गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्लीत लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम (विनिमय) चे उद्घाटन
मोदीजी उद्या भारताचे सर्वाधिक काळ कार्यरत असलेले आणि सलग निवडून आलेले पंतप्रधान बनणार; संपूर्ण देशासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे
लँड पोर्ट ऑथॉरिटी हे चतुष्कोणीय सीमा सुरक्षा धोरणाचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून उदयास येत आहे
सध्या देशभरात पंधरा लैंड पोर्ट कार्यरत असून, पुढील तीन वर्षांत आणखी 11 लँड पोर्ट्स विकसित करण्याची योजना
प्रविष्टि तिथि:
09 JUN 2026 9:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2026
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम (विनिमय)चे उद्घाटन केले.

या कार्यक्रमाला संबोधित करताना, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भू-बंदर प्राधिकरणाला एक नवी दिशा देण्यात आली. सुरक्षा-केंद्रित दृष्टिकोनाच्या पुढे जाऊन, लँड पोर्ट्स सुरक्षेसाठी संरक्षणाची पहिली फळी, व्यापार सुलभतेचे साधन आणि लोकांमधील संपर्कासाठी एक सेतू म्हणून विकसित करण्यात आली. त्याचबरोबर, भू-बंदरांनी सीमावर्ती भागांच्या सर्वांगीण विकासात, वैध व्यापाराला प्रोत्साहन देण्यात आणि सीमावर्ती गावे व जिल्ह्यांमधून होणाऱ्या स्थलांतरासारख्या आव्हानांना सामोरे जाण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

भू बंदर प्राधिकरणाने आपल्या भू-सीमा बंदरांसाठी सर्व हितधारकांना एकाच व्यासपीठावर आणणारी आधुनिक, डिजिटल, एकात्मिक आणि रिअल-टाइम व्यवस्थापन प्रणाली विकसित केली असल्याचे शाह यांनी सांगितले. भू बंदर व्यवस्थापन प्रणालीच्या (लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टम)माध्यमातून, भू बंदर प्राधिकरणाने, भू-सीमा बंदर स्थापनेमागील मूळ उद्दिष्ट साध्य केले आहे, असे त्यांनी नमूद केले. येत्या काही दिवसांत, आम्ही 'भू बंदर व्यवस्थापन प्रणाली' हा देशाच्या आधुनिक सुरक्षितता रचना अर्थात स्मार्ट सिक्युरिटी ग्रिडचा अविभाज्य भाग बनवू, ज्यामुळे केवळ आपली आर्थिक सुरक्षाच नव्हे तर आपली भौतिक सुरक्षाही सुनिश्चित होईल. भू बंदर प्राधिकरणाच्या या उपक्रमामुळे स्मार्ट सीमा संकल्पना प्रत्यक्षात आणण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. मालवाहतूक, प्रवासी आणि वाहनांच्या व्यवस्थापनासाठी ही प्रणाली एकात्मिक डिजिटल मंच पुरवेल. जवळपास 90% कागदी कार्यवाही समाप्त होईल. ट्रक्सना लागणाऱ्या प्रतीक्षा कालावधीत अंदाजे 40 ते 60 टक्क्यांनी, तर प्रवेशद्वारावरील प्रक्रियांच्या वेळेत 22 ते 35 टक्क्यांनी घट होण्याची अपेक्षा आहे. यामुळे व्यापाराला चालना मिळण्यासोबतच पर्यटनालाही प्रोत्साहन मिळेल आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये उत्तम समन्वय, संवाद आणि सांस्कृतिक आदानप्रदान सुलभ होईल.

9 जून 2026 हा दिवस देशाच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस म्हणून स्मरणात राहील,असे सांगून नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून सलग 12 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला, असे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले. काही नेते आपला बहुतेक वेळ केवळ सत्तेत टिकून राहण्याचा प्रयत्न करण्यात घालवतात, तर मोदी यांनी आपल्या कार्यकाळातील 12 वर्षे समर्पित सेवेचा काळ मानली आणि संपूर्ण देशाला विकासाच्या मार्गावर नेले, हे त्यांनी अधोरेखित केले. मोदी यांनी राष्ट्रसेवा हेच आपल्या जीवनाचे ध्येय मानले असून देशाला पुढे नेण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. मोदी यांनी एका निःस्वार्थ कर्मयोग्याप्रमाणे अनेक ऐतिहासिक टप्पे गाठले आहेत. त्यामुळे भारत आज विविध क्षेत्रांमध्ये जागतिक आदर्श आणि प्रगतीचा मापदंड म्हणून उदयास आला आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज निवडून आलेले पंतप्रधान म्हणून आपला 4398 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत आणि उद्या ते माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मागे टाकतील, असे ते म्हणाले. त्यामुळे मोदी यांना भारताचे निर्वाचित पंतप्रधान म्हणून सलग सर्वाधिक काळ राष्ट्रसेवा करण्याचा मान मिळेल, असे त्यांनी सांगितले. आपल्या कार्यकाळात मोदी यांनी जनकल्याणाला शासनाचे मार्गदर्शक तत्त्व बनवले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
निलीमा चितळे/सोनाली काकडे/सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2270953)
आगंतुक पटल : 16