पंतप्रधान कार्यालय
गुजरात नगर विकास उपक्रमाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गांधीनगर मध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
27 MAY 2025 8:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मे 2025
भारत माता की जय! भारत माता की जय!
तिरंगा ध्वज खाली का केले?
भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय!
व्यासपीठावर उपस्थित गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रातील माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी, मनोहरलालजी, सी. आर. पाटील, गुजरात सरकारचे इतर मंत्री, खासदार, आमदार, आणि गुजरातच्या कानाकोपऱ्यातून इथे आलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो,
मी दोन दिवस गुजरातमध्ये आहे. काल वडोदरा, दाहोद, भुज, अहमदाबाद आणि आज सकाळी गांधीनगरला, मी जिथे जिथे गेलो तिथे असे वाटले की, देशभक्ती म्हणजे गर्जना करणारा सिंदूरिया सागर, सिंदूरिया सागराची गर्जना आणि फडकणारा तिरंगा ध्वज, लोकांच्या हृदयात मातृभूमीबद्दलचे अपार प्रेम, हे एक दृश्य होते, आणि हे फक्त गुजरातमध्येच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यात आहे. ते प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे. शरीर कितीही निरोगी असले तरी, जर काटा टोचला तर संपूर्ण शरीर अस्वस्थ राहते. आता आपण तो काटा काढून टाकण्याचा निर्धार केला आहे.
मित्रहो,
1947 मध्ये, जेव्हा भारतमातेचे विभाजन झाले, तेव्हा तुटायला हव्या होत्या बेड्या, मात्र कापल्या गेल्या, भुजा. देशाचे तीन तुकडे झाले. आणि त्याच रात्री काश्मीरच्या भूमीवर पहिला दहशतवादी हल्ला झाला. भारत मातेचा एक भाग पाकिस्तानने दहशतवादाच्या बळावर मुजाहिदांच्या नावाने बळकावला. जर त्या दिवशी हे मुजाहिदीन मारले गेले असते, सरदार पटेलांची इच्छा होती, की पीओके परत मिळेपर्यंत भारतीय लष्कराने पुढे जात राहावे. मात्र सरदार पटेल यांचे म्हणणे ऐकले गेले नाही. आणि हे मुजाहिदीन, ज्यांना रक्ताची चटक लागली होती, त्यांच्या कारवाया गेली 75 वर्षे सुरूच आहेत. पहलगाममध्ये त्याने विकृत रूप घेतले. आपण 75 वर्षांपासून यातना भोगत आहोत आणि जेव्हा पाकिस्तानशी युद्ध झाले तेव्हा तीनही वेळा भारताच्या लष्करी शक्तीने पाकिस्तानला धूळ चारली. आणि युद्धात आपण भारताविरुद्ध जिंकू शकत नाही हे पाकिस्तानला समजले आणि म्हणून त्यांनी छुपे युद्ध सुरूच ठेवले. लष्करी प्रशिक्षण देऊन, दहशतवाद्यांना भारतात पाठवले जाते आणि निरपराध व निशस्त्र लोक, जे तीर्थयात्रेला जातात, बसमधून प्रवास करतात, काही हॉटेलमध्ये आहेत, काही पर्यटक म्हणून आले आहेत, संधी साधून त्यांची हत्या केली जाते, आणि आपण ते सहन करतो. तुम्हीच सांगा, हे आणखी सहन करायचे का? गोळ्यांना गोळ्यांनी उत्तर द्यायचे का? विटेचे उत्तर दगडाने द्यावे का? हा काटा उपटून टाकावा का?
मित्रहो,
या देशाने ती महान संस्कृती आणि परंपरा जपली आहे, वसुधैव कुटुंबकम, ही आपली मूल्ये आहेत, हेच आपले चारित्र्य आहे, शतकानुशतके आपण ते जगत आलो आहोत. आपण संपूर्ण जगाला एक कुटुंब मानतो. आपल्याला आपले शेजारी देखील आनंदी राहायला हवेत. ते आनंदाने जगोत, आणि आम्हालाही आनंदाने जगू देवोत. हजारो वर्षांपासून हा आपला विचार आहे. पण जेव्हा आपल्या ताकदीला पुन्हा पुन्हा आव्हान दिले जाते, तेव्हा हा देश वीरांची भूमी देखील असतो. त्याला आपण आजपर्यंत प्रॉक्सी वॉर (छुपे युद्ध) म्हणायचो, मात्र 6 मे नंतर जी दृश्ये दिसली, त्याला प्रॉक्सी वॉर म्हणण्याची चूक आपण करू शकत नाही. आणि याचे कारण म्हणजे, जेव्हा आम्ही 22 मिनिटांत, माझ्या मित्रांनो, केवळ 22 मिनिटांत 9 दहशतवादी अड्डे ओळखले आणि ते नष्ट केले. आणि यावेळी सर्व काही कॅमेऱ्यासमोर करण्यात आले, सगळी व्यवस्था ठेवण्यात आली होती. जेणेकरून आमच्या घरात कोणी पुरावे मागणार नाही. आता आम्हाला पुरावे देण्याची गरज नाही, ते सीमेपलीकडून मिळत आहेत. आणि म्हणूनच मी म्हणतो की, तुम्ही याला प्रॉक्सी वॉर म्हणू शकत नाही, कारण दहशतवाद्यांच्या ज्या अंत्ययात्रा निघाल्या, 6 मे नंतर जे मारले गेले, त्यांना पाकिस्तानात सरकारी सन्मान देण्यात आला, त्यांच्या शवपेटीवर पाकिस्तानी झेंडे लावण्यात आले, त्यांच्या सैन्याने त्यांना सलामी दिली. यावरून या दहशतवादी कारवाया असून, छुपे युद्ध नाही, हे सिद्ध होते. ही त्यांची योजनाबद्ध युद्धनीती आहे. तुम्ही युद्धच केले, तर त्याचे उत्तरही तसेच मिळेल. आम्ही आपल्या कामात गुंतलो होतो, प्रगतीच्या मार्गावर होतो. आम्हाला सर्वांचे भले हवे आहे आणि अडचणीच्या वेळी मदतही करतो. पण त्या बदल्यात रक्ताचे पाट वाहतात. मला नव्या पिढीला हे सांगायचे आहे की देशाचे कसे नुकसान झाले, 1960 मध्ये सिंधू जल करार झाला. त्याचा बारकाईने अभ्यास केला, तर तुम्हाला धक्काच बसेल. जम्मू-काश्मीरमधील इतर नद्यांवर बांधण्यात आलेली धरणे स्वच्छ केली जाणार नाहीत, त्याचा गाळ काढण्याचे काम केले जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला. स्वच्छतेसाठी तळाशी असलेले दरवाजे उघडले जाणार नाहीत. 60 वर्षे हे दरवाजे उघडले गेले नाहीत आणि जिथे शंभर टक्के पाणी भरायला हवे होते, त्याची क्षमता हळूहळू कमी होत गेली, केवळ दोन ते तीन टक्क्यावर आली. माझ्या देशबांधवांना पाण्याचा अधिकार नाही का? त्यांना पाण्याचा हक्क मिळावा की नाही? आणि मी अजून फारसे काही केलेले नाही. सध्या आम्ही ते स्थगित ठेवले आहे असे म्हटले आहे, आणि तिथे घाम फुटला आहे, आम्ही बांध थोडा उघडला आणि साफसफाई सुरू केली, तिथे जो काही कचरा होता तो आम्ही बाहेर काढत आहोत. एवढ्यानेही तिथे पूर आला.
