पंतप्रधान कार्यालय

नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे आयोजित इंटरपोलच्या 90 व्या महासभेला पंतप्रधानांनी केले संबोधित


"स्थानिक कल्याणासाठी जागतिक सहकार्य हेच आमचे आवाहन"

“जे आपल्याजवळ नाही ते मिळवण्यासाठी ,आपल्याकडे जे आहे त्याचे संरक्षण करण्यासाठी , आपण जे संरक्षित केले आहे ते वाढवण्यासाठी आणि सर्वात योग्य व्यक्तींना ते वितरीत करण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी सहाय्यक ”

"आपली पोलीस दले केवळ लोकांचे रक्षणच करत नाहीत तर आपल्या लोकशाहीची सेवा देखील करतात"

“जेव्हा धोका जागतिक असतो , तेव्हा प्रतिसाद केवळ स्थानिक असू शकत नाही ! या धोक्यांवर मात करण्यासाठी जगाने एकत्र येण्याची वेळ आली आहे.

" दहशतवादी आणि गुन्हेगारांची सुरक्षित आश्रयस्थाने नष्ट करण्यासाठी जागतिक समुदायाने आणखी वेगाने काम करण्याची गरज "

"संवाद, सहयोग आणि सहकार्याने गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि दहशतवादाचा पराभव करू या "

Posted On: 18 OCT 2022 6:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18  ऑक्टोबर  2022

नवी दिल्लीतील प्रगती मैदान  येथे आयोजित इंटरपोलच्या  90 व्या  महासभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.

महासभेत उपस्थितांना  संबोधित करताना, पंतप्रधानांनी नवी दिल्लीत आयोजित  इंटरपोलच्या 90 व्या  महासभेच्या निमित्ताने सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत केले.भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असून हा  जनतेचा  आणि संस्कृतींचा उत्सव आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. 2023 मध्ये इंटरपोल आपल्या स्थापनेची 100 वर्षे साजरी करणार असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली.ही एक सिंहावलोकनाची  वेळ आहे तसेच भविष्य ठरवण्याची वेळ आहे, असे त्यांनी सांगितले.  आनंद व्यक्त करण्याची  आणि चिंतन करण्याची, अडथळ्यांमधून  शिकण्याची आणि  भविष्याकडे आशेने पाहण्याची ही उत्तम वेळ आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

भारतीय संस्कृतीशी इंटरपोलच्या  तत्त्वज्ञानाचा संबंध पंतप्रधानांनी अधोरेखित केला आणि "आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः ·" या वेदातील उद्धृतांचा संदर्भ  देत 'पोलिसांना सुरक्षित जगाशी जोडणे' या इंटरपोलच्या ब्रीदवाक्यातील साम्य अधोरेखित केले. म्हणजेच, सर्व दिशांमधून उदात्त विचार येऊ द्या, हे  जगाला एक चांगले स्थान बनवण्यासाठी सार्वत्रिक सहकार्याचे आवाहन  असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमांमध्ये  शूर पुरुष आणि महिलांना पाठवण्यात भारत हा एक सर्वोच्च योगदानकर्ता आहे, असे भारताच्या  जागतिक दृष्टिकोनावर भाष्य करताना पंतप्रधानांनी अधोरिखित केले. "भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आम्ही जगाला एक चांगले स्थान बनवण्यासाठी बलिदान दिले.", असे मोदी यांनी सांगितले. जागतिक युद्धांमध्ये हजारो भारतीयांनी बलिदान दिले आहे, असे ते म्हणाले. कोणत्याही संकटात पुढाकार घेण्यासाठीची सज्जता दर्शवली आहे, असे कोविड प्रतिबंधक लस आणि हवामान उद्दिष्टांबद्दल  बोलताना पंतप्रधानांनी सांगितले. ज्यावेळी देश  आणि समाज अंतर्मुख होताना दिसत  आहेत, तेव्हा भारताने अधिक आंतरराष्ट्रीय सहकार्याचे  आवाहन केले आहे. स्थानिक कल्याणासाठी जागतिक सहकार्य हेच आमचे आवाहन आहे, असे  मोदी म्हणाले.

