मंत्रिमंडळ
azadi ka amrit mahotsav

नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकमधून सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन मध्ये स्थलांतर करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी : युगे युगीन भारत राष्ट्रीय संग्रहालयासाठीचा मार्गही झाला प्रशस्त

Posted On: 14 FEB 2026 2:24PM by PIB Mumbai

 

आज, विक्रम संवत 2082... फाल्गुन कृष्ण पक्ष... विजया एकादशी... माघ 24, शके 1947 या शुभ मुहूर्तावर...

13 फेब्रुवारी 2026 रोजी, माननीय पंतप्रधानांनी नवीन पंतप्रधान कार्यालय राष्ट्राला समर्पित केले असून हे कार्यालय यापुढे सेवा तीर्थ या नावाने ओळखले जाईल.

भारताला वसाहतवादी राजवटीच्या जोखडात अडकवून ठेवण्यासाठी ब्रिटीशांनी नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक या इमारतींची उभारणी केली होती. भारताने 1947 मध्ये वसाहतवादी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवले, मात्र तरी देखील तत्कालीन सरकारने आपल्या कामकाजाच्या सोयीसाठी या इमारतींचा वापर तसाच सुरू ठेवला होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून साऊथ ब्लॉकच्या याच इमारतीतून पंतप्रधान कार्यालयाचे कामकाज चालत आले आहे.

आज, साऊथ ब्लॉकच्या या सभागृहात केंद्रीय मंत्रिमंडळाची अखेरची बैठक होत असल्याचा आम्हा सर्वांना अत्यंत आनंद होत आहे. हा काही केवळ एक ठिकाण बदलत असल्याचा क्षण नाही, तर हा इतिहास आणि भविष्याचा संगम घडून येण्याचा क्षण आहे. हे संकुल गुलामगिरीच्या कालखंडापासून ते स्वातंत्र्यापर्यंत आणि त्यानंतर स्वतंत्र भारताच्या अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार राहीले आहे, त्यांना आयाम दिला आहे. देशाच्या 16 पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या मंत्रिमंडळांनी घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांचेही हे संकुल साक्षीदार राहिले आहे. नेहरूंपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वांच्याच पाऊलखुणा या इमारतीच्या पायऱ्यांवर उमटलेल्या आहेत. या इमारतीच्या पायऱ्या चढताना टाकलेल्या पावलांनी देशाला विकासाच्या एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यात आपले अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे.

गेल्या काही दशकांमध्ये इथे पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकांमध्ये, राज्यघटनेतील तत्वे, जनतेकडून मिळालेला कौल आणि देशाच्या आकांक्षांपासून प्रेरित होऊन अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले गेले आहेत. याच ठिकाणी भारताच्या यशाचा जल्लोष साजरा करण्यात आला, अपयशाचे मूल्यमापन केले गेले आणि विविध संकटांचा तसेच आव्हानांचा सामना करण्यासाठी अत्यंत खंबीर आणि मोठे निर्णयही इथे घेतले गेले आहेत.

साऊथ ब्लॉकच्या या खोल्यांनी देशाच्या फाळणीचा भितीदायक काळ, युद्ध आणि आणीबाणीच्या आव्हानांचा काळ तसेच शांततेच्या काळातील धोरणांवर झालेली चर्चाही अनुभवली आहे. टाइपरायटरच्या युगापासून ते आजच्या डिजिटल गव्हर्नन्सपर्यंतचा तंत्रज्ञानाचा प्रदीर्घ टप्पा त्यांनी अनुभवला आहे.

इथे बसूनच सनदी अधिकाऱ्यांच्या अनेक पिढ्यांनी स्वातंत्र्यानंतरच्या अनिश्चिततेतून भारताला यशस्वीपणे बाहेर काढणारे आणि स्थैर्याच्या मार्गावर समर्थपणे पुढे नेणारे निर्णय घेतले आहेत. आर्थिक आव्हाने आणि संकटांतून सावरून आज एक आत्मविश्वासपूर्ण राष्ट्र म्हणून असलेला उभा असलेला भारत म्हणजे अशा सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचेच फलित आहे.

