पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उत्तरप्रदेशातील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कोनशिला समारंभ


“हे विमानतळ या संपूर्ण प्रदेशाला राष्ट्रीय गतिशक्ती बृहद आराखड्याचे एक शक्तिमान प्रतीक बनवेल”-पंतप्रधान

“पश्चिम उत्तरप्रदेशातील हजारो लोकांना या विमानतळामुळे नवा रोजगार उपलब्ध होईल”

“दुहेरी इंजिनाच्या सरकारांच्या प्रयत्नांमुळेच, आज उत्तर प्रदेश, देशातिल एक सर्वाधिक संपर्क व्यवस्था असलेला प्रदेश बनतो आहे.”

“खुर्जा इथले सिरॅमिक कारागीर, मीरतचा क्रीडा उद्योग, सहारनपूरचे लाकूडकाम, मुरादाबादचा ब्रास उद्योग, आग्राची पादत्राणे आणि पेठा उद्योग या सगळ्या लघुउद्योगांना नव्या पायाभूत सुविधांमुळे पाठबळ मिळेल.”

“आधीच्या सरकारांनी उत्तरप्रदेशाला खोटी स्वप्ने दाखवली, मात्र आज हेच राज्य केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवत आहे.”

“पायाभूत सुविधा राजकारणाचा विषय असू शकत नाहीत, तर तो राष्ट्रकारणाचा विषय आहे.”



Posted On: 25 NOV 2021 5:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तरप्रदेशात नोएडा इथे, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पायाभरणी समारंभ झाला. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया, जनरल व्ही. के. सिंह, संजीव बलियान, एस.पी. सिंह बघेल आणि बी. एल. वर्मा हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या जाहीर सभेत बोलतांना पंतप्रधान म्हणाले, की नव्या भारतात आज एकविसाव्या शतकातल्या सर्वोत्तम आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जात आहे. उत्तम रस्ते, उत्तम रेल्वे दळणवळण, उत्तम विमानतळे हे केवळ पायाभूत सुविधा प्रकल्प नाहीत, तर ते एखाद्या प्रदेशाचा संपूर्ण कायापालट करतात, तिथल्या लोकांच्या जीवनमानात आमूलाग्र परिवर्तन घडवतात. असे पंतप्रधान म्हणाले.

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ उत्तर  भारताला लॉजिस्टीक सुविधा पुरवणारे महाद्वार सिद्ध होईल. हे विमानतळ राष्ट्रीय गतिशक्ती बृहद आरखडयाचे प्रत्यक्ष प्रतीक असेल, असेही मोदी पुढे म्हणाले.

पायाभूत विकासाचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम सांगताना ते म्हणालेया विमानतळाच्या बांधकामामुळे, इथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्याशिवाय विमानतळ तयार झाल्यावर देखील तिथे अनेकांची गरज भासेल. त्यामुळेच, पश्चिम उत्तरप्रदेशात हजारो लोकांसाठी या विमानतळामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील., असे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्याला सात दशके पूर्ण झाल्यानंतर, पहिल्यांदाच उत्तरप्रदेशाला त्याच्या हक्काच्या सोयी सुविधा मिळत आहेत. दुहेरी इंजिनांच्या सरकारमुळेच, आज उत्तरप्रदेश देशातील सर्वोत्तम संपर्कव्यवस्था असलेले राज्य बनले आहे.

देशातील नागरी हवाई वाहतूक क्षेत्राच्या विकासात नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची भूमिका महत्वाची ठरेल. तसेच, हे विमानतळ, विमानांची देखभाल, दुरुस्ती आणि कार्यान्वयनाचे महत्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. इथल्या 40 एकर परिसरात, देखभाल, दुरुस्ती च्या एमआरओ सुविधा विकसित केल्या जात असून इथे शेकडो युवकांना रोजगार मिळेल, असेही ते म्हणाले. आज भारत, हजारो कोटी रुपयांचा खर्च करुन, परदेशातून या सुविधा मिळवत आहे.

