पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममध्ये कोक्राझार येथे विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभाच्या वेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलेले भाषण
Posted On:
13 MAR 2026 4:48PM by PIB Mumbai
खुलुमबाई कोकराझार !
मित्रांनो,
हवामान खराब असल्यामुळे मी कोक्राझारला येऊ शकत नाही आहे. मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो. येथून गुवाहाटीवरूनच तुमच्याशी संवाद साधणे शक्य झाले आहे. मी दिल्लीहून निघालो होतो तुमच्याकडे येण्यासाठी, परंतु मला गुवाहाटीमध्येच उतरावे लागले आणि आता मी गुवाहाटीतूनच तुमचे दर्शनही घेत आहे आणि तुमच्याशी बोलतही आहे.
या कार्यक्रमाशी जोडले गेलेले आसामचे मुख्यमंत्री भाऊ हिमंत बिस्वा सरमा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल जी, बोडोलँड टेरिटोरियल कौन्सिलचे चीफ एक्झिक्युटिव्ह मेंबर हाग्रामा मोहिलारी जी, आमच्यासोबत उपस्थित असलेले आसामचे राज्यपाल श्री लक्ष्मण प्रसाद आचार्य जी, आसाम सरकारचे मंत्री, खासदार आणि आमदार, B.T.C चे सर्व प्रतिनिधी, समाजातील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!
सर्वात आधी मी बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा जी, रूपनाथ ब्रह्मा जी आणि या भूमीवरील महान व्यक्तिमत्त्वांना श्रद्धापूर्वक नमन करतो. मी पाहत आहे की, जिथपर्यंत माझी नजर पोहोचत आहे तिथपर्यंत लोकच लोक दिसत आहेत, आणि इतक्या मोठ्या संख्येने माता-भगिनी देखील आशीर्वाद देण्यासाठी आल्या आहेत. तुम्ही तिथे इतक्या प्रचंड संख्येने पोहोचला आहात. तुमचे हे प्रेम माझ्यावर एका कर्जासारखे आहे. आणि माझा नेहमीच असा प्रयत्न राहिला आहे की, हे कर्ज मी तुमची सेवा करून फेडावे, या क्षेत्राचा विकास करून फेडावे.
मित्रांनो, काही आठवड्यांपूर्वीच मी गुवाहाटीमध्ये होतो, तिथे मला बागुरुम्बा दहोउ च्या भव्य उत्सवात समृद्ध बोडो संस्कृतीचा भाग होण्याची संधी मिळाली. बोडो समाजाने आपली भाषा, आपली संस्कृती आणि आपल्या परंपरा इतक्या चांगल्या प्रकारे जपल्या आणि सांभाळल्या आहेत, हे पाहून मला खूप अभिमान वाटतो. बाथोऊ ची आध्यात्मिक परंपरा असो, किंवा बैइसागू चा उत्सव, हे सर्व भारताच्या सांस्कृतिक शक्तीला अधिक मजबूत करतात.
मित्रांनो,
भाजप-NDA चे डबल इंजिन सरकार देखील आसामच्या वारशाचे जतन आणि आसामचा वेगवान विकास, या दोन्ही गोष्टींसाठी निरंतर काम करत आहे. आज येथे या कार्यक्रमातच, या क्षेत्राच्या विकासासाठी 4500 कोटी रुपयांहून अधिक प्रकल्पांचे भूमीपूजन आणि लोकार्पण झाले आहे. यापैकी 1100 कोटी रुपयांहून अधिक रक्कम बोडोलँडच्या रस्त्यांसाठी खर्च केली जाणार आहे. 'आसाम माला' या अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यामुळे आसामची रोड कनेक्टिव्हिटी अधिक सशक्त होईल.