आजचा भारत हा जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांपैकी एक देश आहे.  भारत आता एक सुरक्षित आणि सक्षम राष्ट्र म्हणून उदयाला आले असून जागतिक व्यासपीठावर आपली ठाम आणि प्रभावी मते मांडतो आहे.

गेल्या दशकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, साऊथ ब्लॉक हे देशाच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांचे केंद्र राहिले आहे. हे ठिकाण किमान सरकार आणि कमाल शासन  या सूत्राचे प्रेरणास्थान बनले आहे. इथूनच देशभरातील रिफॉर्म एक्स्प्रेसला प्रोत्साहन मिळाले. इथूनच थेट लाभ हस्तांतरण (DBT), स्वच्छ भारत अभियान, गरीब कल्याणाशी संबंधित मोहिमा, डिजिटल इंडिया तसेच वस्तू आणि सेवा कर (GST) यांसारख्या व्यापक सुधारणांनी आकार घेतला आहे. कलम 370 ची भिंत पाडणे आणि तिहेरी तलाकच्या विरोधात कायदा करणे यांसारखे सामाजिक न्यायाचे धाडसी आणि संवेदनशील निर्णयही याच ठिकाणाहून घेण्यात आले. यासोबतच भारताने आपल्या खंबीर आणि आत्मविश्वासपूर्ण सुरक्षा धोरणाचा स्पष्ट संदेश जगाला ज्या निर्णयांच्या माध्यमातून दिला, ते सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरचे निर्णयही इथूनच झाले आहेत.

आज देश विकसित भविष्याचा संकल्प घेऊन पुढे वाटचाल करतो आहे. यासाठी एका आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि पर्यावरणस्नेही कार्यालयाची निकडीची गरज होती. अशा कार्यस्थळाची आवश्यकता होती. एक असे कामाचे ठिकाण जे तिथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मयोग्याची उत्पादकता वाढवू शकेल आणि त्यांच्या सेवेच्या संकल्पाला प्रेरणा देत राहील.

याच भावनेतून, साऊथ ब्लॉकच्या उद्घाटनानंतर जवळपास 95 वर्षांनी, आज 13 फेब्रुवारी 2026 रोजी भारत सरकार या इमारती रिकाम्या करत असून आपले कामकाज आता सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन या इमारतींमध्ये स्थलांतरित करत आहे. प्रतीकात्मकरीत्या, गुलामगिरीच्या भूतकाळातून विकसित भारताच्या भविष्याच्या दिशेने पडलेले हे देशाचे आणखी एक पाऊल आहे. गेल्या काही वर्षांत देशात सत्तेच्या संस्कृतीऐवजी सेवेच्या संस्कृतीला अधिक बळकटी लाभली आहे. आजच्या या संक्रमणातून या मूल्यांना अधिक बळ मिळेल.

आज मंत्रिमंडळाने नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकला आता, आपल्या हजारो वर्षांच्या जुन्या नागरी संस्कृतीपासून ते भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहणाऱ्या युगे युगीन भारत राष्ट्रीय संग्रहालयाचा भाग बनवले जाईल असा ठराव देखील मंजूर केला. हे संग्रहालय आपल्या कालातीत आणि चिरंतन सांस्कृतिक वारशाचा गौरव ठरेल आणि आपल्या गौरवशाली भूतकाळाला समृद्ध भविष्याशी जोडण्याचे काम करेल.

वसाहतवादी भूतकाळातील हे शासनाचे केंद्र आता नवीन भारताच्या सेवा तीर्थ मध्ये परावर्तित केल्याबद्दल, केंद्रीय मंत्रिमंडळ पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाप्रति कृतज्ञता व्यक्त करत आहे.

***

शैलेश पाटील/तुषार पवार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2228170) अभ्यागत कक्ष : 10