जगभरातील पोलीस दल केवळ लोकांचे रक्षण करत नाहीत तर समाजकल्याणासाठी पुढे येत  आहेत. कोणत्याही संकटाला समाज देत असलेल्या  प्रतिसादात ते अग्रभागी असतात, असे पंतप्रधान मोदी  यांनी सांगितले. पंतप्रधानांनी कोविड संकटाचे उदाहरण देत  लोकांना मदत करण्यासाठी पोलिस कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालतात याकडे लक्ष वेधले."त्यांच्यापैकी अनेकांनी लोकांच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदानही दिले आहे ", असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी भारताची भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता अधोरेखित केली आणि भारताचा आकार आणि भव्यता यावर  भाष्य केले. "भारतीय पोलिस", "संघराज्य  आणि राज्य स्तरावर, 900 हून अधिक राष्ट्रीय आणि सुमारे दहा हजार राज्याचे कायदे लागू करण्यासाठी सहकार्य करतील .", असे त्यांनी सांगितले. आमची  पोलिस दले  संविधानातील  प्रतिज्ञेनुसार  लोकांच्या विविधतेचा आणि अधिकारांचा आदर राखून  काम करतात.ते केवळ लोकांचेच  रक्षण करत नाहीत तर आपल्या लोकशाहीची सेवा देखील करतात, असे ते म्हणाले. इंटरपोलने गेल्या 99 वर्षांपासून जगभरातील 195 देशांमधील पोलीस संघटनांना जोडले आहे आणि या गौरवशाली प्रसंगी भारत सरकार टपाल तिकीट आणि नाणे जारी करत आहे, असे इंटरपोलच्या कामगिरीबद्दल  बोलताना पंतप्रधानांनी सांगितले.

दहशतवाद, भ्रष्टाचार, अंमली पदार्थांची तस्करी, प्राण्यांची  शिकार आणि संघटित गुन्हेगारी यांसारख्या जगाला भेडसावणाऱ्या अनेक घातक जागतिक धोक्यांची पंतप्रधानांनी आठवण करून दिली.या धोक्यांच्या बदलाचा वेग पूर्वीपेक्षा वेगवान आहे.जेव्हा धोके जागतिक असतात तेव्हा प्रतिसाद केवळ  स्थानिक असू शकत नाही! या धोक्यांवर मात  करण्यासाठी जगाने एकत्र येण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी सांगितले.  आपल्याजवळ नाही ते मिळवण्यासाठी ,आपल्याकडे जे आहे त्याचे संरक्षण करण्यासाठी , आपण जे संरक्षित केले आहे ते वाढवण्यासाठी  आणि  सर्वात योग्य व्यक्तींना ते वितरीत करण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी सहाय्यकारी असल्याचे ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या दुष्कृत्यांवर  प्रकाश टाकत पंतप्रधान म्हणाले, की हे जगाने  ओळखण्यापूर्वीच भारत अनेक दशकांपासून याचा  मुकाबला करत आहे.आम्हाला सुरक्षा  आणि सुरक्षिततेची किंमत माहित होती. या लढ्यात आमच्या  हजारो लोकांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे असे मोदी यांनी सांगितले. दहशतवादाचा मुकाबला आता केवळ भौतिक स्तरावर केला जात नाही तर ऑनलाइन कट्टरतावाद आणि सायबर धोक्यांद्वारे तो वेगाने पसरत आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. एका बटणावर क्लिक करून हल्ला केला जाऊ शकतो किंवा यंत्रणांना गुडघे टेकायला लावू शकतो, हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.प्रत्येक देश याविरुद्ध रणनीती आखत आहे, पण आपण आपल्या  सीमेअंतर्गत  जे करतो ते आता पुरेसे नाही.असे सांगत पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय रणनीती आणखी विकसित करण्याच्या गरजेचा पुनरुच्चार केला. लवकर शोध घेणे आणि इशारा प्रणालीची स्थापना, वाहतूक सेवांचे संरक्षण, दळणवळणाच्या पायाभूत सुविधांसाठी सुरक्षा, महत्वाच्या  पायाभूत सुविधांसाठी सुरक्षा, तांत्रिक आणि तंत्रज्ञानाचे  सहाय्य, बुद्धिमत्तेची देवाणघेवाण आणि इतर विविध गोष्टी नव्या स्तरावर नेण्याचे त्यांनी यावेळी  सुचविले.

पंतप्रधानांनी यावेळी भ्रष्टाचाराचे धोके विशद केले.भ्रष्टाचार आणि आर्थिक गुन्ह्यांमुळे अनेक देशांतील नागरिकांच्या कल्याणाला हानी पोहोचली आहे, असे त्यांनी सांगितले. "भ्रष्ट", असे म्हणत त्यांनी सांगितले की, जगाच्या विविध भागांमध्ये गुन्ह्यांचे उत्पन्न स्रोत प्रतिबंधीत करण्यासाठी मार्ग शोधावे, हा पैसा ज्या देशातून घेतला गेला आहे त्या देशातील नागरिकांचा आहे. बर्‍याचदा, हा पैसा जगातील सर्वात गरीब लोकांकडून घेतला जातो.  शिवाय, हा पैसा अनेक घातक उपयोगांसाठी वापरा जातो.

