पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 व्या नागरी सेवा दिनी केलेले भाषण

Posted On: 21 APR 2025 10:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 एप्रिल 2025

 

मंत्रिमंडळातले माझे सहकारी डॉ जितेंद्र सिंह जी, शक्तीकांत दास जी,डॉ. सोमनाथ जी, इतर वरिष्ठ अधिकारी वर्ग, देशभरातून जोडले गेलेले नागरी सेवेतील  सर्व मित्र, महिला आणि सद्गृहस्‍थ,

मित्रहो,

नागरी सेवा दिनाच्या आपणा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा ! यावर्षीचा नागरी सेवा दिन अनेक कारणांनी खास आहे. या वर्षी आपण आपल्या राज्यघटनेची 75 वर्षे साजरी करत आहोत आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीचे हे वर्ष आहे. 21 एप्रिल 1947 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांनी तुमच्यासारख्‍या नागरी सेवेमध्‍ये असलेल्या या वर्गाला ‘भारताची पोलादी चौकट’ असे संबोधले होते. त्यांनी स्वतंत्र भारताच्या  सनदी सेवांसाठी  नवा आदर्श ठरवला होता. एक असा सनदी सेवक जो राष्ट्र सेवा हेच आपले सर्वोत्तम कर्तव्य मानतो. जो लोकशाही पद्धतीने प्रशासन चालवतो. ज्याच्याकडे  प्रामाणिकपणा   तसेच शिस्त आणि समर्पण भावना  ओतप्रोत आहे. जो देशाने ठरवलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अहोरात्र  काम करतो. आज विकसित भारताचा संकल्प  घेऊन आपण आगेकूच करत असताना, सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा दृष्टिकोन अधिकच समर्पक ठरतो. सरदार साहेबांच्या दूरदृष्टीला मी नमन करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

मित्रहो,  

आजच्या भारताला येत्या एक हजार वर्षांची मजबूत पाया भरणी करायची आहे, असे मी काही दिवसांपूर्वी लाल किल्ल्यावरून सांगितले होते. त्या दृष्टीने पाहिल्यास एक हजार वर्षांच्या सहस्त्रकाची पहिली 25 वर्षे  झाली आहेत. नव्या शताब्दीचे हे 25 वे वर्ष आहे आणि नव्या ‘मिलेनियम’  म्हणजेच नव्या सहस्त्रकाचेही हे 25 वे वर्ष आहे. आम्ही आज ज्या धोरणांवर काम करत आहोत,  जे  निर्णय घेत आहोत, ते एक हजार वर्षांचे भविष्य घडवणार आहेत.

आपल्या पुराणात म्हटले आहे,

यथा हि एकेन चक्रेण न रथस्य गतिर्भवेत्।

एवं पुरूषकारेण विना दैवं न सिध्यति॥

याचा अर्थ असा आहे की, रथ एका चाकावर चालू शकत नाही त्याच प्रकारे परिश्रमाशिवाय केवळ नशिबावर विसंबून यश प्राप्त होत नाही. विकसित भारताचे आमचे लक्ष्य साध्य करण्यासाठीही विकास रथाचे प्रत्येक चाक फिरते ठेवले पाहिेजे,  कटीबद्ध होत दर दिवशी, क्षणोक्षणी या लक्ष्यासाठी काम करायचे आहे, लक्ष्य प्राप्तीसाठी जगायचे आहे, आयुष्य वेचायचे आहे.

