पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोची मेट्रो आणि भारतीय रेल्वेच्या 4,500 कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण


‘‘विकसित भारताच्या या पथदर्शी प्रकल्पांमध्‍ये आधुनिक पायाभूत सुविधा मोठी भूमिका बजावू शकतात ’’

‘‘आम्ही भारतीय रेल्वेचा पूर्ण कायापालट करत आहोत; आज देशातील रेल्वे स्थानकेही विमानतळांप्रमाणे विकसित केली जात आहेत’’

‘‘कृषीपासून उद्योगापर्यंत या आधुनिक पायाभूत सुविधांमुळे केरळमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील’’

‘‘अमृत काळामध्ये पर्यटन विकासामुळे देशाच्या विकासाला मोठी मदत होईल’’

‘‘केरळमध्ये मुद्रा कर्ज योजनेमधून लाखो लघु उद्योजकांना 70 हजार कोटींपक्षा जास्त निधी दिला गेला’’

Posted On: 01 SEP 2022 10:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 सप्‍टेंबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोची मेट्रो आणि भारतीय रेल्वेच्या सुमारे 4,500 कोटी रूपयांपेक्षा अधिक प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. तत्पूर्वी  आज पंतप्रधान मोदी यांनी कोचीमधल्या कलाडी  या गावातल्या श्री आदि शंकराची जन्मभूमी असलेल्या क्षेत्राला भेट दिली. 

यावेळी उपस्थितांना  मार्गदर्शन करताना पंतप्रधान म्हणाले की, केरळचा प्रत्येक कानाकोपरा ओणमच्या पवित्र सणाच्या आनंदाने भरलेला आहे. ‘सुलभ राहणीमान’ आणि ‘व्यवसाय सुलभता’ वाढवणाऱ्या  प्रकल्पांचा प्रारंभ होत असल्याबद्दल त्यांनी संबंधित सर्वांचे अभिनंदन केले. या शुभप्रसंगी केरळला 4,600 कोटीं रूपयांपेक्षा जास्त खर्चाच्या संपर्क व्यवस्थेच्या प्रकल्पांची भेट दिली जात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृतकाळाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले, आगामी 25 वर्षांमध्ये भारतीयांनी विकसित भारत निर्माणाचा मोठा संकल्प केला आहे. विकसित भारताच्या या पथदर्शी प्रकल्पांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांचा मोठा वाटा आहे. ते पुढे म्हणाले,‘‘ 2017 मध्ये कोची मेट्रोचे उद्घाटन करण्याची संधी आपल्याला मिळाली होती, त्याची आठवण त्यांनी सांगितली.’’ पंतप्रधानांनी आज कोची मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या विस्ताराचे उद्घाटन केले आणि कोची मेट्रोच्या दुस-या टप्प्याची पायाभरणी आज केली. कोची मेट्रोचा दुसरा टप्पा तरूण आणि व्यावसायिकांसाठी वरदान ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ‘‘ वाहतूक आणि शहरी विकासाच्या बाबतीत संपूर्ण देशामध्ये नेतृत्वाच्या प्रेरणेमुळे विकास होत आहे, असे ते म्हणाले.

कोचीमध्ये ‘युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अॅथॉरिटी’च्या कामकाजाविषयी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, या प्राधिकरणाच्या माध्यमातून मेट्रो, बस आणि जलमार्ग अशा विविध वाहतूक साधनांच्या पद्धतींसाठी ही व्यवस्‍था एकत्रित कार्य करणार आहे. मल्टीमोडल कनेक्टिव्हिटीच्या या मॉडेलसह, कोची शहराला तीन फायदे होणार आहेत. यामुळे शहरातल्या लोकांचा प्रवासाला लागणारा वेळ कमी होईल, रस्त्यावरील वाहतूक कमी होईल आणि शहरातील प्रदूषण कमी होणार आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारताने शून्य प्रदूषणाची शपथ घेतली आहे, त्यालाही मदत होणार आहे. यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत मिळणार आहे, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.

