पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियातील भारतीय समुदायाला केले संबोधित
आपल्या भारतीय समुदायाने जागतिक स्तरावर यश मिळवले आहे आणि याचा आपल्या सर्वांना खूप अभिमान आहे: पंतप्रधान
आपल्यासाठी संपूर्ण जग एक कुटुंब आहे: पंतप्रधान
भारत आणि नायजेरिया लोकशाही तत्त्वांप्रतीची वचनबद्धता, विविधतेचा उत्सव आणि लोकसंख्याशास्त्र यांनी जोडलेले आहेत: पंतप्रधान
भारताच्या प्रगतीचे जागतिक स्तरावर कौतुक केले जात आहे, भारतातील लोकांनी देशाला नवीन उंचीवर नेले आहे: पंतप्रधान
भारतीयांनी आपल्या आरामदायी क्षेत्रातून बाहेर पडून चमत्कार केले आहेत, स्टार्टअप क्षेत्र हे एक उदाहरण आहे: पंतप्रधान
वृद्धी, समृद्धी आणि लोकशाहीला पुढे नेण्याच्या बाबतीत भारत जगासाठी आशेचा किरण आहे, आम्ही नेहमीच मानवतावादी भावना जोपासण्याचे काम केले आहे: पंतप्रधान
भारताने नेहमीच सर्व जागतिक व्यासपीठांवर आफ्रिकेला मोठा आवाज मिळण्यासाठी पाठिंबा दिला आहे: पंतप्रधान
Posted On:
17 NOV 2024 10:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नायजेरियातील अबुजा येथे भारतीय समुदायाने त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संबोधित केले. भारतीय समुदायाने विशेष स्नेह आणि उत्साह दाखवून केलेल्या भव्य स्वागताबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. समुदायाकडून मिळालेले प्रेम आणि मैत्री ही आपल्यासाठी मोठी संपत्ती असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान म्हणून नायजेरियाचा हा त्यांचा पहिलाच दौरा असल्याचे सांगताना मोदी म्हणाले की, कोट्यवधी भारतीयांच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत. नायजेरियातील भारतीयांच्या प्रगतीबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो, असेही त्यांनी सांगितले. ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर’ पुरस्कार प्रदान केल्याबद्दल राष्ट्रपती टिनुबू आणि नायजेरियातील जनतेचे आभार मानत मोदी यांनी संपूर्ण नम्रतेने हा पुरस्कार कोट्यवधी भारतीयांना समर्पित केला.
पंतप्रधानांनी अधोरेखित केले की राष्ट्रपती टिनुबू यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान, नायजेरियातील भारतीयांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले ज्यामुळे आपल्याला अभिमान वाटला. एक उपमा देत मोदी म्हणाले की जेव्हा आपली मुले उत्कृष्ट कामगिरी करतात तेव्हा पालकांना जसा आनंद आणि अभिमान वाटतो तसाच आपल्यालाही आनंद आणि अभिमान वाटतो. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, येथील भारतीय वंशाचा सदस्य नेहमीच नायजेरियाच्या सुख-दुःखात त्यांच्यासोबत राहिला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, नायजेरियामध्ये 40 ते 60 वयोगटातील अनेक भारतीय होते, ज्यांना एकेकाळी भारतीय शिक्षकाने शिकवले होते. मोदींनी असेही नमूद केले की नायजेरियामध्ये निःस्वार्थपणे सेवा करणारे अनेक भारतीय डॉक्टर होते. त्यांनी असेही सांगितले की असे अनेक भारतीय उद्योजक होते, जे व्यवसाय स्थापित करून नायजेरियाच्या विकासकथेचा सक्रिय भाग बनले.
पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्यापूर्वीच किशनचंद झेलराम जी नायजेरियात स्थलांतरित झाले होते आणि त्यांनी एक व्यवसाय सुरू केला होता, जो नायजेरियातील सर्वात मोठ्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक बनला होता. त्यांनी पुढे म्हटले की, आज अनेक भारतीय कंपन्या नायजेरियाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत आहेत. मोदी यांनी नमूद केले की तुलसीचंद्र फाउंडेशन अनेक नायजेरियन लोकांचे जीवन उजळवत आहे. नायजेरियाच्या प्रगतीत खांद्याला खांदा लावून चालल्याबद्दल भारतीय समुदायाचे कौतुक करताना मोदी म्हणाले की ते भारतीयांचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे आणि भारतीयांच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. ते पुढे म्हणाले की सर्वांच्या कल्याणाचा आदर्श विचार भारतीय कधीही विसरले नाहीत आणि संपूर्ण जग एक कुटुंब आहे या विश्वासानेच ते नेहमी जगतात.
