पंतप्रधान कार्यालय

पीएम स्वनिधी योजनेच्या उत्तर प्रदेशातील लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी व्हीडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साधला संवाद

Posted On: 27 OCT 2020 11:57PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली, 27 ऑक्‍टोबर 2020

 

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी पीएम स्वनिधी योजनेच्या उत्तर प्रदेशातील लाभार्थ्यांशी व्हीडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

लाभार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी डिजीटल पेमेंटच्या फायद्यांविषयी सांगीतले आणि कॅशबॅक कसा मिळवावा याचेही मार्गदर्शन केले. हे पैसे एखाद्याला चांगले शिक्षण घेण्यासाठी आणि उत्तम करियर करण्यासाठी वापरता येतील असेही ते म्हणाले.

आपल्या संबोधनात प्रधानमंत्री पुढे म्हणाले, की याआधी नोकरदारांनाही कर्जासाठी बँकेकडे जाणं कठीण वाटत असे, तर गोरगरीब वा पथविक्रेते तर याचा विचारही करू शकत नव्हते. पण आता, बँकच लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि त्यांना त्यांची स्वप्ने साकार करायला मदतीचा हात पुढे करत आहे.

पंतप्रधानांनी लाभार्थींचे अभिनंदन केले. तसेच बँकर्सचे त्यांच्या प्रयत्नांबद्दल आभार मानले. त्यांच्या प्रयत्नांनींच गरिबांना सण साजरे करता येतील असे ते म्हणाले. आत्मनिर्भर भारतासाठी हा महत्वाचा दिवस आणि पथविक्रेत्यांच्या सत्काराचा दिवस आहे, असे त्यांनी सांगितले. स्वावलंबी भारतात त्याच्या सहभागाची नोंद देश घेत असल्याचे ते म्हणाले. करोना महामारी प्रकोपात ईतर देशांना त्यांचे कामगार कश्या प्रकारे सामना करतील याची चिंता होती परंतु आपल्या देशातील कामगारांनी सिद्ध केले की ते कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतात, परिस्थितीशी दोन हात करून विजय मिळवतात.

महामारीदरम्यान गरिबांच्या हालअपेष्टा कमी करण्यांच्या उद्देशाने सरकारने 1 लाख 70 हजार कोटी रुपयांचे पॅकेज गरिब कल्याण योजनेतून दिले, असे पंतप्रधानांनी सांगितले. गरिबांना केंद्रस्थानी ठेवून 20 लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पथविक्रेते पुन्हा त्यांच्या कामाला आरंभ करून स्वावलंबी झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

ज्या वेगाने देशभरात ही योजना राबवण्यात आली त्याचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी कौतुक केले.  स्वनिधि योजनेअंतर्गत कर्जासाठी गॅरेंटरची गरज नसल्याचे आणि कोणत्याही अडथळ्याविना कर्ज मिळत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. सामायिक सेवा केंद्र वा महापालिका कार्यालयात ऑनलाईन अर्ज अपलोड करून किंवा बँकेत जाऊन कर्ज मिळवता येते.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच पथविक्रेत्यांना परवडणारे कर्ज मिळत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

उत्तर प्रदेशातील शहरी पथविक्रेत्याकडून सर्वाधिक अर्ज आले, असे सांगून पथविक्रेत्यांकडून देशभरातून कर्जासाठी आलेल्या 25 लाख अर्जापैंकी फक्त 6.5 लाख अर्ज उत्तर प्रदेशातून आले. उत्तर प्रदेशातून आलेल्या 6.5 लाख अर्जांपैकी 4.25 लाख मंजूर झाले. उत्तर प्रदेशात स्वनिधी योजनेच्या करारावर स्टँप ड्युटी लावण्यात येत नाही असे त्यांनी नमूद केले.

महामारीदरम्यान 6 लाख पथविक्रेत्यांना 1000 रुपयांची आर्थिक मदत दिल्याबद्दल त्यांनी उत्तरप्रदेश सरकारचे आभार मानले.

स्वनिधी योजनेतून कर्ज मिळालेले बहुसंख्य पथविक्रेते त्यांच्य कर्जाची परतफेड वेळेवर करत आहेत असेही त्यांनी नमूद केले. छोटे कर्ज घेणारे स्वतःच्या प्रामाणिकतेशी, सचोटीशी तडजोड करत नाहीत असे यावरून  स्पष्ट होते असेही ते म्हणाले.

शक्य असेल तेवढ्या प्रकारे या योजनेबद्दल जागृती करा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले वेळेवर कर्जाची परतफेड केल्यास व्याजावर 7 टक्के सूट मिळेल तसेच डिजिटल व्यवहारावर 100 रु कॅशबॅक मिळेल असे त्यांनी सांगितले.

जनधन योजनेच्या परिणामकारकतेवर शंका व्यक्त करणारे होते आणि आज संकटाच्या वेळी तिच गरीबांच्या कामी आली असंही ते म्हणाले.

गरीबांच्या कल्याणासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला,

पथविक्रेते, कामगार, शेतकरी यांना आपापल्या क्षेत्रात आणि जीवनात प्रगती करता यावी या साठी देश कोणतीही कसर सोडणार नाही असे आश्वासन या प्रसंगी पंतप्रधानांनी दिले.

 

* * *

B.Gokhale/V.Sahajrao/D.Rane 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1668238) Visitor Counter : 175