गेल्या आठ वर्षांमध्ये केंद्र सरकारने मेट्रो हे  शहरामध्ये वाहतुकीचे प्रमुख माध्यम बनावे, यासाठी निरंतर काम केले आहे, याचा पुनरूच्चार पंतप्रधान मोदी यांनी केला. मेट्रो राजधानीपुरती मर्यादित न ठेवता, ती राज्याच्या इतर मोठ्या शहरांमध्येही धावेल, याचा विचार केला आहे, असे ते म्हणाले. आपल्या देशामध्ये पहिली मेट्रो सुमारे 40 वर्षांपूर्वी धावली आणि पुढील 30 वर्षांमध्ये केवळ 250 किलोमीटर मेट्रो मार्ग जोडण्यात आले, असे पंतप्रधानांनी सांगितले. गेल्या 8 वर्षात केलेल्या कामांची माहिती देण्यावर भर देताना ते म्हणाले, देशात 500 किलोमीटरपेक्षा जास्त मेट्रो मार्गांचा विकास करण्यास प्रारंभ झाला आहे. आणि 1000 किलोमीटर पेक्षा जास्त नवीन मार्गांवर काम वेगाने सुरू आहे. ‘‘ आम्ही भारतीय रेल्वेचा पूर्णपणे कायाकल्प करीत आहोत. आज देशातील रेल्वे स्थानकेही विमानतळांप्रमाणे विकसित केली जात आहेत,’’ असे पंतप्रधान मोदी यांनी पुढे सांगितले.

लाखो भाविकांच्या दीर्घकाळापासून असलेल्या मागणीविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, देशभरातील आणि जगभरातील शबरीमालाच्या भक्तांसाठी हा आनंदाचा प्रसंग आहे. इट्टुमनूर -चिंगावनम- कोट्टायम या मार्गाचे दुहेरीकरण केल्यामुळे भगवान अय्यप्पाचे दर्शन घेणे अधिक सुलभ होणार आहे’’ असे पंतप्रधान म्हणाले.

केरळमध्ये सुरू असलेल्या कामांवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले, आम्ही ज्याप्रमाणे आधी जाहीर सांगितले होते, त्याप्रमाणे 1 लाख कोटी रूपये खर्चाचे विविध पायाभूत सुविधा प्रकल्प आता आकाराला येत आहेत. कृषी क्षेत्रापासून ते उद्योगांपर्यंत, या आधुनिक पायाभूत सुविधांमुळे केरळमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.

केंद्र सरकार केरळच्या संपर्क व्यवस्थेवर खूप भर देत आहे. आमचे सरकार केरळची जीवनरेखा म्हणून ओळखला जाणारा राष्ट्रीय महामार्ग NH 66 देखील 6 पदरी करत आहे. यावर 55 हजार कोटींहून अधिक रुपये खर्च होत आहेत,” पंतप्रधान म्हणाले.

फायद्यांवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, उत्तम संपर्क व्यवस्थेचा सर्वाधिक फायदा पर्यटन आणि व्यापार क्षेत्राला होतो. पर्यटन हा असा उद्योग आहे, ज्यात गरीब, मध्यमवर्गीय, गाव, शहर, सर्वजण सामील होतात, प्रत्येकाला रोजीरोटी मिळते. “अमृत काळात पर्यटनाच्या विकासामुळे देशाच्या विकासात मोठी मदत होईल,” असेही पंतप्रधान म्हणाले.

केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, पर्यटन क्षेत्रातील उद्योजकतेसाठी विविध सवलती दिल्या जात आहेत. ते म्हणाले की मुद्रा योजना गरजूंना हमी न घेता 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात मदत करत आहे. पंतप्रधान म्हणाले, "केरळमध्ये या योजनेंतर्गत लाखो लघु उद्योजकांना मदतीचा हात म्हणून 70 हजार कोटींहून अधिक रुपयांचे सहाय्य करण्यात आले आहे."

केरळचे वैशिष्ट्य उलगडताना पंतप्रधान म्हणाले की, लोकांची सेवा आणि काळजी हा समाज जीवनाचा भाग आहे. ते म्हणाले, “काही दिवसांपूर्वी मला हरियाणातील माँ अमृतानंदमयी जी यांच्या अमृता रुग्णालयाचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली. करुणेने परिपूर्ण असलेल्या अमृतानंदमयी अम्मा यांचा आशीर्वाद मिळाल्याने मीही धन्य झालो. आज मी केरळच्या भूमीवरून पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो.