भारतीयांना आपल्या संस्कृतीबद्दल मिळणारा आदर सर्वत्र स्पष्टपणे दिसून येतो असे मोदी यांनी नमूद केले. नायजेरियातील लोकांमध्ये योगाची लोकप्रियता सतत वाढत आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी नायजेरियातील भारतीयांना नियमितपणे योगासने करण्याचे आवाहन केले. नायजेरियाच्या राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिनीवर योगावर साप्ताहिक कार्यक्रम प्रसारित होत असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. नायजेरियामध्ये हिंदी आणि भारतीय चित्रपटांची लोकप्रियता वाढत असल्याचेही मोदी यांनी नमूद केले.
गांधीजींनी आफ्रिकेत बराच काळ घालवला होता यावर प्रकाश टाकत मोदी म्हणाले की, भारत आणि नायजेरियातील लोकांनी त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी पुढे म्हटले की, भारतीय स्वातंत्र्याने नायजेरियाच्या स्वातंत्र्यलढ्याला आणखी प्रेरणा दिली. मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्याच्या काळात तसेच आजही भारत आणि नायजेरिया स्थिरपणे प्रगती करत आहेत. "भारत लोकशाहीची जननी आहे तर नायजेरिया आफ्रिकेतील सर्वात मोठी लोकशाही आहे", असे मोदी म्हणाले. दोन्ही देशांमध्ये लोकशाही, विविधता आणि लोकसंख्येची ताकद हे समान घटक आहेत असे त्यांनी सांगितले. नायजेरियातील विविधतेला स्पर्श करताना मोदी म्हणाले की, भारतीयांना मंदिरांच्या बांधकामासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी नायजेरियन सरकारचे आभार मानतो.
भारत हा जगभरात चर्चेचा विषय होता यावर भर देऊन स्वातंत्र्योत्तर काळात भारताला कराव्या लागलेल्या असंख्य संघर्षांवरही मोदींनी भाष्य केले. त्यांनी सांगितले की, चांद्रयान, मंगळयान, मेड इन इंडिया, लढाऊ विमाने इत्यादी भारताच्या कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. "भारत अवकाशापासून उत्पादन क्षेत्रापर्यंत, डिजिटल तंत्रज्ञानापासून आरोग्यसेवेपर्यंत जागतिक शक्तींशी स्पर्धा करत आहे", असे मोदी म्हणाले. स्वातंत्र्याच्या सहा दशकांनंतर भारताने केवळ 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला होता हे अधोरेखित करून, गेल्या दशकातच भारताने 2 ट्रिलियन डॉलर्सची भर घातली आहे, ज्यामुळे आज तो जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे, असे ते म्हणाले. त्यांनी भारत लवकरच 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास व्यक्त केला.
भारतीय लोक जोखीम पत्करतात यावर प्रकाश टाकत मोदी म्हणाले की, भारत विविध क्षेत्रांमध्ये वेगाने प्रगती करत आहे. भारतातील स्टार्ट-अप परिसंस्थेत 1.5 लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स आहेत, असे सांगून मोदी म्हणाले की, भारतीय तरुणांनी आपल्या आरामदायी क्षेत्रातून बाहेर पडून केलेल्या कठोर परिश्रमाचे हे थेट परिणाम आहेत. "गेल्या 10 वर्षांत भारतात 100 हून अधिक युनिकॉर्न बनले आहेत", असे मोदी म्हणाले.
भारत आपल्या सेवा क्षेत्रासाठी ओळखला जातो हे लक्षात घेऊन मोदी म्हणाले की, सरकारने देखील आपल्या आरामदायी क्षेत्रातून बाहेर पडून उत्पादन क्षेत्राला मोठी चालना दिली आहे, जेणेकरून ते जागतिक दर्जाचे उत्पादन केंद्र बनेल. भारत आता जगातील सर्वात मोठ्या मोबाइल फोन उत्पादकांपैकी एक आहे आणि भारतात 30 कोटींहून अधिक मोबाइल फोन तयार केले जातात, हे याचेच निदर्शक आहे. ते पुढे म्हणाले की, गेल्या दशकात भारताची मोबाइल फोन निर्यात 75 पटीने वाढली आहे. गेल्या दशकातील भारताच्या संरक्षण निर्यातीचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, ती 30 पटीने वाढली आहे आणि भारत आज 100 हून अधिक देशांमध्ये संरक्षण उपकरणे निर्यात करत आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्राचे जगभरात कौतुक होत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, भारताने स्वतःच्या गगनयानातून भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत अंतराळात एक अंतराळ स्थानक देखील विकसित करणार आहे.
