पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत :स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाचे लाभार्थी  आणि हितधारकांशी साधला  संवाद


"निसर्ग आणि आनंद या व्यतिरिक्त, गोवा हे विकासाचे नवीन मॉडेल,  सामूहिक प्रयत्नांचे प्रतिबिंब आणि पंचायतीपासून प्रशासनापर्यंत  विकासासाठी एकतेचे दर्शन घडवते

"गोव्याने ओडीएफ, वीज, पाईपद्वारे पाणी, गरीबांना धान्य यासारख्या सर्व प्रमुख योजनांमध्ये 100% उद्दिष्ट साध्य केले आहे"

"स्वयंपूर्ण गोवा हा टीम गोव्याच्या नव्या संघ भावनेचा परिणाम आहे"

"गोव्यात विकसित होणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे शेतकरी, पशुधन पाळणारे शेतकरी आणि आपल्या मच्छीमारांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल"

"पर्यटनावर भर देणाऱ्या राज्यांकडे लसीकरण मोहिमेत विशेष लक्ष देण्यात आले आणि गोव्याला त्याचा मोठा फायदा झाला"

Posted On: 23 OCT 2021 12:47PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाचे  लाभार्थी आणि हितधारकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

गोवा सरकारच्या अवर सचिव  ईशा सावंत यांच्याशी संवाद साधताना  पंतप्रधानांनी त्यांना स्वयंपूर्ण मित्र म्हणून काम करण्याबाबत  अनुभवाबद्दल  विचारले.  लाभार्थ्यांना त्यांच्या दारात सेवा आणि उपाय मिळत असल्याची  माहिती त्यांनी दिली.एकाच ठिकाणी सेवा केंद्र असल्यामुळे कामात सुलभता  आहे. पंतप्रधानांनी तंत्रज्ञानाच्या वापराबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले  की एकत्रित पद्धतीने डेटा संकलित केला जात होता त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर केला. यामुळे आवश्यक सुविधांचे मॅपिंग करणे शक्य झाले, असे त्या म्हणाल्या. महिला सक्षमीकरणाबद्दल, पंतप्रधानांना माहिती देण्यात आली की प्रशिक्षण आणि बचत गट यंत्रणेमार्फत महिलांना सोशल मीडिया मार्केटिंग आणि ब्रँडिंग संदर्भात उपकरणे आणि सहाय्य पुरवण्यात आले. अटल इन्क्युबेशन गटाचीही मदत घेण्यात आली. पंतप्रधानांनी आपल्या मुख्यमंत्री कार्यकाळातील  आठवण सांगितली.  अन्न वाढणे, खानपान इत्यादी सेवांसाठी महिला बचत गटांच्या सदस्यांना प्रशिक्षण देणे आणि पूरक वातावरण निर्माण करणे याबद्दल त्यांनी माहिती दिली.  उत्पादनांव्यतिरिक्त  सेवांमध्येही मोठी क्षमता असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.  पंतप्रधानांनी नोकरशाहीला संवेदनशील राहण्याचा आणि नाविन्यता  आणण्याची सूचना केली.  आणि अशा अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

माजी मुख्याध्यापक आणि सरपंच कॉन्स्टँसिओ मिरांडा यांनी पंतप्रधानांना  सांगितले  की, स्वयंपूर्ण मोहिमेमुळे विविध क्षेत्रात आत्मनिर्भरतेचे ध्येय साध्य करण्यासाठी नवीन उपक्रमांना मदत झाली. त्यांनी गरजा-आधारित राज्य आणि केंद्राच्या योजना जाणून घेतल्या आणि त्यावर समन्वित पद्धतीने काम केले. प्रदीर्घ काळ प्रलंबित कामे पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेली प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे.

कुंदन फलारी यांच्याशी पंतप्रधान बोलले, त्यांनी सांगितले की ते आणि स्थानिक प्रशासन हे  समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज आहेत. त्यांनी त्यांच्या परिसरात स्वनिधी  योजना लोकप्रिय करण्याबाबत आपला अनुभव कथन  केला. हे रस्त्यावरचे विक्रेते डिजिटल व्यवहाराचा वापर करत आहेत का याची पंतप्रधानांनी चौकशी केली. कारण या योजनेचे वैशिष्ट्य हेच आहे की डिजिटल साधनांचा वापर व्यवहाराचे हा  तपशील सुरक्षित ठेवतो ज्यामुळे बँकांना वाढीव वित्तपुरवठा करता येतो. गोवा मुक्तीला 60 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त  भाग  केंद्र सरकारने गोव्याला प्रत्येक पंचायतीसाठी 50 लाख आणि प्रत्येक नगरपालिकेसाठी 1 कोटीचे विशेष अनुदान दिले जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी आर्थिक समावेशकतेच्या सरकारी प्रयत्नांबद्दल सांगितले की  लोकांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले  पाहिजे.

मत्स्यव्यवसाय उद्योजक लुईस कार्डोझो यांनी सरकारी योजनांचा लाभ  मिळवण्यातले फायदे आणि इन्सुलेटेड वाहने वापरण्याबाबत आपला अनुभव सांगितलं.  किसान क्रेडिट कार्ड, नाविक ऍप्प बोटींसाठी वित्तपुरवठामच्छिमार समुदायाला मदत करणाऱ्या योजनांबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली.  मच्छीमार आणि शेतकऱ्यांना अधिक नफा व्हावा यासाठी  कच्च्या  मालाऐवजी प्रक्रिया केलेल्या उत्पादनांचा विस्तार करण्याची इच्छा  पंतप्रधानांनी बोलून दाखवली.