एकात्मिक बहु-मोडल म्हणजेच वाहतुकीचे विविध पर्याय एकाच ठिकाणी असलेल्या मालवाहतूक केंद्राविषयी बोलतांना ते म्हणाले, की चहूबाजूंनी भू-सीमा असलेल्या उत्तरप्रदेश सारख्या राज्यासाठी, हे केंद्र अत्यंत उपयुक्त ठरेल. हे केंद्र, अलिगढ, मथुरा, मीरत, आग्रा, बिजनौर, मुरादाबाद आयनई बरेली औद्योगिक केंद्रांसाठी हे सेवाकेंद्र म्हणून कामी पडेल. खुर्जा इथले सिरॅमिक कारागीर, मीरतचा क्रीडा उद्योग, सहारनपूरचे लाकूडकाम, मुरादाबादचा ब्रास उद्योग, आग्राची पादत्राणे आणि पेठा उद्योग या सगळ्या लघुउद्योगांना नव्या पायाभूत सुविधांमुळे पाठबळ मिळेल, असं विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उत्तरप्रदेशाला आधीच्या सरकारांनी कायम अंधारात आणि सुविधापासून वंचित ठेवले. ज्या उत्तरप्रदेशाला आधीच्या सरकारांनी कायम खोटी स्वप्ने दाखवलीत, तेच राज्य आता केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवत आहे. असे मोदी म्हणाले. आधीच्या सरकारांनी पश्चिम उत्तरप्रदेशाकडे कसे दुर्लक्ष केले याचे उदाहरण म्हणजेजेवर विमानतळ आहे, असे ते म्हणाले. दोन दशकांपूर्वी, उत्तरप्रदेशातील भाजपा सरकारने, या प्रकल्पाची संकल्पना तयार केली होती. मात्र, नंतरच्या काळात, दिल्ली आणि लखनौच्या सरकारांच्या राजकीय मतभेदांमुळे, कित्येक वर्षे या विमानतळाचे काम रखडले. याआधी उत्तरप्रदेशात जे सरकार होते, त्यांनी हा प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवावा, असे पत्र केंद्र सरकारला लिहिले आहे, मात्र, आता दुहेरी इंजिनाच्या सरकारांच्या प्रयत्नामुळेच, आज याच विमानतळाचे भूमिपूजन होतांना आपण पाहतो आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पायाभूत सुविधा, राजकरणाचा भाग असू शकत, नाही तर ते राष्ट्रकारणाचा विषय आहे.  असे पंतप्रधान म्हणाले. आता कोणतेही प्रकल्प रखडणार नाहीत, अर्धवट राहणार नाहीत किंवा बासनात गुंडाळले जाणार नाहीत, हे आम्ही सुनिश्चित करतो आहोत. एवढेच नाही, तर पायाभूत सुविधा प्रकल्प, निश्चित वेळेत पूर्ण होतील, याचीही आम्ही काळजी घेतो.

आपल्या देशातील काही राजकीय पक्षांसाठी आपले हितच सर्वात महत्वाचे आहे, अशी टीका मोदी यांनी केली. अशा लोकांच्या विचार केवळ स्वहितापुरता मर्यादित असतो, त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबांचा विचार, हेच त्यांचे ध्येय असते. मात्र आमच्यासाठी ‘देश प्रथम’हे तत्व महत्वाचे सबका साथ- सबका विकास, सबका विश्वास- सबका एफर्ट्स’ हाच आमचा मंत्र आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

केंद्र सरकारने अलीकडेच हाती घेतलेल्या काही उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. 100 कोटी लसी देण्याचा महत्वाचा टप्पा, नेट झीरो उद्दिष्ट 2070 पर्यंत साध्य करण्याचा संकल्प, कुशीनगर विमानतळ, उत्तरप्रदेशात नऊ विमानतळे, नवी धरणे आणि सिंचन प्रकल्प, संरक्षण मार्गिका, पूर्वाचल एक्सप्रेस, आदिवासी गौरव दिन, भोपाळमधील आधुनिक रेल्वे स्थानक, पंढरपूर येथील राष्ट्रीय महामार्ग, आणि आज नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी, या सर्व प्रकल्पाचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, आमच्या देशभक्ती आणि राष्ट्रीय सेवेच्या भावनेपुढे, काही राजकीय पक्षांची स्वार्थी धोरणे टिकाव धरु शकत नाहीत.

 

 

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1775070) Visitor Counter : 243