 सुरक्षित आश्रयस्थाने  नष्ट करण्यासाठी जागतिक समुदायाने आणखी वेगाने काम करण्याची गरज आहे .भ्रष्टाचारी, दहशतवादी, अंमली पदार्थांची तस्करी , शिकार करणाऱ्या टोळ्या किंवा संघटित गुन्हेगारीसाठी सुरक्षित आश्रयस्थाने  असू शकत नाही, यावर पंतप्रधानांनी भर दिला. एका  ठिकाणचे  लोकांविरुद्धचे असे गुन्हे हे सर्वांविरुद्धचे गुन्हे आहेत, मानवतेविरुद्धचे गुन्हे आहेत, , असे त्यांनी सांगितले. पोलिस आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांनी सहकार्य वाढवण्यासाठी प्रक्रिया आणि नियम  तयार करणे आवश्यक आहे.फरार गुन्हेगारांसाठी रेड कॉर्नर नोटीस वेगाने जारी करून इंटरपोल यात मदत करू शकते, असे ते म्हणाले. एक सुरक्षा आणि सुरक्षित जग ही आपली  सामायिक जबाबदारी आहे. जेव्हा चांगल्या शक्ती सहकार्य करतात , तेव्हा गुन्हेगारी शक्ती कार्य करू शकत नाही. , असे पंतप्रधानांनी नमूद केले.

नवी दिल्लीतील राष्ट्रीय  पोलिस स्मारक  आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकाला  भेट देऊन  भारताला सुरक्षित ठेवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली  त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी उपस्थित सर्व मान्यवरांना केले.इंटरपोलची 90 वी महासभा गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी प्रभावी आणि यशस्वी व्यासपीठ ठरेल, अशी आशाही पंतप्रधानांनी व्यक्त केली."संवाद, सहयोग आणि सहकार्याने गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि दहशतवादाचा पराभव करूया", असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

कार्यक्रमस्थळी आल्यानंतर इंटरपोलच्या अध्यक्षांनी पंतप्रधानांचा कार्यकारी समितीशी परिचय करून दिला. त्यानंतर पंतप्रधानांसह  सामूहिक छायाचित्र काढण्यात आले आणि नंतर त्यांनी इंटरपोल शताब्दी स्टँडची पाहणी केली. त्यानंतर पंतप्रधानांनी फीत कापून राष्ट्रीय पोलिस वारसा प्रदर्शनाचे  उद्‌घाटन केले आणि हे प्रदर्शन पाहिले.

त्यांचे व्यासपीठावर आगमन होताच,पंतप्रधान आयटीबीपी जवानांच्या  तुकडीने केलेल्या मानवंदना संचलनाचे साक्षीदार झाले. यानंतर भारताचे राष्ट्रगीत आणि इंटरपोलचे राष्ट्रगीत झाले.इंटरपोलच्या अध्यक्षांनी पंतप्रधानांना बोन्साय झाडाचे रोप  भेट दिले. त्यानंतर, पंतप्रधानांनी 90 व्या इंटरपोल महासभेच्या निमित्ताने एक टपाल तिकीट  आणि 100 रुपयांचे नाणे जारी केले.

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, इंटरपोलचे अध्यक्ष अहमद नासेर अल रईस, इंटरपोलचे सरचिटणीस जुर्गन स्टॉक आणि सीबीआयचे संचालक   सुबोध कुमार जयस्वाल हे उपस्थित होते.

पार्श्वभूमी

इंटरपोलची 90 वी महासभा 18 ते 21 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत  195 इंटरपोल सदस्य देशांचे मंत्री, देशांचे पोलीस प्रमुख, राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोचे प्रमुख आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे.महासभा ही इंटरपोलची सर्वोच्च नियामक संस्था आहे आणि तिच्या कामकाजाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वर्षातून एकदा महासभेची बैठक होते.

इंटरपोल महासभेची  बैठक सुमारे 25 वर्षांच्या अंतरा नंतर भारतात होत आहे -  भारतात शेवटची बैठक 1997 मध्ये झाली होती.भारत स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करत असल्याच्या अनुषंगाने 2022 मध्ये नवी दिल्ली येथे इंटरपोलची महासभा  आयोजित करण्याचा भारताचा प्रस्ताव महासभेने प्रचंड बहुमताने स्वीकारला.हा कार्यक्रम भारताच्या कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थेतील सर्वोत्कृष्ट पद्धती संपूर्ण जगाला दाखविण्याची संधी प्रदान करतो.

 

 

G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 



(Release ID: 1868908) Visitor Counter : 346