पंतप्रधान कार्यालय

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिलेले उत्तर


“माझं भाषण सुरु करण्यापूर्वी मी लता दिदींना श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या संगीताने त्यांनी प्रत्येक भारतीयाला एकत्र आणले.”

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, येत्या काळात भारत कशा प्रकारे जगाच्या नायकाची भूमिका निभाऊ शकतो याचा विचार करण्याचा योग्य काळ आहे”

“टीका ही लोकशाहीत आवश्यक आहे असे देखील आम्ही मानतो. मात्र प्रत्येक गोष्टीवर अंध टीका कधीच पुढे जाण्याचा मार्ग असू शकत नाही.”

“आम्ही जर व्होकल फॉर लोकल म्हणत असू, तर आम्ही महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण करत नाही आहोत का? मग विरोधी पक्ष त्याची खिल्ली का उडवत आहे?”

“आयुष्यात क्वचितच येणाऱ्या अशा मोठ्या जागतिक महामारीच्या काळात भारताने केलेल्या आर्थिक घोडदौडीची जगाने दखल घेतली आहे.”

“या महामारीत भारत सरकारने 80 कोटीपेक्षा जास्त देशवासियांना मोफत अन्नधन्य देण्याची सोय केली. एकही भारतवासी उपाशी राहणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

“भारताच्या प्रगतीसाठी छोट्या शेतकऱ्यांचे सक्षमीकरण महत्वाचे आहे. हे छोटे शेतकरी भारताच्या प्रगतीला बळ देतील”

“पंतप्रधान गतिशक्ती योजना आपल्या पायाभूत सुविधांच्या मार्गात असलेली आव्हाने पेलण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन देते”

“केवळ सरकार सगळ्या समस्या सोडवू शकते यावर आमचा विश्वास नाही, आमचा आमच्या देशातील जनतेवर विश्वास आहे, देशाच्या युवाशक्तीवर विश्वास आहे.”

“देशातले युवक, संपत्ती निर्माते आणि उद्योजकांच्या मनात भीती निर्माण करण्याच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही”

“संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता आणणे ही देशातील सर्वोच्च सेवेपैकी एक सेवा आहे”

“देश म्हणजे केवळ सत्ता किंवा सरकारची व्यवस्था नाही, तर आमच्यासाठी देश म्हणजे जिवंत आत्मा आहे”

Posted On: 07 FEB 2022 9:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला लोकसभेत उत्तर दिले. भाषण सुरु करण्यापूर्वी पंतप्रधानांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. माझं  भाषण सुरु करण्यापूर्वी मी लता दिदींना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या सूरांनी त्यांनी प्रत्येक भारतीयाला एकत्र आणले.

राष्ट्रनिर्मितीसाठी नवे संकल्प आणि पुन्हा प्रयत्न सुरु करण्याची गरज असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, येत्या काळात भारत कशा प्रकारे जगाच्या नेतृत्व भूमिका निभाऊ शकतो याचा विचार करण्याचा योग्य काळ आहे. ही देखील तितकेच खरे आहे, की भारताने गेल्या काही वर्षांत विकासाचे अनेक टप्पे पार केले आहेत, पंतप्रधान म्हणाले. ते पुढे म्हणाले की, कोरोना  नंतरच्या काळात जगात नवी व्यवस्था वेगाने आकार घेत आहे. हा एक महत्वाचा टप्पा आहे जिथे भारतीय म्हणून आपण ही संधी  दवडता कामा नये, पंतप्रधान म्हणाले.

