अर्थ मंत्रालय

सामान्य जनतेला सामाजिक संरक्षणाचे कवच प्रदान करणाऱ्या पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि अटल निवृत्तीवेतन योजना (APY) यांचा 7 वर्षांचा कार्यकाळ संपन्न


कमी खर्चिक विमा योजना आणि खात्रीलायक निवृत्तीवेतन योजना यांच्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत जन सुरक्षेचे संरक्षण पोहोचण्याची सुनिश्चिती झाली आहे- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

बँका आणि विमा कंपन्या यांनी अधिक उत्साहाने आणि समर्पित वृत्तीने या योजनांचे संरक्षण अधिकाधिक प्रमाणात विस्तारण्याचे कार्य सुरु ठेवावे- केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड

Posted On: 09 MAY 2022 11:20AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 मे 2022

 

  • पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना: एकूण 12.76 कोटींहून अधिक नागरिकांचा सहभाग  
  • पंतप्रधान सुरक्षा विमा योजना: एकूण 28.37 कोटींहून अधिक नागरिकांचा सहभाग  
  • अटल निवृत्तीवेतन योजना: 4 कोटींहून अधिक नागरिक सहभागी

सामान्य जनतेला जन सुरक्षेचे म्हणजेच सामाजिक संरक्षणाचे कवच प्रदान करणाऱ्या पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय), पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) आणि अटल निवृत्तीवेतन योजना (एपीवाय) या योजनांच्या अंमलबजावणीची सात वर्षे साजरी करत असतानाच, आपण या योजनांच्या माध्यमातून किफायतशीर दरात सामान्य लोकांना पुरविण्यात आलेले जन संरक्षण म्हणजेच विमा तसेच आर्थिक संरक्षण, या योजनांची सफलता आणि ठळक वैशिष्ट्ये यावर लक्ष केंद्रित करूया.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोलकाता, पश्चिम बंगालमध्ये 9 मे 2015 रोजी या तिन्ही योजनांची सुरुवात करण्यात आली होती.

आकस्मिक जोखीम/ नुकसान आणि आर्थिक असुरक्षितता यांच्यापासून मानवी जीवनाला संरक्षण देण्याची गरज ओळखून नागरिकांचे कल्याण साधण्याप्रती या तिन्ही योजना समर्पित करण्यात आल्या आहेत. देशातील असंघटीत क्षेत्रात कार्यरत नागरिकांच्या आर्थिक सुरक्षिततेची सुनिश्चिती करून घेण्यासाठी केंद्र सरकारने – पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय), आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) – या दोन विमा योजनांची सुरुवात केली आणि या नागरिकांच्या वृद्धापकालीन अत्यावश्यक गरजा पुरविण्यासाठी अटल निवृत्तीवेतन योजना (एपीवाय) लागू केली. 

पीएमजेजेबीवाय आणि पीएमएसबीवाय या योजना सर्वसामान्यांना कमी खर्चात जीवन आणि अपघात विम्याचे संरक्षण देऊ करतात तर एपीवाय योजना त्यांना त्यांच्या वृद्धापकाळात नियमित निवृत्तीवेतन मिळण्यासाठी आतापासून बचत करण्याची संधी देते.

या योजनांच्या 7 व्या वर्धापनदिनानिमित्त  आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “समाजातील गरीब आणि उपेक्षित घटकांना अत्यंत आवश्यक असलेली आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी किफायतशीर दरातील योजनांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत  विमा आणि निवृत्तीवेतन योजनांचा लाभ पोहोचविणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी जाहीर केलेल्या आर्थिक समावेशासाठीच्या राष्ट्रीय मोहिमेतील एक मुख्य उद्दिष्ट होते.”

“जन सुरक्षेविषयीच्या या तीन योजनांनी विमा तसेच निवृत्तीवेतन या गोष्टी सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणल्या आहेत. गेल्या सात वर्षांत या योजनांमध्ये सहभागी झालेल्या तसेच या योजनांच्या लाभ मिळविणाऱ्या लोकांची संख्या हा या योजनांच्या यशाचा पुरावाच आहे. या कमी खर्चिक विमा योजना तसेच खात्रीलायक निवृत्तीवेतन योजना आर्थिक संरक्षणाची सुनिश्चिती करत आहेत. अशा योजनांचा लाभ पूर्वी काही निवडक लोकांनाच मिळत होता, मात्र आता त्या समाजातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचल्या आहेत,” केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या.

गरिबांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचे अवलोकन करताना अर्थमंत्री म्हणाल्या, “आज सर्वात गरीबातील गरीब व्यक्तीला देखील प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत (PMJJBY) 1 रुपयापेक्षा एक रुपयापेक्षाही कमी दरात, 2 लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण आणि अपघात विमा मिळू शकतो.  प्रधानमंत्री सुरक्षित विमा योजनेअंतर्गत (PMSBY) अंतर्गत दरात दरमहा किमान 42 रुपये भरून 18 ते 40 वयोगटातील देशातील सर्व नागरिक 60 व्या वर्षांनंतर मिळणाऱ्या निवृत्तीवेतनासाठी सदस्यत्व घेऊ शकतात.

