आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली कोविड -19 संबंधी मंत्री गटाची (जीओएम) 29 वी बैठक संपन्न


राज्ये टप्प्याटप्प्याने अनलॉक होत असल्यामुळे कोविड सुयोग्य वर्तनाच्या महत्वाबाबत मंत्रीगटाने केला पुनरुच्चार

दुसरी लाट अद्याप संपलेली नाही; काही जिल्ह्यांमध्ये चिंताजनक स्थिती असल्याचे केले अधोरेखित

Posted On: 28 JUN 2021 5:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जून 2021

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली कोविड -19 वरील उच्चस्तरीय मंत्री गटाची 29 वी बैठक आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली. त्यांच्यासमवेत नागरी विमान वाहतूक मंत्री  हरदीप एस. पुरी, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि आरोग्य, कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे हे उपस्थित होते.

डॉ विनोद के पॉल, सदस्य (आरोग्य), नीती आयोग व्हर्च्युअली उपस्थित होते.

  

कोविड व्यवस्थापनासाठी आणि देशभरात कोविड लसीकरणाची व्याप्ती आणि गती वाढवण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले त्या सर्वांचे मंत्री गटाने कौतुक केले.

डॉ. हर्ष वर्धन यांनी सुरुवातीला कोविड -19 ला आळा घालण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ते म्हणाले , “गेल्या 24 तासांत आपल्याकडे केवळ 46,148  नवीन रुग्णांची नोंद झाली असून उपचाराधीन रुग्णांची संख्या 5,72,994 पर्यंत खाली घसरली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सतत वाढत आहे आणि आज तो 96.80% आहे.

कोविड 19 लसीकरण मोहिमेबाबत बोलताना डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, “कोविड -19 लसीकरणात भारताने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे आणि आतापर्यंत देण्यात आलेल्या  कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रांमध्ये  अमेरिकेला मागे टाकले आहे.

कोविड लसीकरणाच्या नवीन धोरणाअंतर्गत, केंद्र सरकार देशातील लस उत्पादकांनी तयार केलेली 75% लस राज्य व केंद्रशासित प्रदेशांना (विनामूल्य) पुरवत आहे. आज सकाळपर्यंत (सकाळी 8 वाजेपर्यंत) आपण आपल्या विविध श्रेणीतील देशवासियांना 32,36,63,297 लसीच्या मात्रा दिल्या आहेत.

 

कोविड-19 च्या या टप्प्यात उद्भवलेल्या म्यूकर मायकोसिस संक्रमणाच्या मार्गाबाबत त्यांनी मंत्रीगटातल्या सदस्यांना माहिती दिली.

मंत्रीगटाने कोविड प्रतिबंधक योग्य वर्तनाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले. सातत्यपूर्ण आयईसी मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली जात आहे.  डॉ व्ही के पॉल यांनी मास्कचा वापर आणि हातांच्या स्वच्छतेच्या फायद्यांवर भर दिला.

सचिव (आरोग्य संशोधन) आणि महासंचालक (आयसीएमआर) डॉ. बलराम भार्गव यांनी देखील सावधगिरीची सूचना देत सांगितले की कोविड-19 ची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही, कारण अजूनही देशातील 80 जिल्ह्यांमध्ये उच्च पॉझिटिव्हिटी दर आहे.

महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि ओदिशा या राज्यांमध्ये रुग्णवाढीचा दर राष्ट्रीय रुग्णवाढ दरापेक्षा अधिक असून उपचाराधीन रुग्णांची संख्या देखील अधिक आहे.


* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1730925) Visitor Counter : 244