गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित राजभाषा विभागाच्या ‘सुवर्ण जयंती सोहोळ्या’ला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केले
भाषा केवळ संवादाचे माध्यम नव्हे तर देशाचा आत्मा असते
देशाचा आत्मसन्मान जागृत करण्यासाठी भारतीय भाषांचा वापर होणे अत्यंत आवश्यक
भारतीय भाषांना देश विभक्त करण्याचे नव्हे तर देशाला जोडून ठेवण्याचे सशक्त माध्यम बनवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे
हिंदी भाषा कोणत्याही भारतीय भाषेची विरोधक नाही, हिंदी तर सर्व भारतीय भाषांची सखी आहे
राजभाषा हिंदी आणि इतर सर्व भारतीय भाषा एकत्रित होऊनच आपल्या आत्मसन्मान उंचावण्याच्या उद्दिष्टाला अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचवू शकतील
Posted On:
26 JUN 2025 6:27PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथे आयोजित राजभाषा विभागाच्या ‘सुवर्ण जयंती सोहोळ्या’ला संबोधित केले.
केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की कोणताही देश स्वतःच्या भाषेविना स्वतःची संस्कृती, साहित्य, इतिहास तसेच सामाजिक संस्कार अमर ठेवू शकत नाही. स्वतःच्या संस्कृतीच्या पायावर आत्मसन्मानासह प्रगती करण्यासाठी देशाचा राज्यकारभार देशाच्या स्वतःच्या भाषेत व्हायला हवा. याच महान उद्दिष्टासह राजभाषा विभागाची सुरुवात झाली होती आणि गेल्या 50 वर्षांचा हा प्रवास आज अशा ठिकाणी येऊन ठेपला आहे जिथून आपल्याला हा प्रवास आणखी पुढे नेण्यासाठीचे प्रयत्न आणि पुढची वाटचाल निश्चित करायला हवी. ते म्हणाले की संघर्ष, साधना आणि निर्धाराच्या बळावर ही 50 वर्षांची वाटचाल आपण सर्वांनी मिळून पूर्ण केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, भाषा केवळ संवादाचे माध्यम नसते तर ती देशाचा आत्मा असते. आपली पाळेमुळे, परंपरा, इतिहास, ओळख आणि जीवन संस्कृती भाषेपासून लांब राहून प्रगती करू शकत नाही आणि भाषांना जिवंत ठेवणे आणि समृद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे. येत्या काळात सर्व भारतीय भाषा, विशेषतः राजभाषा यांसाठी हे सर्व प्रयत्न करायला हवेत.

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री म्हणाले की, यावर्षी भारतीय भाषा विभागाची स्थापना करण्यात आली आहे. ते म्हणाले की हिंदी कोणत्याही भारतीय भाषेच्या विरोधात असू शकत नाही. ते म्हणाले की हिंदी ही सर्व भारतीय भाषांची सखी आहे आणि हिंदी व भारतीय भाषा एकत्र येऊनच आपल्या आत्मसन्मान वाढवण्याच्या कार्यक्रमाला अंतिम ध्येयापर्यंत घेऊन जातील. ते म्हणाले की, भारतीय भाषा विभाग प्रत्येक राज्याला, राज्यांचे आणि भारत सरकारचे प्रशासन भारतीय भाषांवर आधारित असावे यासाठी साहाय्य करेल.
अमित शाह म्हणाले की, कोणतेही राज्य आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करून कधीही महान होऊ शकत नाही आणि मोदी सरकारने आपल्या भाषांचा सन्मान करण्यासाठी आणि प्रतिष्ठा देण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातच मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळाली. संपूर्ण जगात असा एकही देश नाही जिथे 11 अभिजात भाषा आहेत.

कोणत्याही देशाचे शिक्षण धोरण हे येणाऱ्या 50 वर्षांत देश कोणत्या मार्गाने जाईल याचे सूचक असते. राष्ट्रीय शिक्षण धोरण- 2020 मध्ये, इयत्ता 5 वी आणि इयत्ता 8 वी पर्यंत मातृभाषा आणि स्थानिक भाषा शिकवण्यावर भर देण्यात आला आहे, असे शाह यांनी सांगितले.

अमित शाह म्हणाले की, राजभाषा विभागाने निर्णय घेतला आहे की, येत्या काळात आपण भारतीय भाषा विभागाद्वारे भारतीय भाषांना किशोरवयीन आणि तरुणांची भाषा बनवू. ते म्हणाले की, गेल्या काही दशकांमध्ये भाषेचा वापर भारताला तोडण्यासाठी केला जात होता, परंतु हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. गृहमंत्र्यांनी सांगितले की, आपल्या भाषा भारताला तोडण्याचे नव्हे, तर जोडण्याचे एक सशक्त माध्यम बनतील याची सुनिश्चिती करावी लागेल. गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज जो पाया घातला जात आहे, तो 2047 मध्ये विकसित आणि महान भारताची निर्मिती करेल. याअंतर्गत, भारतीय भाषांना प्रगत आणि समृद्ध करण्याबरोबरच त्यांची उपयुक्तता देखील वाढवली जाईल.

***
S.Kakade/S.Chitnis/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2139979)