मित्रहो,
आम्हाला कोणाशीही शत्रुत्व नको आहे. आम्हाला सुखाचे आयुष्य जगायचे आहे. आम्हाला प्रगती देखील यासाठी करायची आहे की, त्यामुळे जगाच्या भल्यासाठी आपल्याला काही योगदान देता येईल, आणि म्हणूनच आम्ही कोट्यवधी भारतीयांच्या कल्याणासाठी एकनिष्ठतेने आणि बांधिलकीने काम करत आहोत. काल 26 मे होता, 26 मे 2014 रोजी मला पहिल्यांदाच देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची संधी मिळाली, आणि तेव्हा भारताची अर्थव्यवस्था जगात अकराव्या क्रमांकावर होती. आपण कोरोना विरोधात लढलो, आपल्या शेजाऱ्यांकडून त्रास सहन केला आणि नैसर्गिक आपत्तीचाही सामना केला. हे सर्व असूनही, एवढ्या कमी वेळात आपण अकराव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेपासून चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचलो आहोत, कारण हेच आपले ध्येय आहे, आपल्याला विकास हवा आहे, आपल्याला प्रगती हवी आहे.
आणि मित्रहो,
मी गुजरातचा ऋणी आहे. इथल्या मातीने मला वाढवले आहे. येथून मला मिळालेले शिक्षण, मला मिळालेली दीक्षा, तुम्हा सर्वांमध्ये राहून मी जे काही शिकलो आहे, जे मंत्र तुम्ही मला दिले आहेत, जी स्वप्ने तुम्ही माझ्यात जोपासली आहेत, ती देशवासीयांच्या कामी यावीत, यासाठी मी प्रयत्न करतो आहे. गुजरात सरकारने 2005 साली हा शहरी विकास वर्ष कार्यक्रम आयोजित केला होता. आज या कार्यक्रमाची 20 वर्षे साजरी होत आहेत, याचा मला आनंद आहे आणि हा कार्यक्रम शहरी विकासाच्या 20 वर्षांच्या प्रवासाचे गुणगान करण्यासाठी आयोजित केला नव्हता. या 20 वर्षांत आपण जे काही मिळवले आहे आणि शिकलो आहे, त्याच्या आधारे गुजरात सरकारने शहरी विकासाच्या पुढच्या वाटचालीसाठी एक आराखडा तयार केला आहे आणि आज तो आराखडा गुजरातच्या लोकांसमोर सादर करण्यात आला आहे. मी गुजरात सरकार, मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमचे याबद्दल मनापासून अभिनंदन करतो.
मित्रहो,
आज आपण जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत. जपानला मागे टाकून आपण पुढे आलो आहोत, याचे कोणालाही समाधान वाटेल, आणि मला आठवते आहे, जेव्हा आपण 6 वरून 5 व्या क्रमांकावर गेलो होतो तेव्हा देशात एक वेगळाच आनंद होता, खूप उत्साह होता, विशेषतः तरुणांमध्ये, आणि त्याचे कारण म्हणजे आपल्यावर 250 वर्षे राज्य करणाऱ्या युकेला मागे सोडून आपण पाचव्या स्थानावर पोहोचलो होतो. आता चौथ्या स्थानावर येण्याचा आनंद, आपण तिसऱ्या स्थानी कधी पोहोचणार, या दबावापेक्षा निश्चितच जास्त आहे. आता देश वाट बघायला तयार नाही आणि जर कोणी वाट पाहण्यास सांगितले तर मागून घोषणा येतात, मोदी है तो मुमकिन है.