रुकी अहमद राजसाब यांनी स्वयंपूर्ण अंतर्गत दिव्यांग जनांसाठी केलेल्या  उपाययोजनांची माहिती दिली. पंतप्रधान म्हणाले की, सरकार दिव्यांग जनांचा  सन्मान आणि सुलभतेसाठी काम करत आहे. सुविधांचे प्रमाणीकरण  आणि  अलिकडेच  पॅरालिम्पिकमध्ये  खेळाडूंनी मिळवलेल्या यशाचा त्यांनी उल्लेख केला.

बचत गटाच्या प्रमुख  निशिता नामदेव गवस यांच्याशी बोलताना पंतप्रधानांनी  गटाची  उत्पादने आणि या  उत्पादनांच्या  विपणन  पद्धतींबद्दल विचारले.  महिलांचा सन्मान आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी सरकार उज्ज्वलास्वच्छ भारत, पंतप्रधान  आवास, जन धन यासारख्या योजना हाती घेत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. महिला प्रत्येक क्षेत्रात, मग ते  सशस्त्र दलाचे क्रीडा क्षेत्र असो , देशाचा गौरव वाढवत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

दुर्गेश एम शिरोडकर यांच्यासोबत पंतप्रधानांनी त्यांच्या समूहाच्या दुग्ध  उपक्रमांबाबत  चर्चा केली. त्यांनी सांगितले की त्यांच्या समूहाने किसान क्रेडिट कार्डचा लाभ  घेतला. त्यांनी इतर शेतकरी आणि दुग्ध उद्योजकांनाही या  सुविधेबद्दल जागरूक केले. किसान क्रेडिट कार्ड योजना लोकप्रिय  करण्यासाठी  शिरोडकरांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. पंतप्रधान  म्हणाले की, सरकार त्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करण्यासाठी  बियाण्यापासून ते बाजारपेठेपर्यंत एक परिसंस्था  तयार करण्यासाठी   वचनबद्ध आहे.  किसान क्रेडिट कार्ड, मृदा आरोग्य कार्ड, युरियाचे निम   कोटिंग, ई नाम, अस्सल बियाणे, एमएसपीनुसार  खरेदी, नवीन कृषी कायदे हे त्या दिशेने प्रयत्न आहेत असे पंतप्रधान म्हणाले.

या प्रसंगी संबोधित करताना, पंतप्रधानांनी गोवा म्हणजे आनंद, गोवा म्हणजे  निसर्ग, गोवा म्हणजे पर्यटन असे वर्णन केले. मात्र  आज त्यांनी यात आणखी जोड घालत सांगितले  की  गोवा विकासाचे नवीन मॉडेल, सामूहिक प्रयत्नांचे प्रतिबिंब आणि  पंचायतीपासून प्रशासनापर्यंत विकासासाठी एकजुटता देखील आहे.

केंद्र सरकारच्या योजना राबवण्यात गोव्याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीवर  भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले की, भारताने उघड्यावरील  शौचापासून  मुक्त होण्याचे ध्येय ठेवले आहे. गोव्याने हे लक्ष्य 100% पूर्ण केले. देशाने  प्रत्येक कुटुंबाला वीज जोडणी देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गोव्याने हे लक्ष्य 100%  साध्य केले आहे. हर घर जल अभियान मध्ये - 100% अंमलबजावणी साध्य करणारे गोवा हे पहिले राज्य बनले आहे. गरीबांना मोफत धान्य  देण्याच्या बाबतीत - गोव्याने 100% उद्दिष्ट साध्य केले आहे अशा शब्दात  पंतप्रधानांनी कौतुक केले.

पंतप्रधान म्हणाले, महिलांच्या सोयीसाठी आणि सन्मानासाठी गोवा, केंद्र  सरकारच्या योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करत आहे आणि त्यांचा  विस्तारही करत आहे. महिलांना शौचालये, उज्ज्वला गॅस जोडणी  किंवा जन  धन बँक खाती यासारख्या सुविधा पुरविण्यामध्ये उत्तम काम केल्याबद्दल  त्यांनी गोवा सरकारचे कौतुक केले.

गोव्याला प्रगतीच्या मार्गावर नेणाऱ्या दिवंगत  मनोहर पर्रीकर यांचे  पंतप्रधानांनी स्मरण केले.  गोव्याच्या विकासाचे प्रकल्प प्रामाणिकपणे पुढे  नेल्याबद्दल आणि गोव्याला नवी उंची दिल्याबद्दल  त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले. आज गोवा नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे. दुहेरी इंजिन सरकार राज्याच्या विकासासाठी ऊर्जा आणि निर्धारासह काम करत आहे. टीम गोव्याच्या या नव्या सांघिक भावनेचा परिणाम म्हणजे स्वयंपूर्ण गोव्याचा संकल्प आहे, असे मोदींनी नमूद केले.

गोव्यात विकसित होत असलेल्या पायाभूत सुविधांमुळे शेतकरी, पशुधन  पाळणारे  शेतकरी आणि मच्छीमारांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे  पंतप्रधान म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ग्रामीण पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी गोव्याचा निधी पूर्वीच्या तुलनेत यावर्षी 5 पटीने वाढवण्यात आला  आहे.

मच्छीमारांच्या नौकांच्या आधुनिकीकरणासाठी विविध मंत्रालयांकडून प्रत्येक स्तरावर प्रोत्साहन दिले जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ते पुढे म्हणाले की, गोव्यातील मच्छिमारांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गतही मोठी मदत मिळत आहे.

लसीकरण मोहिमेबाबत पंतप्रधान म्हणाले की, गोव्यासह देशातील पर्यटन केंद्रित राज्यांना विशेष प्रोत्साहन देण्यात आले आहे. गोव्यालाही याचा खूप  फायदा झाला आहे. सर्व पात्र लोकांना लसीची पहिली मात्रा देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी गोवा सरकारची प्रशंसा केली.

 

***

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1765967) Visitor Counter : 271