विविध सुविधांच्या माध्यमातून नव्याने आत्मसन्मान प्राप्त करू लागलेल्या वंचित आणि गरीबांच्या बदलत्या स्थितीची पंतप्रधानांनी माहिती दिली.  पूर्वी गॅस जोडणी  हे स्टेटस सिम्बॉल म्हणजेच प्रतिष्ठेची ओळख होती  होते. आता, गरिबातील गरीब लोकांना ही सुविधा  उपलब्ध आहे आणि म्हणूनच ते खूप आनंददायक आहे. गरीबांची  बँक खाती देखील उघडली आहेत, थेट लाभ हस्तांतरण  सेवा वितरणात मदत करत आहे...हे मोठे बदल आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.  ते पुढे म्हणाले की जेव्हा गरीब व्यक्तीला त्याच्या  घरात वीज आल्यामुळे  आनंद होतो तेव्हा त्याचा आनंद देशाच्या आनंदाला बळ देतो. मोफत गॅस जोडणीमुळे गरीबांच्या  घरात धुरमुक्त स्वयंपाकघराचा आनंद निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी लोकशाहीच्या योग्य कामकाजाचे  महत्त्व अधोरेखित केले आणि भारताची अनेक शतके जुनी लोकशाही परंपरा अधोरेखित केली.  आपला लोकशाहीवर ठाम विश्वास आहे  आणि,आपण असेही मानतो की टीका हा लोकशाहीचा एक अविभाज्य  भाग आहे.मात्र  प्रत्येक गोष्टीला डोळे मिटून  विरोध करणे हा कधीच पुढे जाण्याचा  मार्ग नसतो, यावर त्यांनी भर दिला. राजकीय हेतूसाठी महामारीचा  वापर केल्याबद्दल पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला. लॉकडाऊनचे पालन करणार्‍याना तसेच  लोकांनी आहे तिथेच थांबावे असे  मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केलेले असूनही त्यांना मुंबई आणि दिल्ली इथून उत्तर प्रदेश आणि बिहारमधील त्यांच्या मूळ गावी जायला भाग पाडले गेल्याबद्दल त्यांनी टीका केली.

सर्वांचे समर्थन  मिळायला हवे अशा प्रयत्नांना आंधळा विरोध झाल्याबद्दलही  मोदींनी खेद व्यक्त केला. जर आपण स्थानिकांना प्रोत्साहन देण्याबाबत (व्होकल फॉर लोकल )  बोलत आहोत,म्हणजे  आपण महात्मा गांधींची स्वप्ने पूर्ण करत नाही  का? मग विरोधकांकडून त्याची खिल्ली का उडवली जात होती? आम्ही योग आणि फिट इंडियाबद्दल बोललो, त्याचीही  विरोधकांनी खिल्ली उडवली,असे  ते म्हणाले.  जगाने भारताच्या आर्थिक प्रगतीची दखल घेतली आहे आणि ती देखील शतकातून  एकदा येणाऱ्या जागतिक महामारीच्या काळात घेतली आहे असे ते पुढे म्हणाले.

पंतप्रधानांनी शंभर वर्षांपूर्वीच्या फ्लूच्या  साथीच्या आजाराची आठवण करून देताना सांगितले  की बहुतेक मृत्यू उपासमारीने झाले होते. . मात्र  सध्याच्या महामारीच्या  काळात, एकाही भारतीयाचा  उपासमारीने मृत्यू झाला नाही आणि सर्वात मोठ्या सामाजिक सुरक्षा उपायांपैकी एक उपाययोजना राबवली गेली यावर त्यानी भर दिला. .  भारत सरकारने हे सुनिश्चित केले की 80 कोटींहून अधिक देशबांधवांना  महामारीच्या काळात मोफत अन्नधान्य मिळेल.  एकाही भारतीयाला  उपाशी रहावे लागू नये  ही आमची वचनबद्धता आहे, असे ते म्हणाले.

गरिबीला  सामोरे जाण्याचा एकमेव प्रभावी मार्ग म्हणजे छोट्या शेतकऱ्यांच्या चिंतेची काळजी घेणे  यावर पंतप्रधानांनी भर दिला. अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे फार पूर्वीपासून दुर्लक्ष झाले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ज्यांनी देशावर इतकी वर्षे राज्य केले आणि ज्यांना आलिशान घरांमध्ये राहण्याची  सवय लागली  ते छोट्या शेतकर्‍यांच्या हिताबद्दल आवाज उठवायला विसरले आहेत. भारताच्या प्रगतीसाठी छोट्या शेतकऱ्याला सक्षम करणे महत्त्वाचे आहे. छोटा शेतकरी भारताच्या प्रगतीला आणखी बळ देईल,’ असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी प्रशासन आणि प्रकल्पाच्या कामाची पद्धत याविषयी सरकारच्या दृष्टीकोनावर सखोल विचार व्यक्त केला. हे सांगताना उत्तर प्रदेशातल्या शरयू कालव्याच्या राष्ट्रीय प्रकल्पासारखे महत्वाचे, मोठे प्रकल्प दीर्घकाळ प्रलंबित होते, ते विद्यमान सरकारने पूर्ण केले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेचा दाखला दिला आणि पायाभूत सुविधा विकसित करण्याचे आव्हान कशा प्रकारे पूर्ण केले  याची माहिती दिली आणि  त्यामुळे उद्योग व्यवसायांना योग्य प्रकारे संपर्क यंत्रणा उपलब्ध देण्यावर आपल्या सरकारने भर दिल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. या सरकारने एमएसएमईची व्याख्याच पूर्ण बदलली आहे त्यामुळे या क्षेत्राला मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