आणि म्हणूनच मित्रहो,
सर्वप्रथम, आपले लक्ष्य आहे 2047, भारत विकसित झाला पाहिजे, त्यात कोणतीही तडजोड नाही... आपण स्वातंत्र्याची शंभर वर्षे अशीच वाया घालवणार नाही, आपण स्वातंत्र्यप्राप्तीची शंभर वर्षे अशा प्रकारे साजरी करू की विकसित भारताचा झेंडा जगात उंच फडकत राहील. कल्पना करा, 1920, 1925, 1930, 1940, 1942, त्या काळात भगतसिंग असोत, सुखदेव असोत, राजगुरू असोत, नेताजी सुभाषबाबू असोत, वीर सावरकर असोत, श्यामजी कृष्ण वर्मा असोत, महात्मा गांधी असोत, सरदार पटेल असोत, त्यांनी जागवलेल्या भावना नसत्या आणि देशातील लोकांच्या मनात स्वातंत्र्याची तळमळ नसती, स्वातंत्र्यासाठी जगण्याची आणि मरण्याची वचनबद्धता नसती, स्वातंत्र्यासाठी सहन करण्याची इच्छा नसती, तर कदाचित आपल्याला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नसते. आपल्याला ते मिळाले कारण त्यावेळची 25-30 कोटी लोकसंख्या त्यागासाठी तयार होती. जर 25-30 कोटी लोक संकल्प करून 20 वर्षांत , 25 वर्षांत इंग्रजांना येथून हाकलून देऊ शकतात, तर 140 कोटी लोकही पुढच्या 25 वर्षांत भारताला विकसित करू शकतात मित्रांनो. आणि म्हणूनच 2030 मध्ये जेव्हा गुजरातला 75 वर्षे होतील, तेव्हा, मला वाटते की आपण आतापासूनच पुढच्या दहा वर्षांसाठी अशी योजना बनवली पाहिजे की गुजरातला 75 वर्षे होतील, 30, 35, मध्ये... 35 मध्ये गुजरातला 75 वर्षे होतील, तेव्हा आपण पुढच्या दहा वर्षांसाठी अशी योजना बनवली पाहिजे की जेव्हा गुजरातला 75 वर्षे होतील, तेव्हा गुजरात अमूक येथे पोहोचेल. ते उद्योगात असेल, ते शेतीत असेल, ते शिक्षणात असेल, ते क्रीडा क्षेत्रात असेल, आपण एक संकल्प केला पाहिजे आणि गुजरातला 75 वर्षे होतील, तेव्हा एका वर्षानंतर जे ऑलिंपिक होणार आहे, ते भारतातच व्हावेत अशी देशाची इच्छा आहे.
आणि म्हणूनच मित्रहो,
ज्याप्रमाणे आमचे ध्येय आहे की जेव्हा गुजरातला 75 वर्षे होतील. आणि तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा गुजरातची स्थापना झाली होती, त्या काळातील वर्तमानपत्रे काढा, त्या काळातील चर्चा बघा. महाराष्ट्रापासून वेगळे झाल्यानंतर गुजरात काय करेल यावर कोणत्या चर्चा झाल्या? गुजरातमध्ये काय आहे? समुद्र आहे, खारट जमीन आहे, येथे वाळवंट आहे, दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे, ते काय करेल? गुजरातमध्ये कोणतेही खनिज नाही, गुजरातची प्रगती कशी होईल? हे सर्व व्यापारी आहेत... ते एकीकडून वस्तू खरेदी करतात, दुसरीकडे विकतात. दलाली करून ते आपला उदरनिर्वाह करतात. ते काय करतील, अशा चर्चा तिथे झाल्या. ज्या गुजरातमध्ये एकेकाळी मीठाशिवाय दुसरे काहीही नव्हते, आज जग त्याच गुजरातला हिऱ्यांसाठी ओळखते. कुठे मीठ आणि कुठे हिरे! आम्ही हा प्रवास पूर्ण केला आहे. आणि यामागे विचारपूर्वक प्रयत्न केले गेले आहेत. नियोजनबद्ध पद्धतीने पावले उचलली गेली आहेत. येथे बहुधा सरकारच्या मॉडेलबद्दल चर्चा केली जाते की सरकारमध्येच अडकून राहणे, हे सर्वात मोठे संकट आहे. एक विभाग दुसऱ्याशी बोलत नाही. एका टेबलावरील लोक दुसऱ्या टेबलावरील लोकांशी बोलत नाहीत, अशा चर्चा होतात. काही अंशी ते खरे असू शकते, पण त्यावर काही उपाय आहे का? आज मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो, हे एकमेव शहरी विकास वर्ष नाही, त्या वेळी आपण प्रत्येक वर्ष विशेष कामासाठी समर्पित करायचो, जसे 2005 हे शहरी विकास वर्ष मानले जात होते. एक वर्ष असे होते जेव्हा आपण ते मुलींच्या शिक्षणासाठी समर्पित केले होते, एक वर्ष असे होते जे संपूर्ण वर्ष आपण पर्यटनासाठी समर्पित केले होते. याचा अर्थ असा नाही की आपण इतर सर्व कामे थांबवली, परंतु त्या वर्षी सरकारच्या सर्व विभागांना विचारण्यात आले की, जर वन विभाग असेल तर तो शहरी विकासात काय योगदान देऊ शकतो? जर आरोग्य विभाग असेल तर तो शहरी विकास वर्षात काय योगदान देऊ शकतो? जर जलसंधारण मंत्रालय असेल तर ते शहरी विकासात काय योगदान देऊ शकते? जर पर्यटन विभाग असेल तर तो शहरी विकासात काय योगदान देऊ शकतो? म्हणजेच, एक प्रकारे, हे वर्ष संपूर्ण सरकारी दृष्टिकोनातून साजरे केले गेले आणि तुम्हाला आठवत असेल की, जेव्हा आपण पर्यटन वर्ष साजरे केले, त्यापूर्वी संपूर्ण राज्यात, गुजरातमध्ये पर्यटनाची कल्पनाही कोणी करू शकत नव्हते. विशेष प्रयत्न केले गेले, त्याच वेळी एक जाहिरात मोहीम राबविण्यात आली, ‘कुछ दिन तो गुजारो गुजरात में’. त्यातून एक एक गोष्ट समोर आली. त्यातून रण उत्सव समोर आला, त्यातून स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यात आला. त्याच कल्पनेतून आज सोमनाथ विकसित होत आहे, गीर विकसित होत आहे, अंबाजी विकसित होत आहे. साहसी खेळ विकसित होत आहेत. म्हणजेच, एकामागून एक गोष्टी विकसित होऊ लागल्या आहेत. त्याचप्रमाणे आता शहरी विकास वर्ष साजरे करण्यात आले आहे.
