पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अंदमान आणि निकोबार व्दीपसमूहावर पराक्रम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्य प्रणालीव्दारे केलेले भाषण

Posted On: 23 JAN 2026 6:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली - दि. 23 जानेवारी, 26

 

नमस्कार ! अंदमान-निकोबारचे नायब राज्यपाल अॅमिरल डी. के. जोशी, नेताजी सुभाषचंद्र बोस आयएनए न्यासाचे अध्यक्ष ब्रिगेडियर आर.एस. छिकारा, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामधील सहभागी आणि आयएनएचे शाश्वत पुरूष लेफ्टनंट आर माधवन् !!

आज गौरवशाली तारीख म्हणजे, 23 जानेवारी - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीदिन आहे. आजचा  या  दिवशी    नेताजींचा पराक्रम, त्यांचे शौर्य यांचे स्मरण केल्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते. मनामध्ये नेताजींविषयी श्रद्धेच्या भावना निर्माण होतात.

मित्रांनो,

गेल्या काही वर्षांपासून पराक्रम दिवस हा देशाच्या  राष्ट्रीय भावनेचा, राष्ट्रीय चैतन्याचा एक अभिन्न उत्सव बनला आहे. 23 जानेवारीला पराक्रम दिवस, 25 जानेवारीला मतदाता दिवस आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन, 29 जानेवारीला बीटिंग रिट्रीट आणि त्यानंतर 30 जानेवारीला पूज्य बापू यांची  पुण्यतिथी ! सलग असे प्रेरणादायी दिवस असणे हा एक सुखद योगायोग आहे. यामुळे प्रजासत्ताक दिनाचा महाउत्सव साजरा करण्याची एक नवीन परंपरा बनली आहे. याप्रसंगी तुम्हा सर्वांना आणि सर्व देशवासियांना पराक्रम दिनाच्या मी अनेक-अनेक शुभेच्छा देतो.

बंधू -भगिनींनो,

वर्ष 2026 मध्ये पराक्रम दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन अंदमान-निकोबार इथे होत आहे. शौर्य, पराक्रम आणि बलिदान यांनी ओतप्रोत भरलेला अंदमान-निकोबारचा इतिहास आहे. इथल्या सेल्यूलर कारागृहामध्ये वीर सावरकर यांच्यासारख्या  असंख्य देशभक्तांच्या असलेल्या गाथा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा असलेला संबंध, या गोष्टी पराक्रम दिन कार्यक्रमाच्या आयोजना ला अधिक विशेष बनवतात. स्वातंत्र्याचा विचार इथे कधीच समाप्त होवू शकत नाहीया विश्वासाचे प्रतीक म्हणजे ही अंदमानची भूमी आहे.   इथे कितीतरी क्रांतीकारकांना यातना दिल्या गेल्या, इथे कितीतरी सेनानींच्या प्राणांची आहुती दिली गेली. परंतु स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी विझण्याऐवजी आणखी जास्त तेजाने धगधगायला लागली. आणि त्याचा परिणाम असा झाला की, अंदमान-निकोबारची ही भूमी स्वतंत्र भारताच्या प्रथम- आधीच सूर्योदयाची साक्षी बनली. 1947 च्या ही आधी- 30 डिसेंबर, 1943 रोजी इथल्या सागराच्या लाटांना साक्षी ठेवून भारताचा तिरंगा इथेच फडकवण्यात आला. मला चांगले स्मरते की, वर्ष 2018 मध्ये ज्यावेळी या महान घटनेला 75 वर्ष पूर्ण झाली होती, त्यावेळी 30 डिसेंबर रोजीच मला अंदमानातील त्याच स्थानावर तिरंगा फडकवण्याचे सदभाग्य मिळाले होते. राष्ट्रगीताची धून सुरू असताना सागरकिनारी, वेगवान वा-यावर दिमाखाने फडकणारा तिरंगा जणू आवाहन करीत होता की, ‘‘पहा , आज किती अगणित स्वातंत्र्य सेनानींचे स्वप्न पूर्ण झाले आहे.‘‘

बंधू- भगिनींनो,

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अंदमान -निकोबार व्दीप समूहाच्या या गौरवशाली इतिहासाचे जतन करण्याची आवश्यकता होती. परंतु, त्याकाळामध्ये सत्तेच्या स्वप्नापर्यंत पोहोचलेल्या लोकांच्या मनात एक प्रकारची असुरक्षेची  भावना होती. ते स्वातंत्र्याचे श्रेय केवळ आणि केवळ एका परिवारापर्यंत मर्यादित ठेवू इच्छित होते. या राजकीय स्वार्थामध्ये देशाच्या इतिहासाची उपेक्षा केली गेली. अंदमान-निकोबारलाही गुलामीच्या  ओळखीशी जोडून ठेवले गेले. स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाल्यानंतर या व्दीपावर असलेल्या अनेक बेटांना इंग्रज अधिका-यांच्या नावाने ओळखले जात होते. आम्ही अशा प्रकारचा इतिहासाच अन्याय समाप्त केला. म्हणूनच पोर्ट ब्लेअर आज श्रीविजयपूरम बनले आहे. श्रीविजयपूरम, हे नवे नाव, ही ओळख नेताजींच्या विजयाचे स्मरण करून देणारी आहे. याचप्रमाणे इतर बेटांचेही स्वराज व्दीप, शहीद व्दीप, आणि सुभाष व्दीप असे नामांतर करण्यात आले आहे. वर्ष 2023 मध्ये अंदमान भागातील 21 व्दीपांची नावेही भारतीय सेनेतील पराक्रमी वीर पुरूष- 21 परमवीर चक्र विजेत्यांच्या नावांवरून ठेवण्यात आली. आज अंदमान-निकोबारमध्ये गुलामीचे नाव पुसून गेले आहे. स्वतंत्र भारतामध्ये त्यांची नवीन, स्वतंत्र ओळख निर्माण होत आहे