मित्रहो,

अवघे जग झपाट्याने बदलत असल्याचे आपण पाहत आहोत. आपल्या कुटुंबातही आपण पहात असाल दहा -पंधरा वर्षाच्या मुलाशी बोलत असताना आपल्याला आपण कालबाह्य झाल्याचे जाणवते. कारण काळ अतिशय झपाट्याने बदलत आहे. दर 2-3 वर्षामध्ये  उपकरणे बदलत आहेत. आपण शिकेपर्यंत, समजून घेईपर्यंत आणखी नवी उपकरणे दाखल झालेली असतात. घरातली छोटी-छोटी मुले झपाट्याने होणाऱ्या या बदलांसह वाढत आहेत.  त्यामुळेच आता आपले प्रशासन, आपले कामकाज, धोरण आखणी जुन्या मार्गांनी चालू शकत नाही. म्हणूनच 2014 नंतर देशामध्ये  व्यवस्था परिवर्तनाचा एक महायज्ञ सुरु झाला आहे. या वेगासमवेत आपण स्वतःला जुळवून घेत आहोत. आज भारताचा आकांक्षी समाज,भारताचा युवावर्ग, भारताच्या महिला, त्यांच्या स्वप्नांची भरारी खरोखरच अभूतपूर्व आहे. या अभूतपूर्व आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी अभूतपूर्व वेगही आवश्यक आहे. येत्या काळात भारत अनेक मोठ्या परिवर्तनातून जाईल. उर्जा सुरक्षिततेशी संबंधित लक्ष्य,स्वच्छ ऊर्जेशी जोडलेली लक्ष्य,क्रीडा जगतापासून ते अंतराळापर्यंत अशी अनेक लक्ष्य, प्रत्येक क्षेत्रात देशाची कीर्ती नव्या उंचीवर न्यायची आहे. हे जेव्हा मी बोलतो त्यावेळी आणि  देश असा विचार करतो त्‍यावेळी,  प्रत्येकाचे लक्ष तुमच्यावर आहे, विश्वास आहे, माझ्या या मित्रांवर मोठे दायित्व आहे. आपल्याला लवकरात लवकर भारताला जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे आणायचे आहे. याला विलंब होता कामा नये,  हे आपणा सर्वाना सुनिश्चित करायचे आहे.

मित्रहो,

या वर्षीच्या नागरी सेवा दिनाची संकल्पना, ‘भारताचा समग्र विकास’  अशी आहे याचा मला आनंद आहे. ही केवळ एक संकल्पना नाही तर ही आमची कटिबद्धता आहे, देशाच्या जनतेला दिलेले वचन आहे, ‘देशाचा समग्र विकास’ म्हणजे विकासाच्या वाटचालीत कोणतेही गाव, कोणतेही कुटुंब, कोणताही नागरिक मागे राहणार नाही. खरी प्रगती याचा अर्थ,  छोटे –छोटे बदल नव्हे तर व्यापक प्रभाव घडवणारे बदल. घरोघरी स्वच्छ पाणी, प्रत्येक घरातल्या मुलांना दर्जेदार शिक्षण, प्रत्येक उद्योजकाला आर्थिक पाठबळ आणि प्रत्येक गावाला डिजिटल अर्थव्यवस्थेचा  लाभ या बाबी समग्र विकासात   येतात,केवळ योजना सुरु करून प्रशासन दर्जेदार होत नाही तर एखादी योजना सर्व पात्र लाभार्थीपर्यंत पोहोचली का, वास्तवात तिचा परिणाम किती झाला यावर  ते अवलंबून असते. आज राजकोट असो, गोमती असो, तिनसुकिया असो, कोरापुट असो अशा अनेक जिल्ह्यात आपण हा प्रभाव अनुभवत आहोत. शाळेतली उपस्थिती वाढविण्यापासून ते सौर उर्जेपर्यंत अनेक जिल्ह्यांनी उत्तम कामगिरी केली आणि जे उद्दिष्ट ठेवले होते ते साध्य केले आणि त्यापैकी काही जिल्ह्यांना आज पुरस्कार देण्यात आले आहेत. या सर्व योजनेशी संबंधित वर्गाचे आणि या सर्व जिल्ह्यांचे मी विशेष अभिनंदन करतो.