आणि मला आठवतंय, मी राजकारणात नवखा होतो. आणि काही काळानंतर आम्ही पहिल्यांदा अहमदाबाद महानगरपालिका जिंकली, तोपर्यंत आमच्याकडे राजकोट नगरपालिका होती, तेव्हा ती महानगरपालिका नव्हती. आणि आमच्याकडे प्रल्हादभाई पटेल होते, ते पक्षाचे खूप ज्येष्ठ नेते होते. ते खूप अभिनव होते, नवनवीन गोष्टींचा विचार करणे हा त्यांचा स्वभाव होता. मी नुकताच राजकारणात प्रवेश केला होता, म्हणून प्रल्हादभाई एके दिवशी मला भेटायला आले, ते म्हणाले आपल्याला हे जरा, त्यावेळी चिमणभाई पटेल यांचे सरकार होते, म्हणून चिमणभाई आणि भाजपाचे लोक छोटे भागीदार होते. म्हणून आपण चिमणभाईंना भेटून जाणून घ्यावे की अहमदाबादची ही लाल बस अहमदाबादच्या बाहेर जाऊ दिली तर. तर त्यांनी मला समजावून सांगितल्यावर मी आणि प्रल्हादभाई चिमणभाईंना भेटायला गेलो होतो. आम्ही खूप विचारमंथन केले, आम्ही म्हटले की लाल बस अहमदाबादच्या बाहेर गोरा, गुम्मा, लांबा, पुढे नरोरा, पुढे दहेगाम, पुढे कलोलपर्यंत जाऊ द्यावी हे विचार करण्यासारखे आहे. वाहतूक वाढवली पाहिजे, तर सरकारच्या जशा सचिवांचा स्वभाव असतो, ते सर्व इथे बसले आहेत, त्यावेळचे लोक निवृत्त झाले आहेत. एकदा एका काँग्रेस नेत्याला विचारण्यात आले की जर देशाच्या समस्या सोडवायच्या असतील तर मला दोन वाक्यात सांगा. मला अजूनही एका काँग्रेस नेत्याने दिलेले उत्तर आवडते. हे सुमारे 40 वर्षांपूर्वीचे आहे. ते म्हणाले, देशात दोन गोष्टी घडल्या पाहिजेत. एक, राजकारण्यांनी नाही म्हणायला शिकले पाहिजे आणि नोकरशहांनी हो म्हणायला शिकले पाहिजे! मग सर्व समस्या सुटतील. राजकारणी कोणालाही नाही म्हणत नाहीत आणि नोकरशहा कोणालाही हो म्हणत नाहीत. म्हणून त्या वेळी आम्ही चिमणभाईंकडे गेलो, त्यांनी सर्वांना विचारले, आम्ही पुन्हा गेलो, तिसऱ्यांदा गेलो, नाही-नाही, एसटीचे नुकसान होईल, एसटीची कमाई बंद होईल, एसटी बंद पडेल, एसटी तोट्यात चालली आहे. लाल बस तिथे पाठवता येणार नाही, असे बरेच दिवस सुरू होते. आम्ही तीन-चार महिने विचारमंथन केले. असो, आमचा दबाव इतका जास्त होता की शेवटी लाल बसला लांबा, गोरा, गुम्मा पर्यंत विस्तार मिळाला, त्याचा परिणाम असा झाला की अहमदाबादचा विस्तार सारण, दहेगाम, कलोल, अहमदाबाद पर्यंत वेगाने झाला, त्यामुळे अहमदाबादकडे जाणारा लोंढा खूप वेगाने वाढणार होता, तो वेग वाढला, आम्ही वाचलो, तेव्हा ही एक छोटीशी बाब होती, मी त्यावेळी राजकारणात नवीन होतो. मला या गोष्टींबद्दल फारशी माहिती नव्हती. पण नंतर मला समजले की जर आपण तात्काळ फायद्यांपेक्षा वर जाऊन खरोखरच धैर्याने आणि दीर्घकालीन विचाराने राज्याच्या आणि त्याच्या लोकांच्या कल्याणासाठी काम केले तर खूप फायदा होईल. आणि मला आठवते की जेव्हा शहर विकास वर्ष साजरे केले जात होते तेव्हा पहिले काम अतिक्रमण हटवणे होते, आता जेव्हा अतिक्रमण हटवण्याची वेळ येते तेव्हा पहिला अडथळा राजकीय व्यक्ती निर्माण करते, तो कोणत्याही पक्षाचा असला तरी, तो येऊन उभा ठाकतो कारण त्याला वाटते की त्याचे मतदार तुम्ही फोडत आहात. आणि अधिकारी देखील खूप हुशार असतात. जेव्हा त्यांना सांगितले जाते की हे सर्व पाडायचे आहे, तेव्हा ते प्रथम जाऊन भगवान हनुमानाचे मंदिर पाडतात. त्यामुळे असे वादळ निर्माण होते की कोणताही राजकारणी घाबरतो, त्याला वाटते की जर आपण भगवान हनुमानाचे मंदिर पाडले असेल, तर ते व्हावे... आम्ही खूप धाडस दाखवले. त्यावेळी आमचे ..... (नाव स्पष्ट नाही) नगरमंत्री होते. आणि त्याचा परिणाम असा झाला की रस्ते रुंद होऊ लागले, ज्याचे 2 फूट किंवा 4 फूट कमी झाले, तो ओरडायचा, पण संपूर्ण शहर आनंदी व्हायचे. यामध्ये एक परिस्थिती निर्माण झाली, जी खूप मनोरंजक आहे. आता मी 2005 हे शहर विकास वर्ष म्हणून घोषित केले. मी त्यासाठी 80-90 मुद्दे काढले होते, खूप मनोरंजक मुद्दे. म्हणून मी पक्षाशी चर्चा केली की असे एक शहर विकास वर्ष असेल, सर्वांना स्वच्छतेच्या कामात सहभागी व्हावे लागेल. पण जेव्हा हे पाडकाम सुरू झाले, तेव्हा माझ्या पक्षाचे लोक आले, मी हे तुम्हाला मोठे गुपित सांगत आहे, ते म्हणाले साहेब, 2005 मध्ये नागरी संस्थेच्या निवडणुका आहेत, आमची अवस्था वाईट होईल. हे सर्व पाडकाम सर्वत्र सुरू आहे. मी म्हणालो, मित्रा, हे माझ्या मनात नव्हते आणि खरं तर ती निवडणूक माझ्या मनात अजिबात नव्हती. आता मी कार्यक्रम बनवला आहे, आता साहेब, माझाही एक स्वभाव आहे. आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत की एकदा पाऊल टाकले की मागे हटू नये. म्हणून मी म्हणालो, बघा भाऊ, तुमची चिंता बरोबर आहे, पण आता आपण मागे हटू शकत नाही. आता हे शहरी विकास वर्ष असेल. फार काय आपण हरू, निवडणूक काय आहे? काहीही झाले तरी आपल्याला कोणाचेही नुकसान करायचे नाही, परंतु गुजरातमधील शहरांचे स्वरूप बदलणे खूप महत्वाचे आहे.