प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत (पीएमजेजेबीवाय,PMJJBY) विशेषत: कोविड-19 महामारीच्या काळात, नागरिकांना सहजगत्या सुरक्षा प्रदान केली जात असल्याचे सांगून श्रीमती सीतारामन पुढे म्हणाल्या, “पीएमजेजेबीवाय अंतर्गत, जीवन विम्याची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 12.76 कोटी व्यक्तींनी नावनोंदणी केली आहे आणि 5,76,121 व्यक्तींच्या कुटुंबांना एकूण 11,522 कोट.रु.इतकी रक्कम यायोजनेअंतर्गत मिळाली आहे.

आर्थिक वर्ष 21 ( FY21) मध्ये, महामारीच्या काळात कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरली आहे, जवळजवळ 50% दाव्यांची रक्कम कोविड-19 मुळे झालेल्या मृत्यूंसाठी  देण्यात आली. महामारीच्या काळात या  दाव्यांचा जलद आणि सुलभ निपटारा करण्यासाठी दावा निकाली काढण्याच्या प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले.  दाव्यांचा सुलभ निपटारा करण्यासाठी केलेले हे बदल अजूनही तसेच सुरू आहेत.  महामारीच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 एप्रिल 2020 पासून 23 फेब्रुवारी 2022 पर्यंत, एकूण 2.10 लाख दाव्यांत 4,194.28 कोटी रुपये एवढी रक्कम देण्यात आली असून एकूण दाव्यांपैकी 99.72% दावे निकाली काढले गेले.”

तीच भावना अधोरेखित करत अर्थमंत्र्यांनी सांगितले की, “प्रधानमंत्री सुरक्षित विमा योजनेचा आरंभ  (PMSBY) झाल्यापासून 28.37 कोटी लोकांनी जोखीम संरक्षणासाठी नोंदणी केली आहे आणि 97,227 दाव्यांअंतर्गत 1,930 कोटी रुपयांची रक्कम अदा करण्यात आली आहे.  4 कोटींहून अधिक लोकांनी आधीच अटल पेन्शन योजना (APY) चे सदस्यत्व घेतले आहे.

या प्रसंगी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत किशनराव कराड म्हणाले, “या योजनांच्या 7 व्या वर्धापनदिनानिमित्त मी या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व बँका आणि विमा कंपन्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी या योजनांची यशस्वी अंमलबजावणी शेवटच्या घटकाला लाभ होईपर्यंत त्याच उत्साहाने आणि समर्पणाच्या भावनेने करावी."

“भविष्याकडे वाटचाल करताना, पंतप्रधानांनी त्यांच्या गतवर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात या संदर्भात घोषित केल्यानुसार, विमा आणि निवृत्तीवेतन या सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत देशातील प्रत्येक पात्र व्यक्तीला समाविष्ट केले जाईल, हे सुनिश्चित करण्याचा आमचा प्रयत्न असेल,” असे डॉ.  कराड यांनी नमूद केले.

आपण प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना (PMJJBY),  प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना (PMSBY) आणि अटल पेन्शन योजना (APY ) चा सातवा वर्धापन दिन साजरा करत आहोत. त्यांची वैशिष्ट्ये आणि आतापर्यंतच्या कामगिरीवर एक नजर टाकू या:

1. प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना (पीएमजेजेबीवाय)

योजना: पीएमजेजेबीवाय ही एक वर्षाची आयुर्विमा योजना आहे जिचे दरवर्षी नूतनीकरण करता येते आणि कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास विमा संरक्षण मिळते.

पात्रता: बँकेत बचत खते  किंवा पोस्ट ऑफिस खाते असलेल्या 18-50 वयोगटातील व्यक्तींना या योजनेअंतर्गत नावनोंदणी करता येते.  वयाची 50 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी या योजनेत सामील झालेले लोक प्रीमियम भरून वयाच्या   55 व्या वर्षांपर्यंत जीवन विमा संरक्षण मिळवू शकतात.

लाभ: वार्षिक 330/- रुपये  प्रीमियम भरून कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये विमा संरक्षण .

नावनोंदणी: या योजने अंतर्गत  नावनोंदणी खातेदाराच्या बँकेची शाखा/बीसी पॉइंट किंवा संकेतस्थळाला भेट देऊन किंवा पोस्ट ऑफिस बचत बँक खाते  असेल तर  पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन करता येते. खातेधारकाच्या निर्देशानुसार प्रीमियमची रक्कम प्रत्येक वर्षी देय तारखेला त्याच्या  बँक खात्यातून आपोआप कापली जाते. योजनेची तपशीलवार माहिती आणि अर्ज (हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमध्ये) https://jansuraksha.gov.in वर उपलब्ध आहेत.