आत्मनिर्भरतेविषयी एक नवीन विचार पद्धती रूढ  करण्याचे काम आपल्या सरकारने केले आहे, त्यामुळेच नवोन्मेषी धोरणांना पुढे नेणे शक्य होत आहे, तसेच देशातल्या प्रतिभावान युवावर्गाला नवनवीन क्षेत्रांची दालने मुक्त होत असल्याचे  पंतप्रधानांनी  यावेळी अधोरेखित केले. सर्व समस्या केवळ सरकारच सोडवू शकते, असे आपल्याला वाटत नाही. आमचा देशातल्या लोकांवर, देशातल्या तरूणांवर विश्वास आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी स्टार्टअप क्षेत्राची माहिती दिली. देशामध्ये ज्या प्रकारे स्टार्टअप्सची वाढलेली संख्या आपण पाहतो, त्यावरून आपल्या लोकांचे सामर्थ्य दिसून येते, असेही ते म्हणाले. तसेच अलिकडच्या काळामध्ये दर्जेदार युनिकॉर्नची वृद्धी झाली आहे, या गोष्टीवर त्यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘‘तरूणांना,संपत्ती निर्माण करणा-यांना, उद्योजकांना घाबरवून टाकले जावे, असा दृष्टिकोन आमचा नाही’’.सन 2014 पूर्वी देशात फक्त 500 स्टार्टअप्स होते, आणि आता गेल्या अवघ्या सात वर्षांमध्ये देशातल्या स्टार्टअप्सची संख्या 60 हजारांपर्यंत पोहोचली आहे इतकेच नाही तर भारत आता युनिकॉर्न्सचे शतक पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तसेच स्टार्टअप्सच्या बाबतीत भारत जगामध्ये तिस-या स्थानावर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, ‘‘ मेक इन इंडियाची खिल्ली उडवणे म्हणजे भारताच्या उद्योजकतेची, भारतीय तरूणांची आणि उद्योग माध्यमांची थट्टा केल्यासारखे आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये स्वावलंबी असणे म्हणजे सर्वात मोठ्या देशसेवांपैकी एक असल्याचे त्यांनी संगितले.

पंतप्रधान म्हणाले की, मागच्या काळामध्ये जागतिक समस्यांचे कारण देऊन महागाई झाली असल्याचे सांगितले जात होते. मात्र आज जागतिक समस्या बनलेल्या महामारीच्या संकटकाळातून भारतही जात आहे, तरीही तसे कारण न देता आपला देश महागाईच्या समस्येचे निराकरण करीत आहे.

पंतप्रधान म्हणाले, ‘‘ राष्ट्र म्हणजे आमच्यासाठी एक जिवंत आत्मा आहे, केवळ सत्ता आणि सरकारची व्यवस्था नाही.’’ भारताच्या संस्कृतीमध्ये सर्वसमावेशकता आहे हे सांगताना त्यांनी पुराणातले आणि सुब्रमण्यम भारती यांच्या साहित्यातले दाखले देऊन त्यामधून भारत म्हणजे जिवंत आत्मा असल्याचे स्पष्ट होत असल्याचे नमूद केले. तामिळनाडूतल्या लोकांनी मुख्य संरक्षण अधिकारी जनरल बिपीन रावत यांना दिलेला आदर म्हणजे संपूर्ण भारताच्या राष्ट्रीय भावनेचे उदाहरण आहे, असेही त्यांनी सांगितले.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतकाळामध्ये देशाच्या विकासकार्यामध्ये  सर्व राजकीय पक्षांनी, नागरिकांनी आणि तरूणांनी सकारात्मक भावनेने योगदान द्यावे, असे आवाहन करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

JPS/SP/RA/SK/SB/PM

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1796319) Visitor Counter : 274