• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

राष्ट्रीय रस्ते वाहतूक परिजालाच्या 500 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीच्या 22 मार्गांच्या माध्यमातून टपाल विभाग अत्यावश्यक वस्तूंसाठी वितरण सेवा देणार

Posted On: 24 APR 2020 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24  एप्रिल 2020

कोविड-19 मुळे घालण्यात आलेल्या लॉकडाउनच्या परिस्थितीत देशात विमान, रेल्वे, राज्य मार्ग यामार्फत होणारी प्रवासी वाहतूक पूर्णतः थांबल्याने अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठा साखळीच्या व्यवस्थापनात अडथळे उत्पन्न झाले. सदर आपत्कालीन स्थितीत चौकटीबाहेरचा विचार करण्याचे आवाहन केंद्रीय संदेशवहन, इलेकट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी टपाल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केले. या प्रोत्साहनामुळे, विभागाच्या सध्याच्या वाहनांच्या ताफ्याच्या मदतीने शहरांतर्गत वितरणासाठी रस्ते वाहतुकीची यंत्रणा सुरु करण्याची नवकल्पना उदयाला आली. 22 मार्गांचे व 500  किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे असे हे 'राष्ट्रीय रस्ते वाहतूक परिजाल (नेटवर्क)' आंतरराज्य/ राज्यांतर्गत प्रकारच्या 34 फेऱ्यांसह देशातील 75 शहरांना स्पर्श करते. आता या उपक्रमामुळे, टपाल विभागामार्फत अत्यावश्यक वस्तूंची मालवाहतूक देशभरात कोणत्याही ठिकाणी होऊ शकेल.

देशाच्या कानाकोपऱ्यात औषधे, कोविड-19 चे तपासणी संच, मास्क, सॅनिटायझर इत्यादींसह अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याची काळजी घेण्याचे अन्य अनेक उपक्रम टपाल विभागाद्वारे आधीपासूनच चालविले जात होते. तसे, वृद्ध, दिव्यांग आणि निवृत्तिवेतनधारकांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांना त्यांच्या खात्यातील रोख रक्कम उपलब्ध करून देण्याचेही काम विभाग करत आहे. आता, देशवासियांपर्यंत पोहोचण्यासाठी हे राष्ट्रीय रस्ते वाहतूक परिजाल (नेटवर्क) हा टपाल विभागासमोरचा आणखी एक नवा पर्याय ठरणार आहे.

 

B.Gokhale/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1618011) Visitor Counter : 96


Link mygov.in