मित्रहो,
आम्ही प्रयत्न करत राहिलो. खूप विरोध झाला, खूप आंदोलने झाली आणि बऱ्याच समस्या आल्या. आता मोदी लक्ष्य आहेत म्हणून माध्यमेही आनंदात होती, त्यांनी पूर्ण ताकदीने प्रयत्न केले. आणि त्यानंतर जेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हा पहा, मी राजकारण्यांना सांगतो, मी देशभरातील राजकारण्यांना सांगतो की माझे ऐका, मी त्यांना सांगतो की जर तुम्ही जनतेच्या कल्याणासाठी सचोटीने, प्रामाणिकपणाने निर्णय घेतले, जरी त्यावेळी ते रुचत नसले तरी, लोक तुमच्यासोबत जातात. आणि त्यावेळी झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाने 90 टक्के विजय मिळवला होता, 90 टक्के म्हणजे लोकांचा असा विश्वास आहे की जनता अशी नाही आणि मला आठवते. आता येथे बांधलेला हा अटल पूल, हा साबरमती रिव्हर फ्रंट, मला माहित नाही की मला उद्घाटनासाठी का बोलावले गेले होते. बरेच कार्यक्रम होते, म्हणून मी म्हणालो चला ते पाहूया, म्हणून मी त्या अटल पुलावर फिरायला गेलो, तिथे मी पाहिले की काही लोकांनी पानाची पिचकारी थुंकली आहे. उद्घाटन आता होणार होते, पण कार्यक्रम झाला होता. तर माझ्या मनात आले, मी म्हटलं की त्यावर तिकीट लावा. तर हे सर्व लोक आले आणि म्हणाले की निवडणूक आहे, त्यानंतर निवडणूक आहे, ते तिकीट लावू शकत नाहीत, मी म्हटलं तिकीट आकारा नाहीतर तुमचा अटल पूल निरुपयोगी होईल. मग मी दिल्लीला गेलो, दुसऱ्या दिवशी फोन करून विचारलं, मी म्हटलं तिकीट आकारण्याचे काय झालं, एकही दिवस तिकीटाविना जाऊ देऊ नका.
मित्रहो,
काही झाले तरी माझा मान ठेवतात सर्व लोक, शेवटी आमच्या लोकांनी पुलावर तिकीट लावले. आज तिकीटही झाले, निवडणूकही जिंकलो मित्रांनो आणि तो अटल ब्रिज चालू आहे. मी कांकरियाच्या पुनर्बांधणीचा कार्यक्रम हाती घेतला, त्यावर तिकीट लावले तेव्हा काँग्रेसने मोठे आंदोलन केले. न्यायालयात गेले, पण त्या लहानशा प्रयत्नाने संपूर्ण कांकरियाला वाचवून ठेवले आहे आणि आज समाजातील प्रत्येक वर्ग मोठ्या सुखासमाधानाने तिथे जातो. कधीकधी राजकारण्यांना खूप लहान-लहान गोष्टींची भीती वाटते. समाजविरोधी नसतात त्या, त्याला समजावून सांगायचे असते. तो सहकार्य करतो आणि चांगले परिणामही मिळतात.
बघा, शहरी विकासाची प्रत्येक गोष्ट इतक्या बारकाईने तयार करण्यात आली आणि त्याचेच हे परिणाम होते, मी तुम्हाला सांगतो. आता माझ्यावर हा जो दबाव वाढणार आहे, तो आधीच सुरू झाला आहे की मोदी ठीक आहेत, चौथ्या क्रमांकावर पोहोचलात, आता तिसऱ्या क्रमांकावर कधी पोहोचणार? याचे एक औषध तुमच्याकडे आहे. आता जी आमची ग्रोथ सेंटर्स आहेत, ते शहरी भाग आहेत. आपल्याला शहरी संस्थांना आर्थिक वाढीचे केंद्र बनवण्याचे नियोजन करावे लागेल.
