रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेने मोफत भोजन वितरण करण्याचा 20 लाखाचा टप्पा ओलांडला


कोविड-19 मुळे लॉकडाउनच्या काळात देशभरातल्या सुमारे 300 ठिकाणांवर भोजनाचे वितरण

Posted On: 20 APR 2020 5:50PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 20 एप्रिल 2020

 

कोविड-19 च्या महामारीमुळे संपूर्ण देशभरामध्ये लॉकडाउन सुरू आहे. अशा संकटकाळात भारतीय रेल्वेच्यावतीने गरजूंना दररोज ताजे, गरम भोजन पुरवले जात आहे. रेल्वेने आत्तापर्यंत 20.5 लाख लोकांना मोफत भोजन वितरित केले.

कोविड-19 या महामारीमुळे संपूर्ण जगामध्ये संकट निर्माण झाले आहे. अनेक लोकांवर रोजगाराविना उपासमारीची वेळ आली आहे. या महामारीचा फटका रोजगारीवर असणारे मजूर, हमाल, कामगार, स्थलांतरित श्रमिक, बेघर, अशा लोकांना सर्वात जास्त बसला आहे.

अशा गरीब लोकांच्या मदतीसाठी भारतीय रेल्वेच्या विविध संघटना एकत्र आल्या असून दि.28 मार्च,2020 पासून सर्वांना भोजन मिळावे, यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. रेल्वेच्या आयआरसीटीसीचे भोजनगृह वापरून आणि आरपीएफ म्हणजेच रेल्वे सुरक्षा दलाची साधन सामुग्री वापरून स्वयंसेवी संघटनांच्या मदतीने कागदांच्या प्लेटसह खाद्यपदार्थांची पाकिटे दुपारच्या आणि रात्रीच्या भोजनाच्यावेळी सर्व गरजूंपर्यंत पोहोचवली जात आहेत.  विशेष म्हणजे सर्व गरीब, बेघर, लोकांना भोजन देतांना सामाजिक अंतराचे नियम पाळले जात आहेत. त्याचबरोबर भोजन तयार करतानाही स्वच्छता पाळली जात आहे.

केवळ सर्व रेल्वे स्थानक परिसरामध्येच नाही तर शहराच्या इतर भागातही जर कोणाला अन्न पोहोचवणे गरजेचे असेल तर आरपीएफ, जीआरपी, राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संघटना यांच्यामार्फत भोजनाची तयार पाकिटे पुरवण्याचे काम केले जात आहे.

आयआरसीटीसीचे भोजनगृह असलेल्या रेल्वेच्या नवी दिल्ली, बंगलुरू, हुबळी, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, भुसावळ, हावडा, पाटणा, गया, रांची, कटिहार, दीनदयाळ उपाध्याय, बालासोर, विजयवाडा, खुर्दा, काटपाडी, तिरूचिरापल्ली, धनबाद, गुवाहाटी, समस्तीपूर, प्रयागराज, इटारसी, विशाखापट्टणम, चेंगलपटू, पुणे, हाजीपूर, रायपूर आणि टाटानगर या उत्तर, पश्चिम, पूर्व, दक्षिण आणि दक्षिण मध्य, या विभागातल्या विविध क्षेत्रामध्ये मोफत भोजन देण्यात येत आहे. या योजनेमधून तयार भोजनाची पाकिटे वाटण्याचा 20.5 लाखांचा टप्पा आज ओलांडण्यात आला.

यापैकी, सुमारे 11.6 लाख भोजन पाकिटांचे वितरण आयआरसीटीसीच्या वतीने करण्यात आले तर 3.6 लाख भोजन पाकिटे आरपीएफच्या वतीने वितरित करण्यात आली. जवळपास 1.5 लाख भोजन पाकिटे रेल्वेच्या वाणिज्यिक आणि इतर विभागाच्यावतीने पुरवण्यात आली. तर जवळपास 3.8 लाख भोजन पाकिटे रेल्वेच्या विविध संघटनांबरोबर कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांनी दिली. 

आयआरसीटीसी आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्यावतीने तयार करण्यात आलेले भोजन गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल खूप महत्वाची भूमिका बजावत आहे. लॉकडाउनच्या अगदी प्रारंभीच्या दिवसात, दि. 28 मार्च, 2020 रोजी रेल्वेच्या विविध 71 स्थानी 5,419 गरजू लोकांना भोजन पुरवण्यात आले. मात्र लॉकडाउनमुळे गरजवंतांची संख्या दिवसेंदिवस वाढायला लागली. त्यामुळे देशभरात जवळपास 300 स्थानांवर भोजन वितरणाची सुविधा करण्यात आली.

भारतीय रेल्वे संघटनांनी एकत्र येवून जास्तीत जास्त गरजवंतांना भोजन मिळावे, अशी व्यवस्था केल्यामुळे हजारो गरीब, बेघर लोकांचे रेल्वेचे भोजन म्हणजे आशास्थान बनले आहे.

*****

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor

 



(Release ID: 1616426) Visitor Counter : 284