गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

‘स्वच्छता के 6 साल बेमिसाल’- गांधी जयंतीनिमित्त गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय स्वच्छ भारत मोहिमेची सहा वर्षे साजरी करणार

Posted On: 01 OCT 2020 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्‍टोबर 2020


केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय स्वच्छ भारत मोहीमेची (शहरी) सहा वर्षे साजरे करण्यासाठी 02 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छता के 6 साल बेमिसाल’ या वेबिनारचे आयोजन करणार आहे. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत गेल्या सहा वर्षातील कामगिरी साजरी करण्याबरोबर राज्य व शहरे आणि भागीदार संघटनांचा अनुभव सामायिक करण्यावर वेबिनारमध्ये  भर देण्यात येईल. गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप सिंग पुरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या वेबिनारमध्ये मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा, अतिरिक्त सचिव कामरान रिझवी यांची उपस्थिती असेल.

मंत्र्यांच्या हस्ते देशभरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रभावी पद्धतींसाठी वापरण्यात आलेल्या नवनवीन पद्धतींबद्दल माहिती सांगणारी पुस्तिका आणि एक डायनामिक जीआयएस पोर्टल प्रकाशित करण्यात येईल. तसेच एनआययुएने तयार केलेले कोविड-19 प्रती भारतीय शहरांचा प्रतिसाद: स्वच्छता परिप्रेक्ष्य, नॅशनल फीकल स्लज अँड सेप्टेज मॅनेजमेंट अलायन्सचा संग्रह ‘फ्रंटलाईन स्टोरीज ऑफ रिजिलीयन्स इंडियाज सॅनिटेशन चॅम्पिअन्स’ आणि नागरी व्यवस्थापन केंद्र (UMC) ने तयार केलेले स्वच्छता कामगारांच्या स्वच्छतेसाठी टूलकिट याचेही प्रकाशन करण्यात येणार आहे.   

दुसऱ्या सत्रात निवडक राज्ये आणि शहरांचे अनुभव सामायिक केले जातील आणि ‘स्वच्छतम भारत’साठी पुढे काय पावले उचलता येतील यावर विचारविनिमय केला जाईल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व भागधारकांना एकमेकांकडून शिकण्याची आणि मोहिमेच्या पुढील टप्प्यातील नियोजन करण्याची संधी असेल.  

2014 मध्ये मोहिमेची सुरुवात झाल्यापासून स्वच्छ भारत मोहिमेने- नागरी स्वच्छता आणि घन कचरा व्यवस्थापनात चांगली प्रगती केली आहे. 4,327 नागरी स्वराज्य संस्था उघड्यावर शौचापासून मुक्त जाहीर करण्यात आल्या आहेत. 66 लाख वैयक्तिक शौचालय आणि 6 लाखांहून अधिक समुदाय/सार्वजनिक शौचालयांची उभारणी, जी या मोहिमेच्या उद्दिष्टांपेक्षा अधिक आहे, त्यामुळे हे शक्य झाले आहे. मोहिमेत आता ओडिएफ+ आणि ओडिएफ++ प्रोटोकॉलनुसार सर्वांगीण स्वच्छतेकडे लक्ष देण्यात येणार आहे. एकूण 1,319 शहरे ODF+ प्रमाणित आणि 489 शहरे ODF++ प्रमाणित आहेत. याव्यतिरिक्त, 59,900 शौचालये 2900+ पेक्षा अधिक शहरांमध्ये गुगल नकाशावर प्रदर्शित करण्यात आली आहेत. घन कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत, 97% वार्डांमध्ये घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जात आहे, 77% वार्डांमध्ये कचरा वर्गीकरण केले जाते, तर एकूण जमा कचऱ्यापैकी 67% कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते-2014 च्या तुलनेत 4 पटीने वाढ होऊन याचे प्रमाण 18% आहे.

एकूण 6 शहरांना (इंदोर, अंबिकापूर, नवी मुंबई, सुरत, राजकोट आणि मैसुरु) पंचतारांकित श्रेणी देण्यात आली आहे, 86 शहरांना तीन तारांकित आणि 64 शहरांना 1 तारांकित श्रेणी देण्यात आली आहे. तसेच, आता या शासकीय कार्यक्रमाचे जन चळवळीत रुपांतर झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये 12 कोटी नागरीकांचा सहभाग होता. 

या मोहिमेमुळे सर्व स्वच्छता कामगारांना आणि अनौपचारिक कचरा उचलणाऱ्यांना सन्मानजनक उपजिविका पुरवण्यावर भर देण्यात आला आहे जो समाजातील सर्व घटकांना समानता आणि समावेशाची खात्री देण्याच्या महात्मा गांधींच्या दृष्टीकोनाशी थेट संबधित आहे. मोहिमेअंतर्गत 84,000 कचरा उचलणाऱ्या व्यक्तींना यशस्वीरित्या मुख्य प्रवाहात आणले आहे, तसेच 5.5 लाख स्वच्छता कामगारांना सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांशी जोडले आहे.     

स्वच्छ भारत मिशन, या केंद्र सरकारच्या प्रमुख कार्यक्रमाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 ऑक्टोबर 2014 रोजी राजघाट येथून करण्यात आली. महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीदिनी स्वच्छ भारताचे उद्दिष्ट साध्य करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.  

 

* * *

M.Chopade/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1660637) Visitor Counter : 170