आपोआप लोकसंख्येमुळे वाढत राहतील, अशी शहरे असू शकत नाहीत. शहरे ही आर्थिक घडामोडींची वेगवान केंद्रे असावीत आणि आता तर आपण टियर 2, टियर 3 शहरांवरही भर दिला पाहिजे आणि ती आर्थिक घडामोडींची केंद्रे बनली पाहिजेत. मी तर संपूर्ण देशातील नगरपालिका, महानगरपालिकांच्या लोकांना सांगू इच्छितो. शहरी शासन संस्थांशी संबंधित सर्व लोकांना सांगू इच्छितो की त्यांनी हे लक्ष्य निर्धारित करावे की 1 वर्षात त्या शहराची अर्थव्यवस्था कुठून कुठे पोहोचवणार? तिथल्या अर्थव्यवस्थेची वाढ कशी करणार?
तिथे जे काही उत्पादन होत आहे, त्याची गुणवत्ता कशी सुधारणार? तिथे आर्थिक घडामोडींचे नवनवीन मार्ग कोणते उघडणार? मी पाहिले आहे की, बहुतेकदा नवीन नगरपालिका काय करतात, एक मोठे शॉपिंग सेंटर बनवतात. राजकारण्यांनाही ते सोयीचे वाटते, 30-40 दुकाने बनवतील आणि 10 वर्षे घेणारा कोणी येत नाही. इतक्याने काम चालणार नाही. अभ्यास करून आणि विशेषतः जी कृषी उत्पादने आहेत, मी टियर 2, टियर 3 शहरांसाठी सांगेन, जे शेतकरी उत्पादन करतात, त्यांचे मूल्यवर्धन या नगरपालिकेत सुरू झाले पाहिजे. आसपासच्या शेतीतील वस्तू याव्यात, त्यातून काही मूल्यवर्धन व्हावे, गावाचेही भले होईल, शहराचेही भले होईल.
त्याचप्रमाणे, तुम्ही पाहिले असेल की, हल्ली स्टार्टअप्स, स्टार्ट अप्समध्येही तुमच्या लक्षात आले असेल की, पूर्वी स्टार्टअप्स मोठ्या शहरांमधील मोठ्या उद्योग घराण्यांच्या आजूबाजूला चालत होते, पण आज देशात सुमारे दोन लाख स्टार्टअप्स आहेत. आणि त्यापैकी बहुतेक टियर 2, टियर 3 शहरांमध्ये आहेत. यात अभिमानाची बाब ही आहे की, त्यापैकी अनेक स्टार्टअप्सचे नेतृत्व आपल्या मुलींकडे आहे. स्टार्टअप्सचे नेतृत्व मुलींकडे असणे हे एका मोठ्या क्रांतीच्या शक्यतेला जन्म देते आणि म्हणूनच माझी अशी इच्छा आहे की, जेव्हा आपण शहरी विकासाची 20 वर्षे साजरी करत आहोत आणि एका यशस्वी प्रयोगाची आठवण करून पुढील दिशा ठरवत आहोत, तेव्हा आपण टियर 2, टियर 3 शहरांना बळ दिले पाहिजे. शिक्षणातही टियर 2, टियर 3 शहरे बरीच पुढे राहिली आहेत, या वर्षी पहा. पूर्वी एक काळ असा होता की, 10वी आणि 12वीचे निकाल लागले की, मोठ्या नामांकित शाळांमधील मुलेच पहिल्या 10 मध्ये असायची. आता मात्र, मोठ्या शहरांमधील मोठ्या शाळांचे कुठे नावही नसते. टियर 2, टियर 3 शहरांमधील शाळेची मुले पहिल्या 10 मध्ये येतात. गुजरातमध्येही असेच घडत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. याचा अर्थ असा की, आपल्या लहान शहरांची क्षमता, त्यांची ताकद वाढत आहे. खेळांचेच उदाहरण घ्या, आधी क्रिकेटच घ्या ना. क्रिकेट तर भारतात आपण गल्ली-बोळात खेळतो. पण खेळ-क्रिकेट हे सर्व मोठ्या शहरातील बड्या श्रीमंत कुटुंबांपुरतेच मर्यादित होते. आज सर्व खेळाडूंपैकी निम्म्यापेक्षा जास्त खेळाडू टियर 2, टियर 3 शहरे आणि गावातील मुले आहेत, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून कमाल करत आहेत. म्हणजेच, आपण हे विचारात घेतले पाहिजे की आपल्या शहरांमध्ये खूप क्षमता आहे. आणि मनोहरजींनीही सांगितले आणि इथे व्हिडिओमध्येही दाखवले गेले, ही आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे. 4 वरून 3 नंबरची अर्थव्यवस्था गाठण्यासाठी आपण जर हिंदुस्तानातील शहरांच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले, तर आपण तिथेही खूप वेगाने पोहोचू शकू.
मित्रहो,
हे राज्यकारभाराचे एक मॉडेल आहे. दुर्दैवाने, आपल्या देशात अशाच एका परिसंस्थेने जमिनींमध्ये आपली मुळे अशी रोवली आहेत की, ती भारताच्या सामर्थ्याला नेहमी कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत. वैचारिक विरोधामुळे व्यवस्थांच्या विकासाचा अस्वीकार करणे त्यांचा स्वभाव बनला आहे. एखाद्या व्यक्तीबद्दलच्या पसंती-नापसंतीमुळे, त्या व्यक्तीने केलेल्या प्रत्येक कामाला वाईट ठरवणे ही एक फॅशनची पद्धत बनली आहे आणि त्यामुळे देशातील चांगल्या गोष्टींचे नुकसान झाले आहे. हे राज्यकारभाराचे एक मॉडेल आहे.