मित्रहो,

छोट्या छोट्या आणि हळू-हळू होणाऱ्या बदलांना मागे टाकत गेल्या दहा वर्षात भारताने प्रभावशाली  परिवर्तनाचा प्रवास अनुभवला आहे. आज भारत प्रशासनिक मॉडेल, अद्ययावत सुधारणा यांवर लक्ष केंद्रित करत आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवोन्मेष आणि नवोन्मेषी  कल्पनांद्वारे सरकार आणि नागरिक यांच्यातले अंतर आम्ही समाप्त करत आहोत. ग्रामीण आणि शहरी भागांसह दुर्गम प्रदेशातही याचा प्रभाव आपल्याला  दिसत आहे. आपल्यासमवेत आकांक्षी जिल्ह्यांबाबत अनेकदा चर्चा झाली मात्र आकांक्षी तालुक्यांचेही यश तितकेच उत्तम आहे. दोन वर्षांपूर्वी, जानेवारी 2023 मध्ये हा कार्यक्रम सुरु झाला होता हे आपल्याला माहीतच आहे. फक्त दोन वर्षांमध्ये या तालुक्यांनी जे परिवर्तन दर्शवले आहे ते अभूतपूर्व आहे. या तालुक्यांमध्ये आरोग्य, पोषण,सामाजिक विकास,आणि पायाभूत सुविधांच्या अनेक परिमाणांमध्ये   उत्तम प्रगती झाली आहे काही ठिकाणी तर राज्यांच्या सरासरीच्या ते पुढे गेले आहेत.राजस्थानमधल्या टोंक जिल्ह्यातला पिपलू तालुक्यात दोन वर्षांपूर्वी आंगणवाडी केंद्रांमधल्या मुलांची गणन क्षमता केवळ 20 टक्के होती आता ती 99 टक्क्याहूनही जास्त झाली आहे.

बिहारमधील भागलपूरमध्ये जगदीशपूर तालुका आहे. तिथे, पहिल्या तिमाहीत गर्भवती महिलांची नोंदणी पूर्वी फक्त 25 टक्के होती. आता ही नोंदणी 90 टक्क्यांहून अधिक झाली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील मारवाह तालुक्यात संस्थात्मक प्रसूती पूर्वी 30 टक्के होत्या, ज्या आता 100 टक्के झाल्या आहेत. झारखंडच्या गुर्डी तालुक्यात, नळाव्दारे पेयजल घरापर्यंत पोहोचवण्याचे प्रमाण  18 टक्क्यांवरून 100 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. हे फक्त आकडे नाहीत, तर शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याच्या आमच्या संकल्पाची पूर्तता दर्शवतात. हे आकडे  दाखवून देतात की योग्य हेतू, योग्य नियोजन आणि योग्य अंमलबजावणीसह, दुर्गम भागातही इच्छित बदल शक्य आहे.

मित्रहो,

गेल्या 10 वर्षांत, भारताने अनेक परिवर्तनकारी बदल करून दाखवले आहेत. यशाची नवी उंची गाठली आहे. आज, भारत केवळ त्याच्या विकासासाठीच ओळखला जात नाही तर तो प्रशासन, पारदर्शकता आणि नवोन्मेष यामध्येही नवीन मापदंड स्थापित करत आहे.

