पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातमधील दाहोद येथे विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 26 MAY 2025 11:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 मे 2025

तिरंगा झेंडा सदैव फडकत राहो

भारत माता की जय,

भारत माता की जय,

भारत माता की जय,

भारत माता की जय,

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, खासदार, आमदार आणि इतर सर्व मान्यवर आणि दाहोदचे माझे प्रिय बंधू आणि भगिनी, कसे आहात आपण? जरा मोठय़ा आवाजात उत्तर द्या, आता दाहोदचा प्रभाव वाढला आहे. आज 26 मे आहे. 2014 मध्ये आजच्याच दिवशी मी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. तिरंगा झेंडा हवा आहे, तुम्ही गुजरातच्या जनतेने मला भरभरून आशीर्वाद दिला आणि नंतर देशातील कोट्यवधी जनतेनेही मला आशीर्वाद देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. तुमच्या आशीर्वादाच्या बळावर मी दिवसरात्र देशवासीयांच्या सेवेत आहे. या वर्षांमध्ये देशाने असे निर्णय घेतले, जे अकल्पनीय होते, ते अभूतपूर्व आहेत. या वर्षांमध्ये देशाने अनेक दशकांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या, देश प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. आज देश निराशेच्या अंधारातून बाहेर येऊन श्रद्धेच्या प्रकाशात तिरंगा झेंडा फडकवत आहे.

मित्रहो,

आज आपण 140 कोटी भारतीय एकत्र येऊन आपल्या देशाला विकसित भारत बनवण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहोत. देशाच्या प्रगतीसाठी जे काही आवश्यक आहे, ते आपण भारतातच निर्माण करायला हवे, ही आजच्या काळाची मागणी आहे. भारत आज उत्पादनाच्या क्षेत्रात पुढे येत आहे. देशाला लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती असो किंवा आपल्या देशाने बनवलेल्या वस्तूंची जगातील विविध देशांना होणारी निर्यात असो, या सगळ्यात सातत्याने वाढ होत आहे. आज आपण स्मार्ट फोन पासून, ते कार, खेळणी, लष्करी शस्त्रास्त्रे, औषधे, अशा अनेक वस्तू जगातील विविध देशांना निर्यात करत आहोत. एवढेच नाही, तर आज भारत रेल्वे, मेट्रो आणि त्यासाठी लागणारे तंत्रज्ञानही स्वत: बनवतो आणि जगाला निर्यातही करतो. आणि आपले दाहोद, हे त्याचे ठळक उदाहरण आहे.

काही काळापूर्वीच येथे हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन झाले. यापैकी सर्वात भव्य आहे, ते म्हणजे दाहोद इथली इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह फॅक्टरी. तीन वर्षांपूर्वी मी येथे पायाभरणीसाठी आलो होतो. आणि काही लोकांना कुठल्याही गोष्टीवर टीका करण्याची सवय आहे, ते म्हणायचे की, निवडणुका आल्या, तर मोदींनी कारखान्याची पायाभरणी केली, हे काही होणार नाही, असे म्हणत होते. आज तीन वर्षांनंतर आपण सर्व जण पाहत आहोत, आता या कारखान्यात पहिले इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह तयार झाले आहे आणि काही वेळापूर्वीच मी त्याला हिरवा झेंडा दाखवला आहे. ही गुजरात आणि देशासाठी अभिमानाची बाब आहे. आज गुजरातने आणखी एक यश मिळवले आहे. गुजरातमधील रेल्वे नेटवर्कचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. याबद्दल मी गुजरातमधील माझ्या सर्व बंधू-भगिनींचे अभिनंदन करतो.