मित्रांनो,

नेताजी सुभाषचंद्र बोस स्वातंत्र लढ्याचे महानायक होतेच, त्याचबरोबर स्वतंत्र भारताचे महान स्वप्नद्रष्टे होते. त्यांनी एका अशा भारताची संकल्पना केली होती की, ज्याचे स्वरूप आधुनिक असेल आणि त्या भारताचा आत्मा भारताच्या पुरातन चैतन्याशी जोडलेला असेल. नेताजींच्या या दूरदृष्टीचा  आजच्या पिढीला परिचय करून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आणि मला आनंद वाटतो की, आमचे सरकार ही जबाबदारी अतिशय उत्तमतेने पार पाडत आहे. आम्ही दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांना समर्पित एक संग्रहालय निर्माण केले आहे. इंडिया  गेटच्या नजिकच नेताजींचा एक भव्य पुतळा स्थापन केला आहे. प्रजासत्ताक दिनी जे पथसंचलन होते, त्यामधून  नेताजींच्या हिंद फौजेच्या  योगदानाचे स्मरण देशाला होते.  आम्ही सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार देण्यास प्रारंभ केला आहे. या वेगवेगळ्या कार्यातून केवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा सन्मान केला जातो असे नाही. तर यामुळे आपल्या युवा पिढीसाठी  आणि येणा-या  पिढीमध्ये नेताजी प्रेरणास्त्रोत म्हणून अमर राहतील. आपल्या आदर्शांचा हा सन्मान, त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा, हाच विकसित भारताच्या आमच्या संकल्पाला ऊर्जा आणि आत्मविश्वास देत आहे.

मित्रांनो,

एका कमकुवत राष्ट्रला आपले लक्ष्य साध्य करणे खूप अवघड असते. म्हणूनच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी नेहमीच सशक्त राष्ट्रचे स्वप्न पाहिले. आज 21 व्या शतकामधील भारतही एक सशक्त आणि दृढसंकल्प साध्य  करणारे राष्ट्र म्हणून आपली ओळख तयार करीत आहे. अलिकडेच झालेले  ऑपरेशन सिंदूरआपण  पाहिले आहे.  भारताला वेदना देणा-यांच्या घरामध्ये घुसून  आम्ही त्यांचा नायनाट केला. भारत आज शक्ती कशी वाढवायची हे जाणून आहे आणि आपली शक्ती सांभाळून ठेवणेही तो जाणतोइतकेच नाही , आपल्याकडील शक्तीचा वापर करणेही  चांगले जाणतो. नेताजी सुभाषचंद्र यांच्या समर्थ भारताच्या दूरदृष्टीप्रमाणे आमची वाटचाल सुरू आहे. आज आम्ही संरक्षण क्षेत्राला स्वावलंबी- आत्मनिर्भर बनविण्याचे कार्य करीत आहोत. आधी भारत फक्त परदेशातून हत्यारे मागवत असे, हत्यारांच्या बाबतीत परकीय देशांवर भारत अवलंबून होता. आज आमच्या संरक्षण खात्याच्या  निर्यात व्यापाराने 23 हजार कोटी रूपयांचा आकडा पार केला आहे. भारतामध्ये बनलेल्या ब्रह्मोस आणि इतर क्षेपणास्त्रांनी कितीतरी देशांचे लक्ष वेधून घेतले आहे. आम्ही स्वदेशीच्या ताकदीने भारताच्या लष्कराचे आधुनिकीकरण करीत आहोत.

बंधू- भगिनींनो,

आज आम्ही 140 कोटी देशवासी, विकसित भारताचा संकल्प सिद्ध करण्यासाठी एकजुटीने कार्य करीत आहोत. विकसित भारताचा हा मार्ग आत्मनिर्भर- स्वावलंबी भारत अभियानामुळे मजबूत होत आहे. यामुळे स्वदेशीच्या मंत्राची शक्ती मिळत आहे. मला विश्वास आहे की, विकसित भारताच्या या प्रवासामध्ये पराक्रम दिवसाची प्रेरणा आपल्याला अशाच पद्धतीने सातत्याने बळ देत राहील. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वाना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त खूप -खूप शुभेच्छा देतो.

भारत माता की जय!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

***

अंबादास यादव/सुवर्णा बेडेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2218041) अभ्यागत कक्ष : 52