आता तुम्ही पहा, आम्ही शहरी विकासावर भर दिला, पण जेव्हा तुम्ही मला दिल्लीला पाठवले, तेव्हा आम्ही आकांक्षी जिल्हे, आकांक्षी तालुक्यांचा विचार केला की, प्रत्येक राज्यात एखादा जिल्हा, एखादा तालुका असा असतो, जो इतका मागे असतो की, तो राज्याच्या संपूर्ण सरासरीला खाली खेचतो. तुम्ही पुढे जाऊच शकत नाही, ती बेड्यांसारखी असते. मी म्हणालो, आधी या बेड्या तोडायच्या आहेत आणि देशात सुमारे 100 आकांक्षी जिल्ह्यांची निवड करण्यात आली. 40 मापदंडांच्या द्वारे पाहिले गेले की, इथे कशाची गरज आहे. आता 500 तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण सरकार या दृष्टीकोनाने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तरुण अधिकाऱ्यांना या कामासाठी तैनात केले आहे, पूर्ण कार्यकाळाने काम करतील असे नेमण्यात आले आहे. आज जगासाठी एक आदर्श बनले आहे आणि जे विकसनशील देश आहेत त्यांना देखील वाटत आहे की आपल्याकडे विकासाचे हे मॉडेल राबवले पाहिजे. आपल्या शैक्षणिक विश्वाने भारताच्या या प्रयत्नांविषयी आणि यशस्वी प्रयत्नांविषयी विचार केला पाहिजे आणि ज्यावेळी शैक्षणिक विश्व यावर विचार करते तेव्हा जगासाठी देखील ते एक अनुकरणीय उदाहरण म्हणून उपयुक्त ठरते.
मित्रहो,
येत्या काळात आपण पर्यटनावर भर दिला पाहिजे. गुजरातने कमाल केली आहे! कोणी विचार करू शकले असते का? कच्छच्या वाळवंटात, जिथे कोणी जायचे नाव घेत नव्हते, तिथे आज जाण्यासाठी बुकिंग मिळत नाही. गोष्टी बदलल्या जाऊ शकतात. जगातील सर्वात उंच पुतळा हा खरोखरच अद्भुत आहे. मला सांगण्यात आले की, वडनगरमध्ये जे संग्रहालय बनले आहे. काल मला यूकेचे एक गृहस्थ भेटले होते. ते म्हणाले, मी वडनगरचे संग्रहालय पाहण्यासाठी जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इतक्या जागतिक दर्जाचे एखादे संग्रहालय बनले आहे आणि भारतात काशीसारखी खूप कमी ठिकाणे आहेत जी अविनाशी आहेत.
कधीही मृतप्राय न झालेल्या आणि प्रत्येक क्षणी जीवन अस्तित्वात असलेल्या ठिकाणांपैकी एक म्हणजे वडनगर आहे, जिथे 2800 वर्षांपर्यंतचे पुरावे सापडले आहेत. आता आपले काम आहे ते आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर कसे आणायचे ? आपले लोथल जिथे आम्ही एक संग्रहालय बांधत आहोत, सागरी संग्रहालय, 5 हजार वर्षांपूर्वी सागरी क्षेत्रात जगभरात आपला दबदबा होता. हळूहळू आपण विसरून गेलो, लोथल त्याचे जिवंत उदाहरण आहे. लोथलमध्ये जगातील सर्वात मोठे सागरी संग्रहालय उभारले जात आहे. तुम्ही कल्पना करू शकता या गोष्टींचा किती फायदा होणार आहे आणि म्हणूनच मी म्हणतो, मित्रांनो, 2005 चा तो काळ होता, जेव्हा पहिल्यांदाच गिफ्ट सिटीची कल्पना सुचली आणि मला आठवतंय , बहुधा आपण त्याचा प्रारंभ टागोर हॉलमध्ये केला होता. तेव्हा आमच्या मनात असलेल्या डिझाईन्सची मोठ- मोठी चित्रे लावली होती , तेव्हा माझे स्वकीयच विचारत होते. असे होईल , इतक्या उंच इमारती बांधल्या जातील ? मला चांगले आठवतंय , म्हणजे, जेव्हा मी केंद्रातील काही नेत्यांना त्याचा नकाशा आणि सादरीकरण दाखवायचो , तेव्हा तेही मला म्हणत होते , अरे, भारतासारख्या देशात तुम्ही काय करत आहात? मी ऐकायचो , आज भारतातील प्रत्येक राज्य म्हणत आहे की आपल्याकडेही अशी एक गिफ्ट सिटी असायला हवी.
मित्रहो,
जर आपण एखादी सुचलेली कल्पना प्रत्यक्षात साकारण्याचा प्रयत्न केला तर त्याचे किती चांगले परिणाम मिळू शकतात हे आपण पहातच आहोत. तोच कालखंड होता , रिव्हरफ्रंट ची कल्पना सुचली, तोच कालखंड होता जेव्हा जगातील सर्वात मोठे स्टेडियम बांधण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण केले. तोच कालखंड होता , आम्ही जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचा विचार केला आणि तो पूर्ण केला.
बंधू आणि भगिनींनो,
एकदा आपण मानून चालूया की आपल्या देशात खूप क्षमता आहे, खूप सामर्थ्य आहे.
