शकता.

हे लक्ष्य गाठल्याने भारताला थेट तीन लाभ  मिळाले आहेत. एक, यामुळे सुमारे 27 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे. दुसरे म्हणजे, भारताने 41 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलनाची बचत केली आहे. आणि तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे इथेनॉल मिश्रण वाढल्यामुळे देशातील शेतकऱ्यांनी 8 वर्षांत 40 हजार कोटींहून अधिक कमाई केली आहे. या यशाबद्दल मी देशातील जनता, देशातील शेतकरी, देशातील तेल कंपन्यांचे अभिनंदन करतो.

 

मित्रांनो,

आज देश ज्या पीएम -राष्ट्रीय गतिशक्ती मास्टर प्लॅनवर काम करत आहे, तो देखील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. गति शक्तीमुळे देशातील लॉजिस्टिक व्यवस्था आधुनिक होईल, वाहतूक व्यवस्था मजबूत होईल. यामुळे प्रदूषण कमी होण्यास खूप मदत होईल. देशातील  मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी असो, शंभरहून अधिक नवीन जलमार्गांसाठीचे  काम असो, या सर्व गोष्टी भारताला पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि हवामान बदलाच्या आव्हानावर तोडगा काढण्यासाठी  मदत करतील.

 

मित्रांनो ,

 

भारताच्या या प्रयत्नांना, या मोहिमांना आणखी एक बाजू आहे, ज्याची क्वचितच चर्चा होते, ती बाजू म्हणजे हरित रोजगार. भारत ज्या प्रकारे पर्यावरणाच्या हिताचे निर्णय घेत आहे, त्यांची झपाट्याने अंमलबजावणी करत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात हरित रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत. हा देखील एक अभ्यासाचा विषय आहे ज्याचा विचार व्हायला हवा.

 

मित्रांनो,

पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी, पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी, मातीचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती जितकी वाढेल, तितके चांगले परिणाम दिसून येतील. माझी देशाला आणि देशातील सर्व सरकारांना, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना, सर्व स्वयंसेवी संस्थांना विनंती आहे की, शाळा-कॉलेज, एनएसएस -एनसीसी यांना या  प्रयत्नात सहभागी करून घ्या.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात  जलसंधारणाशी संबंधित आणखी एक आवाहन मी करू इच्छितो. पुढील वर्षी 15 ऑगस्टपर्यंत देशातील प्रत्येक जिल्ह्यात, एका जिल्ह्यात किमान 75 अमृत सरोवर बांधण्याचे काम आज सुरू आहे. 50  हजारांहून अधिक अमृत सरोवरे पुढील पिढ्यांसाठी जलसुरक्षा सुनिश्चित करण्यात मदत करतील. हे अमृत सरोवर त्यांच्या सभोवतालच्या जमिनीतील ओलावा वाढवतील, भूजल पातळी खालावण्याच्या समस्येत तोडगा पुरवतील आणि जैवविविधतादेखील सुधारतील. या विशाल संकल्पात आपल्या सर्वांचा सहभाग कसा वाढेल याचा विचार एक नागरिक म्हणून आपण सर्वांनी करायला हवा.

 

मित्रांनो,

सर्वांच्या प्रयत्नानेच सर्वांगीण दृष्टिकोनातून पर्यावरणाचे संरक्षण आणि जलद विकास शक्य आहे. यामध्ये आपल्या जीवनशैलीची भूमिका काय आहे, आपण ती कशी बदलली पाहिजे, याबद्दल आज संध्याकाळी  एका कार्यक्रमात मी सविस्तर बोलणार आहे, कारण तो माझा  आंतरराष्ट्रीय मंचावरचा  कार्यक्रम आहे. पर्यावरणासाठी जीवनशैली, 'मिशन लाइफ', या शतकातील चित्र, या शतकात पृथ्वीचे भाग्य  बदलण्याच्या मोहिमेची सुरुवात. याचे स्वरूप  P-3 म्हणजेच प्रो-प्लॅनेट-पीपल मूव्हमेंट (पृथ्वीपूरक लोकसहभाग) असेल. लाइफस्टाइल फॉर द एन्व्हायर्न्मेंट- ग्लोबल- कॉल फॉर अॅक्शनची  (पर्यावरणासाठी जीवनशैली -कृतीसाठी वैश्विक आवाहन) आज संध्याकाळी नांदी होत आहे. पर्यावरणाच्या संरक्षणाची जाणीव असलेल्या प्रत्येक व्यक्तीने यात सहभागी व्हायला हवे, असे आवाहन मी करतो. आम्ही एसी लावणार आणि पांघरूण घेणार आणि मग पर्यावरण विषयावरील चर्चासत्रात चांगले भाषण देणार, असे व्हायला नको.

मित्रांनो,

आपण सर्व मानवतेची महान सेवा करत आहात. सद्गुरुजींनी दुचाकीवरून केलेला हा प्रदीर्घ, खडतर प्रवास, त्याला यश मिळू दे. तसा त्यांचा हा  बालपणापासूनच छंद असला तरी तरीही हे काम खूप अवघड आहे. कारण जेव्हा कधी मी यात्रा आयोजित करायचो, तेव्हा मी सांगायचो, माझ्या पक्षाची एक यात्रा चालवणे  म्हणजे वय पाच ते दहा वर्षे कमी करणे, एवढी प्रचंड मेहनत यासाठी घ्यावी लागते. सद्गुरुजींनी यात्रा काढली, हे एक  खूप मोठे काम आहे. मला खात्री आहे की जगाला मातीप्रती प्रेम वाटू लागण्यासोबत भारताच्या मातीच्या सामर्थ्याचीही ओळख झाली असेल.

 

तुम्हा सर्वांना खूप-खूप  शुभेच्छा.

 

धन्यवाद !

***

S.Thakur/S.Bedekar/S.Kulkarni/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1831464) Visitor Counter : 303