पंतप्रधानांनी सांगितले की, भारत सध्या आपल्या आरामदायी स्थितीतून बाहेर पडून नवनवीन शोध घेण्याच्या आणि नवीन मार्ग निर्माण करण्याच्या मनःस्थितीत आहे. पंतप्रधान म्हणाले की, गेल्या 20 वर्षात भारताने 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. इतके लोक गरिबीतून बाहेर पडणे ही जगासाठी एक मोठी प्रेरणा आहे आणि प्रत्येक देशाला आशा देते की जर भारताने हे केले तर आपणही ते करू शकतो. मोदी म्हणाले की, विकसित भारत निर्माण करण्याच्या उद्देशाने भारताने आज एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की प्रत्येक भारतीय 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या ध्येयाने काम करत आहे.
पंतप्रधान म्हणाले की, विकास असो, शांतता असो, समृद्धी असो किंवा लोकशाही असो, भारत जगासाठी एक नवीन आशा म्हणून उदयास आला आहे. नायजेरियातील भारतीय वंशाच्या लोकांनीही जेव्हा ते भारतातून आल्याचे सांगतात तेव्हा त्यांना मिळणारा आदर अनुभवला असेल, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान म्हणाले की, जगात जेव्हा जेव्हा कोणतीही समस्या येते तेव्हा भारत जागतिक बंधुत्वाच्या नात्याने प्रथम प्रतिसाद देणारा म्हणून तेथे पोहोचतो. ते म्हणाले की, कोरोनाच्या काळात जगात खूप गोंधळ उडाला होता, प्रत्येक देश लसीबद्दल चिंतेत होता आणि त्या संकटाच्या वेळी भारताने निर्णय घेतला की ही लस शक्य तितक्या देशांना दिली जाईल. मोदी म्हणाले की, हे आपले संस्कार आहेत आणि हजारो वर्षांच्या जुन्या संस्कृतीने आपल्याला हे शिकवले आहे. म्हणूनच भारताने लसींचे उत्पादन वाढवले आणि जगातील 150 हून अधिक देशांमध्ये औषधे आणि लसी पाठवल्या. भारताच्या या प्रयत्नांमुळे नायजेरियासह अनेक आफ्रिकन देशांमधील हजारो लोकांचे जीव वाचले, असे पंतप्रधानांनी सांगितले. आजचा भारत 'सबका साथ सबका विकास' या मंत्रावर विश्वास ठेवतो यावर त्यांनी भर दिला.
आफ्रिकेच्या भविष्यातील विकासासाठी नायजेरिया हे एक मोठे आशास्थान आहे असे सांगताना मोदी म्हणाले की, गेल्या 5 वर्षांत 18 नवीन दूतावास आफ्रिकेत सुरू करण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांत भारताने जागतिक व्यासपीठावर आफ्रिकेचा आवाज उंचावण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. पहिल्यांदाच जी-20 च्या भारताच्या अध्यक्षपदाची रूपरेषा सांगताना मोदी म्हणाले की, आफ्रिकन युनियनला कायमस्वरूपी सदस्य बनवण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. जी-20 च्या प्रत्येक सदस्य देशाने भारताच्या या पावलाला पूर्ण पाठिंबा दिला आहे हे पाहून मला आनंद झाला आणि भारताच्या निमंत्रणावरून नायजेरियाने पाहुणा देश म्हणून इतिहास रचला जात असताना पाहिले.
पंतप्रधानांनी सर्वांना पुढील वर्षी जानेवारीमध्ये भारताला भेट देण्याचे विशेष आमंत्रण दिले. त्यांनी सांगितले की जानेवारी महिन्यात अनेक सण एकत्र येणार आहेत, ज्याची सुरुवात 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन आणि जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवासी भारतीय दिवस ओरिसाच्या भूमीत भगवान जगन्नाथजींच्या चरणी साजरा केला जाईल. पंतप्रधानांनी 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत 45 दिवस प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभाबद्दलही सांगितले. यावेळी भारतीय समुदायाला त्यांच्या नायजेरियन मित्रांसह भारतात येण्याचे आवाहन करून एकत्र येण्याची अनेक कारणे असल्याचे मोदी म्हणाले. 500 वर्षांनंतर अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर बांधले गेले आहे, ज्याला त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी भेट दिली पाहिजे, असे मोदी म्हणाले. प्रथम अनिवासी भारतीय दिन, नंतर महाकुंभ आणि त्यानंतर प्रजासत्ताक दिन, हा एक प्रकारचा त्रिवेणी योग आहे, भारताच्या विकास आणि वारशाशी जोडण्याची एक उत्तम संधी आहे, असे त्यांनी नमूद केले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी सांगितले की, जरी त्यांनी यापूर्वी अनेक वेळा भारताला भेट दिली असेल तरी ही यात्रा त्यांच्या आयुष्यातील एक अमूल्य आठवण बनून राहील. पंतप्रधानांनी उत्साह आणि उबदार स्वागताबद्दल सर्वांचे आभार मानले.
* * *
नेहा कुलकर्णी/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2176046)
अभ्यागत कक्ष : 21
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam