आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा


“परिचारिका आणि इतर आरोग्य सेवकांविना, आपण महामारी प्रकोपाशी लढा जिंकू शकणार नाही.”: हर्षवर्धन

Posted On: 12 MAY 2020 7:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  12 मे 2020

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणजेच फ्लॉरेन्स नाईटेंगलच्या 200व्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या समारंभात अध्यक्षपदी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री हर्षवर्धन  होते.

जागतिक आरोग्य संघटनेने हे वर्ष परिचारिका आणि सुईणींचे (midwife) वर्ष म्हणून घोषित केल्याने आजच्या दिवसाचे महत्व अधिक आहे. लाखो परिचारिकांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती नोंदवली.

परिचारिकांचे कार्य आणि  सेवाभावी समर्पण याबद्दल गौरवोद्गार काढत हर्षवर्धन यांनी त्यांचा आरोग्यसेवेचे मजबूत आणि मुख्य खांब असा उल्लेख केला. तुमच्या कामाची व्याप्ती आणि निष्ठा शब्दांपलीकडली आहे. दयाळू व़ृत्ती,समर्पणभाव, सेवाभावी स्पर्श आणि कितीही कठीण दिवसात रुग्णाला प्रधान्य देणारी वृत्ती याबद्दल आपले मनापासून आभार, असे उद्‌गार हर्षवर्धन यांनी काढले. सध्याच्या महामारीत ध्रुवताऱ्यासारखे अढळ कार्य करत असल्याबद्दल त्यांनी परिचारीकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. परिचारिका आणि इतर आरोग्य सेवकांविना, आपण महामारी प्रकोपाशी लढा जिंकू शकणार नाही, तसेच जागतिक पातळीवरील आरोग्य स्थिती वा शाश्वत विकासाचे ध्येयही गाठू शकणार नाही, असे ते म्हणाले.

कोविड-19च्या या लढ्यातील आव्हाने पेलणाऱ्या परिचारिकांच्या धैर्याची त्यांना स्तुती केली. पुण्यातील परिचारिका ज्योती विठ्ठल रक्षा, पुण्याच्या सहाय्यक मेट्रन अनिता गोविंदराव राठोड आणि झिलमिलच्या ESI रुग्णालयातील परिचारिका अधिकारी मार्गारेट यांना आपण नुकतंच गमावलय, त्यांची आठवण या क्षणाला येते आहे. आपण त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करत असल्याचेही हर्षवर्धन यांनी याप्रसंगी नमूद केले.

या आजाराशी सामना   करतांना आम्ही आपणा सर्वांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत. या लढ्यात आपलं मनोधैर्य उंचावत ठेवू तसेच आवश्यक काळजी आणि स्वतःला सांभाळायचे प्रशिक्षण तसेच सर्व नियम पाऴून आपले रक्षण करूया, असे आवाहनही त्यांनी केले.

कोविड-19ला हरवण्यासाठी  पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सर्वतोपरी वचनबद्ध आहे असं हर्षवर्धन म्हणाले. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबद्दल बोलताना त्यांनी यासाठी अध्यादेश काढल्याचा उल्लेख केला. या अध्यादेशानुसार महामारीत कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले वा त्यांच्या स्थावर मालमत्तेला नुकसान पोचवणे  हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा ठरवला असून, अश्या हिंसाचारातील दोषींना  तीन महिने ते पाच वर्षांपर्यंतची कैद आणि 50,000/- ते 20,00,000/- रुपयांपर्यंत दंड अश्या शिक्षेची तरतूद असल्याचे ते म्हणाले.  अतिहिंसेच्या बाबतीत ही शिक्षा  6 महिने ते 7 वर्षे आणि 1,00,000/- ते 5,00,000/- लाख रुपयांपर्यंत दंड एवढी वाढू शकते.  त्याशिवाय   पिडीत आरोग्य कर्मचाऱ्याला त्याच्या स्थावर मालमत्तेच्या  बाजारभावाच्या दुप्पट भरपाई देण्यासही दोषी बांधिल आहे.

कोविड-19 शी लढा देत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण विमा योजना मंजूर  केली आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांना 90 दिवसांसाठी 50 लाखांचे विमाछत्र मिळेल. 22.12 लाख आरोग्यसेवक ,कोविड-19रुग्णाशी थेट संपर्कात येणारे आणि त्यामुळे संसर्गाचा धोका असणारे कम्युनिटी आरोग्य कर्मचारी यांना याचा लाभ मिळणार आहे. कोविड-19 संसर्गाने प्राण गमावलेल्यांचाही यात समावेश होईल. आताच्या काळात परिचारिकांनी स्वतःसोबतच इतरांना मार्गदर्शन करता यावे म्हणून हा आजार, त्याच्या संसर्गाचा धोका, प्रतिबंध आणि काळजी घेणे ही सर्व माहिती करून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. AIIMS, दिल्ली आणि भारतीय परिचारिका परिषद आयोजित करत असलेल्या वेबिनार्सचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी परिचारिकांना केले.

B.Gokhale/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1623372) Visitor Counter : 253