पंतप्रधान कार्यालय

"मेघालयच्या 50 व्या राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांचे भाषण


"मेघालयाने जगाला निसर्ग, प्रगती, संवर्धन आणि पर्यावरण शाश्वततेचा संदेश दिला आहे"

"मेघालय प्रतिभावान कलाकारांनी परिपूर्ण आहे आणि शिलाँग चेंबर कॉयरने त्याला नवी उंची दिली आहे"

“देशाला मेघालयच्या समृद्ध क्रीडा संस्कृतीकडून खूप आशा आहेत”

"मेघालयातील भगिनींनी बांबू विणण्याच्या कलेचे पुनरुज्जीवन केले आहे आणि येथील कष्टकरी शेतकरी सेंद्रिय राज्य म्हणून मेघालयची ओळख बळकट करत आहेत"

Posted On: 21 JAN 2022 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जानेवारी 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयच्या 50 व्या राज्य स्थापना दिनानिमित्त मेघालयच्या जनतेचे अभिनंदन केले आहे.  राज्याच्या स्थापनेत आणि विकासात योगदान देणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी वंदन केले. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान झाल्यानंतर ईशान्य प्रदेश परिषदेच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शिलाँगला दिलेल्या भेटीची आठवण करून दिली. 3 ते 4 दशकांनंतर कोणत्याही पंतप्रधानांनी केलेला राज्याचा हा पहिला दौरा होता. निसर्गाच्या सान्निध्यात असणारी माणसे म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी राज्यातील जनतेला परिपूरक ठरविले. "मेघालयाने जगाला निसर्ग, प्रगती, संवर्धन आणि पर्यावरणीय शाश्वततेचा संदेश दिला आहे", श्री मोदी म्हणाले.

‘व्हिस्लिंग व्हिलेज’ आणि प्रत्येक गावातील गायकांच्या परंपरेचा संदर्भ देत पंतप्रधानांनी कला आणि संगीत क्षेत्रातील राज्याच्या योगदानाला सलाम केला. ते म्हणाले की ही भूमी प्रतिभावान कलाकारांनी परिपूर्ण आहे आणि शिलाँग चेंबर कॉयरने तिला नवीन उंचीवर नेले आहे. मेघालयच्या समृद्ध क्रीडा संस्कृतीकडून देशाला मोठ्या आशा असल्याचे त्यांनी नमूद केले.

सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात राज्याच्या वाढत्या प्रसिद्धीचीही पंतप्रधानांनी दखल घेतली. "मेघालयातील भगिनींनी बांबू विणण्याच्या कलेचे पुनरुज्जीवन केले आहे आणि येथील कष्टकरी शेतकरी सेंद्रिय राज्य म्हणून मेघालयची ओळख बळकट करत आहेत", ते म्हणाले.

चांगले रस्ते, रेल्वे आणि हवाई संपर्कासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. राज्यातील सेंद्रिय उत्पादनांना नवीन स्वदेशी आणि जागतिक बाजारपेठ मिळावी यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राच्या योजना लोकांपर्यंत नेण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पीएम ग्रामीण सडक योजना आणि राष्ट्रीय उपजीविका अभियान यांसारख्या योजनांचा मेघालयला फायदा झाला आहे. वर्ष 2019 मध्ये केवळ 1 टक्के कुटुंबापासून सुरू झालेले जल जीवन अभियान आज 33 टक्के कुटुंबांपर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करत आहे. लस वितरणासाठी ड्रोन वापरणाऱ्या राज्यांपैकी मेघालय हे पहिले राज्य आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

पर्यटन आणि सेंद्रिय उत्पादनांव्यतिरिक्त नवीन क्षेत्रे विकसित करण्यासाठी मेघालयातील लोकांना निरंतर समर्थन आणि दृढनिश्चयाचे आश्वासन देत पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.

 

 

 

 

 

* * *

M.Chopade/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1791487) Visitor Counter : 162