गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी ‘भारत मंथन-2025: नक्षल मुक्त भारत - मोदी यांच्या नेतृत्वाखाली लाल दहशतीचा अंत’ या नवी दिल्ली इथे आयोजित कार्यक्रमाच्या समारोप सत्राला केले संबोधित

Posted On: 28 SEP 2025 10:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2025

 

नवी दिल्ली येथे आयोजित, ‘भारत मंथन-2025: नक्षल मुक्त भारत – मोदी यांच्या नेतृत्वाखाली लाल दहशतीचा अंत’ या कार्यक्रमाच्या समारोप सत्राला, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री  अमित शाह यांनी आज संबोधित केले.

भारत 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवादमुक्त होईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी बोलताना सांगितले.  नक्षलवादाला विचारधारात्मक, कायदेशीर आणि आर्थिक पाठबळ देणाऱ्यांना जेव्हा भारतीय समाज ओळखेल, तेव्हाच नक्षलवादाविरुद्धची लढाई संपेल असे त्यांनी स्पष्ट केले. अंतर्गत सुरक्षा आणि देशाच्या सीमांचे रक्षण, आमच्या विचारसरणीचा नेहमीच गाभा राहिला आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. पुढे ते म्हणाले की आमच्या पक्षाच्या कार्यात तीन प्रमुख उद्दिष्टे केंद्रस्थानी राहिली आहेत - देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा, सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भारतीय संस्कृतीच्या सर्व अंगांचे पुनरुज्जीवन. डाव्या विचारसरणीने माजवलेल्या हिंसाचारात, 1960  च्या दशकापासून ज्यांनी आपले प्राण गमावले, प्रियजन गमावले किंवा शारीरिक-मानसिक यातना सोसल्या, त्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांनी आदरांजली अर्पण केली. ते म्हणाले की पश्चिम बंगालमध्ये डावे पक्ष सत्तेत येईपर्यंत नक्षलवाद वाढला होता, पण ते सत्तेत आल्यावर लगेचच नक्षलवाद तेथून नाहीसा झाला.

CR3_1877.JPG   CR3_1844.JPG

देशाच्या 17 टक्के भूभागावर डाव्या विचारसरणीचा लाल पट्टा पसरला होता आणि त्याचा परिणाम सुमारे 120 दशलक्ष लोकांना सोसावा  लागला, असे अमित शाह म्हणाले. त्या वेळी लोकसंख्येचा 10 टक्के भाग नक्षलवादाच्या दहशतीखाली राहत होता असे सांगत, त्यांनी स्पष्ट केले की, तुलनेत इतर दोन हिंसाग्रस्त क्षेत्रे - काश्मीर, जिथे देशाच्या 1 टक्के भूभागावर दहशतवादाचा प्रभाव होता, आणि ईशान्य भारत, जिथे 3.3 टक्के भूभाग अशांततेने धुमसत होता - तुलनेने कमी प्रमाणात अस्वस्थ होते. शाह पुढे म्हणाले की जेव्हा नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाले, तेव्हा मोदी सरकारने चर्चा, सुरक्षा आणि समन्वय या तीन पैलूंवर काम सुरू केले. यामुळे, 31 मार्च 2026 पर्यंत देशातून सशस्त्र नक्षलवाद पूर्णपणे नष्ट होईल.

CR5_9046.JPG

ईशान्य भारतातील स्फोटक परिस्थितीबद्दल बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की 2004–2014 या काळापेक्षा 2014–2024 मध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या जिवितहानीत 70 टक्क्यांची घट झाली आहे. त्याचप्रमाणे, सामान्य नागरिकांची जिवितहानी 2014–2024 मध्ये 85 टक्क्यांनी कमी झाली आहे. मोदी सरकारने 12 महत्त्वपूर्ण शांतता करार राबवले आणि 10,500 सशस्त्र तरुणांचे आत्मसमर्पण नक्की करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणले, असे त्यांनी सांगितले. त्यांनी नमूद केले की पूर्वी संपूर्ण ईशान्य भारत, देशाच्या इतर भागांपासून वेगळा पडल्यासारखा वाटत होता, पण आज तो रेल्वे, गाड्या आणि विमानसेवेने जोडला गेला आहे. मोदी सरकारने केवळ भौतिक अंतरच नाही तर दिल्ली आणि ईशान्य भारत यातील भावनिक अंतरही कमी केले आहे असे सांगत, शहा पुढे म्हणाले की आज ईशान्य भारत, शांतता आणि विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे.

 

* * *

माधुरी पांगे/आशुतोष सावे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2172522) Visitor Counter : 26