कृषी मंत्रालय

लॉकडाऊन दरम्यान शेतीविषयक कामकाज सुलभ करण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली


एन एस तोमर यांनी नियमित देखरेखीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे दिले निर्देश; शेतमाल आणि शेतीविषयक उत्पादनांच्या वाहतुकीला अडथला आणू नये – तोमर

Posted On: 07 APR 2020 9:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 एप्रिल 2020


केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज लॉकडाऊन दरम्यान शेतीविषयक कामकाज सुलभ करण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली होती. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करत सरकारने शेतकरी आणि संबंधित क्षेत्रातील कामगारांना विना अडथळा काम करता यावे यासाठी अनेक उपक्रम सुरु केले आहेत. तोमर यांनी यावेळी, कृषी आणि संबंधित क्षेत्राला दिलेल्या सवलतींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले तसेच विविध सवलती आणि सूट दिलेल्या बाबींवर देखरेख करण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्याचे निर्देश दिले. 

कोविड-19 चा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने पुकारलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊन कालावधीच्या सुरवातीच्या काळात शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली तोमर यांनी केंद्रीय गृह आणि अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विचारविनिमय केला आणि जिथे शक्य आहे तिथे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तात्काळ उपाययोजना लागू केल्या. केंद्र सरकारच्या संबंधित मार्गदर्शक सूचना आणि मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री, पुरषोत्तम रुपाला आणि कैलाश चौधरी यांच्यासमवेत तोमर यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन केले होते.

तोमर यांनी अधोरेखित केले की, कृषी आणि संबंधित क्षेत्राला दिलेल्या सवलतींची अंमलबजावणी करताना अधिकाऱ्यांनी सामाजिक अंतराच्या संबंधित निकषांचे काटेकोरपणे पालन करावे असे.  मंत्री म्हणाले की, शेती उत्पन्न घेताना शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येता कामा नये. शेतकऱ्याला त्याचा शेतमाल त्याच्या शेताजवळ विकता यावा शिवाय शेतमालाची  राज्य आणि आंतरराज्य वाहतूक करताना कोणताही अडथळा येऊ नये, यावर त्यांनी जोर दिला. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, शेतमाल घेऊन जाणाऱ्या ट्रकना वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. मंत्री म्हणाले की, पेरणीची कामे लवकरच सुरु होतील आणि यावेळी बियाणांचा आणि खतांचा तुटवडा भासणार नाही याकडे लक्ष द्यावे. अन्नधान्य आणि कृषी मालाच्या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी असे ते म्हणाले. 

सरकारने एमएसपी कामांसह कृषी उत्पादनांची खरेदी करणाऱ्या संस्था; कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित किंवा राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या ‘मंडी’; शेतातील शेतकरी आणि शेतमजुरांची कामे; शेती यंत्रणेशी संबंधित केंद्र; खत, कीटकनाशके आणि बियाणे उत्पादन आणि पॅकेजिंग युनिट्स; आणि संबधित आणि पीक तसेच पेरणीशी संबंधित शेती व फलोत्पादनात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांच्या आंतरराज्य वाहतुकीला लॉकडाऊन मध्ये सूट देण्यात आली आहे. कृषी आणि फलोत्पादनाशी संबंधित पुरवठादारांनाही सवलतीच्या प्रवर्ग यादीमध्ये समाविष्ट केले आहे. याशिवाय शेतमालाची वाहतुक सुलभ व्हावी यासाठी कृषी यंत्रांची दुकाने, त्यातील सुटे भाग (पुरवठा साखळीसह) आणि महामार्गावरील ट्रक दुरुस्तीची दुकाने व शक्यतो पेट्रोल पंप खुली राहू शकतात. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त 50 टक्के कर्मचारी ठेवून चहाच्या मळ्यांमध्ये काम केले जाऊ शकते.

 

 

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
 



(Release ID: 1612105) Visitor Counter : 141