मित्रहो,

सर्वप्रथम मला इथल्या लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, ज्यांनी मला या ठिकाणी आपल्या समोर येण्याची संधी दिली. अनेक जुन्या परिचित लोकांना भेटण्याची संधी मिळाली, अनेक ओळखीचे चेहरे, जुन्या गोष्टी आणि दाहोद बरोबरचे माझे नाते राजकारणात आल्या नंतरचे नाही. अंदाजे सत्तर वर्ष झाली असतील, दोन ते तीन पिढ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आणि आज मी परेल इथे गेलो, कदाचित वीस वर्षांनी मी परेल ला गेलो असेन, परेल पूर्णपणे बदलले आहे. यापूर्वी मी परेल ला यायचो, तेव्हा सूर्यास्ताच्या वेळी सायकलवर जायचा  प्रयत्न करायचो, आणि पाऊस असेल, हिरवळ असेल, लहान लहान डोंगरांमधून छोटासा रस्ता असेल, अशी संध्याकाळ मला प्रसन्न करायची आणि त्यानंतर परेल ला रेल्वे मध्ये जे काम करायचे, त्या परिचितांकडे संध्याकाळी जेवून परतायचो, एवढे माझे जवळचे नाते होते. आणि आज परेल चा दिमाख पाहून आनंद वाटत आहे.

मित्रहो,

येथील सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही काम करत आहोत, आम्ही अनेक पावले उचलली आहेत आणि मला अभिमानाने सांगायचे आहे की दाहोदसाठी मी जी स्वप्ने पाहिली होती, ती माझ्या डोळ्यांसमोर पूर्ण होताना पाहण्याचे भाग्य मला मिळाले आहे. आणि मी आत्मविश्वासाने सांगतो की जर कोणाला भारतात आदिवासीबहुल जिल्हा कसा विकसित करता येईल याचे मॉडेल पहायचे असेल तर त्यांनी माझ्या दाहोदला यावे. जेव्हा आदिवासी जिल्ह्यात स्मार्ट सिटी बनवण्याचा विचार मांडला जातो, तेव्हा हेच लोक आश्चर्यचकित होतात. गेल्या 10-11 वर्षांत, रेल्वेमध्ये किती वेगाने बदल झाले आहेत हे आपण सर्वांनी स्पष्टपणे पाहिले आहे. रेल्वे विकासाची नवी दिशा, नवी गती, आणि मेट्रो सेवांचा विस्तार झपाट्याने वाढत आहे, भारतात सेमी हाय स्पीड रेल्वेचा तर उल्लेखही नव्हता. आज ती वेगाने विकसित होत आहे. आज देशात सुमारे 70 मार्गांवर वंदे भारत ट्रेन धावत आहे आणि आज आपल्या दाहोद मधूनही, अहमदाबादहून वेरावळपर्यंत, सोमनाथांच्या चरणांपर्यंत ही वंदे भारत ट्रेन  धावू लागली आहे. आणि पूर्वी दाहोदमधील आमच्या बांधवांना उज्जैनला जावेसे वाटत असे, उज्जैन जवळच आहे, आता सोमनाथचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले आहेत.

मित्रहो,

आज भारतात इतकी आधुनिक वाहने धावत आहेत आणि याचे एक मोठे कारण म्हणजे आता या देशातील तरुण, आपली युवा पिढी, भारतात नवीन तंत्रज्ञान विकसित करत आहे. रेल्वेगाडीचे कोच भारतात बनवले जातात, लोकोमोटिव्ह भारतात बनवले जातात, या सर्व गोष्टी आपल्याला पूर्वी परदेशातून आयात कराव्या लागत होत्या. आज पैसा आपला आहे, घाम आपण गाळतो आणि परिणामही आपला आहे. आज भारत रेल्वेशी संबंधित अनेक वस्तुंचे उत्पादन घेऊन जगातला एक मोठा निर्यातदार बनत आहे. तुम्ही ऑस्ट्रेलियाला गेलात तर तिथे धावणाऱ्या मेट्रोचे डबे गुजरातमध्ये बनलेले आहेत, हे जाणून तुम्हाला आनंद होईल. इंग्लंडला जा, सौदी अरेबियाला जा, फ्रान्सला जा,अनेक देशांमध्ये धावणाऱ्या आधुनिक गाड्यांचे डबे भारतात तयार होत आहेत. मेक्सिको, स्पेन, जर्मनी आणि इटली अशा देशांमध्ये रेल्वेसाठी आवश्यक असलेली अनेक लहान-मोठी उपकरणे भारतात तयार केली जात आहेत.आमचे छोटे उद्योगपती एमएसएमई आणि लघु उद्योगांच्या माध्यमातून इतके आश्चर्यकारक काम करत आहेत की ते अगदी लहान भाग उत्तम प्रकारे बनवत आहेत आणि जागतिक बाजारपेठेत त्यांचा पुरवठा करत आहेत. आपले प्रवासी कोच मोझांबिक आणि श्रीलंकेसारख्या अनेक देशांमध्ये वापरले जात आहेत. मेड इन इंडिया लोकोमोटिव्ह आणि मेड इन इंडिया इंजिन, भारत आता अनेक देशांमध्ये निर्यात करत आहे. मेड इन इंडिया चा हा विस्तार होत असल्यामुळे भारताचे मस्तक अभिमानाने उंचावले आहे. आता, दाहोदच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, मला सांगा, भारतात बनवलेल्या या वस्तु जगात प्रसिद्ध झाल्या आहेत, आता आपण आपल्या घरात परदेशी उत्पादने वापरणे थांबवायला हवे की नाही? जरा मोठ्याने उत्तर द्या, आपण थांबवायला हवे की नाही? तिरंगा फडकवा आणि मला सांगा, आपण ते थांबवायला हवे की नाही? बघा, तुम्ही तिरंग्याच्या सावलीत बसून म्हणत आहात की आपण आपल्या देशात बनवलेल्या वस्तू का वापरू नयेत? आपल्याच लोकांबद्दल काय सांगावे, गणेश चतुर्थी आली की ते लहान डोळ्यांचे गणपती आणतात, आपले गणपती नाही तर परदेशी गणपती, होळी, दिवाळी आली की ते तिथले फटाके आणतात आणि बाहेरून पाण्याच्या पिचकाऱ्या सुद्धा आणतात. आपण भारतात बनवलेल्या उत्पादनांचा वापर करायला हवा की नाही? भारतीयांनीच कमवायला हवे की नाही? भारताला प्रगती करायची असेल तर प्रत्येक भारतीयाने हा संकल्प करायला हवा की नको?

मित्रहो,

जेव्हा रेल्वे मजबूत असते तेव्हा सुविधा सुद्धा वाढतात आणि त्याचा फायदा उद्योगांना होतो, शेतीला होतो, विद्यार्थ्यांना होतो, बहिणींना अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. मागच्या दशकभरात, रेल्वे प्रथमच देशाच्या अनेक भागांमध्ये पोहोचली आहे. गुजरातमध्येही अशी अनेक ठिकाणे होती जिथे लहान वाहने धावत असत आणि ती संथपणे चालत असत. आमच्या दाभोई भागात तर ट्रेन अशा प्रकारे धावत असे की तुम्ही मध्येच उतरू शकत होता आणि नंतर चालत्या ट्रेनमध्ये परत चढूही शकत होता. असे अनेक नॅरोगेज मार्ग आता रुंद झाले आहेत; दाभोईचा तो नॅरोगेज मार्ग रुंद झाला आहे. आजही येथे अनेक रेल्वे मार्गांचे उद्घाटन झाले आहे. आज दाहोद आणि वलसाड दरम्यान एक्सप्रेस ट्रेन सुरू झाली आहे. दाहोदचे माझे भाऊबंद गुजरातच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत. तुम्ही गुजरातमधील कोणतेही छोटे शहर बघा, तिथे तुम्हाला माझे दाहोदमधले भाऊबंद सापडतीलच आणि आज जेव्हा हे नेटवर्क तयार होईल, तेव्हा माझ्या दाहोदला त्याचा सर्वात जास्त फायदा होईल, आमच्या आदिवासी मुलांना जास्तीत जास्त फायदा होईल.

मित्रहो,

जिथे जिथे कारखाना उभारला जातो तिथे त्याभोवती संपूर्ण परिसंस्था तयार होते. लहान वस्तूंचे उत्पादन करणारे कारखाने उभारले जातात आणि त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात. आपल्या युवा वर्गाला या रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी मी काम करत आहे. दाहोदमधले हे रेल्वे कारखाने, हा कारखाना जगातला, भारतातला एक असा कारखाना असेल, विशेषतः भारतासाठी दाहोद हा एक संस्मरणीय कारखाना आहे. मित्रहो, हा फक्त लोकोमोटिव्हसारखा नाही. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तिथे जवळजवळ सर्व काही उद्ध्वस्त झाले होते, सगळीकडे कुलुपे लागली होती, लोक त्या जागेला कुलूप लावून तेथून निघून गेले होते. दाहोदचे हे परेल मी माझ्या डोळ्यांसमोर संपताना पाहिले आहे आणि आज मी ते माझ्या डोळ्यांसमोर चैतन्यमय आणि भव्य होत असल्याचे पाहतो आहे. तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे हे शक्य होते आहे, आणि आता 9000 हॉर्सपॉवर, , जर कोणी विचारले की याचे लोकोमोटिव्ह भारतात कुठे आहे? तर उत्तर असेल- दाहोद. येथे बनवलेले लोकोमोटिव्ह भारताची शक्ती आणि क्षमता दोन्ही वाढवतील आणि येथे बनवलेले लोकोमोटिव्ह जिथे जातील तिथे फक्त त्यांचे टायरच जाणार नाहीत तर त्यासोबत माझ्या दाहोदचे नाव सुद्धा पोहोचेल, दाहोद सर्वत्र पोहोचेल. आगामी काळात येथे शेकडो लोकोमोटिव्ह तयार केले जातील. काही दिवसांनी, असाही दिवस येईल जेव्हा दोन दिवसांत एक लोकोमोटिव्ह तयार होईल. कल्पना करा की हे किती मोठे काम आहे - दोन दिवसांत एक लोकोमोटिव्ह तयार होईल. इतक्या मोठ्या लोकोमोटिव्हमुळे आणि या सर्व बाबींमुळे, माझ्या स्थानिक बंधू-भगिनींना आणि आपल्या युवा वर्गाला मोठ्या संख्येने रोजगार मिळेल. या कारखान्यामुळे आजूबाजूच्या परिसरातही सुटे भाग तयार करण्यासाठी लघु उद्योगांचे मोठे जाळे निर्माण होईल. कारखान्यात रोजगार उपलब्ध होईल, आणि त्याचबरोबर लहान-मोठी कामेही होतील, लघु उद्योग सुरू होतील, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. माझे शेतकरी बंधू आणि भगिनी असतील, आमचे पशुपालक असतील, आमचे लहान दुकानदार असतील, आमचे कामगार बंधू आणि भगिनी असतील, समाजातील प्रत्येक घटकाला याचा मोठा फायदा होणार आहे.

मित्रहो,

आज तुम्ही बघितले तर गुजरातने शिक्षण, आयटी, सेमीकंडक्टर, पर्यटन इत्यादी सर्वच क्षेत्रात आपला झेंडा फडकत ठेवला आहे. हजारो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे आज गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प उभारले जात आहेत आणि या सर्व प्रयत्नांमुळे गुजरातमधील लाखो तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत.

मित्रहो,

एक काळ असा होता की वडोदरामध्ये छोटी-मोठी कामे चालू होती. मला आठवतंय, ज्या दिवशी मी पंचमहल जिल्हा विभागून वेगळा दाहोद जिल्हा निर्माण केला, त्या दिवशी मला पूर्ण कल्पना होती की यामुळे पंचमहल जिल्ह्याचाही विकास होईल आणि दाहोद जिल्हाही स्वतंत्रपणे विकसित होईल. आणि आज, जेव्हा मी प्रत्यक्ष तो विकास अनुभवतो, तेव्हा या भूमीचे ऋण फेडल्याचा मला अतीव आनंद होतो की, मी तुमचे मीठ खाल्ले आहे, म्हणून मी तुमच्यासाठी जितके काही करेन ते कमीच आहे. आता आजचेच उदाहरण घ्या, आपल्याकडे वडोदरा, हलोल, कलोल, गोध्रा, दाहोद या पाचही शहरांमध्ये लघु उद्योगांचे जाळे आहे, एक संपूर्ण नेटवर्क आहे, सामान्य नव्हे तर सर्व प्रकारच्या उच्च तंत्रज्ञानाधारित गोष्टी आहेत आणि संपूर्ण विस्तार, माझ्या आदिवासी बंधू आणि भगिनींचा वावर आहे. तुम्ही वडोदरा पासून दाहोद पर्यंत वा मध्य प्रदेश पर्यंत जाऊन बघा, आज वडोदरा येथे विमाने, हवाई जहाज बनवण्याचे काम वेगाने सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी एअर बस असेंब्ली लाईनचेही उद्घाटन झाले. देशातील पहिले गति शक्ती विद्यापीठ वडोदरा येथेच स्थापन झाले आहे आणि सावली येथे एक मोठा रेल्वे आणि कार उत्पादन करणारा मोठा कारखाना आहे, परदेशी गुंतवणूक लाभली आहे आणि आज जगभरात त्याचा डंका पिटला जात आहे. दाहोदमध्ये, भारतातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिन, 9000 अश्वशक्तीचे इंजिन येथे तयार केले जात आहे. गोध्रा, कलोल, हालोल, अनेक उद्योग, अनेक उत्पादन युनिट्स, हे लघु उद्योग खरोखरच औद्योगिक विकासाची सर्वात मोठी शक्ती म्हणून उदयास येत आहेत. गुजरातमध्ये सर्वत्र विकासाची लाट आहे.

आणि मित्रहो,

मला वाटते तो दिवस दूर नाही जेव्हा गुजरात सायकलींपासून मोटारसायकलींपर्यंत, रेल्वे इंजिनांपासून ते विमानांपर्यंत सर्व काही बनवेल आणि हे गुजरातची तरुण पिढी गुजरातच्या भूमीवर बनवेल. जगात इतका उच्च तंत्रज्ञानाचा अभियांत्रिकी उत्पादन कॉरिडॉर क्वचितच पाहायला मिळेल असा, संपूर्ण वडोदरा ते दाहोद पर्यंत होत आहे, हलोल, कलोल, गोध्रा, दाहोद पर्यंत इतके चांगले नेटवर्क तयार केले जात आहे.

मित्रहो,

विकसित भारताच्या निर्मितीसाठी आदिवासी भागांचा विकास देखील खूप महत्त्वाचा आहे. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना, मला गुजरातच्या पूर्वेकडील भागातील आदिवासी बांधवांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि मी स्वतःला त्यांच्यासाठी समर्पित केले आणि भारत सरकारसाठी काम केले. तेव्हापासून, गेली 11 वर्ष आदिवासी समाजाच्या अभूतपूर्व विकासाच्या कार्यासाठी समर्पित आहे. मला गुजरातच्या आदिवासी भागात बराच काळ काम करण्याची संधी मिळाली आहे. गेल्या 7 दशकांपासून मी गुजरातमधील सर्व आदिवासी भागात भेट देऊन तिथे काम करत आहे. मी माझ्या आदिवासी बंधू आणि भगिनींबाबत खूप गोष्टी जाणून घेतल्या आहेत. एक काळ असा होता जेव्हा गुजरातच्या आदिवासी भागात उमरगाम ते अंबाजी पर्यंत बारावीसाठी विज्ञान शाळा नव्हती. मी असे दिवस पाहिले आहेत आणि आज पाहिलंत तर उमरगाम ते अंबाजी पर्यंत संपूर्ण आदिवासी क्षेत्रात अनेक महाविद्यालये, आयटीआय, वैद्यकीय महाविद्यालये, दोन आदिवासी विद्यापीठे कार्यरत आहेत. गेल्या 11 वर्षांत, एकलव्य आदर्श शाळेचे जाळे खूप मजबूत झाले आहे. दाहोदमध्येही अनेक एकलव्य आदर्श शाळा बांधल्या गेल्या आहेत.

मित्रहो,

आज देशभरात आदिवासी समाजासाठी व्यापक काम केले जात आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच अनेक नवीन योजना बनवून आदिवासी गावांच्या विकासावर भर दिला जात आहे. तुम्ही अर्थसंकल्पात पाहिले असेल तर आदिवासी भागातील गावांच्या उन्नतीसाठी आम्ही 'धरती आबा' आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केले आहे. बिरसा मुंडा यांना धरती आबा असेही म्हणतात. केंद्र सरकार या अभियानावर सुमारे 80 हजार कोटी रुपये खर्च करत आहे आणि या अंतर्गत गुजरातसह देशभरातील 60 हजारांहून अधिक गावांमध्ये विकासकाम सुरू आहे. वीज असो, पाणी असो, रस्ते असो, शाळा असो, रुग्णालये असोत, आवश्यक असलेल्या अत्याधुनिक आणि महत्त्वाच्या सुविधा पुरवण्याचे काम सुरू आहे. आज, माझ्या आदिवासी बंधू आणि भगिनींसाठी देशभरात पक्की घरे बांधली जात आहेत.

मित्रहो,

ज्याची कोणीही पर्वा करत नाही ते मोदींना वंदनीय आहेत.आदिवासींमध्येही अनेक समुदाय मागे राहिले आहेत, ते मागासलेले आहेत आणि आम्ही त्यांचीही धुरा वाहत आहोत.आणि त्यांच्यासाठी सरकारने पीएम जनमानस योजना बनवली आहे आणि या योजनेअंतर्गत, आम्ही मागासलेल्या आदिवासी कुटुंबांना गावांमध्ये सुविधा, त्यांच्यासाठी घरे, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम करत आहोत.

बंधू आणि भगिनींनो,

गुजरातमध्ये सिकलसेल बद्दल आपल्याला माहिती आहे.मी गुजरातमध्ये असल्यापासून सिकलसेल समस्येचा पाठपुरावा करत आहे आणि आज आम्ही त्यावर देशव्यापी काम करत आहोत. माझ्या आदिवासी लोकांना सिकलसेलपासून मुक्त करण्यासाठी आम्ही मिशन मोडमध्ये काम करत आहोत. याअंतर्गत, आज लाखो आदिवासी बंधू-भगिनींच्या स्क्रीनिंगचे काम सुरू आहे.

आमच्या सरकारचा हा प्रयत्न आहे की, जो भाग विकासात मागे राहिला आहे, त्या भागाचा वेगाने विकास केला जावा. दुर्दैवाने, देशात 100 मागासलेले जिल्हे होते, ज्यांना पूर्वी 'मागासलेले जिल्हे' म्हणून सोडून देण्यात आले होते. त्यांना त्यांच्या नशिबाच्या हवाल्यावर सोडून देण्यात आले होते. कोणताही चांगला अधिकारी तिथे नोकरीसाठी जाणार नाही अशी परिस्थिती होती, शाळेत शिक्षकही मिळत नव्हते, घरांचा पत्ता नव्हता, आणि रस्त्यांचा तर पत्ताच नव्हता. ती परिस्थिती बदलली आणि त्यात तर अनेक आदिवासी जिल्हे होते. एक काळ असा होता की, तुमचा हा दाहोद जिल्हाही त्यातच होता आणि आता तर, आपला दाहोद जिल्हा, दाहोद शहर, स्मार्ट सिटीसाठी स्वप्ने पाहून पुढे वाटचाल करत आहे. 'आकांक्षी जिल्ह्यां'च्या विश्वातही दाहोदने आपला झेंडा फडकवला आहे. दाहोद शहराचा कायापालट होत आहे, येथे स्मार्ट सुविधा निर्माण होत आहेत.

मित्रांनो,

आपले साऊथ, दाहोद ज्याच्या अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या खूप जुनी आहे.आज शेकडो किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकून पाणी पोहोचवण्याचे काम सुरू आहे. नर्मदा नदीचे पाणी घरोघरी पोहोचावे यासाठी काम सुरू आहे. गेल्या वर्षी उमरगामपासून अंबाजीपर्यंत 11 लाख एकर जमीन सिंचनाखाली आणली आहे आणि त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी खूप मोठी मदत झाली आहे, ते तीन-तीन पिके घेत आहेत.

बंधूंनो आणि भगिनींनो,

येथे येण्यापूर्वी मी वडोदरा येथे होतो. तिथे हजारोच्या संख्येने माता-भगिनी उपस्थित होत्या. त्या सर्व भगिनी, देशाचे आणि आपल्या सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी तिथे पोहोचल्या होत्या. त्यांनी या पवित्र कार्यासाठी मला निमित्त केले, यासाठी मी आपल्या मातृशक्तीला नमन करतो. येथे दाहोदमध्येही आपण सर्वांनी, माता-भगिनींनी, हातात तिरंगा झेंडा घेऊन 'ऑपरेशन सिंदूर'साठी आपले भरभरून आशीर्वाद दिले आहेत. दाहोदची ही भूमी तपश्चर्या आणि त्यागाची भूमी आहे. असे म्हणतात की, इथेच दुधिमती नदीच्या काठी महर्षी दधिचींनी सृष्टीच्या रक्षणासाठी देहाचा त्याग केला होता. ही ती भूमी आहे, जिने क्रांतीवीर तात्या टोपेंना संकटाच्या वेळी मदत केली होती. मानगड धाम इथून फार दूर नाही, मानगड धाम गोविंद गुरुंच्या शेकडो आदिवासी सेनानींच्या बलिदानाचे प्रतीक आहे. म्हणजेच हा प्रदेश, भारतमातेच्या, मानवतेच्या रक्षणासाठी आपले तप आणि त्याग दर्शवतो. जर आपल्या भारतीयांवर अशा प्रकारचे संस्कार असतील, तर विचार करा, जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जे काही केले, त्यावर भारत गप्प बसू शकतो का? मोदी गप्प बसू शकतात का? जेव्हा कोणी आपल्या बहिणींचे कुंकू पुसून टाकेल, तेव्हा त्याचे अस्तित्व पुसले जाणेही निश्चित आहे. आणि म्हणूनच, ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी कारवाई नाही, तर ही आपल्या भारतीयांच्या संस्कारांची, आपल्या भावनांची अभिव्यक्ती आहे. दहशत पसरवणाऱ्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की, मोदींशी मुकाबला करणे किती कठीण असते.

तिरंगा फडकवत राहा, तिरंग्याची प्रतिष्ठा, मान-मर्यादेचा, जरा विचार करा, मुलांसमोर वडिलांना गोळ्या घातल्या गेल्या.आजही ती दृश्ये पाहिली की रक्त उसळते. दहशतवाद्यांनी 140 कोटी भारतीयांना आव्हान दिले होते, म्हणूनच मोदींनी तेच केले, ज्यासाठी देशवासियांनी, आपण मला प्रधानसेवकाची जबाबदारी दिली आहे. मोदींनी आपल्या तिन्ही सेनादलांना मोकळीक दिली आणि आपल्या शूरवीरांनी ते करून दाखवले, जे जगाने गेल्या अनेक दशकांपासून पाहिले नव्हते.

आम्ही सीमेपलीकडून चालवले जाणारे दहशतवादाचे 9 सर्वात मोठे तळ शोधून काढले, त्यांचे स्थान निश्चित केले आणि 22 तारखेला त्यांनी जो खेळ केला होता, 6 तारखेच्या रात्री 22 मिनिटांत आम्ही त्यांना मातीत गाडले. भारताच्या या कारवाईने बिथरून जेव्हा पाकिस्तानी सैन्याने दुस्साहस दाखवले, तेव्हा आपल्या सैन्याने पाकिस्तानी फौजेलाही धूळ चारली. मला सांगण्यात आले आहे की, या ठिकाणी देखील आपले निवृत्त सैनिक मोठ्या संख्येने आले आहेत, ते आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत, मी त्यांनाही सलाम करतो. मी दाहोदच्या या तपोभूमीतून पुन्हा एकदा देशाच्या सैन्याच्या शौर्याला नमन करतो.

मित्रांनो,

फाळणीनंतर ज्या देशाचा जन्म झाला, त्याचे एकमेव लक्ष्य भारताशी शत्रुत्व राखणे, भारताचा द्वेष करणे, भारताचे नुकसान करणे हे आहे. पण भारताचे लक्ष्य आपल्या देशातील गरिबी दूर करणे, आपली अर्थव्यवस्था मजबूत करणे, स्वतःला विकसित बनवणे हे आहे. विकसित भारताची निर्मिती तेव्हाच होईल, जेव्हा भारताची सैन्यदलेही मजबूत होतील आणि आपली अर्थव्यवस्थाही दमदार होईल. आम्ही याच दिशेने सतत काम करत आहोत.

मित्रांनो,

दाहोदमध्ये खूप सामर्थ्य आहे. आजचा कार्यक्रम तर केवळ त्याची एक झलक आहे. माझा तुम्हा सर्व कष्टकरी सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे, देशवासियांवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही या नवीन सुविधांचा पुरेपूर उपयोग करा आणि दाहोदला देशातील सर्वात विकसित जिल्ह्यांपैकी एक बनवा. याच विश्वासाने मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो. 'ऑपरेशन सिंदूर'च्या सन्मानार्थ उभे राहून तिरंगा फडकवा, सर्वच्या सर्व उभे राहून तिरंगा फडकवा आणि माझ्यासोबत बोला -

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय !

भारत माता की जय चा घोष बंद होता कामा नये.

S.Tupe/R.Agashe/M.Pange/V.Joshi/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2131638)