उपलब्धी: 27.04.2022 पर्यंत, या योजनेत 12.76 कोटी पेक्षा जास्त एकत्रित नोंदणी झाली आहे आणि 5,76,121 दाव्यांसाठी 11,522 कोटी रुपये दिले आहेत.

2. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY)

योजना: पीएमएसबीवाय  ही एक वर्षाची अपघाती विमा योजना आहे, जिचे दरवर्षी नूतनीकरण करता येते. यात अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विमा संरक्षण मिळते.

पात्रता: बँकेत  बचत खाते  किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते असलेल्या 18-70 वर्षे वयोगटातील व्यक्ती या  योजनेअंतर्गत नावनोंदणी करू शकतात.

लाभ: अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख (अंशिक अपंगत्वाच्या बाबतीत 1 लाख) रुपये विमा  संरक्षण

नावनोंदणी: या योजने अंतर्गत  नावनोंदणी खातेदाराच्या बँकेची शाखा/बीसी पॉइंट किंवा संकेतस्थळाला भेट देऊन किंवा पोस्ट ऑफिस बचत बँक खाते  असेल तर  पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन करता येते. खातेधारकाच्या निर्देशानुसार प्रीमियमची  रक्कम प्रत्येक वर्षी देय तारखेला त्याच्या बँक खात्यातून आपोआप कापली जाते. योजनेची तपशीलवार माहिती आणि अर्ज (हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमध्ये) https://jansuraksha.gov.in वर उपलब्ध आहेत.

उपलब्धी: 27.04.2022 पर्यंत, या योजनेंतर्गत  एकूण 28.37 कोटी पेक्षा जास्त नोंदणी झाली आहे आणि  97,227 दाव्यांसाठी 1,930 कोटी रुपये दिले आहेत.

 

अटल पेन्शन योजना (एपीवाय)

पार्श्वभूमी: सर्व भारतीयांसाठी, विशेषत: गरीब, वंचित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यासाठी अटल पेन्शन योजना (APY)  सुरू करण्यात आली. असंघटित क्षेत्रातील लोकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने  सरकारचा हा एक उपक्रम आहे. नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) च्या एकूण प्रशासकीय आणि संस्थात्मक संरचना अंतर्गत पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे एपीवाय राबवली  जाते.

पात्रता: एपीवाय  योजना 18 ते 40 वर्षे वयोगटातील सर्व बँक खातेधारकांसाठी खुली आहे आणि निवडलेल्या निवृत्तीवेतनाच्या रकमेनुसार योगदान ठरते.

लाभ: एपीवाय योजनेत सामील झाल्यानंतर ग्राहकाने केलेल्या योगदानाच्या  आधारे वयाच्या 60 व्या वर्षी सदस्यांना 1000 किंवा 2000 किंवा 3000 किंवा 4000 किंवा  5000 रुपये  किमान मासिक निवृत्तिवेतनाची हमी मिळते.

योजनेचे लाभ वितरण: ग्राहकाला मासिक पेन्शन उपलब्ध आहे, आणि त्याच्या नंतर त्याच्या जोडीदाराला आणि त्यांच्या मृत्यूनंतर, पेन्शन कॉर्पस,  ग्राहकाचे वय 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत जमा झालेली पेन्शन रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला दिली जाईल.
ग्राहकाचा अकाली मृत्यू झाल्यास (60 व्या वर्षापूर्वी मृत्यू), ग्राहकाचा जोडीदार, मूळ ग्राहक वयाची  60 वर्षे पूर्ण करेपर्यंत, उर्वरित  कालावधीसाठी, ग्राहकाच्या एपीवाय  खात्यात योगदान चालू ठेवू शकतो.

केंद्र सरकारचे योगदान: सरकारकडून किमान पेन्शनची हमी दिली जाईल, म्हणजे, जर योगदान आधारित जमा कॉर्पस गुंतवणुकीवर अंदाजे परतावा पेक्षा कमी परतावा मिळत  असेल आणि किमान हमी दिलेली पेन्शन रक्कम प्रदान करण्यासाठी अपुरा असेल, तर केंद्र सरकार हा अपुरा निधी देईल.

पर्यायाने, गुंतवणुकीवरील परतावा जास्त असल्यास, ग्राहकांना वर्धित पेन्शनरी लाभ  मिळतील.

योगदान  वारंवारता: सदस्य मासिक / तिमाही  / सहामाही  आधारावर एपीवाय मध्ये योगदान देऊ शकतात.

योजनेतून पैसे काढणे: सरकारी सह-योगदानाची वजावट आणि त्यावरील परतावा/व्याज संबंधी  काही अटींच्या अधीन राहून ग्राहक स्वेच्छेने एपीवाय मधून बाहेर पडू शकतात.

उपलब्धी: 27.04.2022 पर्यंत 4 कोटींहून अधिक व्यक्तींनी योजनेत नोंदणी केली आहे.

 

* * *

JPS/SRT/S.Kane/S.Chitnis/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1823779) Visitor Counter : 802