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मूलभूत मंत्रावर भर देऊन आणि या तत्त्वांच्या आधारे सरकार देशाचा विकास करत असल्याचे सांगत पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला. पंतप्रधानांनी अमृत काळात विकसित भारताचा मार्ग बळकट करण्याचे वचन दिले.

केरळचे मुख्यमंत्री, पिनाराई विजयन, केरळचे राज्यपाल, आरिफ मोहम्मद खान, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री, व्ही मुरलीधरन, राज्यमंत्री, पी राजीव आणि अॅड अँथनी राजू, खासदार, हिबी एडन, आणि कोची महानगरपालिकेचे महापौर अॅड एम अनिलकुमार यावेळी उपस्थित होते.

 

प्रकल्पांचा तपशील

पेट्टा ते एसएन जंक्शनपर्यंत कोची मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील विस्ताराचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. या प्रकल्पाची एकूण किंमत 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कोची मेट्रो रेल्वे प्रकल्प हा देशातील सर्वात शाश्वत मेट्रो प्रकल्पांपैकी एक असेल आणि त्याच्या उर्जेच्या गरजेपैकी जवळपास 55% गरज सौर ऊर्जेद्वारे पूर्ण केली जाईल. 11.2   किलोमीटर लांबीच्या आणि 11 स्थानके असणाऱ्या जेएलएन स्टेडियम ते इन्फोपार्क पर्यंतच्या कोची मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा -II भागाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली. या प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च सुमारे 1,950 कोटी रुपये आहे. कोची मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा प्रस्तावित टप्पा II कॉरिडॉर कोची शहराच्या वाढत्या वाहतूक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने आहे आणि जिल्हा मुख्यालय, विशेष आर्थिक क्षेत्र आणि शहराच्या माहिती तंत्रज्ञान केंद्राला विद्यमान मेट्रो रेल्वेशी  जोडेल अशा प्रकारे त्याचे नियोजन करण्यात आले आहे. पूर्ण झाल्यावर, टप्पा I आणि टप्पा II संयुक्त मेट्रो नेटवर्क शहरातील प्रमुख निवासी आणि व्यावसायिक केंद्रांना रेल्वे स्थानके आणि बस थांब्यांसारख्या प्रमुख वाहतूक केंद्रांशी जोडेल, अशा प्रकारे मल्टी-मॉडल एकत्रीकरण आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत संपर्क व्यवस्था संकल्पनेला बळकटी देईल.

सुमारे 750 कोटी रुपये खर्च करून पूर्ण झालेल्या कुरुपंथारा-कोट्टायम-चिंगवनम रेल्वे विभागाचे दुहेरीकरणही पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केले. यासह, तिरुअनंतपुरम ते मंगळुरुपर्यंतचा संपूर्ण पट्टा पूर्णत: दुहेरी झाला आहे, जो जलद आणि अखंड संपर्क व्यवस्थेचे आश्वासन देतो. विशेष म्हणजे, सबरीमाला भगवान अय्यप्पा मंदिरासाठी जाणारे लाखो भाविक दुहेरी मार्गावरील कोट्टायम किंवा चेंगन्नूर रेल्वे स्थानकावर सोयीस्करपणे उतरू शकतात आणि रस्त्याने पंबाकडे जाऊ शकतात. पंतप्रधानांनी कोल्लम-पुनालूर दरम्यान नवीन विद्युतीकृत रेल्वे विभाग देशाला समर्पित केला.

केरळमधील एर्नाकुलम जंक्शन, एर्नाकुलम टाउन आणि कोल्लम या तीन रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी सुद्धा  पंतप्रधानांनी पायाभरणी केली. या स्थानक पुनर्विकास प्रकल्पांची एकूण अंदाजे किंमत सुमारे 1050 कोटी रुपये आहे. ही रेल्वे स्थानके अत्याधुनिक सुविधा आणि जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असतील जसे की समर्पित आगमन/निर्गमन कॉरिडॉर, स्कायवॉक, सौर पॅनेल, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ऊर्जा-कार्यक्षम प्रकाश व्यवस्था, वर्षा जलसंचयन आणि इंटरमॉडल वाहतूक सुविधांनी सुसज्ज असतील.

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Kane/S.Bedekar/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1856163) Visitor Counter : 189