रेल्वे मंत्रालय

लॉकडाऊनच्या काळात गेल्या वर्षीच्या तुलनेत खासगी अन्नधान्य मालवाहतुकीत मोठी वाढ


अन्नधान्यासारखी कृषी उत्पादने वेळेत गोळा करून त्यांच्या अविरत पुरवठ्यासाठी भारतीय रेल्वेकडून सर्वोतोपरी प्रयत्न

Posted On: 29 APR 2020 8:25PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 29 एप्रिल 2020

 

लॉकडाऊनच्या काळातही अन्नधान्य आणि अत्यावश्यक वस्तू देशभरात उपलब्ध राहतील याची खबरदारी भारतीय रेल्वे आपल्या माल आणि पार्सल सेवेच्या माध्यमातून घेत आहे.

लॉकडाऊन  जाहीर झाल्यापासून २५ मार्च ते २८ एप्रिल या कालावधीत ७. ७५ लाख टनांहून अधिक (३०३ रेक्स) खासगी धान्याची मालवाहतूक भारतीय रेल्वेने देशभरात केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे ६.६२ लाख टन (२४३ रेक्स )धान्याची मालवाहतूक झाली होती. रेल्वेद्वारे खासगी धान्याची मालवाहतूक करण्यामध्ये आंध्र प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडू ही आघाडीची राज्ये आहेत.

कोविड १९ मुळे जाहीर लॉकडाऊनच्या काळात अन्नधान्यासारखी कृषी उत्पादने वेळेवर गोळा केली जातील आणि देशभरात त्यांचा पुरवठा सुरळीत राहील यासाठी भारतीय रेल्वे सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. रेल्वेगाडीत माल चढवणे, त्यांची  वाहतूक  आणि तो व्यवस्थित उतरवण्याचे काम लॉकडाऊनच्या काळातही जोरात सुरू आहे.

फळ, भाजीपाला, दूध व दुग्धजन्य पदार्थ यासारख्या नाशवंत वस्तू आणि शेतीसाठी  बियाणे याकरिता विशेष पार्सल गाड्यांसाठी भारतीय रेल्वेने मार्ग निश्चित केले आहेत.  देशाच्या सर्व भागात अविरत पुरवठा राहावा यासाठी  ज्या ठिकाणी मागणी कमी आहे अशा मार्गावरही गाड्या चालवल्या जात आहेत.  मार्गावर शक्य त्या सर्व ठिकाणी रेल्वेगाडयांना थांबा देण्यात आला आहे.

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1619380) Visitor Counter : 196