मित्रहो,
मला माहित नाही का, निराशेसारखी गोष्ट माझ्या मनात कधीच येत नाही. मी खूप आशावादी आहे आणि मी ते सामर्थ्य पाहू शकतो, मी भिंतींच्या पलिकडे पाहू शकतो. मी माझ्या देशाचे सामर्थ्य पाहू शकतो. माझ्या देशवासियांचे सामर्थ्य पाहू शकतो आणि याच विश्वासावर आपण खूप मोठा बदल घडवून आणू शकतो आणि म्हणूनच आज मला येथे येण्याची संधी दिल्याबद्दल मी गुजरात सरकारचा खूप आभारी आहे. मला काही जुन्या गोष्टीना उजाळा देण्याची संधी मिळाली. मात्र तुम्ही विश्वास ठेवा मित्रांनो, गुजरातवर खूप मोठी जबाबदारी आहे. आपण देणारे लोक आहोत, आपण नेहमीच देशाला दिले पाहिजे. आणि आपण गुजरातला इतक्या उंचीवर घेऊन जाऊ , इतक्या उंचीवर घेऊन जाऊ की गुजरात देशवासीयांच्या उपयोगी पडावे , मित्रांनो, आपण ही महान परंपरा पुढे नेली पाहिजे. मला विश्वास आहे की गुजरात नव्या ताकदीने, अनेकविध नवीन कल्पनांसह , अनेक नवीन उपक्रमांसह पुढे जाईल. माझे भाषण इतके लांबले, मला कळलंच नाही काय झालं? पण उद्या दोन-तीन गोष्टी माध्यमांमध्ये येतील. त्या देखील मी तुम्हाला सांगतो, मोदींनी अधिकाऱ्यांना फटकारले, मोदींनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली वगैरे -वगैरे . असो, कधीकधी ती चटणी होते ना , तसे समजून घेतले पाहिजे, मात्र ज्या अन्य बाबी मी सांगितल्या , त्या आठवून जा , सिंदुरी भावना, मित्रहो, 6 मे रोजी , 6 मे ची रात्र , ऑपरेशन सिंदूर सैन्यदलाने सुरु केले होते. मात्र आता हे ऑपरेशन सिंदूर जनशक्तीने पुढे जाईल. आणि जेव्हा मी सैन्यदल आणि जनशक्तीबाबत बोलतो, तेव्हा ऑपरेशन सिंदूर जनशक्तीचा अर्थ आहे प्रत्येक नागरिकाने देशाच्या विकासात भागीदार व्हावे , जबाबदारी पार पाडावी.
आपण एवढा निर्धार करूया की 2047, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाल्याला 100 वर्ष पूर्ण होतील, विकसित भारत बनवण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेला चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी आता आपण कोणत्याही परदेशी वस्तूचा वापर करणार नाही. आपण प्रत्येक गावातील व्यापाऱ्यांना शपथ द्यायला हवी की त्यांना कितीही नफा झाला तरी ते परदेशी वस्तू विकणार नाहीत. परंतु दुर्दैव पहा, गणेश मूर्ती देखील परदेशी येतात. लहान डोळ्यांचे गणेशजी येतील. गणेशजींचे डोळेही उघडत नाहीत. होळीचेच पहा, होळीत आपण रंग उधळतो, ते देखील परदेशी, आम्हाला माहित होते की तुम्हीही तुमच्या घरी जाऊन यादी तयार करा. खरंतर,ऑपरेशन सिंदूरसाठी एक नागरिक म्हणून, मला एक गोष्ट करायची आहे. तुम्ही घरी जाऊन एक यादी तयार करा की तुमच्या घरात 24 तासांमध्ये सकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत किती परदेशी वस्तू वापरल्या जातात . तुम्हाला माहीतच नसते, तुम्ही हेअरपिन देखील परदेशी वापरता, कंगवा देखील परदेशी असतो, दातांमध्ये लावल्या जाणारी पिन देखील परदेशी असते , आपल्याला त्याबद्दल माहितीही नसते मित्रहो. देश जर वाचवायचा असेल, देशाची उभारणी करायची असेल, देशाचा विकास करायचा असेल, तर ऑपरेशन सिंदूर ही केवळ सैनिकांची जबाबदारी नाही. ऑपरेशन सिंदूर ही 140 कोटी नागरिकांची जबाबदारी आहे. देश मजबूत असायला हवा, देशाकडे सामर्थ्य हवे , देशातील नागरिक सामर्थ्यवान असायला हवेत आणि यासाठी आम्ही व्होकल फॉर लोकल, एक जिल्हा एक उत्पादन सुरू केले आहे. तुमच्याकडे जे आहे ते फेकून देण्यास मी तुम्हाला सांगत नाही. मात्र आता आपण काहीही नवीन खरेदी करणार नाही आणि कदाचित एक-दोन वस्तू तुम्हाला परदेशातून खरेदी कराव्या लागतील ज्या कदाचित इथे आपल्याकडे उपलब्ध नसतील, बाकी आज भारतात सगळे काही उपलब्ध आहे. तुम्ही पाहिले असेल, 25 -30 वर्षांपूर्वी, जेव्हा कोणी परदेशातून यायचे तेव्हा लोक एक यादी पाठवत असत की हे आणा, ते आणा. आज जेव्हा लोक परदेशातून येतात, तेव्हा विचारतात की काही आणायचे आहे का, तेव्हा इथले लोक म्हणतात, नाही, नाही, इथे सगळं आहे, काही आणू नका. सगळं काही आहे, आपल्याला आपल्या ब्रँडचा अभिमान वाटायला हवा. आपल्याला मेड इन इंडियाचा अभिमान वाटायला हवा. मित्रांनो, ऑपरेशन सिंदूर लष्करी ताकदीने नाही तर जनशक्तीने जिंकायचे आहे आणि जनशक्ती ही मातृभूमीच्या मातीत उत्पादित होणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून येते. जर मला ऑपरेशन सिंदूर प्रत्येक व्यक्तीपर्यंत, घराघरापर्यंत घेऊन जायचे असेल तर मी अशा गोष्टींचा वापर करेन ज्यात या मातीचा सुगंध आहे, ज्यात या देशातील नागरिकांच्या घामाचा सुगंध आहे. तुम्ही बघा की आपण 2047 पूर्वी भारताला एक विकसित राष्ट्र बनवून दाखवू आणि आपल्या डोळ्यांसमोर पाहू, मित्रांनो, याच अपेक्षेसह माझ्यासोबत पूर्ण ताकदीने म्हणा -
भारत माता की जय! भारत माता की जय!
भारत माता की जय! तिरंगा उंच फडकला पाहिजे.
भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय!
वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम!
वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम!
वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम!
वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम!
धन्यवाद!
ST/Rajashree/Madhuri/Vasanti/Shailesh/Sushama/PM
(Release ID: 2132182)