मित्रांनो,
काही वेळापूर्वी मला कामाख्या-चार्लापल्ली अमृत भारत एक्सप्रेस आणि गुवाहाटी-न्यू जलपाईगुडी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्याची संधी मिळाली आहे. या सर्व प्रकल्पांमुळे तुम्हाला सोयी-सुविधा तर मिळतीलच, शिवाय व्यापार आणि पर्यटनालाही चालना मिळेल. यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल सहजपणे मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचू शकेल. मी तुम्हा सर्वांचे या विकास प्रकल्पांसाठी खूप-खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
कोक्राझारसह या संपूर्ण क्षेत्राने गेल्या दशकांमध्ये खूप काही सहन केले होते, खूप काही गमावले होते. आम्ही तो कठीण काळ पाहिला आहे, जेव्हा या डोंगरांमध्ये फक्त बॉम्ब आणि बंदुकीचाच आवाज ऐकू येत असे.
परंतु आज हे चित्र बदलत आहे. आज हे डोंगर 'खाम' च्या तालावर आणि 'सिफुंग' च्या मधुर सुरांनी घुमत आहेत. आज बोडोलँड शांतता आणि विकासाच्या मार्गावर चालू लागले आहे. आज आसाम शांतता आणि विकासाचा नवा अध्याय लिहित आहे.
मित्रांनो,
आज येथे B.T.R क्षेत्रातील 6 महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन झाले आहे, तसेच या क्षेत्रातील रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी मोठी पावले उचलली गेली आहेत. येथे उभारली जाणारे रेल्वेचे वर्कशॉप, या क्षेत्राला लॉजिस्टिक्सचे एक मोठे केंद्र बनवणार आहे.
येथे भूतानला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरही काम सुरू आहे, अनेक स्थानकांना आधुनिक बनवले जात आहे. आता वंदे भारत आणि राजधानी एक्सप्रेस सारख्या गाड्या कोक्राझारमध्ये थांबतात. हा बोडोलँडच्या उत्तम कनेक्टिव्हिटीचे दाखला आहे. अशा प्रकल्पांमुळे कोक्राझार व्यापाराचे मोठे केंद्र बनणार आहे.
मित्रांनो,
मी हाग्रामा मोहिलारी जी यांच्या टीमचे, हेमंत जी यांच्या पूर्ण टीमचे, विकासाच्या या कामांसाठी खूप-खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
दशकांपर्यंत बोडोलँडचे हे क्षेत्र काँग्रेसच्या विश्वासघाताचे साक्षीदार राहिले आहे. बोडोलँडच्या अनेक पिढ्यांना काँग्रेसने खोट्या स्वप्नांत गुंतवून ठेवले. दिल्लीमध्ये बसलेल्या काँग्रेस सरकाराने केवळ दिखाव्यासाठी कागदी करार केले.
मित्रांनो,
जेव्हा तुम्ही देशातून आणि आसाममधून दोन्ही ठिकाणांहून काँग्रेसला दूर करून भाजप-एनडीएला संधी दिली, तेव्हा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू केले. काँग्रेस जिथे आपल्या स्वार्थी राजकारणासाठी वेगवेगळ्या समुदायांमध्ये फूट पाडत असे, तिथे भाजपने कायमस्वरूपी शांततेसाठी काम केले. याच विचाराने बोडो शांतता करार करण्यात आला. या करारात प्रथमच सर्व प्रमुख संघटना आणि गटांना एकत्र आणण्यात आले.
मित्रांनो,
काँग्रेसची आणखी एक सत्यता आहे—काँग्रेस म्हणजे खोट्या आश्वासनांचे दुकान आहे. आणि एका खोट्या आश्वासनासोबत चार “सुपर खोटे” भेटवस्तू म्हणून देते. कारण ती आश्वासने पूर्ण करण्याचा काँग्रेसचा हेतूच नसतो. दुसरीकडे तुमच्यासमोर भाजप-एनडीएचे मॉडेल आहे. आमच्या डबल इंजिन सरकारने जे काही सांगितले ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. ही आजची गोष्ट नाही. 2003 मध्ये जेव्हा दिल्लीमध्ये एनडीए सरकार होते, अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली, तेव्हाही आम्ही प्रामाणिकपणे आणि सचोटीने काम करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. त्याअंतर्गत सहाव्या अनुसूचीमध्ये बीटीसीची स्थापना झाली. यामुळे बोडोलँडच्या विकासाला चालना मिळाली. येथे बोडोलँड विद्यापीठ स्थापन झाले, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सुरू झाले, अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले आणि असे अनेक प्रकल्प येथे सुरू झाले.
