गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह  हिंदी दिवस 2025 च्या निमित्ताने गुजरातमध्ये गांधीनगर येथे आयोजित पाचव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून झाले सहभागी

Posted On: 14 SEP 2025 4:55PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी हिंदी दिवस 2025 च्या निमित्ताने गुजरातची राजधानी गांधीनगर येथे आयोजित 5व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. या कार्यक्रमात गुजरातचे मुख्यमंत्री  भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री  अर्जुन राम मेघवाल, केंद्रीय गृह राज्यमंत्री  बंडी संजय कुमार आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी यावेळी अनेक प्रकाशनांचे प्रकाशनही केले.

या परिषदेला संबोधित करताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, हिंदी ही भारतीय भाषांची सोबती आहे आणि हिंदी व इतर भारतीय भाषांमध्ये कोणताही संघर्ष नाही.  शाह म्हणाले की, याचे सर्वात मोठे उदाहरण गुजरात आहे.

गेल्या पाच वर्षांपासून अखिल भारतीय राजभाषा संमेलन दिल्लीबाहेर देशाच्या वेगवेगळ्या भागांत आयोजित केले जात आहे, ज्यामुळे हिंदी आणि इतर भारतीय भाषांमधील संवाद अधिक मजबूत करण्याची चांगली संधी मिळाली आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. गेल्या चार संमेलनांचा अनुभव असा आहे की, अशा परिषदा नवीन दृष्टीकोन, ऊर्जा आणि प्रेरणा देतात, याकडे शाह यांनी लक्ष वेधले. हिंदी ही केवळ संवादाची आणि प्रशासनाची भाषा न राहता ती विज्ञान, तंत्रज्ञान, न्याय आणि पोलीस यंत्रणेची भाषाही झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

'सारथी' (Sarathi) अनुवाद प्रणाली हिंदीतून सर्व मान्यताप्राप्त भारतीय भाषांमध्ये सोपे भाषांतर करण्यास मदत करते, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या संबंधित भाषांमध्ये पत्र पाठवण्याचे आवाहन केले आणि आश्वासन दिले की, उत्तरे त्याच भाषेत पाठवली जातील. सारथी प्रणाली कोणत्याही भाषेत भाषांतर करण्यासाठी आणि हिंदीमधील उत्तराचे प्राप्तकर्त्याच्या भाषेत भाषांतर करण्यासाठी सक्षम आहे, यावर त्यांनी भर दिला. येत्या काही दिवसांत, 'सारथी' द्वारे संवाद प्रत्येकाच्या मातृभाषेत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठीच्या लढ्यात स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा या तीन महत्त्वाच्या तत्त्वांवर भर दिला होता, असे अमित शाह यांनी सांगितले.  ही सर्व तत्त्वे राष्ट्रप्रेमाशी जोडलेली आहेत. ज्या देशात बोलली जाणारी भाषा आपली नाही, तो देश खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची किंवा अभिमानाची भावना अनुभवू शकत नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. आपल्या भाषांविषयीचा अभिमान वाढवण्यासाठी शब्द सिंधू (Shabd Sindhu) शब्दकोष तयार करण्यात आला, ज्याची सुरुवात 51,000 शब्दांनी झाली होती आणि आता त्यात 7 लाखांपेक्षा जास्त शब्द आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. 2029 पर्यंत तो जगातील सर्व भाषांमधील सर्वात मोठा शब्दकोश बनेल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. हा शब्दकोष हिंदीला अधिक लवचिक बनवत आहे, जे हिंदीला व्यापक प्रमाणात वापरली जाणारी भाषा बनवण्यासाठी अतिशय गरजेचे आहे. शब्द सिंधूचा वापर हिंदीला बहुउपयोगी, स्वीकृत आणि सर्वमान्य बनवेल, असे त्यांनी अधोरेखित केले.

***

सुषमा काणे / शैलेश पाटील / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2166595) Visitor Counter : 2