जी 20 अध्यक्षपद हे देखील याचे एक उदाहरण आहे. 60 हून अधिक शहरांमध्ये 200 हून अधिक बैठका झाल्या, जी- 20 च्या इतिहासात पहिल्यांदाच इतका मोठा आणि समावेशक कार्यक्रम झाला आणि हाच तर  समग्र दृष्टिकोन आहे. सार्वजनिक सहभागाच्या दृष्टिकोनामुळे ते इतर देशांपेक्षा 10-11 वर्षे पुढे आहेत. गेल्या 11 वर्षांत, आम्ही विलंब प्रणाली दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही नवीन प्रक्रिया तयार करत आहोत, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम पूर्ण करण्यासाठी लागणारा अवधी कमी करत आहोत. व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी, आम्ही 40 हजारांहून अधिक अनुपालन रद्द केले आहेत, आम्ही 3,400 हून अधिक कायदेशीर तरतुदींना गुन्हेगारीमुक्त केले आहे. मला आठवते, जेव्हा आम्ही अनुपालनाचे ओझे कमी करण्यासाठी काम करत होतो, जेव्हा आम्ही व्यवसायादरम्यान झालेल्या काही चुकांना गुन्हेगारीमुक्त करत होतो, तेव्हा काही कोपऱ्यांमध्ये निषेधाचे आवाज ऐकू येत होते,  याचे मला आश्चर्य वाटले. बरेच लोक म्हणायचे "आजपर्यंत हे घडले नाही, तुम्ही ते का करत आहात? चाललाय ते चालू द्या, त्यामुळे तुम्हाला काय फरक पडतो? अनुपालन होऊ द्या, तुम्ही तुमचे काम का वाढवत आहात? सर्वत्र चर्चा सुरू होत्या, उत्तरे येत होती पण जे ध्येय साध्य करायचे होते त्या ध्येयाचा दबाव या दबावांपेक्षा जास्त होता आणि म्हणूनच, दबावाच्या दडपणाखाली न अडकता, आम्ही ध्येयाच्या दिशेने  वाटचाल करू लागलो. जर आपण मळलेल्या वाटेने गेलो तर नवीन निकाल मिळवणे आपल्यासाठी कठीण होईल. जेव्हा आपण काहीतरी वेगळे करू, तेव्हाच आपल्याला वेगळे निकाल मिळतील. आणि आज, याच विचारसरणीमुळे, आमच्या व्यवसाय सुलभतेच्या क्रमवारीत खूप सुधारणा झाली आहे. आज जग भारतात गुंतवणूक करण्यास खूप उत्सुक आहे, आणि संधी अजिबात जावू न देणे, न दवडणे  हे आमचे काम आहे, आम्हाला या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. आम्हाला राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर लाल फितीचा कारभार केला जाईल की काय,  याची प्रत्येक शक्यता दूर करावी लागेल. तरच तुम्ही राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर तुमचे ध्येय साध्य करू शकणार आहे.

मित्रहो,

गेल्या 10-11 वर्षात देशाने मिळवलेल्या यशामुळे विकसित भारताचा पाया खूप मजबूत झाला आहे. आता देश या मजबूत पायावर विकसित भारताची भव्य इमारत बांधण्यास सुरुवात करत आहे. पण निर्मितीच्या या प्रक्रियेत आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत. भारत आता जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश बनला आहे. अशा परिस्थितीत, मूलभूत सुविधांची पूर्तता ही आपल्यासाठी प्राधान्याची बाब असली पाहिजे. तुम्हाला नेहमीच शेवटच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी खूप लक्ष केंद्रित करावे लागेल. काळानुसार, देशवासीयांच्या गरजा आणि आकांक्षा दोन्ही वेगाने बदलत आहेत. आता नागरी सेवेला समकालीन आव्हानांनुसार स्वतःला जुळवून घ्यावे लागेल, तरच ती प्रासंगिक राहू शकेल. आपल्याला दररोज स्वतःसाठी नवीन मानके प्रस्थापित करत रहावे लागेल आणि प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण होत रहावे लागेल. आणि स्वतःला आव्हान देत राहणे ही यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. काल मी जे केले ते समाधानासाठी नव्हते, काल मी जे साध्य केले ते आव्हानाचे कारण राहिले पाहिजे, जेणेकरून मी उद्या अधिक करू शकेन. आता आपण फक्त मागील सरकारांशी तुलना करून आपले काम आणि आपली कामगिरी ठरवू शकत नाही. माझ्या आधीच्या जिल्ह्यात एक व्यक्ती होता. त्याने इतकं केलं आणि मी इतकं केलं अशी तुलना न करता, आता आपल्याला स्वतःचे ध्येय निश्चित करायचे आहे. 2047 पर्यंत विकसित भारताच्या ध्येयापासून आपण किती दूर आहोत? आपण किती पुढे पोहोचलो आहोत याचा हिशेब ठेवण्याची वेळ आता संपली आहे. आपण जिथे आहोत तिथून आपल्याला जिथे जायचे आहे तिथपर्यंत किती अंतर शिल्लक आहे, ते अंतर पार करण्यासाठी माझा पथदर्शक कार्यक्रम  काय आहे, माझा वेग काय आहे आणि मी इतरांपेक्षा 2047 पर्यंत लवकर  कसे पोहोचू शकतो आणि सर्व लक्ष्ये कशी साध्य करू शकतो, हेच आपले स्वप्न आहे, हाच आपला उद्देश आहे, हेच आपले ध्येय असले पाहिजे.

प्रत्येक क्षेत्रात आपण ठरवलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपला सध्याचा वेग पुरेसा आहे का हे आपल्याला आजमावे लागेल. आपला कामाचा वेग पुरेसा नसल्यास आपल्याला तो वाढवावा लागेल. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की,  आज आपल्याकडे असलेले तंत्रज्ञान पूर्वी अस्तित्वात नव्हते. आपल्याला तंत्रज्ञानाच्या ताकदीने वाटचाल करायची आहे. गेल्या 10 वर्षांत आम्ही गरिबांसाठी 4 कोटी घरे बांधली आहेत, पण आता 3 कोटी नवीन घरे बांधण्याचे लक्ष्य आमच्यासमोर आहे. आम्ही 5-6 वर्षांत 12 कोटींहून अधिक ग्रामीण घरांना नळ जोडणी दिली आहे. आता आपल्याला गावातील प्रत्येक घराला लवकरात लवकर नळ जोडणी द्यावी लागेल. गेल्या 10 वर्षांत आम्ही गरिबांसाठी 11 कोटींहून अधिक शौचालये बांधली आहेत. आता, आपल्याला कचरा व्यवस्थापनाशी संबंधित नवीन उद्दिष्टे लवकरात लवकर साध्य करायची आहेत. कोट्यवधी गरीब लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील याची कधी कोणी कल्पनाही केली नसेल. आता आपल्याला देशवासियांमध्ये पोषणाबाबत नवीन संकल्प साध्य करायचे आहेत. आपले फक्त एकच ध्येय असले पाहिजे, 100 टक्के कव्हरेज, 100 टक्के प्रभाव, या दृष्टिकोनामुळे 10 वर्षांत 25 कोटी लोकांना दारिद्रयमुक्त केले आहे. या दृष्टिकोनामुळे भारत पूर्णपणे गरिबीतून मुक्त होईल.

मित्रहो,

एक काळ असा होता जेव्हा नोकरशाहीची भूमिका नियामकासारखी होती, जी औद्योगिकीकरण आणि उद्योजकतेच्या गतीवर नियंत्रण ठेवत असे. देश या विचारसरणीतूनही बाहेर पडला आहे.

आज आपण असे वातावरण तयार करत आहोत, जे नागरिकांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देईल आणि त्यांना प्रत्येक अडथळा पार करायला सहाय्य करेल. त्यासाठी नागरी सेवेने सक्षम बनवणारे व्हावे लागेल. केवळ नियमपुस्तिकेचे रक्षक म्हणून नव्हे, तर विकासाला सहाय्य करणारे म्हणूनही आपल्याला स्वत:चा विस्तार करावा लागेल. मी तुम्हाला एमएसएमई क्षेत्राचे उदाहरण देईन. तुम्हाला माहिती आहे की, देशाने ‘मिशन मॅन्युफॅक्चरिंग’ सुरू केले आहे. त्याच्या यशाचा एक मोठा आधार म्हणजे आपले एमएसएमई क्षेत्र. आज जगात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर आपल्या एमएसएमई, स्टार्टअप आणि युवा उद्योजकांसाठी एक अभूतपूर्व ऐतिहासिक संधी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जागतिक पुरवठा साखळीत आपण अधिक स्पर्धात्मक होणे गरजेचे आहे. एमएसएमईची स्पर्धा केवळ छोट्या उद्योजकांशी नाही, हेही आपण लक्षात ठेवायला हवे. ते संपूर्ण जगाशी स्पर्धा करत आहेत. जर एखाद्या छोट्या देशातील उद्योगाकडे आपल्यापेक्षा अधिक चांगली अनुपालन सुलभता असेल, तर तो देश आपल्या देशातील स्टार्टअपशी अधिक जोरदार स्पर्धा करेल. त्यामुळे ‘ग्लोबल बेस्ट प्रॅक्टिसेस’ मध्ये आपण कुठे आहोत, याकडे सातत्याने लक्ष द्यावे लागेल. जगात सर्वोत्तम उत्पादन तयार करणे हे भारताच्या उद्योगाचे उद्दिष्ट असेल तर, भारतातील नोकरशाहीचे उद्दिष्ट जगात सर्वोत्कृष्ट अनुपालन सुलभ वातावरण उपलब्ध करून देणे, हे असायला हवे.

मित्रहो,

आजच्या तंत्रज्ञानाधारित जगात नोकरदारांकडे अशी कौशल्य असायला हवीत, जी त्यांना केवळ तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी उपयोगी ठरणार नाहीत, तर स्मार्ट आणि सर्वसमावेशक प्रशासनासाठीही ते त्याचा वापर करू शकतील. 'तंत्रज्ञानाच्या युगात प्रशासन म्हणजे व्यवस्थांचे व्यवस्थापन नसून, शक्यता वाढवणे, हे आहे.” आपल्याला तंत्रज्ञान स्नेही व्हावे लागेल, जेणेकरून प्रत्येक धोरण आणि योजना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक कार्यक्षम आणि सहज उपलब्ध  करता येईल. आपल्याला डेटा-चालित निर्णय प्रक्रियेत तज्ञ व्हावे लागेल, जेणेकरून धोरण आखणी आणि अंमलबजावणी अधिक अचूक होऊ शकेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम प्रज्ञा) आणि क्वांटम फिजिक्स किती वेगाने विकसित होत आहेत हे सध्या आपण पाहत आहात. लवकरच तंत्रज्ञानाच्या वापरात नवी क्रांती होणार आहे. ते त्या डिजिटल आणि माहिती युगाच्या कितीतरी पुढे असेल, ज्यांच्याशी आपण आज परिचित आहात, त्यापेक्षा पुढील तंत्रज्ञान क्रांतीसाठी स्वत:ला तयार करावे लागेल, संपूर्ण यंत्रणा तयार करण्याची यंत्रणाही विकसित करावी लागेल. जेणेकरून आपण नागरिकांना उत्तम सेवा देऊ शकू आणि त्यांच्या आकांक्षाही पूर्ण करू शकू. आपल्याला नागरी सेवकांची क्षमता वाढवावी लागेल जेणेकरून आपल्याला भविष्यासाठी सज्ज नागरी सेवा तयार करता येतील. आणि म्हणून मिशन कर्मयोगी आणि नागरी सेवा क्षमता विकास कार्यक्रम, आणि मी नुकतेच जे नमूद केले आहे, ते दोन्ही माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत, असे मी समजतो.

मित्रहो.

झपाट्याने बदलणाऱ्या काळात आपल्याला जागतिक आव्हानांवरही बारकाईने लक्ष ठेवायचे आहे. आजही अन्न, पाणी आणि ऊर्जा सुरक्षा हे एक मोठे आव्हान आहे, हे आपण पाहू शकता. विशेषतः ‘ग्लोबल साउथ’साठी हे एक मोठे संकट आहे. दीर्घकाळ सुरू असलेल्या संघर्षामुळे अनेक देशांमध्ये परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. त्याचा परिणाम लोकांवर होतो, दैनंदिन जीवनावर होतो. देशांतर्गत आणि बाहेरील जगातील समस्या यामधील वाढता परस्परसंबंध लक्षात घेता, आपल्याला आपल्या पद्धती आणि धोरणांमध्ये बदल करावा लागेल, आपल्याला पुढे जावे लागेल. हवामान बदल असो, नैसर्गिक आपत्ती असो, साथीचे आजार असोत, सायबर गुन्ह्यांचा धोका असो, यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी भारताला जगाच्या 10 पावले पुढे राहावेच लागेल. आपल्याला स्थानिक पातळीवर रणनीती आखावी लागेल, लवचिकता वाढवावी लागेल.

मित्रहो,

मी लाल किल्ल्यावरून पंच प्रणांबद्दल बोललो आहे. विकसित भारताचा संकल्प, गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्ती, आपल्या वारशाचा अभिमान, एकतेची शक्ती आणि कर्तव्यांचे प्रामाणिक पालन करा. आपण या पंच प्रणांचे प्रमुख वाहक आहात. प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा सोयीपेक्षा सचोटीला, जडत्वापेक्षा नवोन्मेषाला किंवा पदापेक्षा सेवेला प्राधान्य देता, तेव्हा तुम्ही देशाला पुढे घेऊन जाता. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आज जे तरुण अधिकारी आपल्या व्यावसायिक प्रवासात पाउल ठेवत आहेत, त्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो, की समाजात असे कोणीही नसते ज्याच्या जीवनात आणि यशात समाजाचे काहीच योगदान नसते. समाजाच्या योगदानाशिवाय कुणालाही एक पाऊलही पुढे जाणे अवघड आहे. म्हणूनच प्रत्येकाला आपापल्या क्षमतेनुसार समाजाचे देणे परत करायचे असते. तुम्ही सर्वजण तर अत्यंत भाग्यवान आहात, समाजाची परतफेड करण्याची एवढी मोठी संधी तुम्हाला मिळाली आहे. तुम्हाला देशाने आणि समाजाने मोठी संधी दिली आहे, तुम्ही समाजाला शक्य तितके परत द्या.

मित्रहो,

नागरी सेवकांच्या सुधारणांची नव्याने कल्पना करण्याची हीच वेळ आहे. आपल्याला सुधारणांचा वेग वाढवावा लागेल, प्रमाणही वाढवावे लागेल. पायाभूत सुविधा असोत, नवीकरणीय ऊर्जेचे उद्दिष्ट असो, अंतर्गत सुरक्षा असो, भ्रष्टाचार संपवण्याचे आमचे उद्दिष्ट असो, समाजकल्याणाच्या योजना असोत, ऑलिंपिक, खेळांशी संबंधित उद्दिष्ट असोत, आपल्याला प्रत्येक क्षेत्रात नव्या सुधारणा करायच्या आहेत, आपण आतापर्यंत जे काही साध्य केले आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक यश मिळवायचे आहे. आणि हे सर्व करताना आपल्याला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे, जग कितीही तंत्रज्ञानाधारित झाले, तरी मानवी निर्णय क्षमतेचे महत्त्व आपण कधीही विसरता कामा नाही. संवेदनशील रहा, गरीबांचा आवाज ऐका, गरीबांच्या समस्या जाणून घ्या, त्यांचे निराकरण करण्याला प्राधान्य द्या, ज्याप्रमाणे अतिथी देवो भव आहे, त्याचप्रमाणे ‘नागरिक देवो भव’ या मंत्राचा जप करीत  आपल्याला पुढे जायचे आहे. तुम्हाला केवळ भारताचे प्रशासकीय अधिकारी म्हणून नव्हे, तर विकसित भारताचे शिल्पकार, म्हणूनही जबाबदारी पार पडण्यासाठी स्वत:ला तयार करावे लागेल.

एक वेळ होती, जेव्हा तुम्ही नागरी सेवक बनलात, नागरी सेवक म्हणून पुढे गेलात आणि आजही नागरी सेवक म्हणून सेवा बजावत आहात. पण मित्रहो, आता काळ बदलला आहे, येणाऱ्या काळातील भारत कसा असेल, ही कल्पना करून, देशाच्या 140 कोटी नागरिकांच्या डोळ्यांमधील स्वप्ने पाहून मी असे म्हणत आहे की, तुम्ही केवळ प्रशासकीय अधिकारी नाही, तर तुम्ही नव्या भारताचे शिल्पकार आहात. शिल्पकाराची ती जबाबदारी पार पडण्यासाठी स्वतःला सक्षम बनवा, आपल्या ध्येयपूर्ती साठी वेळ द्या, प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न हे  स्वत:चे स्वप्न मानून जागा, तुम्हाला विकसित भारत साकारताना पाहायला मिळेल. आज मी हे व्याख्यान देत असताना माझे लक्ष तिथे बसलेल्या एका चिमुकली कडे गेले, कदाचित 2047 मध्ये ती या सभागृहात बसली असेल. अशीच आपली स्वप्ने हवीत, विकसित भारताचे हेच आपले उद्दिष्ट असायला हवे. अनेक-अनेक शुभेच्छा ! खूप खूप धन्यवाद !

 

* * *

S.Bedekar/Nilima/Vasanti/Rajshree/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2123460)