मित्रांनो,
2020 च्या कराराअंतर्गत आम्ही केलेली सर्व आश्वासने एकामागून एक जलदगतीने पूर्ण केली जात आहेत. बोडो भाषेला सहयोगी अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. बोडोलँडसाठी 1500 कोटी रुपयांचे विशेष विकास पॅकेज देण्यात आले आहे. आज कोकराझार येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू आहे आणि तमुलपूर येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारले जात आहे. येथे नवीन पूल बांधले जात आहेत. आज आसाममधील शस्त्रत्याग केलेल्या सुमारे 10 हजार युवकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना पुढे नेले जात आहे. ज्या मातांचे मुलगे आज घरी परतले आहेत, त्या सर्व माता आम्हाला आशीर्वाद देत आहेत. हे युवक आता आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जीवन जगत आहेत.
मित्रांनो,
आमच्या सरकारने हेही सुनिश्चित केले आहे की बोडो समाजाच्या श्रद्धा आणि परंपरांना राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळावा. बोडो समाजाची पारंपरिक श्रद्धा ‘बाथोऊ’लाही मोठा सन्मान देण्यात आला आहे. तसेच श्रद्धास्थानांच्या विकासासाठीही विशेष मदत दिली जात आहे.
मित्रांनो,
काँग्रेसचा आणखी एक मोठे पाप आहे, ज्यामुळे देश आणि आसामच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. ज्यामुळे ‘रोटी, बेटी आणि माटी’—तिन्हींच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. काँग्रेसचा हात नेहमीच घुसखोरांसोबत राहिला आहे आणि आजही आहे. काँग्रेसने अनेक दशके येथील मूळ रहिवाशांना जमिनीची कायदेशीर कागदपत्रे दिली नाहीत. काँग्रेसने आदिवासींच्या जमिनी मोठ्या प्रमाणात घुसखोरांच्या ताब्यात दिल्या. धुबरी आणि गोलपारा सारख्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अतिशय भीषण होती. त्यामुळे बोडोलँडमध्ये लोकसंख्येचे संतुलन बिघडत होते आणि समाजात संकट निर्माण होत होते. मला समाधान आहे की हेमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली घुसखोरांच्या ताब्यातील जमीन परत मिळवण्याचे मोठे अभियान आसाममध्ये चालू आहे. येथे भाजप-एनडीए सरकारने आसामच्या मूळ रहिवाशांना जमिनीची कायदेशीर कागदपत्रेही दिली आहेत. या मोहिमेत सक्रिय सहभाग दिल्याबद्दल मी आदिवासी समाजाचे मनापासून आभार मानतो. आज मी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलो आहे की येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला कठोर शिक्षा द्या आणि स्पष्ट संदेश द्या की आता देशात घुसखोरांसाठी कोणतीही जागा नाही. आसाममधून निघालेला संदेश संपूर्ण देशाचा आवाज बनेल.
मित्रांनो,
आसामच्या विकासाची गती आपल्याला सातत्याने वाढवत ठेवायची आहे आणि मला खात्री आहे की आसामच्या जनतेच्या आशीर्वादाने विकसित आसामचा संकल्प नक्की पूर्ण होईल. या विश्वासासह मी आपणा सर्वांना विकास प्रकल्पांसाठी पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
खूप-खूप आभार.
नमस्कार.
***
यश राणे / शैलेश पाटील / श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2240303)
अभ्यागत कक्ष : 29
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam